• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

Romance डॉलर बहू

  • Thread starter Thread starter StoryPublisher
  • Start date Start date
S

StoryPublisher

Guest
डॉलर बहू

बेंगळूरहून मिरजेकडे जाणाऱ्या कित्तूर-चन्नम्मा एक्सप्रेसची चंद्रू अस्वस्थ मनानं वाट पाहत होता.

त्याला स्टेशनवर येऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही गाडीचा पत्ता नव्हता.

चंद्रूचा धाकटा भाऊ गिरीशही त्याच्याबरोबर होता. पण `आलोच एका मिनिटात दोन पेपर घेऊन!-’ असं सांगून तो जो निघून गेला होता, तो अर्धा तास होऊन गेला तरी आला नव्हता. चंद्रू मनातल्या मनात चडफडत पुन्हा-पुन्हा घड्याळ पाहत होता.

रेल्वे सावकाश स्टेशनमध्ये शिरताना दिसली. ती सावकाश प्लॅटफॉर्मला लागली तेव्हा चंद्रूच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात कातरता भरली होती. वाटत होतं, आजवर न पाहिलेलं गाव - धारवाड! कसं आहे कोण जाणे!

आयुष्यात प्रथमच आपलं लाडकं आणि चिरपरिचित माहेर सोडून अपरिचित पतीमागून आनंदानं, तरीही कातर मनानं जाणाऱ्या नव-विवाहितेसारखी चंद्रूची मन:स्थिती झाली होती.

बेंगळूर, मंड्य, मैसूर, शिवमोगा ह्या प्रदेशापलीकडे चंद्रू आजवर कधीही गेला नव्हता. आता शिक्षण संपल्यावर पहिल्या-वहिल्या नोकरीच्या निमित्तानं तो धारवाडला निघाला होता.

धारवाडमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. आज-काल नोकरी मिळणंच कठीण असल्यामुळे हाताला लागलेली पहिली नोकरी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. गावाचा मोह मोठा, की पैशाचा मोह मोठा ? राष्ट्रीय बँकेत टेक्निकल ऑफिसरच्या हुद्द्यावर काम करायचं म्हणजे चांगलीच नोकरी म्हणायची! त्यामुळे निरुपायानं तो धारवाडला जायला तयार झाला होता.

कुठूनतरी अचानक समोर आलेला गिरीश म्हणाला, `गाडी आली चंद्रू. चल, सामान दे.’

चंद्रू विचाराच्या तंद्रीतून भानावर आला. या गिरीशचा स्वभावच असा! क्षणभरही निवांत म्हणून राहणार नाही हा! सतत काही ना काही धावपळ चालूच असते याची!-

चंद्रू आपल्या जागेवर बसला. गाडी सुटताच त्यानं प्लॅटफॉर्मवरच्या गिरीशला हात हलवून निरोप दिला. गाडीनं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला आणि ती धावू लागली. बघता-बघता गिरीशचा हलणारा हात नजरेआड झाला.

गाडीनं वेग घेताच चंद्रूनं आत नजर टाकली. शेजारपाजारचे प्रवासीही काही वेळ आपापलं सामान नीट लावण्यात आणि आपसात गप्पा मारण्यात गढून गेले.

`यंदा पाऊस काय करतोय कोण जाणे!’

`गेल्या वर्षी बरा झाला पाऊस! यम्मी केरि- म्हशींचं तळं पूर्ण भरून गेलं होतं.’

`त्याच्या मागच्या वर्षी- सांगतो मी- घटप्रभेचा धबधबा अस्सा भरून वाहत होता म्हणून सांगू! मस्त दिसत होता!’

चंद्रू ऐकत होता. मनातल्या मनात तो गडबडला होता. भोवतालची माणसं त्याच्या मातृभाषेतच- म्हणजे कन्नडमध्येच- बोलत होती. पण त्याला त्यातले कितीतरी शब्दांचे अर्थच समजत नव्हते! एखादी परक्या प्रांतातली भाषा ऐकावी तसं वाटून तो कावरा-बावरा झाला होता.

तपकिरी रंगाचा कोट आणि काळी टोपी घातलेले एक प्रौढ गृहस्थ तळहातावर तंबाखू अंगठ्यानं मळता-मळता शेजारी बसलेल्या पागोटेवाल्या गृहस्थांना बजावून सांगत होते, `तू काहीही म्हण- पण मला तर हुक्केरी बाळप्पाची गाणीच आवडतात.’

यावर ते पागोटं आणि धोतरवाले गृहस्थ जोरात सांगत होते, `असेल! पण मला मात्र बाले खाँ साहेबांची सतार फार आवडते.’

मुकाट्यानं बसलेल्या चंद्रूलाही बोलण्यात ओढत त्यांनी विचारलं, `कुठल्या गावाला निघालाय?’

`धारवाडला.’

`असं होय! धारवाडला कुणाच्या घरी?’

अरेच्चा! हा काय प्रकार आहे? साऱ्या धारवाडमधल्या प्रत्येक घराची ओळख असल्यासारखं विचारताहेत हे!

`कुठल्याच घरी नाही.’

`मग? नोकरीसाठी निघालाय वाटतं!’

`होय.’ चंद्रूनं निरुत्साहानं सांगितलं. पुढचं संभाषण टाळण्याचा हेतू त्यात स्पष्ट होता.

धारवाडमध्ये त्याचा दूरचा नातेवाईक कृष्णमूर्ती राहत होता. कृष्णमूर्ती, म्हणजे किटीच्या घरची माणसं मूळची बेंगळूरची असली तरी, गेली कितीतरी वर्षं धारवाडला राहत होती. किटीच्या वडिलांनी तर तिथं स्वत:चं घरच बांधलं होतं.

किटीलाही धारवाडमध्येच नोकरी लागली होती. तो आणि चंद्रू साधारण बरोबरीच्या वयाचेच होते. आता किटीची कन्नड भाषाही बेंगळूरी ढंग सोडून धारवाडी ढंगाची झाली होती.

चंद्रूला घेऊन जाण्यासाठी आपण स्टेशनवर येत असल्याचं किटीनं कळवलं होतं. त्याच्या घरी जास्तीतजास्त आठवडाभर राहता येईल. वेगळी खोली किंवा घर बघण्यासाठी त्यानं किटीलाही सांगून ठेवलं होतं. किटीनं घर पाहून ठेवलंय की नाही, देव जाणे!

गाडी तुमकूरला थांबली. काळ्या टोपीवाल्या गृहस्थांनी चंद्रूला विचारलं, `आमच्याबरोबर जेवताय काय ? चपात्या आहेत.’

चंद्रू चकित झाला. अपरिचित तरुणाला आपल्याबरोबर जेवायला बोलवण्याइतकं औदार्य किती माणसांत पाहायला मिळतं? नकळत त्याच्या आवाजात सौम्यपणा आला,

`नको-नको! थँक्स! मी जेवण करूनच घराबाहेर पडलो.’

सहप्रवाशांनी आपापले जेवणाचे डबे उघडले. चंद्रू बाहेरच्या मैदानावर नजर खिळवून उद्याचा विचार करण्यात गढून गेला.

सुरेख, सुमधुर स्वर! कुणीही मोहून जावं असे स्वर!

चकित झालेल्या चंद्रूच्या मनाला ग्रासून टाकणारे सारे विचार क्षणार्धात नाहीसे झाले आणि त्याचं मन त्या स्वरांवर एकाग्र झालं.

पार्टिशनच्या पलीकडून गाणं ऐकू येत होतं-

`वसंत बनी ती गाते कोकिळ

राजमुद्रेची तिला न आशा-’

कोकिळाकंठी कुणी गायिका पलीकडे अति-सुरेल स्वरात आत्ममग्न होऊन गात होती. कुठल्याही वाद्याची साथ नाही-साधं सरळ भावपूर्ण गाणं!

अगदी हलक्या आवाजात गाणं सुरू झालं. बघता-बघता डब्यातले इतर सारे आवाज थांबले. केवळ गाण्याचा आवाज चढत राहिला आणि काही क्षणातच त्यानं संपूर्ण डबा भारून टाकला. सारेच माना डोलावत तल्लीन होऊन गाणं ऐकत होते.

चंद्रू त्या गंधर्व-लोकातल्या गंधर्व-गायनात पूर्णपणे बुडून गेला होता. मागं राहिलेल्या बेंगळूरचं आणि पुढं येणाऱ्या धारवाडचं भानही काही क्षण त्याला राहिलं नाही.

गाणं संपलं. पाठोपाठ हसण्याचा किलकिलाट कानांवर आला तेव्हा चंद्रू भानावर आला. तो तरुणींचा आवाज ऐकताना त्याला आपण कित्तूर-एक्सप्रेसमध्ये असल्याची जाणीव झाली.

पाठोपाठ मागणी झाली, `वन्स मोअर! वन्स मोअर, विनू.’

अच्छा ! या अभिनव लता मंगेशकरचं नाव `विनू’ आहे तर! पण विनू म्हणजे काय? वनिता? वंदना? त्या सुरेल स्वराच्या मालकिणीला पाहण्याची इच्छा चंद्रूच्या मनात प्रबल झाली.

पार्टिशनमागून धारवाडी कन्नड भाषेत तोच स्वर पुन्हा ऐकू आला, `नको गं बाई! पुरे आता माझं गाणं! साडेदहा वाजून गेले आहेत. लवकर झोपलं नाही तर धारवाडऐवजी पुढं लोंढ्याला उतरायची पाळी येईल!’ त्या विनूनं आणखी गाणी म्हणायचा प्रस्ताव धुडकावून टाकला.

चंद्रूला त्या बोलण्यामुळे बरं वाटलं. म्हणजे ही विनू आणि तिच्या मैत्रिणीही धारवाडला उतरणार आहेत तर! चंद्रूचा उत्साह द्विगुणित झाला.

`विनू, तुलाच गान-गंधर्व पुरस्कार मिळायला हवा बघ! कालच्या स्पर्धेत तुझाच पहिला नंबर येणार याविषयी आमच्या मनात तरी तिळभरही शंका नव्हती!’

म्हणजे या सगळ्या बेंगळूरला कुठल्याशा गायनाच्या स्पर्धेसाठी आल्या होत्या तर! तिथं या विनूला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं तर त्यात काहीही आश्चर्य नाही- चंद्रूच्या अंतर्मनानं न पाहिलेल्या विनूच्या वतीनं निर्वाळा दिला.

`खरंच गं! काल तू `तुंगा-तीर विहारी’ गात होतीस तेव्हा जज्जांसह सगळेच कसे माना डोलावत होते!’

`ते सगळं ठीक आहे! पण आता गाणं बंद! उद्या दुपारी लेडीज-रुममध्ये हवं तर म्हणेन. समजलं?’

बहुधा मैत्रिणींना एवढं बजावत विनू उठून उभी राहिली असावी. काचेच्या बांगड्यांचे आवाज ऐकू आले. चंद्रूच्या ज्ञानात आणखी भर पडली- या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली दिसताहेत.

`एक्सक्यूज मी! मिस्टर- उठता ना?’ तोच आवाज. चंद्रूनं मान वर करून पाहिलं.

गोरापान वर्ण, मोठाले काळेभोर डोळे, सरळ टोकदार नाक, दाट काळेभोर केस- अपरिचित तरुणाबरोबर बोलत असल्यामुळे चेहऱ्यावर उमटलेले मिश्र भाव- एका हातात बेडशिट आणि उशी, दुसऱ्या हातात तिकीट.

`माझी सीट आहे ही.’

चंद्रूचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो तिच्याकडेच भान हरपून पाहत राहिला होता. धारवाडी काठा-पदराची साधी सुती साडी आणि लाल काचेच्या बांगड्या घातलेल्या निराभरण सुंदर युवतीनं त्याची ही गत केली होती!

`हा माझा बर्थ आहे.’ तिनं पुन्हा सांगितलं तेव्हा चंद्रू भानावर आला.

तिच्या बोलण्याचा अर्थ समजताच तो उत्तरला, `नाही. हा माझा बर्थ आहे- जी अठ्ठावीस!’

`नाही- हा पाहा- जी अठ्ठावीस-’ तिनं तिकीट दाखवत म्हटलं. त्याच कोकिळकंठी सुंदरीच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द त्याला पुन्हा गुंगवून गेले.

सुरेल स्वराची धनीण सुंदरही असली पाहिजे, असं काही नसतं. पण विनूचं सौंदर्यही स्वरांइतकंच अनुपम होतं.

दोघांनाही एकच बर्थ दिल्याचं दोघांच्याही लक्षात आलं. ज्यानं ही चूक केली तो क्लार्क आता बेंगळूरात आपल्या घरी पांघरुण ओढून गाढ झोपला असेल! पण आता काय करायचं?

चंद्रू उठला आणि टी. सी. ला शोधायला गेला. विनू जी अठ्ठावीस बर्थवर मट्‌कन बसली.

चंद्रूबरोबर आलेल्या टी. सी.नं स्थितप्रज्ञ वृत्तीनं दोघांच्याही तिकिटांवर नजर टाकली आणि ही एक नेहमीचीच सर्वसामान्य घटना असल्याप्रमाणे म्हणाला, `विनिता - एफ - एकोणीस- जी अठ्ठावीस- आणि चंद्रशेखर - एम - चोवीस- जी अठ्ठावीस- दोघांनाही एकच नंबर दिलाय खरा! तूर्त काहीतरी अॅडजेस्ट करून घ्या. पुढच्या स्टेशनवर बघूया काय करता येईल ते!’

अशा प्रकारे काहीही निश्चित न सांगता, आडव्या भिंतीवर दिवा ठेवल्यागत बोलून तो निघून गेला. चंद्रूपुढे प्रश्न उभा राहिला- या देखण्या विनूबरोबर कसं `अॅडजेस्ट’ करायचं?

निरुपायानं चंद्रू म्हणाला, `तुम्ही बर्थवर झोपा. आत्ता तरी मी होल्डॉल खोलून खालीच झोपतो.’

विनिताही संकोचून म्हणाली, `माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास.’
 
`छे :! यात तुमचा काय दोष?’

पुढं काही न बोलता विनिता पलीकडे वळून झोपली. चंद्रूही होल्डॉल खोलून आडवा झाला. न राहवून त्याची तिच्याकडे नजर गेली. विनिताची जाड आणि लांबसडक नागवेणीही विसावलेली त्याला दिसली.

डोळे मिटले तरी गाण्याचे ते स्वर चंद्रूच्या कानात रुणझुणत होते. गाडी मंद लयीत हेलकावत होती. त्याच तंद्रीत चंद्रूला गाढ झोप लागली.

घाईघाईनं एका हातात सूटकेस आणि दुसऱ्या हातात कसाबसा गुंडाळलेला होल्डॉल घेऊन लुंगी नेसून स्टेशनवर उतरलेल्या चंद्रूला कुणाच्यातरी हास्याचा गडगडाट ऐकू आला.

हौशी आणि छान-छोकीनं राहणाऱ्या चंद्रूच्या दृष्टीनं हे अगदीच अपमानास्पद होतं.

स्टेशनवर येणाऱ्या किटीला कसं टेचात सामोरं जायचं याविषयी त्यानं बरंच काही ठरवलं होतं. इस्त्रीचे रुबाबदार कपडे- त्यावर सेंटचा घमघमाट- ऑफिसरच्याच थाटात स्टेशनवर उतरायचा घाट चंद्रूनं घातला होता. पण प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच!

रेल्वे अलिप्तपणे पुढच्या प्रवासासाठी धावू लागली. चंद्रूनं धारवाड स्टेशनावरून नजर फिरवली.

छोटंसं स्टेशन. बेंगळूरमधल्या मल्लेश्वरम स्टेशनसारखं. स्वच्छ स्टेशन. मोजकीच माणसं इथं-तिथं वावरत होती. रेल्वे निघून गेल्यावर स्टेशन आणखी शांत वाटू लागलं.

चंद्रूनं अपेक्षेनं भोवताली पाहिलं, पण ती कोकिळकंठी रूपसुंदरी कुठंही दिसली नाही. ती आणि तिच्या मैत्रिणी केव्हा निघून गेल्या होत्या कोण जाणे!

हातातलं सामान ठेवून लुंगी सावरत चंद्रूनं पाहिलं- समोरच किटी उभा होता.

त्यानंच खदाखदा हसत विचारलं, `हे काय रे चंद्रू? तू रेल्वेनं आलास की पायी चालत?’ पाठोपाठ त्यानं जुन्या सलगीनं पाठीवर थाप मारली. त्या सलगीच्या थापेसरशी चंद्रूची पाठ वाकलीच!

`सॉरी किटी! काय सांगू तुला- भयंकर झोप आली होती. टी. सी. नं `धारवाड आलं तुमचं! उठा -’ म्हणून जागं केलं तेव्हाच जागा झालो!’

`टी. सी. नं उठवलं नसतं तर तू बेळगावला किंवा मिरजेलाच गेला असतास सरळ!’- म्हणत किटीनं चंद्रूच्या सामानाला हात घातला.

`पाच मिनिटं थांब, किटी! मी अशा अवतारात येणार नाही. आता कपडे बदलून येतो-’ म्हणत चंद्रू वेटिंग रुमच्या दिशेनं गेला.

तो कपडे बदलून आला, तोवर सिटीबस निघून गेली होती. रिक्षावाल्याबरोबर किटी वाटाघाटी करत होता.

लुकड्या घोड्याचा टांगा बघून चंद्रू म्हणाला, `किटी, तुमच्या गावातल्या रथातून जायचं काय?’

दोघंही टांग्यात चढले. आळस झटकून नुकतंच जागं झालेलं धारवाड शहर मंद हसत होतं. टांग्यातून जाताना चंद्रू आश्चर्यानं त्याचं निरीक्षण करत होता.

उंच चढाच्या रस्त्यावर घोडं धापा टाकू लागलं. हे चंद्रूला पाहावेना. तो म्हणाला, `बाबा रे! मला स्वर्गाची काही कल्पना नाही! पण या घोड्याच्या नरक-यातना मला बघवत नाहीत.’

तो टांग्यातून खाली उतरला. पुन्हा उतार लागताच टांग्यात चढला. किटी मात्र याकडे नेहमीचीच गोष्ट असल्याप्रमाणे हसत बघत होता.

टांग्याचा आवाज ऐकून शांतम्मा बाहेर आल्या.

`ये चंद्रू, ये! बरा आहेस ना? कसा झाला प्रवास?’

`छान झाला.’ चंद्रू म्हणाला. सुरेल स्वरांची सोबत असल्यावर प्रवास उत्तम होणारच ना!

`चंद्रू, आज मी रजाच काढलीय! तुला धारवाड गाव दाखवतो.’ इडली खात किटीनं सांगितलं.

`ते राहू दे. आधी आपण घर बघूया.’

`अरे, असा काय करतोयस? इथंच आमच्या घरी का राहात नाहीस?’

`हा काही एक-दोन दिवसांचा प्रश्न नाही, किटी! इथं नोकरीसाठी मी जितके दिवस थांबेन, तितके दिवस मला खोली हवीच ना!’

`का रे? इथं येऊन कामावर हजर होण्याआधीच इथून जाण्याचा सूर काढतोयस!’

`तसं नव्हे रे! नाही म्हटलं तरी हे काही आपलं गाव- आपला प्रदेश नाही. इथं आपले कुणी मित्र नाहीत की कुणी नातेवाईक नाहीत. पहिलीच नोकरी सोडायची नाही म्हणून मी एवढ्या लांब आलोय. तिथंही दोन इंटरव्ह्यू देऊन आलोय. बेंगळूरमध्येच एखादी नोकरी मिळाली, पगार थोडा कमी असला तरी चालेल- पण मी लगोलग निघून जाईन हे मात्र नक्की!’

`बरं, तुझा आग्रहच असेल तर बघू या. चार जणांना सांगून ठेवू या. इथं लवकर घरं मिळतात. तुझ्या छोट्या ब्रह्मचाऱ्याच्या संसाराला एखादी छोटी खोलीही पुरेशी आहे.’ किटी म्हणाला.

एका दिवसात सारं धारवाड पाहून झालं. धारवाड विद्यापीठाचा परिसर, सोमेश्वराचं देऊळ आणि कित्तूर चन्नम्मा पार्कही पाहून संपलं.

`चंद्रू, मला तर धारवाडची फारच सवय झाली आहे. इथंच शिक्षण झालंय. गावभर भरपूर मित्र आहेत. काही कारणानं परगावी जावं लागलंच तर माझा श्वास कोंडल्यासारखा होतो.’

`खरंच! प्रत्येकाला आपापल्या गावाविषयी असंच वाटतं!’ चंद्रू उत्तरला.

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरव्या रंगाचा महोत्सव चालला होता. शेकडो फुलांचे ढीग मनाला भुरळ घालत होते. धारवाडची तांबडी माती चपलांशी सलगी वाढवू पाहत होती. चाफ्याच्या सुगंधाबरोबर शेवंतीचं संमेलन चाललं होतं. धारवाडचं वातावरण कितीही अरसिक व्यक्ती असली तरी तिला रसिक करून टाकत होतं. धारवाडचा श्रावण मन मोहून टाकत होता.

किटीचा हा `स्वर्ग’ कितीही सुंदर असला तरी चंद्रूचा बेंगळूरवरचा मोह कणभरही कमी व्हायला तयार नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे - बेंगळूर म्हणजे नखरेल आकर्षक तरुणी तर धारवाड मुग्ध बालिश तरुणी!-

बेंगळूरहून येऊन तीन दिवस झाले होते. सकाळी शांतम्मा किटीला म्हणाल्या, `तू चंद्रूसाठी खोली पाहिजे म्हणून सांगितलं होतंस का? माळमड्डीवरच्या भीमण्णा देसायांची जागा भाड्यानं द्यायची आहे म्हणे. तुझा तो शानबाग आला होता सांगायला.’

लगोलग चंद्रू आणि किटी चढ-उतारावर वसलेल्या माळमड्डीकडे निघाले.

तारेचं कंपाउंड असलेल्या विस्तीर्ण बागेनं वेढलेलं जुनं घर. लाल कौलांनी शाकारलेलं. भोवतालची बाग भरपूर फुलझाडं-फळझाडांनी भरलेली. कितीतरी प्रकारची झाडं! नीट रांगेत लावलेली पेरूची, आंब्याची आणि फणसाची झाडं, केळ्याच्या झाडांचं बन, फुलांची मुबलक झुडुपं, चाफा, जुई- मोगरा, पारिजात- अगदी कौतुक वाटावं असं बकुळीचंही झाड! विविध रंगांची आणि आकारांची डेलियाची फुलं.

चंद्रूला वाटलं, किटी म्हणत होता- घराभोवती बाग आहे- इथं तर बागेमध्येच घर दिसतंय! त्यानं बेंगळूरमध्ये असं झाडांनी घेरलेलं घर पाहिलंच नव्हतं. तीस बाय चाळीस फुटांच्या साईटवर तीनमजली घरं बांधलेल्या `किष्किंधा नगरी’चीच त्याला सवय होती. मातीच्या कुंड्यांमधून रोपं लावून तयार केलेला बगिचाच त्यानं पाहिला होता. क्षयरोगग्रस्त मानव समूहानं व्यापलेल्या बेंगळूरमध्ये तो इतके दिवस राहिला होता. आता त्याच्यासमोर आरोग्यपूर्ण धारवाड उभं होतं. त्याला मनोमन हा फरक जाणवला.

घर दुमजली होतं. बहुतेक वरचा मजला भाड्यानं द्यायचा विचार आहे की काय कोण जाणे! चंद्रू मनोमन विचार करू लागला- `जागा केवढी असेल? आपल्याला परवडेल की नाही?’

किटीनं घराच्या दारावर थाप मारली.

दरवाजा उघडला गेला आणि चंद्रू अवाक् होऊन उभा राहिला.

घराचा दरवाजा रेल्वे-प्रवासात भेटलेल्या गानकोकिळा सुंदरी विनितानं उघडला होता.

विनितेच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव उमटले.

त्या दोघांच्याही प्रतिक्रियांकडे किटीचं लक्ष नव्हतं. त्यानं विचारलं, `आहेत काय भीमण्णा?’

विनितेनं स्वत:ला सावरत म्हटलं, `हो - आहेत. या. येतील एवढ्यात. बसा तुम्ही.’ आणि हरिणीच्या वेगानं ती आत दिसेनाशी झाली.

जुनाट सोफा आणि जुन्या खुर्च्या पाहाताच घराच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येत होती.

चंद्रूनं मनोमन ठरवलं, काही झालं तरी हीच खोली आपण भाड्यानं घ्यायची. त्यानं अकारणच आणखीही एक ठरवलं- गाडीतल्या विनितेच्या भेटीविषयी किटीला काहीच सांगायला नको.

भीमण्णांनी सांगितलेल्या सगळ्या अटी मान्य करून खोलीचं पक्कं करून तिथून निघताना चंद्रू उल्हसित झाला होता. किटीची मात्र भुणभूण चालली होती, `काही म्हण ! मला तरी भाडं जास्त वाटतंय! तू उगाच दडपणाखाली हो म्हणू नकोस. आणखी दोन दिवसांमध्ये याहून कमी भाड्यामध्ये याहून मोठं आणि नवं घर मिळू शकेल. आपण आणखी प्रयत्न करू या.’

पण चंद्रूनं मात्र नकारार्थी मान हलवली.

त्याची फार काही बोलायची इच्छा नव्हती. कारण विनितेनं त्याचं मन व्यापून टाकलं होतं. मनोमन तो उल्हसित झाला होता.

रोजच्यासारखाच सूर्योदय झाला. हातात पाण्याची बादली आणि झाडू घेऊन विनितानं दार उघडलं. एखादं दुर्मिळ दृश्य पाहावं तशी ती कौतुकानं सूर्योदयाचं निरीक्षण करू लागली. सोनेरी आकाश, पक्ष्यांचा किलबिलाट, विविध फुलांच्या सुगंधाच्या मिश्रणातून हवेत पसरलेला विलक्षण सुगंध! त्यात पारिजातकाच्या सड्याची भर पडलेली! विनिताचं मन उत्साहानं उभारलं गेलं.

हे नेहमीचंच होतं. विनिताचा स्वभावच तसा होता. काहीही सुंदरतेनं भरलेलं समोर आलं की तिचं मन आनंदानं नाचायला सुरुवात करत होतं. त्याचंच प्रतिबिंब चेहऱ्यावर पडल्यामुळे तिचा चेहरा सतत आनंदी दिसत असे.

आज तरी वेगळं असं काय घडलं होतं? नेहमीसारखाच सूर्योदय ना? पण विनितेच्या दृष्टीनं इतकी साधी गोष्ट नव्हती. हा अनुपम सूर्योदय केवळ आपल्यासाठीच झाला आहे- या भावनेनं ती आनंदानं मोहरुन गेली होती.

साऱ्या बागेचा केर लोटत ती बकुळीच्या झाडापाशी आली. मंद पिवळ्या चंद्राप्रमाणे बकुळी आपलं अस्तित्व दर्शवत होती. हातातला झाडू बाजूला ठेवून विनिता हलकेच एकेक फुल गोळा करता-करता त्या गंधानं पुलकित होऊन गेली.

माडीवरच्या खिडकीतून चंद्रू विनिताचं फुलाबरोबर रमणं तिच्या न कळत पाहात होता. तिचं मात्र आणखी कुठंही लक्ष नव्हतं ती स्वत:च्या भावना-प्रपंचात मग्न होऊन गेली होती.

दूधवाला येताच विनिता आपल्या भाव-विश्वातून बाहेर आली. फुलं घेऊनच ती दुधाचं भांडं आणायला आत गेली.

भीमण्णा देसाई भरपूर बोलके गृहस्थ होते. गप्पांच्या आखाड्यात एकदा उतरले की कुणालाच ऐकत नसत. पण चंद्रूला त्यांच्या सरळ स्वभावाचाही अनुभव येत होता. चंद्रू राहायला आला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं,

`अजिबात संकोच वाटू देऊ नका! काही पाहिजे असेल तर खुशाल मागून घ्यायचं. हेही तुमचंच घर म्हणून समजा, समजलं की नाही?’

या घरात कोण-कोण राहतंय, त्यांचं परस्परांशी नातं काय याचा चंद्रूला काहीच खुलासा होत नव्हता. एक मात्र खरं- विनिता मात्र क्षणभराचीही उसंत न घेणारं सतत फिरणारं यंत्र झाली होती.

सकाळी दहा वाजता ऑफिसला जाऊन चंद्रू संध्याकाळी सहा वाजताच घरी परतत होता.

जाग आल्यापासून ऑफिसला जायला निघेपर्यंत सकाळच्या वेळी अनेकदा विनिताचं नाव त्याच्या कानांवर येत होतं.

`विनू, ताटं वाढलीस काय?’

`विनू, गिरणीला जाऊन आलीस ना?’

`विनू, धुतलेले कपडे कुठं ठेवलेस?’

`हे काय विनू! अजून फुलांचे गजरे केले नाहीस?’

`विनू, अगं, आमटीला खडाभर मीठ कमी पडलंय बघ!’

घरातली सगळ्या वयांची माणसं विनिताच्या नावाचा सतत जप करत होती. आणखीही एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती- प्रत्येकजण काही ना काही काम सांगण्यासाठीच तिला हाका मारत होतं!-

कोण आहे ही विनिता? या घरातली अनाथ मुलगी? घरातली कामवाली? सुरुवातीला चंद्रूला काहीच समजत नसे.

एक मात्र खरं- कॉलेजला जाते, म्हणजे ती घरातली मोलकरीण नसावी. भीमण्णांना ती `काका’ म्हणायची. म्हणजे अनाथही नसेल.

एका शनिवारचा दिवस. चंद्रू लवकरच ऑफिसमधून घरी येऊन झोपला होता. त्याच गंधर्व-गायनानं त्याला जाग आली. उठून खिडकीपाशी जाऊन त्यानं खाली पाहिलं. विनिता स्वत:च्याच नादात गाणं गुणगुणत झाडांना पाणी घालत होती.

कुणीतरी गर्दभ-स्वर त्यात मिसळून तिच्या गाण्यात खंड पाडला.

`हे काय गं? सतत गाणं म्हणत बागेतच राहिलीस तर इथली घरातली कामं कोण करणार? चल लवकर. परसात भांड्यांचा ढीग पडलाय! किती सांगायचं तुला? हे गाण्याचं वेड कमी होईल तर शपथ!’

त्या कर्कश आवाजासरशी विनितानं आपलं गाणं थांबवलं आणि ती आत गेली.

नाही म्हटलं तरी चंद्रू खिन्न झाला.

हा सुमधुर स्वर, ही गाण्यातली तन्मयता क्वचितच पाहायला मिळते.

चंद्रूनं सुरभीला- आपल्या लहान बहिणीला- अनेकदा सांगितलं होतं, `कितीही खर्च झाला तरी मी पैसे देईन. तू गाणं शिक!’ पण सुरभीनं तिकडे लक्षच दिलं नव्हतं. तिला आवाजाचीही देणगी नव्हती. शिवाय तिला त्याची आवडही नव्हती.

घरातल्या घुसमटून टाकणाऱ्या वातावरणातही विनिता पुन्हा-पुन्हा गात होती! कुणीही त्या गाण्याला प्रोत्साहन देत नव्हतं - कौतुकही करत नव्हतं. एवढंच नव्हे, गाणाऱ्याला मध्येच अडवू नये एवढंही भान त्या घरातल्या माणसांना असल्याचं चंद्रूला दिसत नव्हतं.

का कुणास ठाऊक, विनिताचे कष्ट बघून चंद्रू अस्वस्थ होत होता. कदाचित स्वत: विनिताही त्यामुळे एवढी कष्टी नसावी. कारण त्यानं पाहिलं- हसतमुखानं आणखी एक गाणं गुणगुणत विनिता आंब्याच्या झाडाखाली भांडी विसळत होती.

जसे जसे दिवस जात होते, तसं तसं त्याला त्या घरातल्या माणसांच्या परस्परांशी असलेल्या नात्याविषयी समजू लागलं. विनिताला आई-वडील नव्हते. रामक्का तिची सावत्र आई. त्याही विधवा. त्यांना एक मुलगा होता- शोधूनही सापडणार नाही एवढा ढ मुलगा! त्यामुळे रामक्कांना हुशार विनितेचा अकारण संताप येत होता.

घरात वृद्ध आजी सीतम्माही होत्या. थोरले काका भीमण्णा आणि त्यांच्या पत्नी तुळसक्का आपल्या चार मुलांसह तिथंच राहात होते. त्याशिवाय घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असे.

ते घर विनिताच्या आईचं होतं. वर्षापूर्वी विनिताचे वडील वारले होते. भीमण्णांची किरकोळ शेती होती. त्यावर जेमतेम पोट भरत होतं- तेवढंच. आता तेच या घराचे यजमान होते. एकूण पाहता आर्थिकदृष्टया त्यांचं घर सर्वसामान्य म्हटलं पाहिजे.
 
सगळ्यांनाच विनितेवर हुकूम चालवायला आवडत होतं. तिच्याच घरी आश्रय घेऊन राहणारे तिला हक्कानं कामं करायला सांगत. रामक्का तर सतत तिला धारेवर धरायच्या. पण भीमण्णा काकांचा मात्र विनितेवर खूपच जीव होता. दिवसभर वासराप्रमाणे स्वच्छंद हुंदडणाऱ्या आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन कामं करणाऱ्या वसंत-लक्ष्मी विनितेला ते दररोज रात्री गाणी म्हणायला लावत. दिवसभराची कामं संपली आणि रात्रीची जेवणं आटोपली की नंतरची झाकपाक करणाऱ्या विनितेला ते बाहेरच्या अंगणातील आंब्याच्या किंवा बकुळीच्या वृक्षाखाली ठेवलेल्या बाजल्यावर बोलावत आणि म्हणत, `विनू, हातातली कामं टाकून इथं ये बघू! आता इतरांना करू दे कामं. इथं बैस. एखादं पुरंदरदासाचं किंवा आणखी कुठल्यातरी दासाचं पद म्हण बघू!’

हा संवाद कानावर आला की माडीवरच्या चंद्रूचे कान आपोआप टवकारले जात. विनिता थोरल्या काकांपाशी बसून देवाची गाणी सुश्राव्य स्वरात गायला सुरुवात करायची. सारं वातावरणच भक्तिरसात बुडून जायचं.

भीमण्णांचा स्वभाव बोलका होता. त्यांच्याकडूनच चंद्रूला विनितेविषयी अधिकाधिक तपशील समजायचा. विनितेशी त्यानं गप्पा मारण्याचा प्रसंगच आला नव्हता. तिला तेवढा वेळही नव्हता. शिवाय अपरिचित तरुणाशी गप्पा तरी काय मारणार ती?

कर्नाटक कॉलेजमध्ये विनिता संगीत हा प्रमुख विषय घेऊन - त्यातही हिंदुस्थानी संगीत- बी.ए. च्या दुसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकत होती. अनेक संगीत-स्पर्धांमध्ये कॉलेजच्या वतीनं भाग घेऊन तिनं वेगवेगळ्या गावांमधून पुरस्कार मिळवून आणले होते. तूर्त तरी तिच्या लग्नाचा विचार कुणाच्याही मनात नव्हता. पैशाची व्यवस्था व्हायला हवी ना! बी. ए. झाल्यानंतर तिनं कुठं तरी नोकरी धरायला हवी, पैसे साठवायला हवेत- त्यानंतर लग्नाचा विचार करायचा. म्हणजे आणखी चार-पाच वर्षं तरी लग्नाचा विचार नव्हता.

पावसाळा संपून ऑक्टोबरचं कडक ऊन पडायला सुरुवात झाली होती. उन्हाळ्यात झाडावरून उतरवून, फोडून, चिंचोके काढून उन्हं दिलेली चिंच पावसाळ्यात दमट हवेमुळे ओलसर झाली होती. उन्हाचा कडाका वाढला तेव्हा ती चिंच एका टोपलीत घालून विनिता माडीवर निघाली. चंद्रूच्या खोलीलगतच गच्चीचं दार होतं. चिंचेची भली मोठी टोपली घेऊन विनिता माडीवर आली.

गच्चीत तट्ट्या अंथरुन त्यावर चिंच पसरत विनितेनं विचारलं, `इथं गच्चीत चिंच वाळत टाकली तर तुम्हाला त्रास नाही ना होणार?’

हे विनिताचं चंद्रूबरोबरचं पहिलं संभाषण!

ऑक्टोबरचं ऊन चटका देत होतं. आभाळ निरभ्र होतं. श्रावणातल्या फुलांनी निरोप घेतला असला तरी बकुळीला कुठला दुष्काळ? सदा सर्वदा सुगंधाचा स्रोत देणारा निरंतर प्रवाह तो! वर्षभर फुलांची उधळण करणारा वृक्ष-

एव्हाना चंद्रूला धारवाडच्या कन्नड भाषेतले अनेक शब्द समजू लागले होते. त्यामुळे विनिताच्या बोलण्यावर तोही धारवाडी ढंगात म्हणाला, `नाही. टाका तुम्ही वाळत. चिंच तुमची- गच्चीही तुमचीच!-’ त्याचं मन तर म्हणत होतं- विनिता, एवढंच काय! मीही तुझाच आहे!-

चंद्रूला तर तिच्याशी आणखी थोडं बोलायचं होतं. पण काय बोलायचं हे सुचेना. शेवटी एकदाचा चिंच वाळत घालण्याचा रूक्ष कार्यक्रमही संपला. आता ही टोपली घेऊन निघून जाईल हे लक्षात येऊन तोच म्हणाला, `फार सुरेख गाता तुम्ही!’ एवढंच नव्हे, तूही फार सुंदर आहेस! पण हे वाक्य त्याच्या मनातच राहिलं. सुरेख, सुशील, सतत उत्साहानं नाचणारं कारंजं-

विनितेच्या चेहऱ्यावर संकोच उमटला. ती उद्गारली, `थँक्स.’ त्यानं संभाषण वाढवण्याची संधी पकडत म्हटलं, `तुम्ही रेडिओवरही गाऊ शकाल!-’

`हो, गाते ना! खूप वर्षांपासून गाते मी रेडिओवर! तुम्ही ऐकलं नाही कधी?’

चंद्रू वरमला, `नाही! कधी नाही ऐकलं!’

`पुढच्या वेळी तुम्हाला आधीच सांगेन. आता वाट सोडता? जायचंय मला.’

स्वत:च्या नकळत तिच्या वाटेत आडवा उभा राहिलेला चंद्रू शरमून बाजूला झाला.

विनिता रिकामी टोपली घेऊन पायऱ्या उतरुन निघून गेली.

दिवस जात होते. चंद्रू धारवाड गावात आणि देसायाच्या घरात बऱ्यापैकी रुळला होता. अधून-मधून कधीतरी त्यांच्या घरी जेवायलाही जात होता. त्याही वेळी विनिता त्याच्याशी गप्पा मारत नसली तरी परिचयाचं स्मितहास्य तिच्या चेहऱ्यावर त्याला पाहायला मिळत होतं.

चंद्रूच्या बँकेत अधून-मधून क्रिकेटचं वेड वर उसळून येत होतं. केवळ कॉमेंट्री ऐकण्यावर त्यांचा उत्साह न थांबता मैदानावर मॅचेसही होत. त्या दिवशी चंद्रूही गावसकरच्या थाटात खेळायला गेला आणि जखमी होऊन कण्हत- विव्हळत घरी परतला. एक वेगवान चेंडू मनगटावर जोरात आपटून हाड दुखावलं होतं. डॉक्टरांनी आठवड्याभरासाठी हाताला प्लॅस्टर घातलं होतं. चंद्रूनं किटीच्या घरी जायचा निर्णय घेतला. समोर भेटलेल्या विनितेला त्यानं ते सांगितलं.

हे ऐकताच भीमण्णा पटकन बाहेर आले आणि म्हणाले, `असं का म्हणता?’

`किटी मला बेंगळूरला पोहोचवण्याची व्यवस्था करेल.’

`अशा अवस्थेत तुम्ही परगावी जाण्याइतका प्रवास करू नये. नोकरीही अजून पक्की झालेली नाही तुमची! इथं आमच्या घरात माणसं राहात नाहीत काय? तुमच्या जेवणा-खाण्याकडे आम्ही बघू. तुम्ही ती काळजी करू नका!’

भीमण्णांनी दिलेला शब्द त्यांनी आणि त्यांच्या घरच्या माणसांनी शब्दश: पाळला. नंतर चंद्रूनंही किटीच्या घरी जायचा विचार पूर्णपणे सोडून दिला.

भीमण्णांनी आपल्या लाऊड-स्पीकरसारख्या आवाजात आज्ञा सोडली, `विनू, चंद्रशेखरांना वेळच्या वेळी जेवायला वाढायची जबाबदारी तुझी! त्यांना आपल्यासारखी भाजी-भाकरी वाढायची नाही. सार-भात वाढायचं. आणि हो- चहा नको- कॉफी द्यायची- समजलं?’

चंद्रूलाही जाणवलं, नाहीतरी आणखी कोण ही जबाबदारी अंगावर घेणं शक्य आहे या घरी? आधीच भरपूर कामांची जबाबदारी पेलत असणाऱ्या विनितेवर ही आणखी जबाबदारी!

इथं आल्यापासून चंद्रूचं विनितेवर लक्ष होतं. एवढ्या दिवसांत त्यानं एकदाही तिला रडताना, रागावताना किंवा दु:ख करताना पाहिलं नव्हतं. ही आपल्या सख्या बकुळ, पारिजात, मोगरा, जाई-जुई यांना पाणी घालताना अश्रूही ढाळून पुन्हा मंद-स्मिता होते की काय?

हिचं लग्न होऊन ही जेव्हा सासरी निघून जाईल, तेव्हाच घरातल्या सगळ्यांना हिचं महत्त्व कळेल!-

एवढ्यात विनिता कॉफीचा कप घेऊन माडीवर आली. तिला पाहताच चंद्रूला साऱ्याचा विसर पडला- मनात येणाऱ्या विचारांचाही!

सुट्टीमधल्या एके दिवशी दुपारच्या निवांत वेळी चंद्रूची वामकुक्षी चालली होती. डोळा लागत असतानाच काही मुलींच्या हसण्याचा किलकिलाट त्याच्या कानांवर आला आणि डोळ्यांवरची झोप पार उडालीच.

त्यानं बाहेर डोकावून पाहिलं- फणसाच्या सावलीत कांबळं अंथरुन त्यावर विनिताच्या मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होता. दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याविषयी त्यांची चर्चा चालली असावी.

मैत्रिणी आपापल्या साड्यांविषयी सांगत होत्या. विनिताही म्हणाली, `मला जांभळा रंग भारी आवडतो बाई! मी तर काकांना जांभळ्या रंगाचीच साडी आणायला सांगणार आहे.’

तिच्या बोलण्यातला रंगाचा तपशील चंद्रूला समजला नाही. तो थोडा गोंधळला. कुठला रंग हिला आवडत असेल?

रात्री भीमण्णांनी सगळ्यांसाठी साड्या-लुगडी आणली असावीत. ते म्हणत होते, `विनू, जांभळी साडी खूप शोधली- पण मिळाली नाही. त्याऐवजी ही निळी आणलीय बघ! पुढच्या वर्षी जांभळी आणू या. चालेल ना?’

`न चालायला काय झालं, काका? निळा रंगही सुरेख आहे हा! आवडला हाही रंग!’

हे ऐकताना चंद्रूचं मन सखेद आश्चर्यानं भरून गेलं. त्याची बहीण सुरभी विनितेच्या बरोबरीचीच असेल. गेल्या महिन्यात तो बंगळूरला गेला होता. त्या वेळी तिनं चंद्रूला `मला डार्क ब्ल्यूला शॉकिंग पिंक बॉर्डर असलेलीच साडी हवी-’ म्हणून सांगत संपूर्ण दिवसभर चिक्कपेठेतल्या प्रत्येक दुकानातून घुमवलं होतं. तरी तसली साडी मिळालीच नाही. शेवटी दुसरे दिवशी कुठल्या तरी दुकानातून ती शोधून काढून, अव्वाच्या सव्वा किंमत देऊन तिनं ती विकत आणली होती. वर तिनं चंद्रूला साडी दाखवत विचारलं होतं, `कसं आहे माझं सिलेक्शन?’ खरं तर त्याच्या जिभेवर आलं होतं- `अतिशय वाईट! तुझ्या सावळ्या रंगाला हा रंग अजिबात रुचत नाही!’ पण त्यानं स्वत:ला आवरलं होतं.

हेही खरंच! त्याला धारवाडची रोखठोक बोलण्याची पद्धत अंगवळणी पडली नव्हती ना!

इथं मात्र विनिता मनाविरुद्ध घडणारी प्रत्येक घटना हसतमुखानं स्वीकारत होती. कदाचित परिस्थितीमुळे तिला तसं वागणं भाग पडत असावं- चंद्रूला वाटलं. सुरभीला पैसे देणारा आणि माया करणारा थोरला भाऊ आहे- एक नव्हे, दोन-दोन थोरले भाऊ! शिवाय आई-वडील आहेत. विनिताला कोण होतं? विनिता तारुण्यसुलभ भाव-भावना, हौशी आणि अपेक्षा सहजपणे हसत-हसत बाजूला सारत होती. तिच्या हसण्यातून सुखाची तृप्ती व्यक्त होण्याऐवजी विषादही व्यक्त होत असावा काय? कुणास ठाऊक! केवळ तीच याचं उत्तर देऊ शकेल.

दुसरे दिवशी संधी साधून चंद्रूनं तिला विचारलं, `जांभळा म्हणजे कुठला रंग?’

`जांभूळ म्हणजे तुमच्या बंगळूरच्या भाषेत `नेरळे!’ का बरं? का विचारलंत?’

`काही नाही- सहजच विचारलं.’ तो म्हणाला.

आपली एवढी सेवा जिनं केली, त्या विनितेला जांभळ्या रंगाची एक साडी घेऊन देणं त्याला मुळीच अशक्य नव्हतं. पण इथल्या संकुचित मनाच्या समाजात त्याचा चुकीचा अर्थ लावून विनितेला त्रास होईल याची जाणीव असल्यामुळे तो गप्प राहिला.

किटी अधूनमधून घरी यायचा. एकदा त्यानं म्हटलं तर सहज किंवा म्हटलं तर थट्टेनं विचारलं, `का रे चंद्रू! तू तर धारवाडशी चांगलाच मिळून-मिसळून गेलास! काय विशेष?’

`काही नाही रे! राहायला लागल्यावर मलाही हे गाव आवडायला लागलंय तुझ्यासारखंच!’

`एवढंच?’

`होय. का बरं?’

`काही नाही! म्हटलं, देसायांच्या घराचं काही खास आकर्षण नाही ना? विनिता उत्तम गाते ना?’

`तुला कसं ठाऊक?’

`कसं ठाऊक? अरे, धारवाडमध्ये सगळ्यांनाच ठाऊक आहे हे! ती रेडिओ-आर्टिस्ट आहे ना?’

`तुला का रे एवढा इंटरेस्ट?’

`नाही बाबा! अम्मानं माझ्यासाठी बेंगळूरची मुलगी ठरवली आहे. तुझं काय?’

चंद्रूनं लगोलग विषय बदलला.

बेंगळूरच्या `इस्रो’ कंपनीत नोकरी मिळाल्याची तार चंद्रूला मिळाली आणि चंद्रूला अनावर आनंद झाला.

आता तो पुन्हा आपल्या प्रिय बेंगळूरमध्ये राहू शकत होता. घरचं अन्न खात घरीच राहता येईल. शिवाय ती नोकरीही बदलीची नव्हती.

त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट त्या नोकरीत होती, ती म्हणजे, अमेरिकेत जाण्याची संधी!

चंद्रूच्या स्वप्नातला प्रदेश बेंगळूर नव्हता- तिथून कितीतरी लांब असलेला श्रीमंत देश अमेरिका!

शिक्षणही अमेरिकेत घ्यावं असं चंद्रूला कितीही वाटलं तरी ते शक्य नव्हतं. कारण त्याची घरची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे चंद्रू नोकरी शोधतानाच सावधपणे त्या देशात प्रवेश मिळवून देऊ शकेल अशाच नोकरीच्या शोधात होता.

`इस्रो’मधल्या मुलाखतीतही त्याला विचारलं होतं- `तुम्ही सिलेक्ट झालात तर अमेरिकेला जायची तयारी आहे ना? पासपोर्ट तयार ठेवा तुम्ही!’

धारवाडच्या बँकेतल्या नोकरीत ही शक्यता नाही. योग्य नोकरी मिळेपर्यंत काहीतरी करून पैसे मिळवत राहायचं म्हणून चंद्रूनं ही नोकरी पत्करली होती.

चंद्रूनं आनंदानं सामानाची बांधाबांध केली. इथं येऊन त्याला वर्ष झालं होतं. तो जाणार असल्याचं समजताच भीमण्णा आपण होऊन त्याच्या खोलीत आले.

`हे काय? तुम्ही तुमच्या गावी निघालात म्हणे! आणखी चांगली नोकरी मिळाली ना? जाऊन या! तुम्ही राहत होता तेव्हा काळजी नव्हती बघा! बरंय, जाऊन या तुम्ही.’

`हो ना!’

`पुन्हा या गावात आला तर आमच्याकडेच उतरायचं! समजलं? उगाच या त्या मित्राकडे जायचं नाही- आधीच सांगून ठेवतो!’

गावाला जाण्याआधी किटीच्या घरी आणि भीमण्णांच्या घरी आवर्जून जेवायला बोलवण्यात आलं. चंद्रूनंही भीमण्णांना आग्रहानं सांगितलं, `भीमण्णा, बेंगळूरला याल तेव्हा आमच्या घरी नक्की यायचं!’

`यायचं आहे खरं! राजाजीनगरला माझी धाकटी बहीण इंदूही राहते. तीही बोलावतेय कधीची! एकदा येऊ दोन्ही घरी!’

रात्री निघताना चंद्रूला विनितेची आठवण झाली. तिच्याशी काय बोलावं- काय द्यावं हे त्याला समजेनासं झालं. अखेर बेंद्रेंच्या गीतांचा संग्रह तिच्या हाती ठेवत तो म्हणाला, `हे तुमच्यासाठी! तुमचं रेडिओवरचं गाणं मी तर ऐकू शकलो नाही. आमच्या गावात धारवाड स्टेशन ऐकू येत नाही.’

विनिता हसली; पण त्यात खिन्नता होती.

साऱ्या घरात भीमण्णांपेक्षाही अधिक मनापासून तिचं गाणं ऐकणारा हा तरुण तिचा एकमेव श्रोता होता.

आता तोही निघून चालला आहे.

कदाचित ही त्याच्याबरोबरची अखेरची भेट असेल.

तो काही पुन्हा धारवाडला येणार नाही. आपल्याला तरी बेंगळूरला कशाला जायचा प्रसंग येतोय म्हणा!

याची जाणीव असल्यामुळेच तिच्या हसण्यामागे विषाद होता.

पण नशिबाचा खेळ कुणाला ठाऊक असतो? त्या दोघांनाही त्याची कल्पना नव्हती.

संस्कृतचे मास्तर शामण्णांची चंद्रशेखर, गिरीश आणि सुरभी ही तीन मुलं. पूर्वी कधीतरी त्यांनी जयनगरमध्ये तीस बाय चाळीसच्या प्लॉटवर एक छोटंसं साधं घर बांधलं होतं. घरासमोरच्या रिकाम्या जागेत छोटीशी बाग होती- पण खरं तर तिथं आणखी बांधकाम करून छोट्या घराचं बंगल्यात रूपांतर करायचं, असा गौरम्मांचा विचार होता. मुलं मोठी होऊन पगार मिळवू लागली की आपलं ते स्वप्न पुरं करून घ्यायचा त्यांचा विचार होता.

नवऱ्याच्या पगारात घराचं बांधकाम करण्याइतकी अनुकूलता गौरम्मांना मिळाली नव्हती. मोजका पगार, मुलांची शिक्षणं, वरकमाई नाही- अशा परिस्थितीत गौरम्मा मनातलं स्वप्न बाजूला सारून काटकसरीनं संसार करत होत्या.

शामण्णांचा स्वभाव मात्र शांत आणि समाधानी होता. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सारे त्यांच्याशी आदरानं वागत.

गौरम्मांनाही संसार चालवण्याचं शहाणपण भरपूर होतं. कुठंही कर्ज न करता, टुकीनं संसार करण्यात त्या वाकबगार होत्या. सारी कामं स्वत:च करून त्या मोलकरणीचे पैसेही वाचवत होत्या. स्वत:च्या किरकोळ हौसा-मौजा मारत आणि कष्ट करत त्यांनी आपली मुलं वाढवली होती. आता ती सुशिक्षित मुलंच त्यांची संपत्ती होती.

स्वत:ची कर्तव्यं करून संपली की, शामण्णांचं वागणं विरक्त माणसासारखं असे; पण गौरम्मांचं तसं नव्हतं. त्यांना संसारात बराच रस होता. काटकसरीच्या संसारात त्यांच्या अनेक आशा-आकांक्षा अर्धवट राहिल्या होत्या. ज्या आशा पुऱ्या झाल्या, त्यांचं प्रमाणही गौरम्मांच्या दृष्टीनं समाधानकारक नव्हतं. हळदी-कुंकवाच्या किंवा लग्नाकार्याच्या निमित्तानं स्नेही आणि नातेवाइकांच्या घरी गेलं की, त्यांचं मन भारी रेशमी साड्या, सोन्या-हिऱ्याचे चमकदार दागिने, नवी करकरीत गाडी याकडे ओढलं जात होतं. मनात येई,

`किती नशीबवान आहेत हे! एवढे मेले कष्ट करकरून थोडं बऱ्यापैकी लुगडं घ्यायचं म्हटलं तरी जमत नाही! आयुष्यात कधी तरी माझ्या वाट्याला हे ऐश्वर्य येईल काय?’

मुलं किरकोळ नोकऱ्या करत राहिली तरी, आपलं नष्टचर्य संपणार नाही, त्यांनी मोठ्या पगाराच्या नोकऱ्या धरल्या तरच हे शक्य आहे, हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीला कधीच समजलं होतं.

श्रीमंतीनं लगडलेली पुण्यभूमी अमेरिका त्यांच्या दृष्टीनं प्रत्यक्ष श्रीविष्णूच्या वैकुंठापेक्षाही परमश्रेष्ठ होती! जर आपली मुलं अमेरिकेत गेली तरच तिथला डॉलर मिळवून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त श्रीमंत होता येईल हे त्यांना ठाऊक झालं होतं.

आपली या जन्मीची आणि मागच्या जन्मीची पुण्याई असेल तर, का आपली मुलंही अमेरिकेला जाणार नाहीत? यक्षिणीच्या जादूच्या छडीप्रमाणे असलेला डॉलर देश त्यांच्या जीवनाचं परमध्येय झालं होतं.

अशा गौरम्मांचा थोरला आणि लाडका मुलगा चंद्रू! गव्हर्नमेंट कोट्यातली सीट मिळवून इंजिनियर झालेला हुशार मुलगा. वडिलांसारखा सावळ्या रंगाचा नव्हे, त्यानं आईचा गोरापान रंग उचलला होता. उंची थोडी बेताची असली तरी बुटका म्हणता येणार नाही अशी आकृती. गिरीशच्या तुलनेत याची उंची थोडी कमी वाटते- एवढंच!

चंद्रूनं आईच्या रंगाबरोबर तिचा महत्त्वाकांक्षी स्वभाव उचलला होता. त्यामुळे माय-लेकरांचं पटायचंही खूप!

गिरीशचं मात्र सगळंच याउलट होतं.

बोलणं बेताचं. सतत कुठल्या ना कुठल्या कामात गढून राहणं हा त्याच्या स्वभावाचाच एक भाग झाला होता. स्वभावत:च तो समाधानी होता. या बाबतीत तो अगदी वडिलांवर गेला होता.

बुद्धिमत्तेच्या बाबतीतही चंद्रूशी तुलना करता तो डावा होता. म्हणजे अगदी `ढ’ही नव्हता. दरवर्षी बऱ्या मार्कांनी पास होत त्यानं बी. कॉम. ची डिग्री मिळवली होती. बँकेत क्लार्क म्हणून बऱ्यापैकी नोकरीही त्यानं मिळवली होती. त्या नोकरीविषयी त्याला कुठल्याही प्रकारची खंत नव्हती. बँक सुटल्यावर तो सत्राशे साठ ठिकाणी भटकत असे. राघवेंद्र स्वामींच्या आराधनेचा तीन दिवसांचा उत्सव आला की, सुरुवातीपासूनच त्याचा त्यात पुढाकार असे. कुठली मयतीची बातमी आली तरी काळ-वेळ न म्हणता चार मित्रांना घेऊन तो मदतीसाठी हजर असे. परवाच त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा हा तिपटूरला केवळ नारळ आणण्यासाठी म्हणून गेला होता!

अशा माणसाला पैसे मिळवायला कसं काय जमणार?

गौरम्मांनी आपल्या या धाकट्या लेकराला हजारदा नाना परीनं व्यावहारिक जगताविषयी समजावून सांगितलं होतं. आई काही सांगू लागली की तो हसत म्हणायचा,

`अम्मा, अण्णांनीच सांगितलं नाही काय- `परोपकारं इदं शरीरं’ म्हणून?’

मुलापुढे निरुत्तर झालेल्या गौरम्मांचा संतापाचा रोख मग नवऱ्याकडे वळायचा, `तुम्हीच त्याला नाही ते शिकवलंय! तो कसा मोठा माणूस होईल!’

यावर शामण्णा म्हणायचे, `असू दे गं! तुझा चंद्रू मोठा माणूस होतोय ना? याला होऊ दे माझ्यासारखा- त्यालाही तुझ्यासारखी चांगली बायको मिळेल आणि त्याचाही संसार चांगला होईल.’

चंद्रूला `इस्रो’मधलं काम खूपच आवडलं. तोही केवळ बुद्धिवानच नव्हता, निष्ठेनं काम करणं हा त्याचा स्वभावच होता. त्यामुळे तिथल्या वरिष्ठांचीही त्यावर लवकरच मर्जी बसली.

दिसायला देखणा असलेल्या चंद्रूवर अनेक वधूपित्यांची नजर होती; पण चंद्रू आणि गौरम्मा यांचा एवढ्यात त्याचं लग्न करण्याचा विचार न करण्याचा निर्णय होता. एक-दोन वर्षं नोकरी करून थोडाफार पैसा साठवल्यानंतर घरापुढच्या जागेवर किंवा वरती बांधकाम करून घ्यायचा त्यांचा विचार होता. शिवाय अमेरिका! तेच त्या दोघांच्या जीवनाचं महत्त्वाचं ध्येय होतं. त्यामुळं चंद्रू चौकशीसाठी आलेल्या वधूपित्यांची निराशा करत होता.

शामण्णांची आणखी दोन वर्षं नोकरी राहिली होती. तेवढ्या अवधीत सुरभीचं लग्न उरकून घ्यायचा त्यांचा विचार होता.

गिरीशचा पगार बेताचाच होता. त्याचं कुणालाच फारसं कौतुक नव्हतं. जेमतेम पोटापाण्यापुरते पैसे त्याला मिळत. त्यामुळे घराचं बांधकाम आणि सुरभीचं लग्न या दोन्ही गोष्टी चंद्रूच्या पगारावर अवलंबून होत्या. यानंतर उत्तम आयुष्य जगायचं असेल तर चंद्रूच्याच सुकाणूची गरज असल्याबद्दल गौरम्मांना खात्री होती.

एक दिवस ती आनंदाची बातमी आली. इस्रो कंपनीनं चंद्रूला कंपनीच्या कामासाठी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात पाठवण्याचं ठरवलं.

बातमी ऐकताच गौरम्मांना अपरिमित आनंद झाला. तारुण्य माघारी यावं तसा त्यांच्या मनात उत्साह भरला. चंद्रू एका वर्षासाठी त्या कुबेराच्या देशात निघाला होता.

सुरभी तर हुरळून गेली होती. ती सारखी म्हणत होती, `चंद्रू, तू येशील तेव्हा माझ्यासाठी कमीत कमी सहा साड्या तरी आणल्याच पाहिजेत हं! आणि याशिवाय सिटीझन वॉच!’

गौरम्माही सांगत होत्या, `तिथं केशर, वेलदोडे, बदाम वगैरे चांगले मिळतात म्हणे. आणि सोनंही फार स्वस्त असतं ना? येताना आणायला विसरू नकोस.’

गिरीश आणि शामण्णा मात्र या बाबतीत मौन बाळगून होते.

गौरम्मा आणि चंद्रूची अनेक वर्षांची आशा फळाला आली होती. चंद्रूनं साऱ्या फॉर्‌मॅलिटिज् उरकून अमेरिकेच्या दिशेनं प्रयाण केलं.

चंद्रू अमेरिकेला उतरला. त्याच्या कल्पनेपेक्षा हा देश कितीतरी वेगळा होता!

क्षणाक्षणाला नवेपण आत्मसात करणारा आणि शिकवणारा, सतत श्री-संपत्तीची अनेकविध पद्धतीनं उधळण करणारा देश!

पाण्याचा दुष्काळ नाही, विजेची तक्रार नाही, घराची कटकट नाही! मानवाच्या मूलभूत गरजा पुऱ्या करण्यासाठी अति तत्पर असलेला देश!

आपला पाच हजार वर्षांचा पुरातन देश! चालुक्य-राष्ट्रकूटांचा... वगैरे वगैरे. कवींनी आपापल्या कवितांमधून ज्या देशाच्या ऐश्वर्याचं बेसुमार वर्णन केलंय, तो आज दारिद्र्य आणि अंधश्रद्धांमुळे पोकळ होऊन गेलेला आपला देश! असल्या जराजर्जर आणि असंख्य रोगांनी ग्रासलेल्या आपल्या देशाची तरुण-संपन्न अमेरिकेशी कशी तुलना होऊ शकेल! जमीन-अस्मानाची कधी तुलना होऊ शकते काय?

किती नेटका देश हा! कुणाचीही मदत नसताना इथं आपण घर शोधू शकतो. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधू शकतो.

मुख्य म्हणजे कुणीही घर-गाडी-फोन या सुखसोयी मिळवू शकतो. आपल्या भारतात मात्र केवळ श्रीमंत म्हणवणारेच या सुखसोयींचा उपभोग घेऊ शकतात.

प्रथम भेटीतच चंद्रू अमेरिकेवर मोहित होऊन गेला. किती भव्य देश हा! इथं राहणारे किती सुखी आहेत!

चंद्रूची नोकरीही चांगली होती. भारतात तो करत असलेल्या कामापेक्षा इथलं काम महत्त्वाचं होतं. केलेल्या कामाचा मोबदलाही चौपटीपेक्षाही जास्त होता! त्यामुळे हुशार आणि मुत्सद्दी चंद्रूनं नोकरीमध्ये यशाची कमान चढती ठेवली होती. कामाचं आणि त्यामुळं मिळणारं समाधान तो ओतप्रोत उपभोगत होता. त्याचा सारा दिवस उत्साहानं भरलेला असे.

संध्याकाळी घरी परतल्यावर मात्र घरच्या माणसांची आठवण होणं स्वाभाविक होतं. आईला पत्र लिहिताना अमेरिकेतला भाजीपाला, इथं मिळणारी फळं, फळांच्या रसाचे विविध प्रकार, आइस्क्रीमची समृद्धी यांविषयी आस्थेनं लिहित होता. इथं उपलब्ध असलेली छोटी-छोटी यंत्रॆ, गार्बेज कॅन- केराच्या बादल्या यांची वर्णनं त्याच्या पत्रात भरपूर होती. सामानाच्या काचेच्या बाटल्या रिकाम्या झाल्या की, त्याला न चुकता आईची आठवण यायची. तो लिहायचा, `अम्मा, तू इथं असतीस, तर त्या सुरेख बाटल्यांमध्ये लोणचं भरून ठेवलं असतंस!’

अमेरिकेत खाण्यापिण्याची कशी चंगळ आहे, इथली माणसं कशी प्रामाणिक आहेत, कसे पैसे टाकून पेपर घेऊन जातात- कसे बसमध्ये कंडक्टर नसतात- याविषयीही तो न थकता विस्तारानं लिहित होता.

इथल्या पैशाचा- डॉलरचा सगळ्यांनाच मोह पडतो. इथला एक डॉलर इतका बलवान आहे की, त्यासाठी आपल्याकडील चाळीस रुपये द्यावे लागतात! या डॉलरमध्ये एवढी मंत्रशक्ती आहे की डॉलर असेल तर जगात कुठंही जाता येतं! डॉलर असेल तर साऱ्या जगात मान मिळतो.

चंद्रूचं पत्र आलं की संपलंच! त्या दिवशी डाळ आणि भाजी हमखास कच्ची राहायची, भात करपून जायचा, कॉफीमध्ये दोन-दोनदा साखर पडून गोडमिट्ट होऊन जायची! सारामध्ये मीठ गायब असे आणि भाजीमध्ये ते दोनदा पडलेलं असे.

त्यामुळे शामण्णा आणि गिरीश जेवताना हमखास म्हणायचे, `आज चंद्रूचं पत्र आलेलं दिसतंय!’

पण गौरम्मांचं तिकडंही लक्ष नसे. त्या तर मनोमन अमेरिकेत जाऊन पोहोचलेल्या असत.

चंद्रूचं ट्रेनिंग संपत आलं होतं. आणखी दोन-तीन आठवड्यांनी भारतात परतून आपल्या ऑफिसमधील लोकांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी त्याला स्वीकारायची होती.

भारतात माघारी जाण्याच्या विचारानं चंद्रू अस्वस्थ होत होता. इथलं तंत्रज्ञान, आकर्षक देश- त्याहीपेक्षा इथल्या डॉलर शक्तीची त्याला प्रचंड भुरळ पडली होती.

इथं आल्यावर लवकरच त्याला आणखीही एक गोष्ट समजली होती. त्याच्या आधी इस्रोमधील चार-पाच तरुणांना अमेरिकेत येण्याची संधी मिळाली होती. ती पकडून ते इथं आले होते आणि संधी साधून इथल्या वेगळ्या कंपनीमध्ये त्यांनी नोकऱ्या धरल्या होत्या. अशा प्रकारे `स्किपिंग’ करून कामाला हजर होणाऱ्या तरुणांना इथल्या नव्या कंपन्यांमध्ये सांगण्यात येई, `तुम्ही काही काळजी करू नका- तुम्हांला आम्ही आमच्या लॉयर्सच्या मदतीनं ग्रीनकार्ड मिळवून देऊ!’

ग्रीनकार्ड म्हणजे तिथं राहून हवं ते काम किंवा नोकरी करण्याचं परवानगी पत्र!

ग्रीनकार्ड हातात असलं की, देशात कुठंही काम करता येईल!

खरं तर अशा प्रकारे `स्किप’ करून अमेरिकेत स्थिरावणारे भारतातल्या आपल्या कंपनीलाही बाँड लिहून देऊनच आलेले असतात, हे चंद्रूला ठाऊक होतं. बाँडचा भंग केल्यामुळे मूळची कंपनी कोर्टात खेचू शकते, हे ठाऊक असूनही `त्या वेळी पाहता येईल काय करायचं ते!’ अशा प्रकारची मनोवृत्ती या `पुळपुट्यां’ची असल्याचंही तो पाहत होता.

इथं आलेल्या दिवसांपासून चंद्रूचं याकडे लक्ष गेलं होतं. त्याचा जवळचा मित्र राजीव आणि त्याचा मित्र श्रीकांत हे दोघेही अशा प्रकारे अमेरिकेत विरघळून गेले होते. इस्रो कंपनीला त्यानंही त्या दोघांचा ठाऊक असलेला पत्ता समजू दिला नव्हता.

एकदा ग्रीनकार्ड हातात पडलं की, त्यानंतर मात्र हे सारे परागंदा झालेले अज्ञातवासी पुन्हा प्रगट होतात, मातृभूमीकडे धाव घेतात, तिथली एखादी मुलगी पसंत करून लग्न करतात आणि परत येतात. अशा मुलांना श्रीमंत घरातल्या सुशिक्षित मुलीही मिळतात, हे चंद्रूही पाहत होता. मग तिथं त्यांचं `सुखी’ असं स्थिर जीवन सुरू होतं. मग ते त्याच डॉलर-भूमीचे प्रजाजन होऊन जातात.

ग्रीनकार्ड मिळण्यासाठी एक वर्ष लागेल- कदाचित दोन वर्षही लागतील. काही जणांच्या बाबतीत तर त्याहीपेक्षा जास्त वेळही लागायचा. ग्रीनकार्ड न मिळवता भारताला निघून गेलं की इथं पुन्हा येण्याचं दार बंद झालेलं असायचं!

एक ना एक दिवस आपल्याला ग्रीनकार्ड मिळेल याविषयी चंद्रूची खात्री होती. फक्त त्यासाठी शबरीनं रामाची वाट पाहिली, त्या निष्ठेनं वाट पाहिली पाहिजे एवढंच.

चंद्रू विचार करत होता. अगदी सुरुवातीला त्याचं मन गोंधळलं असलं तरी दिवस जातील तसे त्यालाही `स्किप’ होण्यात काही गैर नाही हे पटू लागलं. एवढ्या समृद्ध देशात राहायची त्याची जबरदस्त इच्छा होती. एकदा भारतात परतलं की, पुन्हा इथं येण्याची संधी मिळणार नाही कदाचित!
 
त्यानं आईला पत्र लिहून आपल्या मनातले विचार कळवले. अखेरीस लिहिलं, `तूर्त माझा इथंच राहायचा विचार आहे, हे घरी आणखी कुणाला सांगू नकोस. ग्रीनकार्ड हातात पडेपर्यंत मला भारतात यायला जमणार नाही.’

पत्र वाचताच गौरम्मांचा आनंद गगनात मावेना! आपला मुलगा यानंतर अमेरिकेत राहणार! डॉलरच्या रूपानं तो भरपूर पैसा मिळवेल आणि इथं पाठवेल! एक डॉलर म्हणजे चाळीस रुपये! आपणही मैत्रिणींपुढे `आमचा चंद्रू अमेरिकेत राहतो-’ असं अभिमानानं सांगू शकू!

चंद्रूचं लक्ष पेपरमधल्या एका जाहिरातीनं खेचून घेतलं. गवतांची कुरणं असलेल्या प्रदेशातल्या, अत्यंत कमी वस्ती असलेल्या, मिनिसोटामधल्या कंपनीनं जाहिरात दिली होती. त्यात कंपनीनं ग्रीनकार्ड मिळवून देण्याचीही जबाबदारी स्वत:कडे घेतली होती!

कुणीही जायला तयार नसलेला नीरस प्रदेश तो! हिवाळ्यामध्ये तर उणे त्रेपन्न फॅरनहिट इतकं कमी तापमान असलेला प्रदेश! जास्तीचा पगार दिला तरी, अशा प्रदेशात जायला माणसं तयार नसताना चंद्रूला मात्र हे योग्य स्थान आणि योग्य नोकरी आहे, असं तीव्रपणे वाटलं. अज्ञातवासासाठी हेच विराटनगर म्हणून योग्य होतं. फोनवर बोलणं झालं. इंटरव्ह्यूसाठी जाऊन आला. कुठल्याही खळखळीशिवाय काम झालं.

कुणालाही कळू न देता गाडी विकून, कंपनीनं दिलेल्या घरात रात्री दिवा लावून ठेवून चंद्रू तिथून बेपत्ता झाला.

दुसरे दिवशी चंद्रू कामावर आलाच नाही. घरी जाऊन पाहिलं तर दिवा जळत होता. आठवडा गेला, तरी चंद्रूचा पत्ता नव्हता. फ्लोरिडा ऑफिसच्या बॉसनं फोन केला. चंद्रूनं टेलिफोनचं पुढच्या आठवड्याचं जास्तीचं बिल भरून पोबारा केला होता.

अमेरिकेतील त्याचे ज्येष्ठ अधिकारी निराशेनं म्हणाले, `तो कुठंही गेलेला नाही. इथंच कुठंतरी स्किप झालाय! घाणेरडी माणसं ही! कशाचीच चाड नाही. आपल्या मातृभूमीला जाणं टाळण्यासाठी ही सगळी नाटकं करतात! देशप्रेम नाही- डॉलरच्या आशेपोटी असं वागतात. अशा लोकांना आपण दिलेलं ट्रेनिंग पूर्णपणे फुकट गेलं!’

त्यांनी मनोमन चंद्रू आणि चंद्रूसारख्यांना शापलं.

राजाजीनगरकडून विजयनगरकडे जाणारी बस गच्च भरून आली तेव्हा विनिताच्या छातीची धडधड आणखी वाढली.

ही बस चुकली तर शाळेत पोहोचायला तासभर उशीर होणार! लाल शाईचा शेरा! आधीच तात्पुरती नोकरी मिळाली होती. असे लाल शेरे पडले तर नोकरी कशी टिकेल?

विनितेनं सारं धैर्य एकवटलं आणि समरांगणात शत्रूवर तुटून पडणाऱ्या कित्तूर चन्नम्माप्रमाणे कंडक्टरच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून ती बसमध्ये घुसली. बसमध्ये प्रवेश मिळताच तिनं विजयी मुद्रेनं सभोवताली बघत सुस्कारा सोडला आणि आधारासाठी खांबाला टेकली.

कंडक्टरनं विचारलं, `कुठं जायचंय?’

`जयनगर-’

तिनं पर्स उघडली- आत फक्त एक शंभरची नोट होती. काल ट्यूशनच्या मुलानं दिलेली नोट. तिनं पर्समध्ये हात घालून शोधले, आजूबाजूच्या कप्प्यांच्या चेन उघडून पाहिलं- एक रुपयाही हाताला लागला नाही.

तिनं अपराधी भावनेनं ती नोट कंडक्टरपुढे धरली.

`पाच रुपयेही सुटे नाहीत. एवढे सुटे कुठून देऊ? असू दे, तुमचे यजमान काढताहेत.’

विनिता आश्चर्यचकित झाली- कोण हा माझा यजमान? या प्रौढ कंडक्टरनं नवा पैसाही खर्च न करता या क्षणी कुणाशी माझं लग्न लावलं?

तिनं वळून पाहिलं. मागं उभा असलेला उंच युवक हसत सुटे पैसे देत कंडक्टरला म्हणाला, `दोन जयनगर-’

`बघा! सुटे पैसे असून नाही म्हणताय!’ म्हणत कंडक्टरनं दोन जयनगरची तिकिटं विनितेच्या हातावर ठेवली.

हा कोण लागून गेलाय? स्वत:ला कोण समजतो? भूपती? राजा? माझं तिकीट यानं का काढावं?

संताप दर्शवत विनितानं सांगितलं, `मिस्टर! जयनगरला उतरल्यावर तुमचे पैसे परत करेन!’

`असू द्या हो.’

`तुम्हाला कदाचित हे चालेल! पण मी दुसऱ्यांचे पैसे घेत नसते!’

एवढ्यात विनिताला बसायला जागा मिळाली.

विनिता राजाजीनगरमध्ये आपल्या आत्याच्या घरी राहात होती. दररोज राजाजीनगरहून जयनगरपर्यंतचा खडतर प्रवास! जयनगरच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाल्यामुळे काही इलाजच नव्हता.

तिच्या जीवनातले धारवाडमधले रम्य दिवस कधीच निघून गेले होते. मायाबाजारातलं एखादं आकर्षक दृश्य नाहीसं व्हावं तसं झालं होतं.

थोरल्या काकांचा, भीमण्णांचा हृदयाघातानं अचानक मृत्यू झाला आणि त्या कुटुंबाचा आधारस्तंभच मोडून गेला.

तुळसक्का दावणगेरेमध्ये नोकरी करणाऱ्या आपल्या थोरल्या मुलाकडे निघून गेल्या.

रामक्का आपल्या सख्ख्या मुलाला सोबत घेऊन मासूरला आपल्या माहेरी निघून गेल्या.

तिथं फक्त आजी सीतम्मा आणि नात विनिता याच दोघी राहिल्या. सीतम्मांनी सगळ्या मुलांकडे थोडे-थोडे दिवस राहायचं असं ठरलं.

आता फक्त विनिताच राहिली.

तिची जबाबदारी कुणालाच नको होती. तिचं लग्न करायचं म्हटलं तर पैसे नव्हते. आता या वयात आलेल्या मुलीनं कुठं राहायचं हा एक प्रश्नच होता.

अखेर आत्या इंदक्का आणि तिचे पती रामराय यांनी मोठं मन करून तिला बेंगळूरला आणलं होतं. `मोठं गाव आहे- लवकर कुठं तरी नोकरी मिळेल. हातात नोकरी असली की लग्नही लवकर जमेल. लग्न ठरलं की धारवाडचं घर विकता येईल. तोच पैसा लग्नासाठी वापरता येईल-’ असा विचार साऱ्यांनीच केला. धारवाडच्या घराला कुलूप लावलं आणि माडी मात्र भाड्यानं दिली. तेवढाच झाडांची देखभाल करणाऱ्या माळ्याचा पगार निघेल.

धारवाडचं घर आणि बाग सोडून येताना विनितेला अत्यंत क्लेश झाले होते. तिनं आत्याला सांगितलं, `घर मात्र विकू नका. आईला तिच्या माहेरकडून आलंय ते. माझा तर या बागेत सारा जीव अडकलाय!’

`खरंय बाई! पटतंय तुझं. जर कुणी सरदार हुंड्याशिवाय तुझ्याशी लग्न करायला तयार झाला तरच तू म्हणतेस तसं घर राखता येईल!’

पण व्यवहारात हे कसं शक्य होईल?

व्यावहारिक जग कसंही असलं तरी विनितेचं मात्र ते घर आणि त्या बागेशी, बागेतल्या प्रत्येक झाडाशी, तिथल्या पाना-फुलाशी अव्यक्त असं गाढ नातं जडलं होतं. तिथलं प्रत्येक झाड तिचं सख्खं भावंडं होतं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. ही बाग आणि हे घर सोडून ती कशी राहील?

पण तिच्या मनाचा कोण विचार करणार? निरुपायानं शेवटी तिनं बागेतल्या प्रत्येक झाडा-झुडुपांवरन हात फिरवून त्यांचा निरोप घेतला. मन घट्ट करून ती जनारण्य असलेल्या बेंगळूरला आली होती.

मोठ्या गावाची सुख-दु:खंही वेगळी. घराजवळ नोकरी कुठून मिळणार? विनिता सकाळी घरातली कामं आवरुन, ट्यूशन उरकून जयनगरच्या शाळेत नोकरीसाठी येत-जात होती.

आता तिला प्रत्येक पैशाचं महत्त्व चांगलंच समजत होतं. त्यासाठी तिचे कष्ट चालले होते.

तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य लोपलं नव्हतं. तेच तर तिचं वैशिष्ट्य होतं!

बस जयनगरला थांबली. सारे विचार मागं सारन विनिता बसमधून उतरली. तिच्या पाठोपाठ तो उंच तरुणही खाली उतरला.

तिनं त्याला हटकलं, `मिस्टर! थोडं थांबा. मी सुटे पैसे आणून देते.’

`गिरीश माझं नाव. कॅनरा बँकेत क्लर्क आहे-’ त्यानं स्वत:चा परिचय सांगितला.

`ते ठीक आहे! तुम्ही इथंच थांबा. आलेच मी सुटे पैसे घेऊन.’

एवढ्या पटकन शंभर रुपयांची चिल्लर मिळणार नाही, हे गिरीशला ठाऊक असलं तरी आता ही सुंदर, स्वाभिमानी तरुणी करते तरी काय हे पाहत तो उभा राहिला.

विनिता निराश होऊन परतली. एकदम तिला सुचलं, `तुम्ही बँकेतच नोकरी करता ना? मी संध्याकाळी बँकेत येऊन तुमच्याकडून सुटे पैसे घेईन!’ आणि तिनं ती शंभरची नोट गिरीशच्या हातावर ठेवली.

`तुमचं नाव?’

`विनिता देसाई. ती शाळा दिसते ना? तिथंच मी शिकवते. आता उशीर झाला. निघू?’

विनिता नमस्कार करून निघून गेली.

गिरीश ती गेलेल्या दिशेकडे पाहून हसला. वेगानं जाताना तिच्या जाड वेणीचा फटका त्याला बसल्याचं तिच्या लक्षात आलं नाही.

शाळेत जाऊन पोहोचल्यावर विनिताला भीती वाटू लागली. कोण हा गिरीश कोण जाणे! अशा अपरिचितावर विश्वास ठेवून मी तरी कशी शंभर रुपयांची नोट दिली? त्यानं फसवलं असेल तर? शंभर रुपये फुकापासरी गेलेच म्हणायचे! छे! वेडेपणाच झाला हा! महिनाभर केलेल्या कामाची कमाई होती ती.

पाठोपाठ विनितेला स्वत:ला वाटलेल्या भीतीचा रागही आला. जे झालं ते घडून गेलंय. त्यावर आता फार उलट-सुलट विचार करून काहीच उपयोग नाही.

संध्याकाळी ती मन घट्ट करून कॅनरा बँकेपाशी गेली. त्यानं नाव काय सांगितलं होतं? गिरीश की रमेश?

या विचारात ती तिथं पोहोचली तेव्हा तो बँकेच्या बाहेर तिची वाट पाहात उभा होता.

`वाटच बघत होतो. तुम्ही आला नसता तर तुमच्या शाळेत येऊन तुमचे पैसे द्यायचा विचार करत होतो.’

`शाळेत कुणी तुमच्या ओळखीचं आहे का?’

गिरीश मंद हसत म्हणाला, `तिथं शामण्णा नावाचे संस्कृतचे शिक्षक आहेत ना? त्यांची ओळख आहे.’

`होय? केव्हापासूनची ओळख आहे?’ विनितानं कुतूहलानं विचारलं.

`खूप वर्षांची ओळख आहे. मला यायला जमलं नसतं तरी मी त्यांच्याकडून पैसे पाठवले असते. हं, हे घ्या तुमचे पैसे-’ म्हणत त्यानं एक बंद लखोटा तिच्या हाती ठेवला.

`थँक्स-’ म्हणत तो घेऊन विनिता निघून गेली.

बसमध्ये बसल्यावर तिनं लखोटा खोलून पाहिला. त्यात शंभर रुपयांची चिल्लर होती. गिरीशनं बसचे पैसे त्यातून मोडून घेतले नव्हते.

विनिताला पाहिल्यावर आणि ती वडिलांच्या शाळेतच नोकरी करत असल्याचं समजल्यानंतर गिरीशच्या मनात प्रथमच स्वत:च्या लग्नाविषयी विचार आला.

गिरीशच्या लग्नाचा विचार गौरम्मांच्या मनात आला नव्हता. पण चंद्रूच्या पत्रामुळे अशा विचारांना तोंड फुटलं होतं.

त्यानं नुकतंच आईला पत्र लिहून कळवलं होतं, `मला ग्रीनकार्ड मिळायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. कदाचित आणखी दोन वर्षंही लागू शकतील. तुम्ही गिरीशचं लग्न करावं हे उत्तम!’

या पत्रानंतर गौरम्मांनी वधू-पित्यांना तसं कळवलं.

लग्नाचा विषय घरात गंभीरपणे चर्चिला जाऊ लागला तेव्हा गिरीशनं थोडं दुर्लक्षच केलं, त्यानंतर माञ त्यानं वडिलांनाच थेट विचारलं,

`अण्णा, तुमच्या शाळेत विनिता देसाई म्हणून शिक्षिका आहेत ना?’

`होय. अगदी मंगळागौरीसारखी आहे! फार चांगली मुलगी आहे. आपल्यापैकीच पण धारवाडची आहे ती.’

`आज मी त्यांना बसमध्ये पाहिलं.’
 
गिरीशचं मन जाणून शामण्णा तो नसताना गौरम्मांना म्हणाले, `गौरी, मी विनितेला ओळखतो. फार गुणी मुलगी आहे. तिला आई-वडील नाहीत. इथंच नातेवाईकांकडे राहते. आपल्या गिरीशचंही आता लग्नाचं वय आहे. आपण विचारायचं काय?’

`आपण होऊन मुलीच्या घरी जाऊन `तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या’ म्हणून तोंड वेंगाडायचं हे मला तरी पटत नाही. आपल्याकडेच काहीतरी खोट आहे, असं लोकांना वाटायचं. त्यांनी विचारलं तर बघू या-’ गौरम्मांनी वरमाईच्या थाटात म्हटलं. त्यांच्या मनात आलं होतं ते वेगळंच! आई-वडील नसलेल्या मुलीला माहेरपण कोण करणार? जावयाचं कोडकौतुक कोण करणार?

शामण्णांना गौरम्मांचा स्वभाव काही अपरिचित नव्हता. त्यांनी एक मध्यस्थ तयार करून त्यांच्याकरवी इंदक्कांना निरोप पाठवला आणि वधू-परीक्षेचं नाटकही ठरवलं.

रात्री कांदा चिरत इंदक्का म्हणाल्या,

`विनू, या रविवारी ट्यूशन ठेवू नकोस बरं!’

`का गं, आत्या?’

`रविवारी मुलाकडची माणसं तुला बघायला येणार आहेत. पण एक मात्र आधीच सांगते- ते काही आपल्या गावाकडचे नाहीत. इकडचे आहेत. तू काय म्हणतेस? चालेल ना तुला?’

`मुलगा ठीक असला की झालं! मग ते कुठले का असेनात!’ मध्येच रामराय म्हणाले.

विनिता म्हणजे त्यांच्या बायकोच्या भावाची मुलगी. लग्न होऊन सासरी गेली की खूप झालं! उगाच नाही तो चिकित्सकपणा कशाला दाखवत बसायचा?

रामरायांच्या मनातले विचार जाणून विनिताही म्हणाली, `अगदी खरंय तुमचं, मामा!’

तिलाही वाटलं होतं- माणसं ती माणसंच ना? बेंगळूरमध्ये चांगली माणसं असतात आणि धारवाडची कितीतरी बिघडलेली माणसं तिनं पाहिली होती. आपल्या शाळेतल्या शामण्णा मास्तरांसारखा माणूस जगात तरी शोधून सापडेल काय?

तिनं नि:श्वास सोडला- आपल्या नशिबात कसली माणसं आणि कसला नवरा आहे कोण जाणे!

`मुलगा बँकेत क्लर्क म्हणून नोकरीला आहे. खाऊन-पिऊन सुखी माणसं आहेत. फारशी गडगंज नाहीत. एक मुलगा अमेरिकेला आहे म्हणे. तो आणखी दोन वर्षांनी भारतात येणार आहे म्हणे. म्हणून आधी धाकट्याचं लग्न करणार आहेत. आणखी एक मुलगी आहे. तिचं लग्न झालं की जबाबदारी संपली. तुझी इंजिनियर-डॉक्टर किंवा ऑफिसरच पाहिजे अशी अट नाही ना?’

`नाही गं आत्या. तसं काहीही म्हणणं नाही. चार पैसे कमी मिळत असले तरी काही म्हणणं नाही- पण माणसं शांत आणि समाधानी असावीत. उगाच गोंधळ-कटकट मात्र असू नये. मीही नोकरी करेन. कष्टाला माझी ना नाही; पण मन प्रसन्न हवं.’

विनितेनं मनातलं मोकळेपणानं सांगितलं.

तो तिचा गाढ विश्वासही होता.

मनाविरुद्धच गिरीश मुलगी बघायला निघाला. वाटेत सुरभी म्हणाली,

`इतके दिवस घरात फक्त अण्णा तेवढेच टीचर होते- आता दोन टीचर होतील!’

`ते एवढ्यात कसं ठरेल? मी मुलगी पाहिल्याशिवाय लग्नाला कसा तयार होईन?’

`गिरी, ही मुलगी अण्णांच्याच शाळेत शिकवतेय म्हणे!’

`होय?’ गिरीश चमकला, `नाव काय मुलीचं?’

`तूच विचार ना तिथं गेल्यावर! नाहीतरी मुलगी बघायची म्हणजे नाव काय वगैरे विचारायचं असतं ना?’

`आधी तू मुकाट्यानं नाव सांग बघू!’

`विनिता देसाई!’

नाव ऐकताच गिरीशचं मन आनंदानं भरून गेलं. विनितेचा स्वाभिमान त्यानं पाहिला होता आणि त्याला तो फार आवडलाही होता. तिला पुन्हा भेटावं असं शंभरदा त्याच्या मनात येऊन गेलं होतं; पण त्यासाठी त्याला आधी राजाजीनगरमधल्या आपल्या मित्राकडे जायला हवं होतं, रात्री तिथं मुक्काम करून सकाळी नऊची बस पकडली पाहिजे होती तरच या मोहिनीची भेट होणं शक्य आहे!

त्याला आता विनितेची माहिती मिळाली होती; पण तरीही तीच आपली वाग्दत्त वधू असल्याची मात्र त्याला कल्पना नव्हती.

`विनिता, आतला ट्रे घेऊन ये बघू!’

खालच्या मानेनं ट्रे घेऊन येणाऱ्या विनितेकडे बघून गिरीशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं.

`बाळ, एखादं देवाचं गाणं म्हणशील काय?’ शामण्णांनी विचारलं तेव्हा तिनं मान वर करून पाहिलं. गिरीशवर नजर जाताच तिच्याही ओठांवर हसू उमटलं.

त्यानंतर तिनं एक देवाचं गाणं सुरेलपणे रंगून जाऊन म्हटलं. गौरम्मा आणि सुरभीलाही विनिता आवडली.

रामरायांनी शामण्णांना स्पष्टच सांगितलं, `धारवाडला तिच्या आईकडून तिला मिळालेलं घर आहे. ते आम्ही तिच्या लग्नासाठी म्हणून ठेवलंय. तुम्ही तुमचं मत सांगितलं तर आम्हांला ते विकण्याची व्यवस्था करता येईल. शक्यतो लवकर तुमचं मत कळवा.’

`आमच्या विनूविषयी आम्ही फार काही सांगत नाही. तुम्ही तिला दररोज शाळेत पाहताच. तुम्ही तुमचा निर्णय लवकर सांगाल तर बरं होईल!’ इंदक्का म्हणाल्या.

वरमाईच्या ठेक्यात गौरम्मा म्हणाल्या, `उद्या आम्ही तुम्हांला कळवू!’ आणि सगळे तिथून बाहेर पडले.

मिनिसोटामध्ये चंद्रू बऱ्यापैकी रुळला होता. ग्रीनकार्डसाठी त्यानं अर्ज दिला होता. तिथल्या वकिलांनी मोघम सांगितलं,

`काहीही सांगता येत नाही. कदाचित लगेच मिळून जाईल, किंवा बराच उशीरही लागेल कदाचित!’

त्यामुळे त्याची अवस्था त्रिशंकूसारखी होऊन बसली होती. आता कुठल्याही कारणासाठी भारतात गेलं तर परत येण्यासाठी व्हिसाचा प्रश्न होता. त्यामुळे घरी आणि आपल्या माणसांची कितीही आठवण झाली तरी त्याचा नाइलाज होता.

त्याच्या मित्रांपैकी काहीजणांना ग्रीनकार्ड मिळाल्याचं त्याला समजलं. ते मित्रा लग्न ठरवण्यासाठी म्हणून ढीगभर सामान घेऊन भारतात आपापल्या गावी गेले होते. तिथं तीन दिवसांत तीस मुली बघून, त्यांतली एक निवडायची आणि लग्न करून इथं यायचं असा त्यांचा प्लॅन होता. कुणी मुलीची व्हिडिओ कॅसेट पाहूनही लग्न ठरवलं होतं.

एवढे दिवस अमेरिकेत राहिल्यामुळे चंद्रूला तिथल्या सुख-साधनांची अपरपाई राहिली नव्हती. आता त्याची त्याला सवय होऊन गेली होती.

उलट आता त्याला तिथं एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. त्याच्या मनात अधूनमधून लग्नाचे विचारही डोकावून जात होते. आतापर्यंत डॉलर्स-अमेरिका-ग्रीनकार्ड यातच संपूर्णपणे बुडून गेल्यामुळे आणखी कुठल्याही विचारांनी मनात प्रवेश केला नव्हता. आता त्या साऱ्या अडचणी दूर होऊन जीवन नेहमीप्रमाणे झाल्यावर लग्नाचा विचार येणं स्वाभाविकच होतं म्हणा!

लग्नाचा विचार मनात येताच त्याला न चुकता विनिताची आठवण येत होती.

त्याला विनिता मनापासून आवडली होती. त्याचं तिच्यावर प्रेम होतं असंही म्हणता येणार नाही. जेव्हा लग्नाचा विचारच मनात नव्हता, तेव्हा तो तिला पूर्णपणे विसरून गेला होता. आता लग्नाच्या विचारानंतर तिची आठवण येत होती. त्यानं तिच्यापुढे कुठल्याही प्रकारे मनातली भावना व्यक्त केली नव्हती. शिवाय त्याला ती आवडली होती- तिला त्याच्याविषयी काय वाटत होतं, हेही त्याला ठाऊक नव्हतं.

एकदा आठवण झाल्यानंतर मात्र त्याला सारखं मनात येऊ लागलं- आता विनिता कशी असेल? तिचं लग्न झालं असेल काय? तिच्या घरची परिस्थिती पाहता एवढ्यात लग्न व्हायची शक्यता कमी आहे. ती कुठं तरी नोकरी करत असेल. ही शक्यता मात्र त्याला जास्त वाटली.

त्याला वाटलं, तिला पत्र लिहून आपल्या मनातली भावना व्यक्त का करू नये? पण मनात आशंका उमटली. विनितेला पत्र बघून काय वाटेल? तिला आवडेल की नाही? पुन्हा वाटलं- काय हरकत आहे? समोरासमोर भावना व्यक्त करण्यापेक्षा पत्र लिहायचा विचार केव्हाही चांगला! शिवाय आपण मनातली भावना व्यक्तच केली नाही, तर ती तिच्यापर्यंत पोहोचणार तरी कशी?

अखेर विचार करकरुन त्यानं विनितेच्या नावे एक पत्र लिहिलं-

विनिता यांना,

माझं हे पत्र पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल; पण तुम्ही हे वाचून गैरसमज करून घेऊ नये.

मला अमेरिकेला येऊन अडीच वर्षं झाली आहेत. तुमच्या मनात असेल आणि आणखी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर तुम्ही माझी आणखी थोडी वाट पाहाल का? मला अजूनही ग्रीनकार्ड मिळालेलं नाही. त्यासाठी आणखी काही दिवस लागतील असं दिसतं.

तुमची यासाठी तयारी असेल तर पत्रामागे दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहा. तुमचा नकार असला तरी मला त्याचा राग नाही. तुमच्या निर्णयासाठी तुम्ही स्वतंञ आहात.

घरात थोरांना नमस्कार.

इति

चंद्रू
 
दिवसांमागून दिवस गेले, महिनेही गेले तरी विनितेकडून उत्तर आलं नाही. चंद्रूला काळजी वाटू लागली- पत्र आणखी कुणाच्या तरी हाती पडलं नसेल ना? अमेरिकेत काही वर्षं राहिल्यामुळे आपला अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन मोकळा असतो. धारवाडच्या माळमड्डीवर राहणाऱ्यांची दृष्टी वेगळी असते.

चंद्रूला स्वत:च्या अविचारीपणाचा राग आला.

अखेर एक दिवस पाकीट आलं. त्यानं लिहिलेलं पत्रच माघारी येऊन त्याला पोहोचलं होतं. पत्त्यावर ही व्यक्ती राहत नसल्याच्या शेऱ्यासहित पत्र आलं होतं.

आपलं पत्र आणखी कुणाच्या हातात पडलं नाही म्हणून सुस्कारा सोडत असतानाच चंद्रू गोंधळून गेला. कुठे गेली विनिता?

मनात पालवलेल्या आशा-आकांक्षा आणि गुपिताच्या त्या पत्रासोबत चिंध्या करून चंद्रूनं त्या कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या. त्याचं मन निराशेनं भरून गेलं. आंब्याचं मोहोरलेलं झाड कोकिळेच्या कूजनाची आतुरतेनं वाट पाहत होतं- पण कोकिळा वेगळ्याच वृक्षावरच्या घरट्यात शिरली होती.

गौरम्मांनी शामण्णांना स्पष्टपणे सांगितलं होतं,

`अहो, बेंगळूरमध्ये घर असतं तर गोष्ट वेगळी! धारवाडमधलं घर घेऊन काय करायचं? आपल्याला काय उपयोग धारवाडमधल्या घराचा? आपल्या घरचं हे पहिलं लग्न आहे. त्यासाठी परगावचे भरपूर नातेवाईक जमतील. सगळे विचारतील- मुलीकडच्यांनी काय काय दिलं? त्यांना म्हणावं, आमच्या गावात तीन दिवसांसाठी एक चांगलं कार्यालय धरा आणि छान लग्न करून द्या. आपल्याला हुंडा मुळीच नको. म्हणावं, सालंकृत कन्यादान करून द्या. त्यांच्याच मुलीला सोनं घालू द्या. आम्हांला काही नको. लग्नाला माणसं येतील त्यांना जेवण आणि खाणं-पिणं मात्र उत्तम करा म्हणावं. ती माणसं काय पुन्हा-पुन्हा आपल्या घरी येणार आहेत? नंतर एक उत्तम रिसेप्शन करून द्या म्हणजे झालं!’

`गौरी, आपण यात लक्ष घालू नये. विनिता आणि गिरीशलाच घराच्या संदर्भात जे ठरवायचं ते ठरवू द्या. स्वत:च्या मालकीचं घर विकून गावभरच्या नातेवाईकांकडून शाबासकी मिळण्यात काय अर्थ आहे? माझं मत असं आहे!’ शामण्णांनी सांगितलं.

गिरीशनं आई-वडिलांची मतं ऐकून घेतली. विनिताशी बोलल्यानंतरच धारवाडच्या घरासंदर्भातला निर्णय घ्यायचा, हे त्याचं पक्कं ठरलं होतं.

लग्न ठरल्याच्या आनंदापेक्षा धारवाडचं घर विकण्याच्या विचारानं विनिता दग्ध झाली होती. पण मनातला दाह कुणापुढे व्यक्त करणार? घर जुनं होतं, काही ठिकाणी पडझडही झाली होती; पण ते घर म्हणजे तिच्या लहानपणी मृत्यू पावलेल्या आईची आठवण होती. आता तिचं असं या जगात केवळ ते एक घरच होतं. तिचं बालपण त्या घरात गेलं होतं. रात्रीच्या काळोखातही ती कुठलं झाड कुठं आहे हे दाखवू शकत होती.

झाडा-वृक्षांच्या सान्निध्यात वाढलेल्या विनिताच्या मनात दु:ख-वेदना ठसठसू लागली की, याच झाडा-वृक्षांच्या सान्निध्यात तिचा निचरा होऊन विनिता पुन्हा आनंदित होत असे. ती बाग- तो निसर्ग तिच्या दृष्टीनं केवळ स्थावर मालमत्ता नव्हती, तोच तिचा सखा-सांगाती होता. घरात भरपूर कामाचं ओझं असलं तरी झाडांच्या आणि सुरांच्या सावलीत तिला कष्टाचाच नव्हे; साऱ्या जगाचाच विसर पडत होता.

केवळ तीन दिवसांच्या उत्सवासाठी असलं जिवाभावाचं घर आणि बाग विकून टाकणं हा विचारच तिला अत्यंत हिंस्त्र वाटत होता. बाग आणि घर विकून आलेल्या पैशांमधून सोनं-नाणं, रेशमी साड्या, चांदीची भांडी घ्यायची- त्या साड्यानी आपला देह झाकायचा- तिला सारंच असह्य होत होतं.

पण तिला कुणीही `या संदर्भात तुला काय वाटतं?’ असं विचारलं नव्हतं. शिवाय ते व्यवहार्यही नव्हतं. धारवाडचं घर विकल्याशिवाय लग्न होणंच शक्य नव्हतं. त्यामुळे आता तिच्यापुढे केवळ दोनच पर्याय होते- लग्न की घर? मन काहीही म्हणत असलं तरी तिला घरावरचा मोह सारावा लागणार, हे तिलाही समजत होतं.

घशाशी आलेला आवंढा गिळत विनिता बसमधून उतरली. समोर गिरीश होता. तिनं पटकन डोळे टिपले; पण गिरीशच्या तीक्ष्ण नजरेनं हे जाणलं होतं.

`विनिता, थोडं काम आहे. रजा टाकून येणार का?’

`हं-’ म्हणत तिनं मान डोलावली आणि ती गिरीशबरोबर चालू लागली.

पावलं गिरीशबरोबर पडत असली तरी, विनितेच्या मनात अनेक आशंका उमटत होत्या. याआधी ती कधीच एखद्या तरुणाबरोबर अशी फिरायला बाहेर पडली नव्हती. तरीही मनाच्या कोपऱ्यात एक आशा डोकावत होती- आपला पती होणाऱ्या या तरुणाला आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली तर घर विकणं टाळता येईल का?

लालबागमध्ये सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे कोवळ्या प्रेमिकांची वर्दळ होती. एका चाफ्याच्या वृक्षाखाली असलेल्या दगडी बाकाच्या टोकावर बसत विनितेनं विचारलं, `काय बरं? कशाला बोलावलंत मला?’

`थोडं काम होतं? तुमच्या धारवाडच्या घराच्या संदर्भात थोडं बोलायचं होतं.’

विनितेच्या हृदयाची धडधड वाढली.

गिरीश पुढं म्हणाला, `धारवाडचं घर विकून लग्न करायला माझा विरोध आहे, हेच तुम्हांला सांगायचं होतं! तुमचं या बाबतीत काय मत आहे?’

मस्तकावर मध्यान्हीचा सूर्य तळपत असताना हजारो कारंजी एकाच क्षणी सर्व बाजूंनी उसळावीत तसा विनितेला अनुभव आला. सुकून निष्प्राण झालेल्या वेलीवर अमृत-सिंचन व्हावं तशी ती डवरून आली.

गिरीश पुढं म्हणाला, `आजच्या दिवसांत एक घर बांधणं किती कठीण आहे, हे मला ठाऊक आहे! आमचं छोटं घर आहे. माडीवरच्या दोन खोल्या बांधण्यासाठी आम्ही वीस वर्षं धडपडत होतो तरी जमत नव्हतं. आता आमचा थोरला भाऊच अमेरिकेत असतो. तो तिथं डॉलर्स वाचवून आम्हांला पाठवून देतोय. म्हणून आम्ही माडीवरच्या खोल्यांचं बांधकाम काढलं आहे. केवळ दोन खोल्या वाढवायला दोन लाखांपेक्षा जास्त खर्च आला आहे.’

विनिता मूकपणे गिरीशचं बोलणं ऐकत होती.

`दोन दिवसांसाठी सगळे पाहुणे जमतील; `लाडू उत्तम होते, अमुक छान होतं, तमुक रुचकर होतं’ म्हणत निघून जातील; पण एकदा हातातून गेलेलं घर पुन्हा मिळणार आहे काय?’

आता तीही म्हणाली, `मलाही तसंच वाटत होतं. पण तुम्ही काय म्हणाल म्हणून काही बोलले नाही.’

तिच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. चेहराही समाधानानं फुलला होता.

`विनिता, आपण राघवेंद्रस्वामींच्या मठात अगदी साधेपणानं लग्न करू या. मी तुला एक साडी आणि मंगळसूत्र एवढंच देईन. एक वेळ जेवण देऊ या. या सगळ्या नातेवाईकांना थेट मठात बोलवायचं आणि तिथून परस्पर निरोप द्यायचा. माझा सगळा पगार मिळून साडेतीन हजार रुपये आहे. आईच्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या आहेत आणि घर. एवढीच आमची संपत्ती. याशिवाय आणखीही एक मूल्यवान ऐवज तुझ्याकडे असेल!’

`तो कोणता?’ विनिता बुचकळ्यात पडली.

`मी!’

`त्या बाबतीत माझ्याइतकी श्रीमंत मीच!’ विनिता लाजून; पण मनापासून म्हणाली.

`गिरीशचं लग्न ठरलंय. तुला त्यासाठी इथं आलंच पाहिजे. केव्हा जमेल ते कळव. म्हणजे तसा मुहूर्त ठरवता येईल.

तू घरातला थोरला मुलगा! खरं पाहता आधी तुझं लग्न व्हायला पाहिजे. तू कळवलंस म्हणून आधी गिरीशचं लग्न ठरवलं आहे एवढंच.

मुलगी तुझ्या वडिलांच्या शाळेत नोकरी करते. पेन्शनर झाल्यानंतर तू पाठवलेल्या पैशांमधून माडीवरच्या दोन खोल्यांच्या बांधकामावर तुझे वडील लक्ष ठेवत आहेत. चंद्रू, तू नसतास तर आमचे हे दिवस कसे गेले असते, या विचारानंही मन घाबरं होतं!’

आईचं विस्तृत पत्र वाचून चंद्रूला आनंद झाला. पत्रात गिरीशच्या बायको होणाऱ्या मुलीचं नाव लिहायचं राहून गेलं होतं. गिरीश किंवा शामण्णांना पत्र लिहायची सवय नव्हती. त्यामुळे आईच्या पत्रातून जेवढं समजत होतं तेवढंच.

आईनं भरपूर आग्रहानं लिहिलं असलं तरी, आता भारतात जाण्यात शहाणपणा नाही, हे चंद्रूला समजत होतं. भावाच्या लग्नाचं कौतुक म्हणून भारतात गेलेल्या वेळीच जर ग्रीनकार्ड मिळण्याची संधी हुकली तर आपल्यावर कायमचे अविवाहित राहण्याची पाळी येईल! तीन वर्षं इथल्या जीवनाची सवय झाली आहे. संधी हुकली तर पुन्हा बेंगळूरमधल्या त्या खुराड्यासारख्या घरात गर्दी करून दाटीवाटीनं आयुष्यभर राहावं लागेल.

त्याऐवजी आता लग्नासाठी म्हणून शंभर डॉलर पाठवले तर त्यांना चार हजार रुपये मिळतील. काहीतरी खर्च करून खूष होतील.

पण आता विनिता कुठं असेल? तिची साथ ज्याला लाभेल तो मात्र खरोखरच नशिबवान म्हटला पाहिजे. तो दररोज तिची सुरेल गाणी ऐकू शकेल! तिच्यासारखी मुलगी दिवा घेऊन शोधत फिरलं तरी दुसरी सापडणार नाही! त्यासाठीही नशीब हवं ना!

चंद्रूनं सुस्कारा सोडला.

सासरी विनितेचे दिवस आनंदात चालले होते. तिच्यावर पित्याप्रमाणे वात्सल्याचा वर्षाव करणारे सासरे तिची मुलीप्रमाणे काळजी घेत होते. हृदयात प्रेमाला परमस्थान देणारा पती गिरीश होता!

सासूबार्इंनीही तिला कधी एखाद्या का होईना, कटू शब्दानं दुखवलं नव्हतं; पण त्यांच्या वागण्यात सासऱ्यांइतकी आत्मीयता नव्हती. त्यांचा स्वभावही फारसा बोलका नव्हता. त्यांच्या अंतर्मनात काय दडलंय हे विनितेला संपूर्णपणे कधीच उमजत नव्हतं. त्यांच्या बोलण्यात आणि मनातल्या भावनेत भेद असल्याचा अनुभव अधूनमधून विनितेला येत होता. त्यांच्या बोलण्यात भावनेपेक्षा व्यावहारिक कर्तव्याचा भाग अधिक असे.

हे विनितेच्या लक्षात आलं तरी तिला वाटायचं, इतर सासवांपेक्षा हे कितीतरी चांगलं, नाही का? त्या निदान घालून-पाडून बोलत नाहीत- वाईट वागत नाहीत.

सुरभीच्या वागण्यात अजूनही अल्लडपणा होता. तिला अजूनही फक्त सिनेमा, साड्या, खाणं-पिणं, मैत्रिणींबरोबर फिरणं यातच आनंद वाटत होता. कॉलेज संपवून ती घरातच असली तरी घरातल्या कुठल्याही कामाला ती हात लावत नव्हती. आईही मुलीत आपले पंचप्राण असावेत, अशा प्रकारे मुलीला जपत होती! सुरभी म्हणजे राजकुमारी आहे, तिला कुणीही कुठलंही काम सांगायचंच नाही, हे गृहीतच होतं. चुकून कुणी काही काम सांगितलंच तर त्या म्हणायच्या,

`अय्यो! ती आणखी कितीसे दिवस इथं राहणार आहे? इथं आहे तितके दिवस तिला आरामात असू द्या ना!’

सुरभीच्याच वयाची विनिता पहाटे पाच वाजता उठायची. सुरभी मात्र नऊ वाजता उठायची. त्यानंतरचा सारा वेळ ती टीव्ही पाहण्यात आणि नटण्यामुरडण्यात घालवत असे.

तसं पाहिलं तर त्या घरातही श्रीमंतीचं कुठलंही लक्षण नव्हतं. तरीही विनिता सुखी होती. पतीबरोबर प्रेम आणि जीवनातले अनुभव वाटून घेत तिचा समाधानी जीवनक्रम चालला होता. केवळ पैसा आणि दागदागिन्यांमुळे स्त्री सुखी होते, या भ्रमात ती कधीच नव्हती.

कधी-कधी तिला एका गोष्टीची मात्र खंत वाटत असे. गिरीशच्या स्वभावात कुठलीही खोट नव्हती. त्याच्यामध्ये असलेला संगीतप्रेमाचा अभाव ही एकच गोष्ट विनितेला अधूनमधून खट्टू करत होती; पण ही गोष्ट इतकी छोटी होती की, विनिता कधी त्याचा उच्चारही करत नव्हती.

शामण्णांना मात्र तिच्या संगीत-कलेचं कौतुक होतं. ते दररोज तिच्याकडून दोन-चार गाणी-भजनं ऐकत. त्यांनी तर तिला आणखी संगीत शिकायचाही आग्रह केला होता.

धारवाडमध्ये विनितेचं हिंदुस्थानी संगीतात शिक्षण झालं होतं. बेंगळूमध्ये तसा गुरू भेटणंही कठीणच होतं. शिवाय तिला संगीताकडून आत्मतृप्तीखेरीज आणखी कशाचीच अपेक्षा नव्हती. वसंतबनात गाणाऱ्या कोकिळेला कुठं राजदरबारातल्या उच्च स्थानाची अपेक्षा असते?

अलीकडे तिची नोकरी सरकारी झाली होती. त्यामुळे तिचा पगारही समाधानकारक होता. धारवाडचं घर न विकल्यामुळे तिच्या मनात समाधानाबरोबरच गिरीशविषयी कृतज्ञभावना काठोकाठ भरलेली असे.

गिरीशही नेहमीप्रमाणेच राहात होता. त्यांच्या श्रीमंत नसलेल्या जीवनात समाधान काठोकाठ भरलेलं होतं. दिवस कसे जात होते, ते त्या दोघांनाही कळत नव्हतं.

शशिकला विनितेच्या शाळेतच नोकरी करत होती. त्या दोघींचं पटायचंही खूप. दोघी एकाच वेळी नोकरीला लागल्या होत्या. शशी अजून नोकरीत कायम झाली नव्हती. दोघीही परस्परांची सुख-दु:खे एकमेकींना सांगायच्या.

त्या दिवशी शशी शाळेत आली तेव्हा तिचा चेहरा उल्हासानं फुलला होता. मनातला आनंद लपवण्याचा शशीचा प्रयत्न विफल होत होता.

तिला पाहताच विनितेनं विचारलं, `काय गं? काय बातमी आहे? एवढा कसला आनंद?’

`आत्ता नको! लंच-टाईममध्ये सांगते-’ शशी उद्गारली.

`सांग तर!’

`अंहं- दुपारी पवित्रा हॉटेलला जाऊ या. तिथं सांगेन.’

`पार्टी आहे?’

शशी हसली.

दुपारी लंच-टाइमला दोघी ठरल्याप्रमाणे पवित्रा हॉटेलच्या माडीवर गेल्या.

खुर्चीवर बसल्या-बसल्या विनिता म्हणाली, `शशी, अभिनंदन!’

`विनू, तुला कसं समजलं?’

`तुझा चेहरा बघून!’

शशीचा चेहरा आणखी लाल झाला. ती सांगू लागली,

`आमच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. शंकर त्याचं नाव.’

`लग्न कधी?’

`आणखी दोन-तीन महिन्यांनंतर होईल असं वाटतं. आजच त्यांचे वडील घरी येऊन गेले. एवढ्यात मुहूर्त नाही.’

`कार्यालय मिळाल्यानंतर लग्न होईल म्हण ना! मुहूर्ताचं काही विशेष नाही!’ विनिता हसत म्हणाली.

`मला नोकरी सोडावी लागेल, विनू!’

`शंकर कुठली नोकरी करतात? काय शिकलेत ते?’

शशीचा चेहरा उतरला. शंकर मैसूरमध्ये राहात होते. एम. एस्सी चौथ्या क्रमांकानं पास होऊनही त्यांना बरी नोकरी मिळाली नव्हती. आता ते तात्पुरती क्लासेसमध्ये शिकवण्याची नोकरी करत होते.

`मग एवढ्यात लग्नाचा का विचार करताहेत?’

`दोन्ही घरांमध्ये खूप वर्षांचे स्नेहसंबंध आहेत. माझी आईच म्हणाली- नोकरीची वाट बघत लग्न पुढं टाकायला नको. मीही नोकरी करून संसाराला हातभार लावू शकेन किंवा दोघं मिळून क्लासेस सुरू करू.’

`हं. तेही खरंच म्हणा! उगाच लग्न का पुढं ढकलायचं? बरं! साखरपुडा कधी?’

`त्यांच्या घरी साखरपुडा करायची पद्धत नाही म्हणे. एकदम लग्नच. विनू, मला मात्र काही वेळा भीती वाटते बघ!’

`भीती कसली?’

`सगळं ठीक होईल ना?’

`होईल गं! सगळं ठीक होईल. माझाच अनुभव सांगते. दोघं मिळून कष्टाची तयारी ठेवा. धैर्य गमावू नका.’

भविष्यात काय दडलंय ते कुणास ठाऊक! तरीही विनिता तिच्या मनाचं धैर्य वाढवत होती.

शशी म्हणाली, `आजच नोकरीचा राजीनामा देते. दोन महिन्यांची नोटीस देणं आवश्यक आहे ना!’

दोघी उठल्या. हिनं आणखी थोडा विचार करून राजीनामा द्यावा, असा विचार करत विनिता तिच्याबरोबर चालू लागली.

अलीकडे शशीनं शाळेला येणं सोडून दिलं होतं. त्यामुळे विनितेला एकटेपणाची भावना जाणवत होती. `शशी सुखी आहे ना, मग झालं तर!’ अशी ती स्वत:ची समजूत काढत होती. आपल्या प्रिय मैत्रिणीच्या लग्नाला काय भेट द्यावी याचा ती विचार करत असतानाच एक दिवस ती बातमी आली.

`विनिता, तुला समजलं? शशीचं लग्न मोडलं!’ शाळेतल्या ज्येष्ठ शिक्षिका सुशीला मॅडमनी तिला विचारलं.

`नाही! मला ठाऊक नाही!’ विनिता बसलेल्या धक्क्यातून स्वत:ला सावरत म्हणाली.

`तुम्ही दोघी एवढ्या मैत्रिणी असूनही काही बोलली नाही ती? फार त्रास झालाय तिला!’

पुढचं बोलणं विनिताच्या कानात शिरलंच नाही. काय झालं असेल? शंकरला अपघात झाला असेल काय? त्याचं वेगळ्या एखाद्या मुलीशी प्रेमप्रकरण असेल काय? पण शशीशी त्याचा अनेक वर्षांचा परिचय होता आणि त्याच्या मर्जीनंच हे लग्न ठरलं होतं. मग का मोडलं असेल लग्न? विनिताच्या जिवाची तडफड झाली.

शाळा सुटल्यावर विनितेनं सरळ शशीच्या घराची वाट पकडली.

दारात विनितेला पाहताच शशीच्या मनावरचा ताबा सुटला. ती हुंदके देऊन रडू लागली.

विनितेनं घरावरून नजर फिरवली. घरभर पदोपदी लग्नाची तयारी दिसत होती. घराची रंग-रंगोटी झाली होती. एका कोपऱ्यात तांदळाची पोती रचलेली दिसत होती.

विनितेला पाहताच शशीची आई म्हणाली, `विनिता, तूच हिची समजूत काढ बाई! शशी थोडं अतीच करतेय. ह्या सगळ्या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात. आपलं नशीब तेवढं बलवत्तर हवं. नशिबात नसेल तर काय करायचं? गेले दोन दिवस हिनं अन्नाला स्पर्श केलेला नाही!’

एवढी मोठी घटना घडलेली असताना शाब्दिक वेदांताला काही अर्थ नाही हे विनितेला समजत होतं.

शशीच तिला `इथं नको, चल-’ म्हणत माडीवर घेऊन गेली. माडीवरच्या गच्चीत मंद वारं वाहत होतं. समोर पसरलेल्या अथांग बेंगळूरचे दिवे दिसत होते.

तिथल्या चटईवर बसत विनितेनं विचारलं, `शशी, शंकरची प्रकृती बरी आहे ना?’

शशीच्या डोळ्यांमधले अश्रू अदृश्य होऊन त्यांची जागा संतापानं घेतली.

`त्याला कसली धाड भरलेय? चांगला टोणग्यासारखा माजलाय! त्याच्यामुळे आमचा अपमान झालाय. मला तर जीवनाचाच कंटाळा आला आहे. विश्वासघातकी नराधम मेला!’

`अशी कोड्यात बोलू नकोस बाई! काय झालं ते नीटपणे सांग ना! का मोडलं लग्न?’

भावनावेगानं शशीला बोलणं सुचत नव्हतं.

`सांग ना!’

विनितेनं पुन्हा-पुन्हा म्हटलं तेव्हा ती उद्गारली, `त्यानं स्वत:ला विकलंय!’

`म्हणजे? मला नाही समजलं.’

`आमच्या समाजापैकी बरेच अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यापैकी एकजण आपल्या वीस वर्षांच्या मुलीला घेऊन इथं आले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली- आमच्या मुलीशी जो लग्न करेल, त्याला अमेरिकेला घेऊन जाऊ, म्हणून!’

`शंकर गेला?’

`फक्त शंकरच नव्हेत, कितीतरी सुशिक्षित तरुणांनी ती जाहिरात वाचून अर्ज टाकले होते म्हणे! डॉक्टर, सी. ए., इंजिनिअर कितीतरी उच्चशिक्षित तरुण! शंकरनंही गमतीनं त्यासाठी अर्ज टाकला होता म्हणे. पण त्या मुलीला नेमका हाच आवडला!’

`हे काय गं? एखाद्या नोकरीचा इंटरव्ह्यू झाला हा! मग पुढं काय झालं?’

`मग काय! हाही तयार झाला. त्याला वाटलं, आपल्याला संपूर्ण आयुष्यात पुन्हा कितीही धडपड केली तरी अशी संधी मिळणार नाही. कशाला संधी सोडायची? मला त्यानं क्षमा कर म्हणून पत्र लिहिलं आहे.’

`तू त्याचं नरडं धरायचंस! गप्प का बसलीस?’

`खरं सांगू? ते त्याचं पत्र वाचून मला त्याची किळस आली. एवढ्या वर्षांची ओळख, नातं, भावना-सरळ पायदळी तुडवून डॉलर आणि ग्रीनकार्डसाठी त्या मुलीचे पाय चाटणारा शंकर! छी!’

`त्याचे आई-वडील काय म्हणतात?’

`माझे आई-वडील त्यांना जाऊन भेटले. हा कुठल्या गावाचा विपरीत न्याय? म्हणून विचारलं तर म्हणताहेत- अहो, आमच्या मुलाचं तिकडं उज्ज्वल भविष्य आहे! आम्ही का त्याचं नुकसान करू? तो इथं राहिला तर आमच्यासारखाच दरिद्री राहील. सारं जीवन सरलं तरी एक घर बांधायला जमणार नाही, आमच्या मुलींच्या लग्नाचं कर्जही फेडता येणार नाही. म्हणून आम्हीच त्याला हे लग्न करायला सांगितलंय!

`तूही नोकरी सोडलीस ना!’

`होय. त्यावरही शंकरनं उपाय सुचवलाय. त्यानं सांगितलंय- शशीच्या लग्नाला येईल तेवढा खर्च मी अमेरिकेला गेल्यावर डॉलरच्या रूपात पाठवून देईन म्हणून!’

`म्हणजे काय! डॉलरच देव होऊन बसलाय म्हणायचा!’

`देव की भूत कोण जाणे! पण डॉलरचं मोहिनीरूप असं आहे खरं! माझ्या जीवनाचा मात्र तमाशा होऊन गेला बघ! लग्न मोडलं म्हटल्यावर लोक मुलीतच काहीतरी दोष असेल असं म्हणतात ना! आता मी काय करु?’

विनिताला काय बोलावं ते सुचलं नाही. शशीच पुढं म्हणाली, `हेही जाऊ दे. पण इतकी वर्षं मनात शंकरलाच नवरा मानून मी राहिले. एका दिवसात ती भावना कशी उपटून-निपटून काढून टाकता येईल? अमेरिकेचा मोह आणि डॉलरची आशा यासाठी शंकरनं माझा हकनाक बळी दिला.’

शशीच्या दु:खाला हुंदक्याच्या रूपानं वाट फुटली होती. तिचं सारं शरीर हुंदक्यांनी हिंदकळत होतं.

विनिता असहाय्यपणे तिचा आक्रोश पाहत राहिली.

त्या दिवशी चंद्रू अत्यंत आनंदात होता. त्याला प्रमोशन मिळालं होतं.

अमेरिकेला `लँड ऑफ ऑपॉरच्युनेटीज’ म्हणतात ते खोटं नाही. तुम्ही कुणीही असलात तरी चालेल. बढतीच्या पायऱ्या भराभर चढू शकता. फक्त तेवढी तुमची कुवत हवी. बढतीच्या मार्गत भारताप्रमाणे जाती, कुळ, सिनिऑरिटी, भाषा, राजकारण- यांपैकी कशाचाच अडसर येत नाही. उत्तम काम केलं की, लगोलग बढती मिळते. तसंच, कामाची फळं योग्य प्रकारे देऊ शकलं नाही, तर एका पत्राद्वारे त्याला घरीही पाठवलं जातं!

चंद्रूच्या आनंदाला आणखीही एक कारण होतं. आजच त्याचं ग्रीनकार्ड आलं होतं! संपूर्ण जीवन सार्थकी लागल्याची भावना त्याच्या मनात भरून राहिली होती. आयुष्यात कधीही लक्ष्मी प्रसन्न न झालेल्या शिक्षकाचा तो मुलगा. सारं आयुष्य पैशाच्या चणचणीत गेलेलं. आता तोच चंद्रू अमेरिकेचा अधिकृत नागरिक झाला होता! त्याच्या आजवरच्या साधनेचं हे एक फलित!

आता तो राजरोसपणे भारतात जाऊ शकत होता. तो आता आपल्या माणसांना भेटू शकत होता. हेही त्याच्या आनंदाचं एक कारण होतं.

तो घरी परतला तेव्हा एक जाड पाकीट त्याची वाट पाहत होतं. म्हणजे त्यात बरीच पत्रं असतील. म्हणजे भरपूर बातम्या! कदाचित सुरभीच्या मागण्यांची यादीही असेल.

त्यानं कॉफी-मशीनमधून मनासारखी कॉफी करून घेतली आणि कॉफीचा मग समोर ठेवून सावकाश पाकीट फोडलं.

पाकिटात गिरीशचं पत्र आणि त्यात गुंडाळलेले काही फोटो होते.

`प्रिय चंद्रू,

तू आमच्या लग्नाला हजर राहिला असतास तर फार बरं झालं असतं. लग्न साधेपणानं झालं. आम्हा दोघांनाही भपकेबाज लग्न करायचं नव्हतं.

सोबत आमच्या लग्नातले काही फोटो पाठवत आहे. विनितेची तुझ्याशी ओळख आहे असं ती सांगत होती. तिनं तुला नमस्कार सांगितला आहे.

गिरीश.’

चंद्रूनं फोटो पाहिले आणि तो निश्चल झाला. त्याच्या मनाला भावलेली विनिता, सतत चैतन्यपूर्ण राहणारी विनिता त्याच्या भावाची पत्नी झाली होती. लग्नपत्रिकेत त्यानं विनिता नाव वाचलं होतं, पण असेल कुणीतरी असा विचार करून त्यानं तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.

आता जे घडलं होतं, त्याची त्यानं कल्पनाही केली नव्हती. संपूर्ण धारवाडची वसंतलक्ष्मी विनिता हीच जयनगरमधल्या शाळेत शिकवणारी शिक्षिका निघाली होती! कुठून कुठं जोडला गेला हा संबंध?’

चंद्रूला धक्का बसला होता. त्याचं विनितेवरचं प्रेम एकांगी होतं. शिवाय अव्यक्त प्रेम होतं ते!

आता त्याच विनितेचं लग्न झालं आहे, तेही आणखी कुणाशी नव्हे, आपल्याच भावाशी, आपल्याच घरची ती सून होऊन आली आहे.

चंद्रू उभ्या उभ्या कोसळला. सकाळपासून उल्हास-उत्साहानं नाचणारं त्याचं मन कोलमडून गेलं होतं.

क्षणभरच त्याच्या मनात येऊन गेलं- या ग्रीनकार्डचा मोह नसता तर याआधीच भारतात जाऊन विनितेशी विवाहबद्ध होता आलं असतं.

त्यानं फोटो पाहिले.

विनिता वधूच्या वेषात साधी आणि सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील मंद हास्य हजार हिऱ्यांच्या तेजापेक्षा अधिक तेजानं झळकत होतं. तिच्या चेहऱ्यावरची तृप्त भावना फोटोतही लपत नव्हती.

केवळ रुपाच्याच बाबतीत नव्हे; तिचा स्वभाव, सुमधुर कंठ, तिचं मृदु अंत:करण- कुठल्याही दृष्टीनं पाहिलं तरी ती कुणाही पुरुषाचं मन वेधून घेणारी होती.

प्रत्येक सासूनं अपेक्षा करावी अशी सून होती ती! चंद्रूनं तिचा सालस आणि लाघवी स्वभाव जवळून पाहिला होता. कितीही कजाग सासू असली तरी तिचं मन जिंकून घेण्याचा नम्रपणा आणि प्रेमळपणा विनितेच्या स्वभावात होता.

तसा स्वभाव नसता तर सावत्र आईच्या कजागपणाचा बाऊ न करता, मनातलं दु:ख, चार-दोन अश्रूंबरोबर बाहेर टाकून पुन्हा `चिक्कव्वा’- धाकटी आई म्हणत ती सांगेल ती कामं करायला पदर खोचून तयार झाली नसती. स्वत: चंद्रूनंच तिथल्या वास्तव्यात असले अनेक प्रसंग पाहिले होते. त्याला तिच्या त्या गुणांचंच आकर्षण वाटलं होतं.

असो! यानंतर आई-वडिलांची चिंता करायचं कारण नाही असं चंद्रूला तीव्रपणे जाणवलं. पोटच्या मुलीपेक्षा अधिक विश्वासानं विनिता घराकडे बघेल यात शंका नाही.

या विचारानं काही क्षण बरं वाटलं तरी, चंद्रूला गिरीशविषयी असूया वाटली. गिरीश आपल्याइतका देखणा नाही, आपल्याइतका त्याला पगार नाही, रसिकतेच्या बाबतीतही तो आपल्यापेक्षा डावा आहे. त्याला गप्पांचं तंत्रही फारसं साधत नाही. तरीही रत्नासारखी बायको त्याला मिळाली ना! सख्खा भाऊ कितीही लाडका असला तरी अशा संदर्भात तो एक वेगळा पुरुषच ना!

मत्सर हा तर माणसाचा मूलभूत स्वभावच असतो ना? त्यामुळे चंद्रूच्या मस्तकात शेकडो विचार भावनांचा गोंधळ उठला त्यात काय नवल? त्याच्या मनात आजवर अनोळखी असलेल्या भाव-भावनांचं मिश्रण झालं होतं.

चंद्रूला पूर्वीच्या मन:स्थितीत स्वत:ला आणायला दोन दिवस लागले.

लग्न ठरल्यावर गिरीशचा थोरला भाऊ अमेरिकेत असल्याचं विनिताला समजलं असलं तरी, तो चंद्रू असेल अशी तिला कल्पना नव्हती.

लग्नानंतर सासरी आल्यावर तिनं थोरल्या दिराचा फोटो पाहिला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं.

धारवाडला त्यांच्या घरी भाड्यानं राहणारा चंद्रू सभ्य तरुण होता. तिचं गाणं आवडल्याचं स्पष्टपणे सांगायचा- संकोच वाटत असला तरी, त्याच्या दृष्टीतून ते तिच्या लक्षात येत होतं. आपलं गाणं तोही ऐकत आहे, हे तिलाही तेव्हा ठाऊक असायचं. आता तोच तरुण आपला थोरला दीर आहे.

बस्स! तिला चंद्रूविषयी एवढीच भावना होती.

चंद्रूला मनोमन वाटलं- आपण तिला लिहिलेलं पत्र तिच्या किंवा आणखी कुणाच्याही हातात न पडता पुन्हा आपल्याच हातात आलं, हे फार चांगलं झालं. लग्न ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर ते तिच्या हातात पडलं असतं तर किती अनर्थ झाला असता! मूर्ख रखवालदारानं म्हाताऱ्या पोस्टमनला पत्ता दिला नाही ते बरंच झालं! नाहीतर बिचाऱ्या विनितेच्या संसारात सुरुवातीपासूनच वादळांना सुरुवात झाली असती!

आज चंद्रू मातृभूमीला परतणार होता. साडेतीन वर्षांनंतर! घरात एखाद्या उत्सवाचं वातावरण भरून राहिलं होतं.

गौरम्मा आणि सुरभी चंद्रूच्या स्वागतासाठी एअरपोर्टला जायला तयार झाल्या होत्या. शामण्णा मात्र म्हणाले, `गावात आलाय तो घरी येणार नाही काय? मी येणार नाही.’

सासूबार्इंचा उत्साह पाहून विनिता म्हणाली, `तुम्ही सगळेजण जाऊन या. भावजींना काय आवडतं ते सांगून जा. मी सगळा स्वयंपाक तयार करून ठेवेन.’

`टोमॅटोचं सार कर, आंबोड्या, रायतं आणि कायरस कर. चंद्रूला फार आवडतं.’

गौरम्मा आणि सुरभीनं नीट केस विंचरले आणि ठेवणीतल्या साड्या नेसून दोघी तयार झाल्या. विनिताची कामाची निष्ठा आणि कामं करण्याची पद्धत त्या दोघींना मनापासून आवडली होती. गौरम्मांच्याही मनात आलं, `चंद्रूलाही एक अशीच बायको मिळाली तर कसलीही काळजी राहणार नाही!’
 
विमानातून उतरुन बाहेर येत असलेल्या चंद्रूला पाहताच गौरम्मांना मस्तकावरच्या कडक उन्हाचा विसर पडला आणि भावनावेगानं त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्याप्रमाणेच परदेशाहून आलेल्या आपल्या माणसांचं स्वागत करायला अनेक माता, पिता, पत्नी, भावंडं, मित्रपरिवार कौतुकानं जमले होते.

गौरम्मा टक लावून चंद्रूकडे पाहात होत्या. तो आणखी गोरा झाल्याचं त्यांना जाणवलं. अंगा-पिंडानंही तो आता भरला होता.

दोन मोठाल्या, जाडजूड बॅगा गिरीश टॅक्सीमधून उतरवून घेत असतानाच चंद्रूनं घरात येऊन वडिलांचे पाय धरले.

नंतर त्याची शोधक नजर स्वयंपाकघराच्या दाराशी उभ्या असलेल्या विनितेवर पडली आणि त्यानं विचारलं, `ओळखलंत की नाही? कशा आहात?’

`छान आहे. तुम्ही कसे आहात?’

विनितेनं बेंगळूरची बोलण्याची ढब आत्मसात केलेली पाहून चंद्रू म्हणाला, `अरे वा! तुम्ही तर आमची भाषा पूर्णपणे आत्मसात केलीय!’

`करायलाच हवी ना! तुमच्या घरचीच झालेय ना मी! तुम्ही धारवाडमध्ये होता, त्याच वेळी मी शिकायला सुरुवात केली होती.’

धारवाडचे दिवस आठवताच क्षणभर चंद्रू विद्ध झाला. पण लगेच त्यानं स्वत:ला सावरलं. आता ती आपल्या धाकट्या भावाची बायको आहे, हे भान जाऊ देता कामा नये.

धारवाडमधल्या विनितेपेक्षा ही विनिता अधिक सुंदर दिसत होती. त्या वेळी तिच्या व्यक्तिमत्त्वात बालिशपणाचा बराच अंश होता. आता त्या अर्धस्फुट कळीचं संपूर्ण उमललेल्या फुलामध्ये रपांतर झालं होतं. त्या वेळी वयाचा अल्लडपणा असला तरी मानसिक स्वास्थ्य आणि मन:शांतीचा अभाव होता. आता तिच्या चेहऱ्यावर मानसिक समाधान प्रसन्नपणे विलसत होतं.

चंद्रूनं इतकं सामान आणलं होतं की, काही विचारता सोय नाही! शाम्पू, सोप, काचेची आकर्षक भांडी, डिनर सेट, केशराच्या डब्या, काजू, बदाम, बेदाणे, कॅमेरा, व्हीसीआर, साड्या, अत्तराच्या बाटल्या, चॉकलेट्स-

मुलानं आणलेलं सामान पाहता-पाहता गौरम्मांना स्वर्गच हाताशी आल्यासारखं वाटत होतं. गरिबीतल्या काटकसरी संसारातून अथांग समुद्राचं दर्शन व्हावं, तसं होऊन त्या दिपून गेल्या होत्या.

चंद्रूनं सांगितलं, `अम्मा, एक साडी तुला, एक सुरभीला आणि विनितेला आणली आहे. बाकीचं सामान कुणाला कसं द्यायचं हे तूच पाहा. मला झोप आलीय. झोपतो मी-’

एवढं सांगून चंद्रू झोपण्यासाठी उठला.

अमेरिकेतून आपल्या मुलानं एवढ्या हौसेनं आणलेलं सामान वाटून टाकणं गौरम्मांच्या स्वभावात बसण्यासारखं नव्हतं. त्यांना ते अशक्य होतं. त्यांनी सारं सामान नीट ठेवून दिलं.

चंद्रू आल्यापासून गौरम्मांनी स्वयंपाकघरात पाऊल ठेवणं सोडून दिलं होतं. विनितेनंही त्यात काही गैर आहे, असं मानलं नाही. बऱ्याच वर्षांनी मुलाची भेट होत आहे, मुलाशी गप्पा मारायच्या असतील- असा विचार करून तिनं दोन्ही वेळच्या स्वयंपाकाची जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. चंद्रूला भेटायला येणाऱ्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी ती न कंटाळता कॉफी आणि खाणं करत होती. त्यासाठी तिनं आठवडाभराची रजाच काढली होती. सुरभीला तर कधीच कामं करायची सवय नव्हती. त्यात आता भावानं आणून दिलेल्या नाना प्रसाधनाच्या वस्तू घेऊन ती सतत आरशापुढे बसत होती. नाहीतर भावाबरोबर फिरायला जात होती.

चंद्रूची जेमतेम तीन आठवडे रजा होती. एवढ्यात त्याला ढिगानं आमंत्रणं आली होती! त्यातले बरेचसे वधू-पिते होते. रुपानं देखणा, अमेरिकेत राहणारा, सुशिक्षित, अविवाहित तरुण म्हटल्यावर त्याच्यावर अशा वधू-पित्यांचा डोळा असणं स्वाभाविक होतं म्हणा!

त्याशिवाय जुने कॉलेजमधले वर्गमित्र, क्रिकेट-क्लबमधले मित्र, इस्त्रोमधले जुने सहकर्मचारी यांना भेटायला तोही जाऊन येत होता. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन बॉसला भेटण्याइतकं नैतिक धैर्य त्याच्यापाशी नव्हतं. आपण आजच्या जगाव्यतिरिक्त काही वेगळं केलेलं नाही असा तो बोलताना आपली बाजू मांडत असला तरी, वर्षभर त्या कंपनीच्या खर्चानं ट्रेनिंग घेतल्यानंतर ती नोकरी सोडून जाणं म्हणजे विश्वासघात आहे, हे त्याच्याही अंतर्मनात त्याला जाणवत होतं. अशा वेळी भारतासारख्या गरीब देशात खितपत पडण्यापेक्षा आपण कसं योग्य केलं, यावरचा त्याचा वाद अधिक तीव्र होत होता.

चंद्रूसाठी गौरम्मांनी अनेक मुली बघून त्यांतली एक फायनल लिस्ट तयार केली होती. त्यात चार मुलींचा समावेश होता. त्या पाहून अखेर चंद्रूनं निर्णय घ्यायचा होता.

या साऱ्या गोंधळात चंद्रू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दमून गेला होता.

गेल्या तीन वर्षांत त्याच्या काही सवयीही बदलून गेल्या होत्या. साधं नळाचं पाणी प्यायलं किंवा काही बाहेरचं खाल्लं की पोट बिघडत होतं. इथं आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचं पोट दुखू लागलं होतं. अशा अवस्थेत तीन मिनिटांमध्ये जीवनाचा जोडीदार निवडण्याचा निर्णय घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती.

मोठीच मानसिक जबाबदारी ती!

चंद्रूचा कॉलेजमधला मित्र रविचंद्र आता डॉक्टर झाला होता. त्यानं स्वत:चं क्लिनिक काढलं होतं. जयनगरमध्येच ते असल्याचंही कुणीतरी म्हणालं. पोटदुखीनं बेजार झालेला चंद्रू त्याच्याकडे जायला निघाला.

खूप दिवसांनी भेटलेल्या मित्राला पाहून रवीलाही आनंद झाला.

त्यानं चंद्रूला तपासत विचारलं, `काय मित्रा! कशी आहे अमेरिका?’

`उत्तम आहे की अमेरिका! माझं पोट बरं नाही. लवकर बरं बघू!’

`हं! वधू-परीक्षेच्या निमित्तानं दररोज चार-दोन घरी जाऊन चांगलंचुंगलं खात असशील! आता तुझी पहिली प्रतिकारशक्ती राहिलेली नाही. बाहेरचं साधं पाणी पिऊ नकोस. बिसलरी पी. ह्या गोळ्या घे.’

`बरं निघतो. फी किती?’

`नको. राहू दे रे. डॉलरवाल्याला काय फी सांगायची?’

`तसं नाही हं चालायचं! अमेरिकेत जाऊन मीही भरपूर व्यवहार शिकलोय.’

यावर तो क्षणभर काही बोलला नाही. नंतर म्हणाला, `तू आग्रहच करतो आहेस म्हणून सांगतो. शंभर रुपये.’

`ठीक आहे–’ म्हणत शंभरची नोट त्याच्या हातात देत चंद्रूनं विचारलं, `पुन्हा केव्हा भेट?’

`तुझ्या लग्नाच्या दिवशी! तेही रविवारी असेल तरच यायला जमेल. काही वेळा मलाही वाटतं, उगाच ही मेडिकल लाईन घेतली. मुकाट्यानं इंजिनिअर झालो असतो तर अमेरिकेत सुखानं राहिलो असतो. इथली गर्दी नकोशी झाली आहे!’ नोट खिशात सारत रवी म्हणाला.

मंद हसत चंद्रू तिथून बाहेर पडला. त्याची नोकरी, त्याचं राहण्याचं ठिकाण याविषयी प्रत्येकाला असूया वाटत होती!

आता चंद्रूला भारत रिकवँन विंकल’ सारखा वाटत होता. सगळ्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. लोकांची सगळीकडे गर्दी वाढली होती. कुठंही गेलं तरी गर्दीच गर्दी! सगळीकडे रांगा. लांबच लांब रांगा. रस्ते बिघडून गेलेले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुकानं उभी राहिली होती.

कृष्णप्पा सावकार भरपूर श्रीमंत होते. पैसे कर्जाऊ देणे हाच त्यांचा व्यवसाय होता. त्यांनी अपार पैसा मिळवला होता. घरात तीन गाड्या होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती.

चंद्रू अमेरिकेतून येण्याआधीच कृष्णप्पांनी गौरम्मांना आपल्या घरी नेऊन आपली मुलगी दाखवली होती.

घरात तांडव करत असलेली धनसंपत्ती नजरेत भरत होती. जणू काही अती चंचल लक्ष्मी पाय मोडल्यामुळे त्यांच्या घरी कायमची वास्तव्यासाठी थांबली होती! गौरम्मांनी आधीच त्यांच्या श्रीमंतीविषयी भरपूर ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष ती श्रीमंती पाहताना मात्र त्यांचा जीव घाबरा झाला. त्यांना वाटलं, जगात खरोखरच एवढी श्रीमंत माणसं असतात तर!

घरभर फक्त चांदीची भांडी दिसत होती. देवाचा देव्हारा चांदीचा होता. देव्हाऱ्याचा कळस आणि खांब सोन्यानं मढवलेले होते. एक ना दोन!

अशा घरातली मुलगी जमुना.

सर्वसाधारण रुपाची. पण अत्यंत विनयशील! गौरम्मांच्या पायांना स्पर्श करून तिनं नमस्कार केला. सुरभीशीही ती मोठ्या स्नेहानं गप्पा मारत होती.

जमुनेच्या अंगावरचे दागदागिने बघून गौरम्मा चकित झाल्या होत्या. कितीतरी प्रकारचे दागिने! हातात सोळा बांगड्या, शिवाय हिऱ्याचे कंगन, हिऱ्याची कानातली, गळ्यात विविध प्रकारच्या चेन्स, मोठ्या काठाची कांजीवरम् साडी!

घरी परतताना सुरभी आणि गौरम्मांना वाटत होतं, चंद्रूनंही जमुनेला पसंत केलं तर किती छान होईल!

जमुनेच्या वडिलांची उटीला असलेली टी-इस्टेट पाहण्यासाठी कृष्णप्पांनी शामण्णा, गौरम्मा आणि सुरभीला आग्रहानं बोलावलं होतं.

पण शामण्णांनी निक्षून सांगितलं, `गौरी, मला तर हे मुळीच पसंत नाही. अजून लग्नाच्या दृष्टीनं काहीच घडलेलं नाही. आपण त्यांचा उगाच पाहुणचार का घ्यायचा? उगाच आपण काहीतरी आशा बाळगणं योग्य नाही. मी तरी येणार नाही.’

`तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका! उगाच तुमचे जुन्या काळचे काहीतरी आदर्श! एवढ्या आग्रहानं त्यांनी बोलावलंय. आपण गेलो नाही, तर त्यांना वाटेल- केवढी यांची मस्ती! तुम्ही येणार नसाल तर मी आणि सुरभी जाऊन येऊ.’

उटीमध्ये दोन दिवस पाहुणचार घेऊन येताना निरोपाच्या म्हणून वितभर काठाच्या रेशमी साड्या दोघींनाही मिळाल्या होत्या.

निरोप देताना कृष्णप्पांनी हात जोडून विनयानं म्हटलं, `तुमच्या घरची सून व्हायचं भाग्य माझ्या जमुनेच्या नशिबात आहे की नाही देव जाणे! पण आपले परस्परांशी जुळलेले ऋणानुबंध असेच असू देत!’

घरी आल्यावर गौरम्मा कौतुकानं सांगत होत्या- दोनच दिवसांत सुरभी आणि जमुना यांचा सख्ख्या बहिणींप्रमाणे स्नेह जुळला होता!

आता चंद्रू आला होता. त्यानं जमुनेला बघावं अशी गौरम्मांची फार इच्छा होती. त्यांनी सुचवलं, `चंद्रू, तू आणि सुरभी मुलीला बघायला जा. आम्ही त्यांचं घर, त्यांचा स्वभाव, त्यांच्या घरची बोलण्या-वागण्याची पद्धत पाहिली आहे. मला तर सगळ्या दृष्टीनं हे स्थळ पटलंय. एवढी श्रीमंती असून अत्यंत विनयशील माणसं आहेत!’

`अम्मा, रिक्षासाठी सुटे पैसे लागतील. शंभर रुपये सुटे आहेत?’

हे ऐकून गिरीश हसत म्हणाला, `चंद्रू, बेंगळूर काही एवढं बिघडलेलं नाही. इथल्या इथं जयनगरला जाऊन येण्यासाठी एवढ्या पैशांची गरज नाही.’

`मलाही तसंच वाटलं होत. पण आजच अनुभव आला.'

`का? काय झालं?’

`पोट दुखतंय म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो. जुना मित्र म्हणून रवीचंद्राकडे गेलो. पोटदुखीवर औषध लिहून द्यायला त्यानं शंभर रुपये फी घेतली.’

`शंभर रुपये? असं कसं शक्य आहे? कालच मीही गेलो होतो त्याच्याकडे. डोकं दुखतंय म्हणून. चाळीस रुपये दिले मी.’

चंद्रू अवाक् झाला. आपल्याला एवढी फी का आकारली? आपला मित्र म्हणवणारा डॉक्टरही आपल्याकडून अधिक पैसे उकळतो! आपण अमेरिकेत राहतो म्हणून? केवळ यासाठी अडीच पट जास्तीची फी यानं घ्यावी?

रवीनं विचार केला असेल- एक डॉलर म्हणजे चाळीस रुपये. अडीच डॉलर्स फी म्हणजे काही जास्त झाली नाही!

चंद्रू अवाक् होऊन उभा होता- कितीतरी वेळ!

रात्री जमुनाला पाहायला येण्यासाठी कृष्णप्पांनी गाडी पाठवून दिली होती. सुरभी आणि चंद्रू मुलगी पाहायला गेले.

दिव्याच्या प्रकाशात जमुनेच्या अंगावरचे हिऱ्याचे दागिने लखलखत होते. कपडेही भारी आणि उठावदार वाटले.

चंद्रूच्या मनानं कौल दिला, विनितेच्या तुलनेत पाहिलं तर ही खूपच डावी आहे.

कृष्णप्पा आणि त्यांच्या पत्नी नम्रपणे बसले होते.

तसं पाहिलं तर जमुनाही सर्वसामान्य चारचौघींसारखी मुलगी होती. बी. एस्सी. पर्यंत तिचं शिक्षण झालं होतं. त्यानंतर ती घरातच होती. वीणा वाजवण्याचं जुजबी शिक्षण तिनं घेतलं होतं. शिवाय भरतकाम, इकेबाना, इंटिरियर डेकोरेशन, बाटीक यांसारख्या कलाही हौसेनं शिकली होती.

किरकोळ निरर्थक गप्पांना कंटाळून चंद्रूनं स्पष्टच विचारलं, `मी तुमच्या मुलीशी थोड्या गप्पा मारू काय?’

`अहो, अवश्य बोला. त्यात काय एवढं!’ कृष्णप्पा म्हणाले.

खोलीत चंद्रू आणि जमुना दोघेच राहिले.

चंद्रूनं सांगितलं, `तुम्हांला आमच्या घरच्या परिस्थितीची माहिती आहे की नाही, ठाऊक नाही. धाकट्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आहे. आमचं घराणं श्रीमंत नाही. हे आधी सांगावं हे बरं, नाही का?’

`पण तुम्ही तिथंच राहणार की इथं परतणार?’

`आता माझा तिथंच राहण्याचा विचार आहे. तिथलंही जीवन एकांगी असतं. इथं बेंगळूरमध्ये जशा तुम्हाला हव्या तेव्हा, हव्या तेवढ्या मैत्रिणी मिळू शकतात, तसं तिथं नाही.’

`मैत्री करण्याचा स्वभाव असेल तर कुठंही मैत्रिणी मिळू शकतात.’

`आई-वडिलांच्या तुम्ही एकुलत्या एक आहात. दरवर्षी आई-वडिलांना भेटायला जाणार म्हणाल- पण मला तो खर्च परवडणार नाही.’

`तसं काही नाही. माझ्या दिल्ली-कलकत्त्यात राहणाऱ्या मैत्रिणी दोन-दोन वर्षं माहेरी येत नाहीत. माझ्या आई-वडिलांना भेटावंसं वाटलंच तर ते येतील खर्च करून!’

जमुना चंद्रूनं सांगितलेल्या सगळ्या परिस्थितीसाठी तयार असल्याचं दिसत होतं. गौरम्मांनी कधीच हिरवा बावटा दाखवला होता.

पुढच्या आठवड्यात चंद्रूचं लग्न ठरलं. घरात एकच गडबड उडाली. एवढ्या कमी अवधीत कसं सगळं जमवायचं? चंद्रूनं हिंडण्यासाठी एक टॅक्सी ठरवली. त्यानं गौरम्मांच्या हाती लग्नाचा खर्च करण्यासाठी एक लाख रुपये ठेवले. साऱ्या जीवनात, वयाच्या छप्पन वर्षांपर्यंत गौरम्मांनी कधीच एवढे पैसे पाहिले नव्हते! गौरम्मांना काय करू अन् काय नको असं झालं होतं.

त्या म्हणाल्या, `चंद्रू, अरे ती एवढ्या बड्या घरची मुलगी! आपल्याकडून तिला पाच भारी साड्या आणि दोन घसघशीत बांगड्या तरी नको का द्यायला?’

चंद्रूनं समजावलं, `अम्मा, अमेरिकेत फारसं कुणी साड्या नेसत नाही. दोन साड्या पुरेत. उलट तुम्ही सगळ्याजणी इथं साड्या नेसता. वेगवेगळ्या समारंभांना जाता. तुम्हीच चांगल्या साड्या घ्या.’

सगळ्या खर्चाचा हिशोब करून पाहिला तेव्हा बांगड्यांसाठी पैसे राहिले नसल्याचं गौरम्मांच्या लक्षात आलं. शिवाय विहिणीलाही भारी साडी घ्यायला हवी होती. यावरही चंद्रू म्हणाला, `सोनं नको घ्यायला. तिथंच सोनं थोडंफार स्वस्त मिळेल.’

पण गौरम्मांना हे पटलं नाही. त्यांनी स्वत:च्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि नवीन डिझाईनच्या दोन बांगड्या बनवल्या.

ही गोष्ट आणखी कुणाच्याही लक्षात आली नव्हती. पण घरात वावरत असलेल्या विनितेच्या नजरेनं मात्र ती टिपली होती.
 
शामण्णांना तर यातलं काहीच पटलं नव्हतं.

`गहाणवटीचा धंदा करणाऱ्याच्या मुलीला पैशाची किंमत नसते-’ असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या सात्त्विक जीवन पद्धतीत गहाणवटीचा धंदा करणं म्हणजेच अपराध होता. अशा घरातली मुलगी आपल्यासारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्याच्या घरी योग्य ठरणार नाही, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. पण चंद्रूनं मुलगी पसंत केल्यावर ते तरी काय बोलणार?

गरीब शाळामास्तराच्या बायकोचा खर्चिकपणा पाहून ते दचकले होते. हा सगळा डॉलर-महिमा असल्याचं त्यांनाही ठाऊक होतं. यक्षिणीप्रमाणे डॉलर काहीही जादू घडवू शकेल, हे त्यांना ठाऊक होतं.

चंद्रूलाही याची पुरेपूर जाणीव होती. अमेरिकेत साठवलेल्या तीन हजार डॉलर्समुळे इथं आपली जन्मदात्री किती आनंद घेत आहे, हे पाहून त्यालाही स्वत:चा अभिमान वाटत होता. डॉलर-देशाचं कौतुक करताना त्याला शब्द आणि वेळ अपुरा पडत होता.

गिरीशचं लग्न अत्यंत साधेपणानं झालं होतं. विनितेच्या माहेरी आई-वडीलच नसल्यामुळे हौस-मौज कोण करणार? शिवाय गिरीशनं सुरुवातीलाच `माझं लग्न माझ्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे’ असं बजावलं होतं.

त्यामुळे गौरम्मांच्या मनातल्या आशा-आकांक्षांवर थंडगार पाणी ओतल्यासारखं झालं होतं. आता चंद्रूनं मात्र तसं केलं नव्हतं. साऱ्या नातेवाईकांना हेवा वाटावा, भाऊबंधांच्या पोटात दुखावं असं लग्न करण्याची संधी चंद्रूनं देऊन आईचे पांग फेडले होते! मागं आपल्या गरिबीमुळे जे नातेवाईक आपल्याशी तुच्छतेने वागले, त्यांच्या तोंडावर डॉलर-महिमा फेकण्याची संधी गौरम्मांना त्यांच्या पोटच्या मुलानं मिळवून दिली होती.

अमेरिकेत राहणारा मुलगा, मोठ्या सावकाराची मुलगी सून म्हणून आलेली. सगळे नावाजत असलेल्या `चामराज कल्याण मंडपा’त तीन दिवस लग्नाचा थाट चालला होता. फुलांचं भरपूर डेकोरेशन, संगीताचा विशेष कार्यक्रम, आरती-अक्षतांचा थाट- सगळेजण असूयेनं लग्नाचं वैभव पाहत होते.

घरात लग्नाआधी प्रचंड काम होतं. गिरीशनं बाहेरची सगळी कामं पाहिली आणि विनितेनं घरची खिंड लढवली. हे जोडपं कुठंही दिसत नसलं तरी नांगराला जुंपलेल्या बैलजोडीप्रमाणे दोघंही अविश्रांत राबत होते.

पण डोळ्यांवर पैशाची झापड आल्यामुळे सुरभी आणि गौरम्मांना यातलं काहीही दिसत नव्हतं. त्या दोघींना आता फक्त जमुनाच दिसत होती.

लग्नाच्या बस्त्याची खरेदी करताना मात्र चंद्रूनं मुद्दाम सांगितलं, `अम्मा, गिरीशच्या बायकोसाठीही एक उत्तम साडी घे.’

`का? तिच्या लग्नातली आहेत लुगडी. शिवाय तू अमेरिकेतून आणलेली साडीही आहेच. उगाच आता जास्तीचा खर्च!’

`असू दे. तिच्यासाठी भारी रेशमीच घे.’

गौरम्मांना हे पटलं नाही. पण मुलगा पैसे देत असल्यामुळे त्या गप्प राहिल्या.

चंद्रूनं जांभळ्या रंगाची भारी साडी विनितेसाठी वेगळी काढली तेव्हा गौरम्मांनी भुवया उडवल्या. सहा हजाराची साडी!

`अरे चंद्रू, एवढी महागाईची साडी कशाला रे तिला?’ न राहवून गौरम्मांनी विचारलं.

चंद्रू शांतपणे म्हणाला, `अम्मा, मी धारवाडमध्ये असताना हात मोडला होता ते आठवतंय ना? मी त्यांच्या घरचा भाडेकर होतो. तरीही त्यांनी माझं खूप केलं होतं.’

जमुनानं मात्र फारसा विचार न करता नवऱ्याचे पन्नास हजार आणि वडिलांचे लाखभर रुपये खर्च करून भरपूर साड्यांची मनसोक्त खरेदी केली.

सुरभीनंही हट्टानं पाच-सहा भारी साड्या घेतल्या.

घरी आल्यावर चंद्रूनं विनितेला तिची साडी दाखवली. तेव्हा ती आनंद आणि संकोचानं म्हणाली, `उगाच का माझ्यासाठी एवढी भारी साडी घेतलीत?’

`मुद्दाम आणलीय मी ती! मी तुमच्या गावी असताना तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत, त्याची ही अत्यंत छोटीशी परत-भेट आहे!’ चंद्रूनं सांगितलं.

त्याला आठवलं, विनितेनं मोठ्या हौसेनं जांभळी साडी मागितली असता तिला निळी साडी मिळाली होती. अनेक निराशा सहज स्वीकारणाऱ्या विनितेच्या दृष्टीनं ही घटना नेहमीसारखीच साधी होती. त्यामुळे कदाचित तिला या घटनेचा विसरही पडला असावा. पण चंद्रूला तो प्रसंग अजूनही जशाचा तसा आठवत होता.

तो मनात म्हणाला- त्याच वेळी तुझी इच्छा पूर्ण करावंसं वाटलं तरी, सामाजिक कारणांमुळे मी माझ्या इच्छेला दडपून टाकलं होतं. आता थोरला दीर या नात्यानं तुला ही साडी देऊन मी माझी इच्छा पूर्ण करतोय.

त्याला ठाऊक होतं, आजच्या त्या घरच्या परिस्थितीत विनिता स्वत: मिळवती असूनही अशी भारी साडी विकत घेऊ शकणार नाही. त्याच्या नजरेनं तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद टिपला होता.

चंद्रूचं लग्न थाटामाटात पार पडलं. सारं बेंगळूरच लग्नाला आलंय की काय, असं वाटण्याइतकी गर्दी झाली होती. राजकारणी, धनाढ्य माणसं, अधिकारी आले होते.

दोन्ही मुलांच्या लग्नाचा थाट एकाच लग्नात अनुभवायला आल्यामुळे गौरम्मा अभिमानानं फुलून आल्या होत्या.

अगदी तृप्त-तृप्त झाल्या होत्या.

त्यातच जमुनाच्या आई निरोपाच्या वेळी डोळे पुसत म्हणाल्या, `गौरम्मा, माझ्या जमुनाला तुम्ही तुमच्या सुरभीसारखीच माना. काही चूक झाली असेल तर क्षमा करा. लग्नात काही त्रुटी राहिल्या असतील तर राग मानू नये.’

लखलखणाऱ्या प्रत्येक वस्तूला हिराच मानणाऱ्या गौरम्मा विहिणीच्या नाटकी बोलण्यावर भाळल्या. शिवाय त्या बोलण्यासोबत असलेली निरोपाची जरतारी साडी आणि ओटीच्या थाटामुळे त्यांचा त्या बोलण्यातल्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला.

जी शक्ती पैशांमध्ये आहे, ती कधीच गुणांमध्ये नसते. ज्यांच्याकडे पैसे नाही, तेच पैशाविषयी उपरोधानं बोलतात!

चंद्रूची सुट्टी संपत आली होती. आणखी दहा दिवसांनी त्याला पुन्हा अमेरिकेला जायचं होतं. हनीमूनसाठी चंद्रू आणि जमुना उटी-मद्रासला जाऊन आले. व्हिसाच्या कामासाठी जाणं आवश्यकही होतं.

बघता-बघता चंद्रूच्या निघण्याचा दिवसही आला. गौरम्मांचे डोळे पाण्यानं भरले. आईला अभिमान वाटावा असा मुलगा आईच्या साऱ्या इच्छा पुऱ्या करून निघाला होता.

चंद्रूनं सांगितलं, `अम्मा, यानंतर सुरभीच्या लग्नासाठीच मी येईन. जमुनाचा व्हिसा मिळून तिला यायला बरेच दिवस लागतील. व्हिसा मिळेपर्यंत तिला इथेच राहू दे.’

`राहू दे ना! अरे, तीच या घरची थोरली सून आहे! आमचे स्वभाव आणि आपल्या घरच्या पद्धतीशी तिलाही जुळवून घ्यायला वेळ मिळेल.’

चंद्रूच्या विमानानं आकाशात झेप घेताच जमुना थेट माहेरी निघून गेली. निघण्याआधी सासूला तिनं लाघवीपणे सांगितलं, `आमच्या घरी फोन आहे ना! अमेरिकेला पोहोचल्यावर ते फोनवर कळवणार आहेत. त्यामुळे आता आईकडेच जाते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांचाही निरोप घेऊन येते. चालेल ना?’

`तसंच कर. यायची अजिबात घाई करू नकोस. तेही तुझंच घर आहे ना!’ गौरम्मा म्हणाल्या.

त्यानंतर जमुना आली ती `आज मी निघाले’ म्हणून सांगण्यासाठीच! कोईमत्तूरची मावशी, दिल्लीचे काका, मुंबईचे मामा अशा सगळ्यांच्या घरी जाऊन ती व्हिसा आल्यावरच परतली होती.

गौरम्मांना मात्र ती लटक्या वैतागानं म्हणाली, `छे! अगदी वैताग आलाय मला! सगळे सांगत होते- अमेरिकेचा व्हिसा लवकर मिळत नाही म्हणून! म्हणून मी सगळ्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. आधी ठाऊक असतं तर मी मुळीच गेले नसते. तुमच्याबरोबर आणि सुरभीबरोबर थोडे दिवस का होईना, राहायची फार इच्छा होती. अगदी निराशा झाली!’

शामण्णांना त्यामागचं नाटक समजलं.

पण डॉलर-सुनेच्या प्रभावामुळे अंध झालेल्या गौरम्मांना मात्र ते दिसलं नाही. जमुनेचं सारं बोलणं त्यांना शब्दश: पटलं.

`असू दे गं! किती निर्मळ मनाची आहेस तू! सुरभीच्या लग्नाच्या आधी मात्र दोन महिने ये. लग्नघरात तूच महालक्ष्मीसारखी वावरली पाहिजेस! लग्नानंतरही दोन महिने राहून जा. म्हणजे माझंही समाधान होईल. आता तू आनंदानं जाऊन ये.’

विनिता मूकपणे गौरम्मांचं वागणं-बोलणं पाहात होती.

जमुना तिच्याशी अवाक्षरही बोलली नव्हती. अगदी समोरासमोर येण्याचे प्रसंग आले तरी एखाद्या अपरिचित व्यक्तीबरोबर बोलावं तसं जमुनाचं बोलणं- वागणं होतं. ही गहाणवटीचा व्यवहार करणाऱ्या घरात जन्मलेली मुलगी आहे, हे विनितेच्या चलाख बुद्धीला जाणवल्याशिवाय कसं राहील? ती गरीब घरातून आली असली तरी बुद्धीची तिथं कमतरता नव्हती.

जमुना अमेरिकेला निघाली. तिला विमानतळावर सोडून आल्यावर गौरम्मा म्हणाल्या, `किती नम्र स्वभावाची आहे ही जमुना! अशी सून मिळण्यासाठी मागच्या जन्मीचं पुण्यच पदरी असायला पाहिजे.’

शामण्णा खिडकीबाहेर पाहात होते. त्यांनी जीवनाकडून विवेकाचे धडे घेतले होते. अनुभवातून खूप शहाणपण ते शिकले होते. त्यांच्या मनात येत होतं- जगात गौरीसारखी माणसंच भरपूर असतात... श्रीमंत माणसं भेटली की अवघडल्यासारखी होतात– पण तरीही त्यांचा आदर-सत्कार करतात.

आपल्यापेक्षा गरीब माणसं भेटली की, हीच माणसं त्यांना हीन लेखतात आणि त्यांना अवमानानं वागवतात.

खराखुरा स्नेह परस्परांविषयी अशी टोकाची भावना कधीच ठेवत नाहीत.

पण पैशाच्या मोहजालात गुरफटून गेलेल्या गौरम्मांना मनाच्या तरल स्वरपाची कल्पना कशी येणार?

चंद्रूच्या लग्नानंतर घरात एक नवीन पद्धत सुरू झाली. घरची सून होऊनही अपरिचित असलेल्या जमुनेचं वर्णन सदोदित सुरू झालं. सतत तिच्या असलेल्या नसलेल्या गुणांचा महिमा असलेली गाणी घरभर ऐकू येऊ लागली.

एवढ्यावर ते थांबलं नाही.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जमुना आणि विनितेची तुलना सुरू झाली.

चंद्रूचं लग्न ठरेपर्यंत विनिता त्या घरची लाडकी सून होती. तिच्या शब्दाला घरात किंमत होती. गौरम्माही मोकळेपणानं म्हणायच्या, `आमची विनिता घरी आली आणि मी निवृत्त झाले बघा!’

पण आता मात्र त्या भावनेची पुसटशी छायाही त्यांच्या बोलण्या-वागण्यात दिसत नव्हती. विनितेलाही हे जाणवत होतं. नाहीतरी जगात धनवंतांची तळी उचलून येळकोटाचा घोष करतात ना? पैसा असेल तर माणसाला सूर्याचं स्थान मिळतं आणि नसेल तर श्वानाची अवस्था प्राप्त होते.

हळूहळू घरात नसलेल्या जमुनेचं स्थान प्रत्येक्ष सूर्यासारखं होऊ लागलं आणि विनितेची अवस्था कुत्र्यासारखी झाली.

घरी कुणी आलं की, चंद्रूचं लग्न, लग्नाचा अल्बम, व्हीडीओ कॅसेट हेच विषय बोलले जात. जमुनाच्या घरच्यांनी दिलेल्या दागिन्यांच्या यादीचं वाचन, जमुनाचा सरळ स्वभाव याचं गुणगान सुरू होई. जमुनेनं आपले सगळे दागिने माहेरी ठेवल्यामुळे ते दाखवता येत नसल्याची खंत न करता गौरम्मा सांगत, `अहो, आमचं घर एवढंसं! इथं किती चांदीची भांडी ठेवायची? शिवाय नसती जबाबदारी आपण तरी कशाला उगाच अंगावर घ्यायची?

हा विषय सुरू झाला की, शामण्णा काहीतरी निमित्त काढून घराबाहेर निघून जात. पण स्वयंपाकघरातल्या विनितेनं कुठं जायचं?

या विषयात अधिक भर घालण्यासाठी अधूनमधून जमुनेची पत्रं येत होती. प्रवासाची वर्णने, विविध रेशमी साड्यांमधले रंगीबेरंगी फोटो, गाडीच्या मॉडेलची चर्चा, अमेरिकेमधली आश्चर्ये यांचा त्यात समावेश असे.

असं एखादं पत्र आलं की, गौरम्मांचे पाय जमिनीवर पडेनासे होत. गिरीश आणि शामण्णा अलिप्त होऊन जात. सुरभी आणि गौरम्मा मात्र मंत्रमुग्ध होऊन जात. विनितेचा सारा दिवस मात्र खिन्नतेत जात असे.

त्या दिवशी अर्धा दिवसच शाळा होती. टीचर्स रूममध्ये मुलांच्या वर्गापेक्षा जास्तीचा दंगा होता.

शाळेतल्या प्रौढ शिक्षिका सुशीला यांना विनितेविषयी विशेष आस्था होती. विनिता मनापासून आपलं काम करते, शक्य तेवढी सगळ्यांना मदत करते, कुणाशी भांडत नाही, मुलांचाही तिच्यावर विशेष लोभ आहे, नेहमी हसतमुख असते- या साऱ्यांचं त्यांना फार कौतुक होतं.

त्या विनिताला म्हणाल्या, `आपण सगळ्याजणी मिळून `मुघले आझम’ बघायला जायचं? गाणी फार छान आहेत.’

`होय मॅडम, मागं कॉलेजमध्ये शिकताना मी पाहिलाय तो सिनेमा. गाणी फारच चांगली आहेत.’

विनिता काही क्षण भूतकाळात रमली. धारवाडच्या रीगल थिएटरात मैत्रिणींबरोबर तिनं तो सिनेमा पाहिला होता. किती सुंदर दिवस होते ते! क्लास चुकवून सिनेमाला जाऊन आल्यानंतर कितीतरी दिवस मैत्रिणी लेडीज रूममध्ये तिला `मुहोब्बत की झूटी कहानी पे रोये’ गायला लावत. लेडीज रूमलगतच्या वर्गात इकॉनॉमिक्सचा कंटाळवाणा क्लास चालला होता. वर्गातल्या मुलांनीही आरडाओरडा केला होता, `सर, इकॉनॉमिक्स नको. कॉलेजच्या मधुबालेसारख्या असणाऱ्या लता मंगेशकरकडून `मुहोब्बत की झूटी-’ ऐकायचं आहे!’ तसं त्यांनी नोटीस बोर्डावरही लिहून ठेवलं होतं. वर्गातली ती सगळी मुलं आणि मुली आता कुठं असतील? मी ही इथं अशी आहे! ते सुंदर दिवस कुठं निघून गेले?

`मग? काय ठरलं? जायचं ना?’

विनिता भानावर आली.

`नको. मी घरी सासूबार्इंना सांगितलं नाही. पुन्हा कधीतरी येईन.’

`चला हो जाऊ या! मी सांगेन तुमच्या सासूबार्इंना.’

जवळ कुणी नाही, हे पाहून त्या विनितेच्या कानाशी कुजबुजल्या, `विनिता, तुम्हाला आणखीही एक सांगायचं होतं.’

विनिता ऐकू लागली. काय सांगायचंय यांना?

`तुमचे सासरे किती मानी आहेत, हे मला ठाऊक आहे. त्यांचा स्वभावही आम्ही अनेक वर्षे पाहिला आहे. म्हणून मुद्दाम तुम्हांला सांगतेय मी.’

`काय झालं?’

नाही म्हटलं तरी विनितेच्या आवाजात चिंता डोकावू लागली.

`आठ-दहा दिवसांपूर्वी मी मॅटिनीला गेले होते. बाल्कनीमध्ये पुढच्या रांगेत तुमची सुरभी एका मुलाबरोबर बसली होती. ती मला ओळखत नाही. पण मी तिला ओळखते. अंधारात दोघांची बरीच घसट चालली होती.’

विनितेला कुणीतरी अचानक मस्तकावर प्रहार केल्यासारखं झालं.

`तो मुलगा कोण होता? तुम्ही त्याला ओळखता काय?’

`होय. आमच्या गल्लीच्या टोकालाच राहतो तो. गोपीनाथ त्याचं नाव. मुलगा दिसायला खूपच देखणा आहे. बी. एस्सी. झालाय. अजून तरी त्याला नोकरी मिळालेली नाही. कुठंतरी पार्टटाईम नोकरी करतो असं ऐकलं होतं. बाकी मुलगा काही वाईट नाही. कुठलंही व्यसन नाही. तुम्हीच आणखी चौकशी करा.’

सारं ऐकून विनिता बधिर होऊन बसून राहिली.

सुरभीला नवरा अत्यंत देखणा हवा होता. शिवाय तिच्या पत्रिकेप्रमाणे तिला सासू नसलेल्या घरी देणं आवश्यक होतं. त्यामुळे तिचं लग्न जुळायला वेळ लागत होता. उन्हा-पावसाची फिकीर न करता सुरभीचे आई-वडील-भाऊ तिच्या लग्नासाठी धडपडत होते. एखादं लग्नाचं स्थळ समजलं की, विलंब न लावता ते त्यांच्याशी संपर्क साधत.

असं असताना सुरभी अशा निरुद्योगी मुलाशी का स्नेह वाढवत आहे?

जड मनानं विनिता घराच्या दिशेनं चालू लागली. सिनेमा पाहायचा उत्साह ओसरून गेला होता. भावंडांचं प्रेम न मिळालेल्या विनितेचा सुरभीवर जीव जडला होता. तिलाही आपल्याप्रमाणे चांगला पती मिळावा म्हणून ती दररोज देवाला प्रार्थना करायची.

परवाच कुणीतरी म्हणत होतं, दुर्गापरमेश्वरीला नवस बोलला तर मनासारखा पती मिळतो. तिनं सुरभीसाठी नवस बोलला होता, दर्शनाला जाऊन आली होती. येताना देवीच्या प्रसादाच्या काळ्या बांगड्या आणून तिनं सुरभीला दिल्या होत्या.

विनितेच्या मनात आलं, खरोखरच सुरभीचा या गोपीनाथवर जीव जडला असेल काय? सुरभीलाच या संदर्भात विचारलं तर? पण कुठलाही चोर आपली चोरी मान्य करत नसतो हे तिला आठवलं.

कदाचित अंधारात सुशीला मॅडमनी सुरभीऐवजी आणखी कुणाला तरी पाहिलं नसेल कशावरून?

या विचारासरशी विनितेचा गोंधळ उडाला. गिरीशला ही बातमी सांगायचाही तिला संकोच वाटला.

ही केवळ फुटकळ बातमी नव्हती. सुशीलाही उगाच काहीतरी, खात्री झाल्याशिवाय बोलणाऱ्या बाई नव्हत्या.

प्रत्यक्ष नजरेनं पाहिलं तरी पुन्हा खात्री करून घे म्हणून मोठी माणसं सांगतात ना? आणखी थोडे दिवस वाट पाहणं चांगलं, असं विनितेनं ठरवलं.

फार दिवस वाट पाहावी लागणार नाही, याची तिलाही तेव्हा कल्पना नव्हती.

सोबत नोकरी करणाऱ्या राजलक्ष्मीचं लग्न ठरलं होतं. लग्नानंतर नोकरी सोडून तिला दिल्लीला जावं लागणार होतं. त्यामुळे तिनं राजीनामा दिला होता.

राजलक्ष्मीला निरोप देण्यासाठी एक पार्टी द्यायचं ठरवलं. `चालुक्य’मध्ये पार्टी ठरली होती. संपूर्ण पार्टीची जबाबदारी विनितेवर होती. त्यामुळे विनिता ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास चालुक्य हॉटेलवर आली.

पार्टीची व्यवस्था चालली होती. योग्य त्या सूचना करून विनिता खिडकीकडेच्या टेबलापाशी विसावली. बाहेर उन्हाचा कडाका जाणवत होता. ग्लासभर ज्यूसची आर्डर देऊन ती खिडकीबाहेर पाहात बसून राहिली.

बाहेरचं दृश्य पाहून ती घाबरी झाली.

सुशीला मॅडमनी सांगितलं होतं त्यात आता शंका राहिली नव्हती.

तिनं पुन्हा-पुन्हा खात्री करून घेतली. होय. तिची नणंद सुरभीच होती ती! एका सुस्वरप तरुणाबरोबर विडा खात रिक्षाची वाट पाहत होती. तिनं विनितेला पाहण्याचा प्रश्नच नव्हता.

रिक्षा थांबली. सुरभी आणि तो तरुण– बहुतेक गोपीनाथ– दोघंही तिथून निघून गेले.

आता सुशीला मॅडमनी जे सांगितलं होतं, त्यावर अविश्वास दाखवण्याचं कारणच नव्हतं.

विनितानंही निर्णय घेतला- यानंतर गप्प बसण्यात अर्थ नाही. घरातल्या वडील माणसांच्या कानांवर घालावं हे उत्तम!

रविवारचा दिवस. सगळे घरातच होते. विनितेनं सारी हकीकत गिरीशच्या कानांवर घातली होती.

गिरीश म्हणाला, `अण्णांना सांगितलं पाहिजे.’

सासूबार्इंना सांगायला विनितेला संकोच वाटला- अंहं- भीती वाटली.

`अण्णा, एक सांगू? सुरभी माझ्या बहिणीसारखी आहे-’

खिडकीवरची धूळ झटकत असलेले शामण्णा मागं वळले. विनितेकडे पाहत त्यांनी विचारलं, `कशाची पूर्वतयारी ही? मी काही तुला आज ओळखत नाही! सुरभीच काय, सगळं घरच तुझं नाही काय?’

`तसं नाही- सुरभीची गोपीनाथ नावाच्या मुलाशी बरीच मैत्री आहे म्हणे-’

`मैत्री? कशा प्रकारची मैत्री? तुला कुणी सांगितलं?’

`सुशीला मॅडमनी सांगितलं; पण त्या वेळी मी त्यावर विश्वास ठेवला नाही. काल मीही पाहिलं.’

परसातून आलेल्या गौरम्मा मागं उभ्या असल्याचं विनितेनं पाहिलं नव्हतं.

त्यांनी विचारलं, `कोण हा गोपीनाथ? काय करतो?’
 
गौरम्मांच्या स्वरातल्या कठोरपणानं विनिता घाबरी झाली. परक्या व्यक्तीनं आपल्या पिल्लांना हात लावल्यावर मांजरीला राग येतो, तसा तो राग होता.

`मला नक्की ठाऊक नाही, पण बी. एस्सी. झालाय आणि पार्टटाईम नोकरी करतो असं समजलं.’

`आपल्याला कळू न देता मुलाला भेटली आहे ही? आपली सुरभी अशी नाहीच!’

गौरम्मांच्या मातृहृदयानं ग्वाही दिली- आपली सुरभी अशी वागणंच शक्य नाही!

`आपण सुरभीलाच विचार या. उगाच अपसेट व्हायचं कारण नाही!’ एवढं बोलून शामण्णांनी विषय तिथंच थांबवला.

गौरम्मा अपार दु:खात बुडून गेल्या होत्या.

सुनेनं हे गुपित शोधून काढल्यामुळे त्यांच्या दु:खाची तीव्रता वाढली होती. सुरभीनं किती मामुली मुलगा शोधला याचं दु:ख त्यांना पराकोटीचं झालं होतं.

चंद्रू अमेरिकेहून येऊन गेल्यापासून आणि जमुनेचे तिकडचे फोटो पाहिल्यापासून त्यांचा आणखी एक विचार पक्का होत चालला होता. कर्ज काढावं किंवा प्रसंगी घर विकावं लागलं तरी हरकत नाही, सुरभीचं अमेरिकेत असलेल्या मुलाशीच लग्न लावून दिलं पाहिजे. तिनंही वैभवपूर्ण जीवन जगलं पाहिजे.

पण शामण्णांचे विचार वेगळेच होते.

त्यांना वाटत होतं, हा गोपी खरोखरच चांगला मुलगा असेल आणि त्याची कष्ट करायची तयारी असेल तर, सुरभीच्या मनाप्रमाणे तिचं त्याच्याशी लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही. फार तर त्याला नोकरी लागेपर्यंत थांबावं लागेल. सुरभी आपली एकुलती एक मुलगी- ती सतत आपल्यासमोर राहील. तिच्या अडी-अडचणींच्या वेळी आपणही मदत करू शकू.

देवळातून घरी परतलेल्या सुरभीला घरातल्या बदललेल्या वातावरणाचा वास आला. संतापानं गौरम्मा लालबुंद झाल्या होत्या. खिन्न होऊन कामं करणारी वहिनी, नेहमीपेक्षा वेगळ्या मूडमध्ये असलेले अण्णा! घरात गोपी-प्रकरण समजलं असेल काय? वहिनीच नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडत असते. या विनिता वहिनीनंच सांगितलं असेल-

तिचं वय गोपीच्या प्रेमात पडायचंच होतं. सारं जगच तिला प्रेममय वाटत होतं. देखण्या गोपीनंही नोकरीचा गंभीरपणे विचार केला नव्हता. शिक्षणात बेताचा असला तरी सगळे त्याच्या स्वभावाविषयी बरं बोलत होते. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या दोघांची ओळख होती. घरात सांगायची त्यालाही भीती वाटत होती. त्यामुळे चोरून त्यांच्या भेटी होत.

तूर्त गोपी एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये पार्टटाईम शिकवण्याची नोकरी करत होता. त्यानं अजून लग्नाचाही विचार केला नव्हता.

गौरम्मांना यातलं काहीच उमजत नव्हतं. सुरभीनं त्यांना आपल्याला गोपीविषयी जे वाटतं ते सांगितलं.

सारं ऐकून त्या आणखी दु:खी झाल्या. म्हणाल्या, `सुरभी, तू अजून लहान आहेस. तुला काहीही कळत नाही. गोपीशी लग्न केलंस तर काय मिळणार आहे तुला? एकेक पैसा साठवत संसार करावा लागेल तुला! विनिताचं पाहतेस ना? किती राबावं लागतं तिला! एवढं करून जेमतेम चार हजार रुपयेही पगार नाही मिळत! अमेरिकेच्या हिशेबानं पाहिलं तर शंभर डॉलर सुद्धा पगार मिळत नाही. तेच जमुनेचं पाहिलंस की नाही? ती इथं येईल तेव्हा लाखो रुपये सहज खर्च करेल. फोटोमध्ये पाहिल्यास नं कसल्या भारी गाड्या आणि घरं? तुला सुखानं जगायचं असेल तर या दरिद्री प्रेमाचा नाद सोडून दे!’

सुरभीवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी पुन्हा अमेरिका-पुराण सुरू केलं.

स्वयंपाकघरातून सारं ऐकणाऱ्या विनितेचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसत नव्हता. काय सांगतेय हे आई मुलीला? ज्याच्यावर मन बसलं, त्याच्याशी लग्न करायचं की जिथं डॉलरचा ओघ आहे, तिथं करायचं?

संध्याकाळी घरी आलेला गिरीश सांगत होता, `अम्मा, सगळीकडे मी चौकशी केली. गोपी चांगला मुलगा आहे. आई नाही. वडील अत्यंत सभ्य आहेत. वडील कारकून म्हणून निवृत्त झालेत. हा एकुलता एक मुलगा. कसलंही व्यसन नाही. कॉम्प्युटरचं ज्ञान आता घेतोय. नोकरी निश्चित मिळेल.’

`कुठली नोकरी मिळेल? किती पगार मिळेल?’

`ऑपरेटर होईल. आणखी कष्ट घेतले तर आणखी चांगली नोकरी मिळून शकेल. कॉम्प्युटर-सेल्स-लाईनीत शिरला तर चांगलं जगता येईल एवढं नक्की कमावू शकेल. मला वाटतं, विचार करायला काही हरकत नाही.’

`तुझ्या मुलीला तू दिली असतीस का अशा मुलाला?’

`न जन्मलेल्या मुलीला मध्ये आणून हा प्रश्न विचारलास तर मी काय उत्तर देऊ, अम्मा? तरीही सांगतो. माझ्या मुलीनं गोपीसारख्या मुलावर प्रेम केलं, तर तिचं मन न मोडता मी जरूर लग्न लावून देईन!’

`पण मी देणार नाही! मला अमेरिकेत नोकरी करणाराच जावई पाहिजे!’

आईच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे गिरीश गप्प बसला.

आईला प्रेमाविषयी सांगणाऱ्या सुरभीला मात्र आईचं बोलणं तत्क्षणी पटलं!

सासूचं डॉलर-प्रेम अपरिचित नसलं तरी आजच्या त्यांच्या वागण्यामुळे विनितेच्या मनावर आघात झाला होता.

गोपी-प्रकरणामुळे गौरम्माही सावध झाल्या. त्यांनी अनेक विवाह-एजंटस्‌शी संपर्क साधला आणि सांगितलं `आम्हांला इथला मुलगा नको. परदेशात- त्यातही अमेरिकेतलं स्थळ सांगा. कितीही खर्च झाला तरी चालेल.’

आपली मुलगी सुखात राहावी असं कुठल्याही आईला वाटणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. सुनेनं सुखात राहावं असं वाटणं मात्र अस्वाभाविक आहे! मुलांना कर्जाच्या खड्ड्यात लोटून मुलींना स्वर्ग-सुखाच्या शिखरावर चढवणं योग्य आहे असं कोण म्हणेल? शिवाय सुख-समाधान ही काही पैसे खर्च करून मिळणारी गोष्ट नव्हे. डॉलरही ते देऊ शकत नाही. तरीही ही गौरी अशी का वागते?- शामण्णा अधिकच गंभीर होत होते.

गौरम्मांनी मात्र कुणाचंही ऐकायचं नाही, असा अचल निर्धार केला होता. एजंटस्‌ही तोंडापुढे सांगायचे, `ठीक आहे. तसं स्थळ असेल तर जरूर कळवू!’ मागं मात्र म्हणायचे, `गौरम्मांचा नवा विक्षिप्तपणा पाहिलात ना? सोवळ्या ओवळ्याचं अवडंबर, हातात काचेच्या बांगड्या आणि अंबाडा घालणाऱ्या गौरम्मा मुलगा अमेरिकेत गेल्यावर किती बदलल्या आहेत! जगात तेवढा एकच देश आहे, इतर सगळी माणसं भिकारी आहेत अशा प्रकारे बोलतात या!’

नाविकानं एकाग्रपणे ध्रुवताऱ्यावर लक्ष ठेवावं तसं त्या केवळ अमेरिकेवर डोळा ठेवून होत्या.

गोपी-प्रकरणानंतर मायलेकींनी विनितेशी बोलणं कमी केलं. त्यांना वाटलं, हिनंच गिरीशचे कान फुंकून सुरभीचं गोपीशी लग्न का करू नये हे पटवलं असावं.

लग्न ठरवणारे एक दलाल लक्ष्मणराय एक दिवस त्यांच्या घरी आले.

`शामराय, माझ्या मित्राचा- राजारायांचा मुलगा अमेरिकेत राहतो. शेखर त्याचं नाव. त्याला विचारणार काय सुरभीसाठी?’

स्वयंपाकघरात चुलीवरचं दूध अगदी उतू येत होतं. तिथं दुर्लक्ष करून गौरम्मा लगबगीनं उठल्या. पायात येणाऱ्या साडीच्या निऱ्यांकडे दुर्लक्ष करत त्या बाहेर धावल्या. त्यांच्या कानावर `अमेरिका’ हा परवलीचा शब्द पडला होता.

पुराणात कृष्णाच्या बासरीच्या स्वरांनी वेडावून गोपीकन्या धावत यायच्या, असं वर्णन करतात- तीही असलीच काहीतरी मंत्रशक्ती असावी!

`आपल्या सुरभीची पत्रिका द्या.’

`थोडं थांबा बघू! लक्ष्मणराय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते तरी समजू द्या!’ शामण्णा म्हणाले.

`त्यांच्या सगळ्या अपेक्षा आम्हांला मान्य आहेत.’ गौरम्मा मध्येच म्हणाल्या.

`त्यांच्या अपेक्षा बेताच्याच आहेत. हिऱ्याच्या कुड्या, अमेरिकेचं तिकीट, दोन किलो चांदी, पन्नास तोळे सोनं एवढं मला ठाऊक आहे. शिवाय तीन दिवसांचं चांगलं लग्न. योग्य तो मानपान. हुंडा मात्र अजिबात नको!’

`बाप रे! फार झालं हे! दोन-तीन लाखांचं हेच बजेट झालं!’ शामण्णा म्हणाले.

तिकडे लक्ष न देता गौरम्मा म्हणाल्या,

`नाहीतरी आम्हांला कुठं चार-दोन मुली उजवायच्या आहेत? ते मागतील तेवढं सगळं आम्ही देऊ. मुलांना आम्ही शिक्षण दिलंय ना? ते फेडतील बहिणीच्या लग्नाचं कर्ज! गरज पडली तर घरही विकायला हरकत नाही!’

`काय बोलतेस गौरी तू? या वयात घर विकून आपण काय करायचं? अमेरिकेला जायचं की भाड्याचं घर घेऊन राहायचं? माणसानं अंथरण पाहून पाय पसरायला पाहिजेत. आपण या फंदात पडायला नको!’ शामण्णांनी नाना प्रकारे विनवलं.

तरीही गौरम्मांनी आपला हेका सोडला नाही, `आपण भाड्याच्या घरात राहू; पण माझ्या मुलीनं अमेरिकेत सुखात राहिलं पाहिजे!’

लक्ष्मणरायांनी मध्यस्थी स्वीकारली. दुसरे दिवशी शेखर येत असल्याचीही त्यांनी बातमी आणली. गौरम्मा हरखून गेल्या. लेकीचं लग्नच ठरल्यासारखा त्यांना आनंद झाला.

दिसायला सुरभी चारचौघींसारखीच होती. आईच्या नजरेला मात्र ती स्वर्गसुंदरी वाटत होती.

सतत प्रणयरम्य कादंबऱ्या वाचण्यात गढून जाणारी सुरभी आईला विदुषी वाटत होती.

सकाळी नऊ वाजता अंथरुणातून उठणाऱ्या आळशी मुलीला त्या कौतुकानं `हळूबाई’ म्हणत.

केवळ चित्रपटातली गाणी ऐकण्यात वेळ घालवणारी सुरभी गौरम्मांच्या दृष्टीनं संगीतप्रिया होती.

गौरम्मांनी सारं घर दोनदा धुऊन-पुसून काढलं. सुनेला सांगून उपीट, वडे, शिरा करायला लावला.

विनिता गर्भारशी होती. तरीही नणंदेला बघायला पाहुणे येताहेत म्हटल्यावर स्वत:ला जपत तिनं सगळी तयारी दिवसभर राबून केली.

ठरलेल्या वेळी सगळं घर तयार झालं; पण कुणीच आलं नाही.

गिरीश म्हणाला, `एकाच दिवसात चार-सहा मुली बघण्याचा प्लॅन असेल म्हणून उशीर झाला असेल.’

अखेर दीड-दोन तास उशिरा शेखर, त्याचे वडील, बहीण आणि चार-सहा अपरिचित मित्र येऊन पोहोचले. आल्यानंतर त्यांनी आपल्याकडून उशीर झाल्याबद्दल क्षमाही मागितली नाही.

राजारायांची तीक्ष्ण नजर नंतर साऱ्या घरावरून फिरली. कुठंच श्रीमंतीचं दर्शन होत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर भाव उमटले- ही दरिद्री माणसं माझ्या मुलाला काय देतील! त्यांनी मनातल्या मनात लक्ष्मणरायांना शिव्या घातल्या- या म्हाताऱ्यानं उगाच आमच्या मुलाचा वेळ फुकट घालवला! त्यांच्या चेहऱ्यावर निरुत्साह दिसू लागला.

सुरभी गरम केलेलं खाणं घेऊन बाहेर आली. तिच्या सावळ्या रंगावर पांढरी पावडर उठून दिसत होती. जमुनानं आपल्या जुन्या साड्या तिला दिल्या होत्या. त्यांतली हिरवी साडी ती नेसली होती- पण तो रंग तिला मुळीच शोभत नव्हता.

शेखरनं चेहरा दुसरीकडे वळवला. त्याची नजर विनितेवर पडली. गर्भारशी विनितेची गणना सुंदर स्त्रियांमध्ये सहजच होत होती.

लक्ष्मणराय उगाच काहीतरी अनावश्यक गप्पा मारत प्रसंग साजरा करू पाहात होते.

गिरीशनं विचारलं, `माझा थोरला भाऊही अमेरिकेत असतो. तुम्ही कुठं नोकरी करता?’

अमेरिकन स्टाईलमध्ये शेखर उत्तरला, `शिकॅगोमध्ये.’

`किती वर्षं तुम्ही अमेरिकेत आहात?’

गिरीशच्या कन्नड प्रश्नांवर शेखर अमेरिकन इंग्लिशमध्ये उत्तर देत म्हणाला, `दहा वर्ष.’

`कुठल्या कंपनीत तुम्ही आहात?’

`वेस्टिंग हाऊस! आणखी काही प्रश्न आहेत?’ शेखरनं तीव्रपणे विचारलं.

`काही नाही-’ म्हणत गिरीश गप्प बसला; पण अपमान त्याला चांगलाच झोंबला.

सगळे उठले. गौरम्मांनी सांगितलं, `तुमचा अभिप्राय लवकर कळवलात तर बरं होईल. मला माझ्या सुनेला कळवावं लागेल. ती अमेरिकेहून येणार आहे लग्नासाठी!’

माना हलवत पाहुणे निघून गेले.

त्यांची पाठ वळताच गौरम्मा गिरीशवर करवादल्या, `एवढे प्रश्न कशाला विचारलेस रे तू? त्यांना आवडलं नाही ते! त्यांनी रागावून नकार दिला तर?’

`अम्मा, एवढ्या लांबच्या देशाला मुलीला देतोय आपण! कुत्र्याचं पिल्लू नव्हे! नोकरी कुठं करता म्हणून विचारलं तर त्यात राग येण्यासारखं काय आहे? फसलं जाऊ नये म्हणून मी विचारलं. काय चुकलं त्यात?’

`खरंय तुझं!’ शामण्णांनी त्याला पाठिंबा दिला.

`मला वाटतं, त्यांना आपली सुरभी पसंत पडेल! सुरभी, तुला काय वाटतं?’

`अम्मा, पण वय थोडं जास्त वाटतं नाही?’

`काही नाही! आठ वर्षांचं अंतर म्हणजे फार नाही. सगळं चांगलं आहे. आता तू काहीतरी खुसपट नको काढू! जमुनाला कळवायला पाहिजे-’

विनिता मुकाट्यानं पुढ्यातली कामं करत होती. तिला या संदर्भात कुणीही विचारलं नव्हतं. संसारात ज्याच्या मताला काहीही किंमत नाही, तो परकाच म्हणायचा! विनितेला तीव्रपणे वाटत होतं.

एवढ्यात गिरीशची हाक कानावर आली, `विनू, चल, एक चक्कर मारुन येऊ या. येताना भाजीही आणता येईल.’

`खरंच जाऊन ये, विनू! दिवसभर खूप दमलीस तूही काम करुन, त्यात दोन जीवांची! जा, मोकळ्या हवेत थोडी फिरुन ये.’ शामण्णांनी त्याला पुस्ती जोडली.

शामण्णांना विनिताच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती. त्यांची तिच्यावर माया जडली होती.

घराबाहेर पडून थोडं अंतर चालल्यावर गिरीश म्हणाला, `काही म्हण विनू! आपल्या अपरिचित लोकांकडे सुरभीला द्यायची मला भीती वाटते. या शेखरविषयी आपल्याला कुठून माहिती मिळू शकेल?’

विनिताही विचारात पडली. मग म्हणाली, `तुमच्या भावाचे मदन नावाचे मित्र आहेत ना? त्यांच्या बहिणीलाही यांनी पाहिलं होतं म्हणे. लक्ष्मणरायांनीच तसं सांगितल्याचं मला आठवतंय. ती मुलगी पाहिलीय मी. देखणी आहे. का जमलं नाही कोण जाणे! चार पावलं असेच चालत गेलो तर त्यांचं घर लागतं. भेटून चौकशी करायची काय?’

गिरीशला हे पटलं.

दोघं मदनच्या घरी पोहोचले तेव्हा अनपेक्षितपणे मदनला पाहून चकित झाले. हा केव्हा आला अमेरिकेहून?

मदनचे वडील वयस्कर होते. त्यांच्यापुढे गिरीशनं शेखरविषयी सगळं सांगितलं. त्यानंतर चौकशी केली, `मुलगा कसा आहे? तुम्हाला काही कल्पना?’

`आम्हांला काही ठाऊक नाही रे! आमचं आणि त्यांचं मुहूर्ताच्या बाबतीत जमलं नाही. आम्ही कौल लावला तर डावा कौल लागला. म्हणून आम्ही नकार दिला.’

मदन त्या दोघांना गेटापर्यंत पोहोचवायला आला होता. त्यानं मात्र स्पष्टपणे सांगितलं, `गिरी, आमचे आप्पा आहेत जुन्या काळातले! हजार खोट्या गोष्टी सांगून एक लग्न जुळवावं यावर त्यांचा विश्वास आहे; पण मी हे मानत नाही. त्या वेळी डायव्होर्स नव्हते, आता सर्रास होतात. मला जे काही समजलं ते सांगतो. तुम्हांला त्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. मला मात्र यात अडकवू नका.’

`काय सांग-’

`आम्ही दोघंही शिकागोमध्ये राहात होतो; पण परस्परांकडे कधी गेलो नव्हतो. पन्नास मैल अंतर दोघांच्या घरात होतं. एका रविवारी आपल्या भागातला मुलगा इथं आलाय म्हणून भेटायला गेलो. उगाच फॉर्‌मॅलिटी कशाला, असा विचार करुन फोन न करताच गेलो. घरात शेखर नव्हता. टूरवर गेला होता. घरात एक गोरी स्त्री होती. लग्नाशिवाय म्हणजे लिव्ह टुगेदर म्हणतात ना, तशी याच्याबरोबर राहात होती. दहा मिनिटं बसून जुजबी गप्पा मारुन आलो. गेली दोन वर्ष ते एकत्र राहात असल्याचंही समजलं. त्यामुळे मी हे लग्न ठरवायला विरोध केला.’

`असं झालं होय?’

`हं. आधी माझा विरोध बघून माझी बहीणच माझ्याबरोबर भांडायला उठली. मी अमेरिकेत यायला नको आहे म्हणून तू मोडता घालतोयस म्हणत राहिली. जेव्हा सारं सांगितलं तेव्हा कुठं गप्प बसली.’

मदनशी बोलल्यावर गिरीशला डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं. दोघांनीही त्याचे मनापासून आभार मानत म्हटलं, `हे सांगून तुम्ही एक लग्न ठरवल्याइतकं पुण्य मिळवलंय! थँक्स!’

घरी परतताना दोघंही गप्पच होते. आता याविषयी बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं.

रात्री जेवायला बसले होते तेव्हा गौरम्मांच्या मनात सुरभीचं लग्न कसं करून द्यायचं, हाच एक विषय होता. कार्यालय कुठलं सोयीचं होईल, पाहुण्यांची व्यवस्था कशी करायची, लग्नाला नातेवाईकांपैकी कुणाला बोलवायचं, कपडे कुठं घ्यायचे, सोनं-नाणं कुठं घ्यायचं, याविषयी बोलत होत्या; पण कुणीच त्यात सहभागी होत नव्हतं.

सगळं असह्य होऊन गिरीश उद्विग्नपणे म्हणाला, `अण्णा, एक सांगायचं आहे. या शेखरनं पसंती कळवली तरी तुम्ही संमती देऊ नका.’

`का?’ गौरम्मांनी चिडून विचारलं.

`मी शेखरची माहिती काढली आहे. त्याची एक गोरी मैत्रीण आहे असं समजलं.’

`आमचं बरं न बघवणाऱ्या कुणीतरी असूयेपोटी सांगितलं असेल.’

`अम्मा, आपल्याशी उत्तम संबंध असणाऱ्यांनीच सांगितलंय हे! रात्री पाहिलेल्या विहिरीत दिवसा का म्हणून पडायचं?’

शामण्णांनी विचारलं, `कुणी सांगितलं हे?’

घडलेली सारी घटना गिरीशनं सविस्तरपणे सांगितली आणि शेवटी म्हणाला, `माझी इच्छा मी सांगितली. यानंतर तुम्हांला जे करायचं आहे ते करा.’

एवढ्यात त्याला बाहेरुन कुणीतरी हाक मारली. गिरीश बाहेर निघून गेला.

आता सुरभीनं हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. घरातलं वातावरण गंभीर झालं. विनिता रडणाऱ्या सुरभीशेजारी बसून म्हणाली, `सुरभी, अशी हताश होऊ नकोस. मीच तुझ्या भावाला घेऊन मदनरावांच्या घरी गेले होते. तुला यापेक्षा कितीतरी चांगला नवरा भेटेल. तू एवढा मनस्ताप करून घ्यायच्या लायकीचा तो मुलगा नाही!’

ठसठसणाऱ्या करटावर कढत पोटीस लावावं तसं झालं. निराशा आणि अपमान यामुळे उफाळलेला गौरम्मांचा संताप विनितेवर उसळला. मुलावरचाही संताप त्यात मिसळला.

सून गर्भारशी आहे याचं भान न ठेवता त्या उसळल्या, `तूच गिरीशला असलं काहीतरी शिकवतेस! एवढ्या खोलात शिरायचा त्याचा स्वभावच नाही. तूच मायावी जादूगारीण-’

विनिता थक्क झाली. दुखावून ती उद्गारली, `अम्मा, काय बोलता तुम्ही हे!’

यावर सुरभीही म्हणाली, `खरं बोलतेय अम्मा. मी अमेरिकेला जाऊ नये म्हणून तुम्हाला माझ्या लग्नात जितक्या अडचणी आणता येतील तितक्या तुम्ही आणताहात! तुम्हांला माझ्याविषयी असूया वाटते! मीही तुमच्यासारखं इथंच राब-राबून पैसा-पैसा साठवण्यात आयुष्य घालवावं अशी तुमची इच्छा आहे! उलट जमुनावहिनी किती मोठ्या मनाच्या आहेत! किती उदार आहेत! मी श्रीमंत होईन म्हणून तुम्हांला असूया वाटते. माझ्या अमेरिकेतल्या मुलाबरोबरच्या लग्नासाठी घर विकलं जाईल, अशी भीती वाटते म्हणून लग्न मोडताय तुम्ही! स्वार्थी!’

शांत स्वभावाचे शामण्णा खवळून ओरडले, `तोंड बंद कर, सुरभी!’

सुरभी त्यांनाही म्हणाली, `अण्णा, तुम्ही पांढरं आहे ते सारं दूधच समजता. त्यांच्या मनातले कुटील हेतू तुम्हांला समजणार नाहीत. म्हणूनच म्हणतात, कुळगोत्रा बघून मुलगी घरी आणावी. मोठ्या घरातून आलेल्या जमुनावहिनी मोठ्या मनाच्या आहेत! किती उदार स्वभाव आहे त्यांचा!’

शामण्णा हात उगारत म्हणाले, `सुरभी, जीभ आवरती घे!’

विनितेला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. आपल्यावर कधी-काळी असा आरोप करण्यात येईल, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. तिनं शामण्णांना आवरलं. डोळ्यांमधलं पाणी तिच्या दोन्ही गालांवरन ओघळलं. ते पुसायचंही विनिताला भान नव्हतं. भरल्या ताटातल्या अन्नात ते अश्रू मिसळून गेले.

`सुरभी, तुला काया-वाचा-मनानं बहीण मानून मी तुझ्या लग्नाच्या संदर्भात लक्ष घातलं. यानंतर तुमच्या घरातल्या कुठल्याही बाबतीत मी लक्ष घालणार नाही. मला क्षमा करा!’ एवढं म्हणून जेवण अर्धवट टाकून विनिता आत निघून गेली.

अस्वस्थ शामण्णांच्या हातातला घास तसाच राहिला.

पण सुरभी आणि गौरम्मा मात्र गर्भारशी विनिता अर्धपोटी उठून गेली, याची फिकीर न करता जेवत होत्या.

डॉलरनं सर्वप्रथम त्या घरात आपलं अशांत पाऊल टाकलं होतं.

सुरभीचं लग्न ठरलं. मुलगा हैद्राबादमध्ये बँकेत नोकरी करत होता. सुरेश त्याचं नाव. ऑफिसर होता. घरची कुठलीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती. एकुलत्या एक बहिणीचं लग्न झालं होतं. घरात सासू नव्हती. सुरभी नशीबवानच म्हणायची! स्वत:चं घर होतं. वडील होते. घरची गाडी होती. अमेरिकेतली नोकरी नाही एवढं सोडलं तर काहीही खटकण्यासारखं नव्हतं.

विनितेनं मात्र लग्नाच्या संदर्भात कुठल्याही बाबतीत लक्ष घातलं नव्हतं. सुरभीच्या कठोर बोलण्यानंतर विनिताही `किती केलं तरी बहीण ती बहीणच आणि नणंद ती नणंदच’ या विचारावर येऊन ठेपली होती.

सासू आणि नणंदेच्या स्वभावाचा परिचय त्याच प्रसंगी झाला होता. त्यांच्या स्वार्थी स्वभावाचा नीच आविष्कार पाहताच विनिता अंतर्मुख झाली होती. तिची कुणाशीही बोलण्याची इच्छाच निघून गेली होती.

गिरीशचा मुळातला स्वभाव अबोल होता त्यात नाही म्हटलं तरी सुरभी त्याची रक्ताची बहीण होती. त्यामुळे तो त्या घटनेतून सहज बाहेर येऊ शकला होता.

सुरुवातीपासूनच अशा घटना हृदयात दडवून जगण्याची सवय असलेल्या विनितेनंही दु:ख अंतर्मनात दडवलं आणि अलिप्तपणे वावरु लागली.

या सर्व प्रकारात खऱ्या वेदना झाल्या त्या शामण्णांना! त्यांच्या नंदगोकुळा सारख्या संसारात अदृश्य का होईना, पण भेग पडली होती. डॉलरनं ती पाडली होती!

सुरभीच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती.

चंद्रूनं सूटचं कापड पाठवलं होतं, तर जमुनेनं सुरभीला शंभर डॉलर्स पाठवून दिले. सोबत चंद्रूचं पत्र होतं-

`आम्हांला यंदा रजा कमी आहे. जमुनाही बँकेत नोकरी करते. त्यामुळे लग्नाची तारीख ठरताच लगेच कळवा, म्हणजे दोन आठवडे आधी येता येईल. शक्यतो सगळ्यांना सोयीचा दिवस ठरवा.’

ऑगस्ट महिन्यात विनितेच्या बाळंतपणाचे दिवस येत होते. त्यानंतर, म्हणजे डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठेवणं शक्य होतं. पण त्यासाठी पाहुणे तयार नव्हते.

विनितानं आपलं बाळंतपण धारवाडमध्ये करुन घ्यायचं ठरवलं होतं. गिरीश आणि शामण्णांनी तिला नाना परीनं समजावलं तरी ती आपल्या विचारावर ठाम होती. त्या दोघांनाही तिनं समजावलं, `आमच्या गावात किती तरी दवाखाने आहेत. माझ्या आजी बाळंतपण करायला येतील. मी बाळंतपणासाठी धारवाडच्या माझ्या घरी जाईन. कमलापुरांचा दवाखाना घरापासून खूप जवळ आहे.’

जुलै महिन्यात मुहूर्त पाहणं सगळ्यांच्या सोयीचं होतं. घरी फोन होता. मुहूर्ताची बातमी फोन करुन जमुनेला सांगितली.

बातमी ऐकताच तिनं सांगितलं, `आम्ही जुलै महिन्यात युरोपच्या प्रवासाला जाणार आहोत. तो प्रवास कॅन्सल करणं शक्य नाही.’

हे पैशाचं युद्ध! डॉलरविरुद्ध रुपयाचं युद्ध!

तिनं स्पष्टच सांगितलं, `मी यायला हवं असेल, तर माझ्या सोयीनं लग्नाची तारीख ठरवा! विनिता येणं आवश्यक असेल, तर तिच्या सोयीनं ठरवा!’

शामण्णांनी समजावलं, `गौरी, बाळंतपणाची तारीख मागं-पुढं करणं कुणाच्याही हातात नाही. आपण विनिताच्या सोयीनंच तारीख ठरवू या. जमुनेनं या वर्षी युरोप-प्रवास केला नाही, तर काय बिघडणार आहे? पुढच्या वर्षी ते जाऊ शकतात. एकच बहीण आहे. आठ दिवस सुट्टी मिळाली तरी येऊन जाऊ दे त्यांना.’

`तसं नाही हो! जमुना रागावली आणि लग्नालाच आली नाही तर काय करायचं? तिला जे सोयीचं असेल, तसंच आपण केलं पाहिजे. तुम्हा पुरुषांना यातलं काही समजत नाही. तुम्ही नका इकडे लक्ष देऊ!’

पण विनितेला सारा अर्थ समजला होता.

सुरभीच्या लग्नासाठी चंद्रूनं दोन लाख रुपये दिले होते. गिरीशनंही बँकेतून कर्ज काढून पन्नास हजार रुपये दिले होते. चंद्रूनं अधिक पैसे दिले असल्यामुळे त्याला जे सोयीचं असेल, तसंच असा गौरम्मांचा निर्णय दिसत होता. म्हणजेच जमुना जे म्हणेल, तेच ऐकण्यात येणार हे नक्की होतं. वयामुळे प्रौढत्व आलं असलं, तरी डॉलरच्या नादामुळे गौरम्माही जमुनेमागे पोरकटपणे धावत होत्या.

अशा प्रकारे सुरभीचं लग्न ऑगस्ट महिन्यातच ठरलं. अगदी विनितेच्या बाळंतपणाच्या दिवसांजवळचाच मुहूर्त ठेवला गेला. हे ठरवत असतानाच `तू आलीस किंवा नाही आलीस तरी हरकत नाही, जमुना येणार आहे’ हे दाखवून देण्यात येत होतं.

`जमुना माझी थोरली सून. अमेरिकेत असते. सावकार कृष्णप्पा ठाऊक आहेत ना? त्यांची मुलगी!’ असं लग्नघरात अभिमानानं सांगता येईल. विनितेविषयी काय सांगणार?

येताना जमुना भरपूर भेटवस्तू घेऊन येईल, असंही त्यामागं गणित होतं.

विनिताचा बाळंतपणासाठी धारवाडला जाण्याचा दिवस ठरला. शामण्णा अस्वस्थ होऊन आत-बाहेर करत होते. अधून-मधून तिला म्हणत होते, `सगळी नीट तयारी आहे ना? तू अजिबात चिंता करू नकोस, विनू! सगळं नीट होईल!’

त्यांच्या वागण्यातून व्यक्त होणारी काळजी पाहून विनिता म्हणाली, `अण्णा, आमचं धारवाड म्हणजे काही खेडं नाही. आजूबाजूला माणसं आहेत. माझीही बागेच्यामध्ये झाडा-झुडपांनी घेरलेल्या घरात राहायची इच्छा आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीच.’

गौरम्मा मात्र प्रथमच फणकारुन म्हणाल्या, `कुठलं धारवाड कोण जाणे! तिथंच बाळंतपण व्हावं म्हणून हट्ट करतेय! इथं आम्ही नाही का करणार बाळंतपण?’

सारं तोंडदेखलंच असल्याचं ठाऊक असल्यामुळे विनिताही त्यांच्याशी वाद घालायला जात नव्हती.

चंद्रू आणि जमुना भारतात आले. त्याच दिवशी विनितेला मुलगा झाला. शामण्णांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मुलगा-सून आल्यामुळे गौरम्मांनाही नवतारुण्य आलं होतं.

लग्नाला अजून पंधरा दिवस होते.

जमुनेनं कुठल्याही कामाची जबाबदारी अंगावर घेतली नाही. प्रकृतीचं निमित्त सांगून ती आईच्या घरी निघून गेली आणि लग्नाआधी केवळ दोन दिवस परतली.

लग्नघरातही दर पाच मिनिटाला एक रेशमी साडी बदलून जमुना व्हिडिओ कॅमेऱ्यापुढे मिरवत राहिली. फिरुन-मिरवून ती इतकी थकली की विचारता सोय नाही!

काही का असेना, सुरभीचं लग्न मात्र थाटात झालं. मुलीला दोन किलो चांदी, भरपूर सोनं, रेशमी साड्या, घरासाठी लागणारं आधुनिक सामान, कॅन वगैरे सारं गौरम्मांनी दिलं.
 
जमुनेला गौरम्मांचा हा उधळेपणा अजिबात आवडला नाही. आपण दूर अमेरिकेत थंडी-बर्फात कामं करुन आणि काटकसर करुन साठवलेले डॉलर्स अशा फालतू कारणांसाठी खर्च करायचे? जे मिळवतात, त्यांनाच पैशाचं महत्त्व ठाऊक असतं!

तरीही तोंडानं वाईट बोलून वाईटपणा घेण्याइतकी ती कच्ची नव्हती. यावरचा मार्ग सोपा होता. यानंतर डॉलर्स पाठवणं कमी करायचं! एवढंच.

गिरीश बाळाला बघण्यासाठी लगोलग जाऊन आला होता.

त्यानं आणि विनितानं बाळासाठी `हर्ष’ नाव चांगलं आहे असं योजून ठेवलं. कारण ती शामण्णांची इच्छा होती.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुरभी हैद्राबादला गेली. लगेच चंद्रू, विनिता आणि बाळाला बघायला धारवाडला निघाला. जमुना माहेरी गेली.

लग्नघरातली कामं शिल्लक असल्यामुळे गौरम्मा धारवाडला आल्या नाहीत. लग्नघरात आणि इतरही वेळी प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सुनावलं, `आमच्या जमुनेनं चार हजार डॉलर दिले लग्नासाठी! नाहीतर लग्न होणंच शक्य नव्हतं! खरं तर कन्यादानाचं सारं पुण्य जमुनेला मिळायला पाहिजे!’

त्यात कुठंही गिरीशचं नाव नव्हतं.

चंद्रूच्या तीक्ष्ण बुद्धीला मात्र घरातल्या वातावरणामधला बदल लक्षात आला होता. या घराला आपलं घर समजून एवढी वर्षं राबणारी विनिता सुरभीच्या लग्नाच्या वेळीच माहेरी बाळंतपणासाठी गेली होती.

अण्णांचा चेहरा कष्टी होता.

लग्नघराच्या धामधुमीत गौरम्मा किंवा सुरभीच्या तोंडून एकदाही `विनिता असायला हवी होती. विनिता असती, तर बरं झालं असतं.’- अशा प्रकारचं एकही वाक्य ऐकू आलं नव्हतं. गिरीशबरोबर कुणी बाळासाठी कपडे किंवा बाळलेणी पाठवली नव्हती.

आपल्या सुंदर आणि शांत घरात ही अशांतीची वावटळ कुठून आली असेल? याला जबाबदार कोण?

मी? की जमुना? चंद्रू गोंधळून गेला होता.

आठ वर्षांनंतर चंद्रू धारवाडला येत होता.

या आठ वर्षांमध्ये किती तरी घडून गेलं होतं!

त्या वेळी जो चंद्रू धडधडत्या अंत:करणानं या गावी आला होता, तोच चंद्रू आत्मविश्वासासह इथं येत होता.

त्या वेळी रेल्वेमध्ये ज्या विनितेनं आपल्या मधुर गाण्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं, तीच विनिता आता त्याची भावजय झाली होती.

त्या वेळी `सेकंड क्लासचा बर्थ मिळाला तर नशीब’ मानणारा चंद्रू आता फर्स्ट क्लासच, काय विमानानं प्रवास करायलाही कंटाळून गेला होता.

त्या वेळी अमेरिकाच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं मानणारा चंद्रू आता म्हणत होता, `तोही एक श्रीमंत देश आहे, एवढंच-’

त्या वेळी त्याचं भूगोलाचं ज्ञान मैसूर-मंड्य एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आता मात्र सारं जग त्यात सामावलं होतं.

याचबरोबर या खेपेच्या प्रवासात त्यानं एक महत्त्वाचं सत्य जाणलं होतं-

डॉलरच्या रुपानं धन कमावत असल्यामुळे सगळे आपल्याला आज मान देताहेत, आत्मीयता दाखवताहेत, हेवाही करताहेत. पण खरं प्रेम आणि खरा विश्वास आपण गमावला आहे.

कितीही पैसा मिळवला तरी प्रेम-विश्वास मिळत नाही. उलट पैशाच्या भरतीमध्ये अशा नाजूक भावना मरण पावतात.

या खेपेला चंद्रू धारवाडमधल्या एका हॉटेलमध्ये उतरला होता. एवढ्या वर्षांमध्ये धारवाडही बरंच बदललं होतं. रस्त्यावरची गर्दी आणि रिक्षांची संख्या वाढली होती. ज्या `अत्तीकोळ्ळ’ भागात पूर्वी काहीही नव्हतं, तिथंही आता घरं झाली होती. रस्त्यात दिसणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतही बरीच आधुनिकता आली होती.

चंद्रू विनितेला भेटायला तिच्या घरी गेला.

त्या घराच्या भोवताली मात्र फारसा फरक झाला नव्हता. भोवतालच्या बागेचा तजेला मात्र पूर्वीसारखा राहिला नव्हता. तेही साहजिक होतं म्हणा! त्या झाडांना वेळच्या वेळी पाणी मिळण्याची व्यवस्था केली असती, तरी विनितेची माया आणि प्रेम नसेल तर तजेला कसा येणार?

चंद्रूला पाहून विनिता मात्र आश्चर्यचकित झाली. आपल्या बाळाला बघायला चंद्रू एवढ्या लांब आवर्जून येईल अशी तिनं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.

तिची आजी सीतक्का चंद्रूजवळ बसल्या. निरखून बघत `अरे, चंद्रू ना तू? कसा आहेस? बरा आहेस ना?’ वगैरे चौकशी केली.

`होय. तुम्ही कशा आहात?’ त्यानंही चौकशी केली.

एवढ्यात विनिता खोलीबाहेर आली.

`लग्न कसं झालं? अण्णा कसे आहेत?’ तिनंही चौकशी केली.

`सगळे छान आहेत. बाळाला दाखवणार नाही?’

विनितेच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद उमटला. त्या नव्या मातेनं कौतुकानं छोटा गोमटेश्र्वर त्याच्यापुढे धरला. नवजात बालक कुणासारखं आहे यावर कौतुकाची चर्चा झाली, पण काहीच निष्कर्ष निघाला नाही.

त्यानंतर चंद्रू मोकळेपणानं गप्पा मारु लागला.

मध्येच काही तरी आठवून त्यानं विचारलं, `तुम्हाला अजून ते गाणं येतं?’

`कुठलं?’

`वसंत-बनी ती गाते कोकिळ–’

`न यायला काय झालं?’

`तुम्ही अजूनही गाता?’

काही क्षण मौनात गेले. त्यानंतर त्याच्याकडे पाहत विनितेनं सांगितलं, `भोवतालच्या परिस्थितीमुळे कोकिळेचं गाणं मूक झालंय!’

`का? असं का व्हावं? कोकिळेला राजदंडाचं भय नसतं आणि राजमुद्रेची आशाही नसते. राजमुद्रेच्या भयानं गाणं बंद केलं?’

`कुठला राजा आणि कुठला आम्रवृक्ष! सगळी झाडं नष्ट झाली, सिमेंटचे इमले उठले, पैशाचं महत्त्व शिगेला पोहोचलं! आता कशी कोकिळा गाणं म्हणेल? आणि ते ऐकणार तरी कोण?’

`असं का म्हणता? पैसे मिळवण्यासाठी नोकरी धरल्यावर गाणं सोडूनच द्यावं असं तुम्ही मानता का?’

`पैसे? अंहं डॉलर!’ बोलता-बोलता विनिता गप्प झाली.

तिच्या मौनाचा अर्थ चंद्रूलाही समजला होता.

`विनिता, मलाही अतिशय निराशा वाटते.’

`तुम्हाला? तुम्हीच असे म्हणालात तर आमच्यासारख्यांची काय गत? तुम्ही एवढे श्रीमंत! जमुना तर साक्षात लक्ष्मीच! सतत तुमच्या नावाचा जप करणारी आई आणि बहीण! काय कमी आहे तुम्हाला?’

`विनिता, उलट तुम्हालाच मी म्हणतो, काय झालंय? तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आहात. कानावर तुमची भाषा सतत येते. तुमच्या मुलावर तुम्ही तुमचे संस्कार करु शकता. तुम्हाला माझ्यासारखं दुहेरी जीवन तर जगावं लागत नाही ना!’

`नदीपलीकडचं कुरण नेहमीच हिरवंगार दिसत असतं!’

`हेच बोलणं तुम्हालाही लागू पडत नाही काय?’

तिला चंद्रूच्या बोलण्याचा अर्थ समजेना. आपल्याला वाटतं तसा चंद्रू तिथं सुखी नाही असं दिसतं. म्हणजे त्या अमेरिकेतही दु:खी माणसं असतात तर!

`विनिता, तुम्हाला तिथल्या जीवनाची कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं येऊन आपल्याला चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा- हे योग्य आहे काय? तिथल्या दु:खांचा उल्लेखही न करता इथं कुबेराप्रमाणे वागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.’

चंद्रूला जमुनाविषयी काही सुचवायचं असेल काय?

`विनिता, तिथं डॉलर मिळवण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून कष्ट करत राहतो. तिथं केवळ भारतीय माणसांबरोबर मिसळतो. तिथल्या समाजाचा अविभाज्य अंग होऊ शकत नाही. कितीही वर्षं तिथं राहिलं तरी एक प्रकारचा जीवघेणा एकटेपणा आम्हांला छळत राहतो. त्यासाठी आम्ही तिथं अनेक देवळं आणि मठ स्थापन करतो.’

चंद्रूचं बोलणं ऐकून अस्वस्थ झालेली विनिता कळवळून म्हणाली, `मग तिथं का राहता? इथं का निघून येत नाही?’

`पैशाच्या दलदलीत आणि मोहाच्या जाळ्यात सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी तिथं मिळते. जाती, भाषा, प्रदेशाचं राजकारण नाही. सुखानं आपलं काम आपण करु शकतो. इथं आलो तरी तशी नोकरी मिळणार नाही. देहालाही तिथल्या सुखासीन जीवनाची सवय झाली आहे. माझंच पाहा ना! एकेकाळी कसा जगत होतो- आता गाडी नसेल, तर घराबाहेर पडायला मी तयार नसतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.’

प्रथमच चंद्रू विनितेशी अंतर्मनातल्या सुख-दु:खाविषयी बोलला होता. तिच्या स्नेहमय स्वभावाची त्याला याच धारवाडमध्ये ओळख झाली होती. तिनं कधीही त्याचं मूल्यमापन डॉलरच्या पार्श्र्वभूमीवर केलं नव्हतं.

त्यानं विचारलं, `विनिता, तुम्हीही पहिल्यासारख्या उत्साही आणि आनंदी राहिला नाहीत. का बरं?’

`खरं सांगू? तुम्हाला राग नाही ना येणार? तुमच्या आई-बहिणीला दोष दिला तर चालेल?’

`खरं तेच सांगा.’

`तुमच्या डॉलरनं आपल्या घरचा सत्यानाश केला आहे. आम्ही काहीही केलं, कितीही केलं तरी अम्मा त्याची तुलना डॉलरशी करतात. सुरभीच्या लग्नासाठी आम्ही दोघांनाही कर्ज काढून पैसे उभे केले. शारिरीक कष्टही भरपूर घेतले. तरीही तिच्या लग्नाची तारीख ठरवताना त्यांनी केवळ जमुनेची सोय पाहिली.आपल्याबरोबर गेली चार वर्षे असलेल्या सुनेची त्यांना आठवणही आली नाही. डॉलर-सुनेचं महत्त्व त्यांना अधिक वाटलं!’

चंद्रू तिचं बोलणं ऐकत होता.

`आताही माझी खात्री आहे. लग्नघरात त्या जमुनेच्या कृपेमुळे लग्न झालं असंच म्हणाल्या असतील. माझं नावही त्यांनी काढलं नसेल!’

चंद्रूला आश्चर्य वाटलं. धारवाडच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाळंतीण विनितेला ही कसली दृष्टी आहे म्हणायची? ही दृष्टी नाही- विनितेच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून उमटलेले ते शब्द होते.

खंतावलेला चंद्रू बेंगळूरला परतला.

हर्षला घेऊन विनिता बेंगळूरला आल्याला सहा महिने उलटून गेले होते. आता हर्ष पालथा पडून रांगायचा प्रयत्न करत होता. घरात त्याचा एकसारखा काही ना काही गोंधळ सुरु असे. आजोबांचा तर त्याला इतका लळा लागला होता की शामण्णांचा आवाज ऐकला की त्यांच्याकडे झेप घ्यायचा. आजोबा-नातवाची चांगलीच मैत्री जुळली होती.

आता घरात माणसंही बेताची होती. सुरभी अधून-मधून येत होती. तिचं सासरचं जीवन आनंदात चाललं होतं. पाहुणे मंडळी मात्र अगदी खास होती. कृष्णप्पा सावकारही अलीकडे त्यांच्या घराकडे फिरकत नव्हते. कारणही ठाऊक नव्हतं.

त्या दिवशी गौरम्मा दोशाचं पीठ रुबत होत्या. एकाएकी त्यांच्या छातीचा भाग दुखू लागला. कसला तरी मार बसला असावा एवढाच त्यांनी विचार केला आणि तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या वेळी त्यांनी चाचपून पाहिलं- एखादी गाठ असावी, असं काहीतरी त्यांच्या हाताला लागलं. मिठाचा शेक दिला तर गळू फुटून जाईल असा विचार करुन त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं.

आठवडा गेला तरी गाठ जशीच्या तशीच होती. ते पाहून मात्र गौरम्मा थोड्या घाबरल्या. सकाळी शाळेला जायच्या घाईत असलेल्या विनितेला त्यांनी बोलावून ती गाठ दाखवली.

विनितेनं लगेच रजा टाकली आणि डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जाण्याची तयारी केली. विनितेला गांभीर्य समजलं असलं, तरी तिनं याविषयी नवरा किंवा सासऱ्यांना सांगितलं नाही.

अगदी घराबाहेर पडताना तिनं शामण्णांना सांगितलं, `आम्ही थोड्या डॉक्टरांकडे जाऊन येतो हं! काही काळजी करू नका.’

डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि गौरम्मांना बाहेर बसायला सांगितलं. नंतर त्यांनी विनिताला विचारलं, `त्यांच्याशी तुमचं काय नातं आहे?’

`माझ्या सासूबाई आहेत. काय झालंय त्यांना?’

`त्यांच्या ब्रेस्टमध्ये गाठ आहे. बायप्सी करुन तपासलं पाहिजे. त्यानंतर काय ते कळेल.’

`म्हणजे? फार त्रास होईल त्यांना?’

`फार नाही. त्या गाठीची तपासणी अत्यावश्यक आहे. कॅन्सर असेल किंवा नसेलही. पण खात्री करून घेतली पाहिजे. शक्य तितक्या लवकर. तुम्ही त्यांना एवढ्यात काहीच सांगू नका.’

विनिता जड मनानं बाहेर आली. तिला पाहताच गौरम्मा म्हणाल्या, `काही नाही ना? काही क्रीम लावायला दिलं की नाही?’

`नाही. लवकर गुण येईल म्हणे!’ विनिता पटकन म्हणाली.

विनिता विचारात पडली. शामण्णा वयस्कर म्हणून त्यांना सांगायचं नाही, लांब राहणाऱ्या चंद्रूला उगाच का चिंता, म्हणून त्याला सांगायचं नाही. सुरभीला प्रसंगाचं गांभीर्यच कमी, म्हणून तिला कळवायचं नाही.

रात्री तिनं गौरम्मांच्या छातीतल्या गाठीविषयी गिरीशच्या कानावर घातलं. ते ऐकताच भावनाप्रधान गिरीशचे डोळे पाण्यानं भरले.

`डॉक्टर काय म्हणाले? कॅन्सर?’

विनितेनंच त्याला समजावलं, `तसं काहीही डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. आता छोटंसं ऑपरेशन करुन ते गाठ काढून टाकणार आहेत, एवढंच. कॅन्सर नसण्याचीही शक्यता आहेच ना?’

दुसऱ्या दिवशीही विनिताच गौरम्मांना दवाखान्यात घेऊन गेली. आता मात्र गौरम्माही गंभीर झाल्या. आपल्याला काहीतरी झालं आहे. सून सांगायला तयार नाही. मुलगा मात्र घाबरलाय हे त्यांच्या लक्षात आलं.

सुनेच्या मनोधैर्याचं क्षणभर त्यांनाही कौतुक वाटलं. तेवढंच.

आपल्याला काही झालं तर सुरभीचं काय होईल?

याआधी त्यांच्यावर दवाखान्यात जायचा प्रसंग आला नव्हता. त्यामुळे दवाखाना म्हटल्यावर त्यांना भीती वाटली होती. त्यात ऑपरेशन!

विनिता मात्र सावधपणे त्यांना सांगत होती, `अम्मा, ही छोटीशी गाठ आहे, ती काढून टाकणार आहेत. मी इथंच बाहेर आहे. तुम्ही अजिबात घाबरायचं कारण नाही. मी कौल लावून विचारलंय- सगळं चांगलं होईल म्हणून कौल मिळालाय!’

तिचं समजुतीचं बोलणं ऐकताना गौरम्मा संकोचून गेल्या होत्या.

नंतरही एक-दोन दिवस त्यांना दवाखान्यात राहावं लागलं. स्त्रियांचा वॉर्ड असल्यामुळे रात्री विनिताच तिथं राहत होती. वांतीची भावना झाली की तीच पॅन देत होती. बाकीही हवं-नको पाहत होती. कशाचाही कंटाळा करत नव्हती.

वॉर्डमधल्या आजूबाजूच्या आया-बाया सकाळी म्हणायच्या, `किती चांगली आहे तुमची मुलगी! संपूर्ण रात्रभर जागी असते! तुमचं सगळं कशी नीट करते.’

`माझी मुलगी हैद्राबादला असते. ही माझी सून! आणखी एक सून आहे. दूर अमेरिकेत राहते ना, म्हणून आली नाही.’

दुखण्यातही रुपयापेक्षा डॉलरचाच मोह त्यांच्यावर प्रभाव पाडून होता.

जेव्हा रिपोर्टमध्येही कॅन्सर नसल्याचं समजलं, तेव्हा गिरीश आणि विनितेला फार आनंद झाला. गिरीशनं प्रथमच चंद्रूला सविस्तरपणे पत्र लिहिलं.

आठवडाभर गौरम्मांचं ड्रेसिंग आणि विश्रांती चालली होती. त्याआधी दोन महिने गिरीशनं मंगळूर-उडपी-कारवार-गोकर्ण अशी समुद्रकिनाऱ्याची गावे पाहण्यासाठी ट्रीप ठरवली होती.

हॉस्पिटलमधून घरी आल्यावर शामण्णांनी सांगितलं, `तुम्ही ठरवल्याप्रमाणे जाऊन या. मी घरात असतोच. मी पाहीन तिच्याकडे.’

पण विनितेनं ते मानलं नाही. तिनं सांगितलं, `गोकर्ण-उडुपी कुठं पळून जात नाहीत. पुढच्या वर्षीही हवं तर जाता येईल.’

`हे पाहा, एवढ्यात जमुना येणार आहे असं पार्वतम्मा सांगत होत्या. त्यांच्या नात्यातलं कुणाचं तरी लग्न आहे म्हणे. मला बरं नाही म्हणून तुम्ही तिला कळवा- ती धावत येईल आणि आठवडाभर इथं राहील. सुरभीलाही बोलावून घेईन. तिलाही जमुनेबरोबर राहिल्यासारखं होईल. तुम्ही दोघंही खुशाल जाऊन या!’ गौरम्मा म्हणाल्या.

हे ऐकून शामण्णांची मान खाली गेली.

आपल्या युरोपच्या ट्रीपसाठी जमुनेनं सुरभीचं लग्न पुढे ढकलायला लावलं होतं! विनितेला वाटलं, आपणच अयशस्वी आहोत. किती केलं तरी आपण यांना त्या डॉलर-सुनेपासून दूर नेऊ शकत नाही. ऑपरेशनची जखम सुकण्याआधीच यांना आपला विसरही पडला.

अखेर जे व्हायचं तेच झालं म्हणा!

जमुना काही आली नाही. विनिता मात्र ट्रीप रहित करुन घरातच राहिली.

चंद्रूनं पत्राचं उत्तर पाठवलं. त्यात तीनशे डॉलर्सचा चेक होता. शिवाय त्यानं लिहिलं होतं-

`पैशानं मदत करणं तसं सोपं असतं. पैसे पाठवता येतात. पण जे शारीरिक मदत करतात, त्यांना मात्र विसरता कामा नये. प्रेम आणि विश्वास केवळ धनानं विकत घेणं अशक्य आहे.’

पत्र कचऱ्याच्या टोपलीत पडलं आणि चेक बँकेत रवाना झाला.

ऑफिसच्या कामानिमित्त चंद्रू बेंगळूरला आला. त्याला भेटण्यासाठी सुरेश आणि सुरभी आले होते. चंद्रूनं बातमी आणली- जमुनेला दिवस राहिले होते.

समोर खेळणाऱ्या नातवापेक्षा गौरम्मा अमेरिकेतल्या न जन्मलेल्या नातवाची अधिक चिंता करु लागल्या. त्या कौतुकानं चौकशी करु लागल्या, `जमुना कशी आहे रे? केव्हा बाळंतपण तिचं? लोणचं घेऊन जाशील काय? आणखी कसले डोहाळे लागले आहेत तिला?’

समोर गोंडस हर्ष खेळत होता, आजोबांशी लडिवाळपणे बोबड्या शब्दांत गप्पा मारत होता. दिसायला तर विनितेसारखाच लोभस दिसत होता; पण विनिता मात्र कोमेजून गेली होती. बाळंतपणात धारवाडमध्ये दिसत होती, त्यापेक्षाही रोडावली होती ती. चेहऱ्यावर पहिल्यासारखी तरतरीही दिसत नव्हती. तिला कशातही फारसा रस राहिला नव्हता. यांत्रिकपणे तिची कामं चालली होती.

त्यानं अगदी प्रथम धारवाडमध्ये ज्या विनितेला पाहिलं होतं, ती ही नव्हतीच!

गौरम्मा तर तिच्याशी कारणाशिवाय एक शब्दही बोलत नव्हत्या. स्नेहाचा एकही धागा तिथं दिसत नव्हता. डॉलरच्या दगडाखाली तो पूर्णपणे नष्ट होऊन गेला होता.
 
Back
Top