• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

वलय (कादंबरी)

  • Thread starter Thread starter StoryPublisher
  • Start date Start date
स्टोरी वाचल्या बद्दल फार फार धन्यवाद
 
वलय - प्रकरण १६

ही घटना राजेश जवळ जवळ विसरून गेला.

आर्ट्सला शिकत असतांना राजेशने सहज म्हणून एक छोटी थरारक आणि रहस्यमय कादंबरी लिहिली: "खेळ हा नशिबाचा!.

त्याचे हस्तलिखित त्याने एका मुंबईच्या नवीनच सुरु झालेल्या दिवाळी अंकाला पाठवले ("कथामंथन").

काही दिवसांनी संपादक विभागाचे पत्र त्याला आले. कथा संपादकाना आवडली आहे. पण ती थोडी आणखी मोठी करावी असे त्याला सांगण्यात आले. त्यात आणखी जास्त संवाद टाकावे असेही त्याला सांगण्यात आले.

मग त्याने आणखी संवाद टाकून त्याने ती एक दीर्घ कादंबरी बनवली आणि पुन्हा पाठवली:

ती कथा थोडक्यात अशी होती –

"एका खेडेगावातला १५ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांसह तालुक्याच्या गावी यात्रेत एका कार्यक्रमांचं तिकीट लकी ड्रॉ जिंकल्यामुळे जातो. तो कार्यक्रम बघून आणि यात्रेतला बाजार फिरून झाल्यानंतर मुलगा वडिलांचे लक्ष नसतांना त्याच्या धुंदीत एका स्टॉल वरच थांबतो. वडील सहज फेरफटका मारायला पुढे जाऊन परत येतात तर तो मुलगा तिथे नसतो. तो मुलगा यात्रेत घुसलेल्या एका स्मगलर्सच्या टोळीच्या तावडीत योगायोगाने सापडतो. त्यानंतर त्याचा एक चित्तथरारक प्रवास सुरु होतो - अचानक एका अशा जगाशी त्याची ओळख होते ज्या जगाचा त्याने आपल्या आयुष्यात कधी विचार सुद्धा केला नसता. मग आणखी एका योगायोगाच्या घटनेत त्याचेकडून टोळीतल्या एकाचा खून होतो आणि तो तेथून निसटतो. मग गुंड त्याचे मागे लागतात.. इकडे त्याचे वडील पोलिसांत तक्रार करतात. अनेक दिवस जाऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने ते स्वत:च जीव धोक्यात घालून मुलाला शोधायचे ठरवतात. तो सापडत नाही. नंतर दोन वर्षांनी एका विचित्र प्रसंगात त्यांची आपल्या मुलाशी भेट होते पण तो पार बदललेला असतो…."

संपादकांचे उत्तर आले - "आणखी संवाद टाकण्याची आमची विनंती मान्य करून कथेची सुधारित आवृत्ती पाठवल्याबद्दल धन्यवाद! आता मुख्य संपादकांच्या फायनल सिलेक्शनची फेरी होईल. त्यात तुमची कादंबरी सिलेक्ट झाली की मग दिवाळी अंक प्रकाशित होण्याच्या एक महिना आधी तुम्हाला निर्णय कळवला जाईल. कादंबरी सिलेक्ट होईलच याबद्दल खात्री बाळगा. साहित्य पाठवत राहावे ही विनंती!"

बरेच दिवस वाट बघितल्यावर कुठलाच पत्रव्यवहार न आल्याने त्याने एक दोनदा दिवाळी अंक कार्यालयाला एसटीडी बूथ वरून फोन केला. फोन सतत बिझी यायचा. चार महिन्यांनी दिवाळीच्या एक आठवडा आधी त्याने पेपर स्टॉल्सवर चौकशी केली तर त्याला कळले की तो अंक बाजारात आलाच नाही. अनेक पेपर स्टॉल आणि न्यूजपेपर व्हेंडर्सकडे तो जाऊन आला. त्याचे हस्तलिखित सुद्धा पोस्टाने परत आले नव्हते. त्याची झेरॉक्स सुद्धा त्याने काढली नव्हती. पुन्हा त्याच्या मेंदूत शाळेतली घड्याळाची घंटा वाजली. खारकाते सर त्याला अचानक आठवून गेले.

कथेचे काय झाले याचा छडा लावण्यासाठी तो तडक मित्रासोबत मुंबईला गेला. दादर पश्चिमला दिवाळी अंकाच्या कार्यालयाचा पत्ता शोधत शोधत तो आणि त्याचा मित्र विनीत भर दुपारी एक वाजता घामाने चिंब होत एका गल्लीत पोहोचले.

पत्त्यानुसार ते कार्यालय वरच्या मजल्यावर होते. लोखंडी गोल वळणाच्या पायऱ्या चढून ते वर गेले. तेथे छोटे ऑफिस होते - "येथे स्टँप पेपर मिळतील" असे लिहिलेले होते.
 
"इथे दिवाळी अंकाचे कार्यालय होते ना?"

"होय, पण ते दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी सोडले"

"काय? त्यांनी कार्यालय सोडले?"

"होय! माझे ऑफिस आधी खाली होते. मग त्यांनी सोडल्यावर आम्ही वर शिफ्ट झालो! वर भाडे कमी आहे!"

"बरं, ते ऑफिस कुठे शिफ्ट झाले ते कळू शकेल काय?"

"नाही बुवा. पण एक गोष्ट म्हणजे ऑफिस सोडताना त्यांनी घरमालकाशी खूप वाद घातला होता. पैसे पण दिले नाहीत शेवटच्या महिन्याच्या भाड्याचे!"

"काय?"

"होय! पण तुम्हाला कुणाला भेटायचं होतं का?"

"नाही. ठीक आहे. धन्यवाद! फक्त चौकशी करायची होती!"

राजेश आणि विनीत परत जायला निघाले आणि काहीतरी आठवून राजेश पुन्हा वर चढून आला आणि त्याने त्या माणसाला विचारले - "बरं, इथे असणारी माणसे दिसायला कशी होती? किती माणसे ऑफिसमध्ये काम करत होती?"

त्या माणसाला संशय आला, म्हणाला, "तुम्ही सीआयडीवाले आहात की "एक शून्य शून्य" ही पोलिसांवरची टीव्ही मालिका जास्ती बघता? नक्की काय समजू मी?"

विनीत म्हणाला, "नाही हो काका! आता काय सांगणार तुम्हाला!! याने एक कथा पाठवली होती छापायला! त्याबद्दल विचारायचे होते, बाकी काही नाही!"

"बरं! बरं! सांगतो! एकजण इथला मुख्य कर्मचारी होता - त्याचे नाव …..?? एक मिनिट! हां आठवले!! त्याचे नाव होते - रत्नाकर रोमदाडे! आणि त्याचा साथीदार ?? त्याला सगळे गोप्या म्हणायचे! आणि दिसायला रत्नाकर हा टक्कल पडलेला आणि वर्ण सावळा. थोडे पोट पुढे आलेले आणि उजव्या गालावर कसलातरी मोठा काळा डाग आहे. अगदी लक्षात येण्यासारखा काळा डाग!

"ओके अंकल! धन्यवाद!" राजेश म्हणाला.

"अंकल! आपण चहा नाश्टा करूया का? चला जाऊ!" विनीत त्या माणसाला म्हणाला.

"नको नको! आता बरीच कामं पडलीत. बोलावल्याबद्दल धन्यवाद!"

"ओके अंकल! बरंय येतो आम्ही!"

दादर स्टेशनवर त्यांनी दोन दोन वडापाव खाल्ले. मग वेस्टर्न लाईनला जाऊन दोघांनी मरीन लाईन्सला जायचे ठरवले.

5:35 ची स्लो लोकल पकडून ते मरीन लाईन्सला आले. थोडा समुद्राच्या कडेने फेरफटका मारून घडलेल्या गोष्टीवर विचार करून काही तोडगा किंवा उपाय करता येईल असे त्यांना वाटले.

"काय करू विनीत मी आता?"

"तू त्या स्टोरीची झेरॉक्स सुद्धा काढून ठेवली नाहीस?"

"हो रे! जरा चुकलंच माझं!"

राजेश मनात म्हणत होता, "चुकलं? एकदा नाही तर दोनदा चुकलं! एकदा अनुभव नव्हता म्हणून फसलो आता मात्र दुसऱ्या वेळेस एक पहिला वाईट अनुभव पाठीशी असतांना सुद्धा पुन्हा फसलो! खूप विश्वास ठेवला..."

"काय झालं? कसल्या विचारात गाढ बुडाला आहेस?"

"काही नाही! मी ती कादंबरी पुन्हा लिहून काढणार! मी हार मानणार नाही. माझी ती कादंबरी त्या नालायक संपादकाने इतर कुठे त्याच्या स्वत:च्या किंवा इतर कुणाच्या नावाखाली छापायला दिली आहे का ते बघावे लागेल!"

"मग त्यासाठी तुला दिवाळी अंकांची लायब्ररी लावावी लागेल. मी तुला शोधायला मदत करेन! मला तुझी कथा घरी गेल्यावर थोडक्यात सांग!"

"ठीक आहे. जर ती कुठे छापून आली नसेल तर मी दिवस रात्र मेहनत करून ती कथा पुन्हा कागदावर लिहून काढेन. पूर्वीसारखं जसंच्या तसं आठवणार नाही मला पण मी लिहेन! आणि पुन्हा पाठवेन दुसरीकडे!", राजेश निर्धाराने म्हणाला.

"आणि जर का ती इतर कुणाच्या नावाने या वर्षीच छापून आली असेल तर? तर मग काय करायचे आपण?", विनितची शंका बरोबर होती.

"ते मलाही माहीत नाही, पण आधी आपण जे ठरवलं आहे ते करूया!" राजेश म्हणाला.

तिकडे अरबी समुद्र अधून मधून खवळत होता आणि मोठमोठ्या लाटा दगडांवर आदळत होता. हे दोघे मरिन लाईन्स वर चालत होते.

"आणि समजा छापून आली तर? तू तुझी कथा पुन्हा लिहेपर्यंत ती दुसरीकडे छापली गेली तर?", विनितची ही शक्यताही नाकारता येत नव्हती.

"तर मग मी सांगेन की ही माझी कथा आहे!" राजेश आवेगाने म्हणाला आणि चालायचा थांबला.

"पण, छापलेली कथा पाहून पाहून कुणीही पुन्हा कागदावर लिहू शकतो आणि म्हणू शकतो की ही माझी कथा आहे! कोण विश्वास ठेवेल?", विनित म्हणाला तशी एक लाट जोराने दोघांच्या अंगावर आदळली. दोघेजण ओले झाले.

"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. पण मला काही सुचत नाही आहे! पण आपण एक करूया! तू येत्या काही दिवसातल्या पेपरमध्ये ‘कथमंथन’ दिवाळी अंकासदर्भात काही बातम्या येतात का त्या तपासत राहा आणि दिवाळी अंकांची लायब्ररी लावून माझ्या कथेसारखी कथा कुठे छापली गेलीय का ते तपासत राहा! तोपर्यंत मी युद्धपातळीवर माझी कादंबरी पुन्हा लिहायला सुरुवात करतो!"

पुढच्या क्षणी निर्धाराने ते दोघे ओल्या कपड्यांसह झपाझप चालत स्टेशन वर गेले आणि घरी जायला लोकल पकडली. लोकलच्या डब्याच्या खडाखड हलणाऱ्या काही रिकाम्या कड्या बघत तो विचार करत होता. त्या कड्यांचा आवाज सहन न होऊन त्याने हलणाऱ्या दोन कड्या मुठीत पकडल्या.

विक्रोळी स्टेशनवर गाडी थांबली. एवढया भयानक गर्दीत त्याची आई अचानक पाण्याचा ग्लास हातात घेऊन सहजपणे लोकलमध्ये शिरली आणि त्याला गदागदा हलवू लागली, "राजेश! अरे असा रात्रभर बसून छताकडे बघून काय विचार करतोयस? हे घे पाणी पी!" तो तंद्रीतून जागा झाला. आई लोकलमध्ये आली नसून आपली तंद्री भंग पावली हे त्याला कळले.

"बरा आहेस ना?"

"हो बरा आहे ! झोप तू!" पलंगावर बसलेला राजेश पाण्याचा ग्लास घेऊन म्हणाला.
 
वलय - प्रकरण १७

सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, "मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा."

"अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!"

"आई! मी येतांना तुला फोन करीन मग तू ये तिथे. मला आज धर्मापूरला जाणे जरुरीचे आहे!!"

"जा बाबा जा! मी सांगितले तरी तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे ते माहित आहे मला! पण संध्याकाळी लवकर ये! उद्या गोडंबे काका आणि त्यांची सुनंदा येणार आहेत आपल्याकडे! तू येणार आहेस म्हणून बोलावून घेतले मुद्दाम त्यांना! तुला आधीच सांगितले असते तर तू मुंबईहून आलाच नसतास इकडे! टाळाटाळ केली असतीस!"

"अगं आई, हे काय चालवलंयस तू? मी तुला मागच्या वेळेस सुद्धा सांगितले होते की मी लग्न करणार नाही आहे. सुनंदाशी तर नाहीच!"

"आता बास झालं राजेश! एक शब्द बोलू नको! आतापर्यंत ऐकत आले तुझं पण आता मी तुझं ऐकणार नाही! मी गोडंबे काकांना शब्द दिलाय. तुझं लग्न होईल तर त्या सुनंदाशीच!"

"आई मला थालीपीठ खाऊ दे!"

"अरे आरामात खा! अजून दोन थालीपीठ घे आणि पोटभर खा! पण, खाल्ल्यावर मी तुला पुन्हा हेच सांगणार आहे की सुनंदा आपली सून होईल! इतर काही ऐकू नकोस पण हे मात्र माझे तुला ऐकावेच लागेल!"

"अगं आई, मला तुलाही घेऊन कायमचा मुंबईत जायचा विचार आहे. ती आणि तिचे कुटुंब खूप खेडवळ आहेत! त्यांना माझी ही अशा प्रकारची नोकरी आवडणार नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राबद्दल गावाकडे बरेच समज गौरसमज आहेत! आणि मी जरी तिला लहानपणापसून बघितले आहे तरीही तीच्याकडे मी त्या भावनेने बघितले नाही!"

"मला बहाणे नकोत! त्या भावनेने बघितले नाहीस ना? मग लग्न झाल्यावर बघ त्या भावनेने! तुला माहीत आहे ना आपण वचन दिलंय त्यांना?"

"वचन बिचन या सगळ्या लहानपणच्या गोष्टी आहेत! आम्ही मोठे झालो आता. विसरा ती वचनं!!"

"अरे त्या गोष्टी लहानपणाच्या असल्या म्हणून काय झालं? काळानुसार वचन हे वचनच राहते! आणि गोडंबे काकांनी आपल्याला किती मदत केली आहे माहित आहे ना तुला? त्याची परतफेड नको करायला?"

"अगं आई वेळोवेळी तू आणि मी पण त्यांच्या मदतीला धावून गेलोच आहोत की!" राजेशने आठवण करून दिली.

"हे वचन तुझ्या बाबांनी दिलं आहे हे ठावूक असूनही तू असा का वागतोस राजेश?" आई अर्धे रडून आणि अर्धे संतापून पदराने डोळे पुसत बोलली.

"थालीपीठ हळूहळू बेचव का होते आहे बरं? दही पण जरा जास्तच आंबट आहे! " उपरोधाने राजेश म्हणाला.

"हो का? सुनंदा थालीपीठ बनवेल तेव्हा चव परत येईल हळूहळू! काळजी करू नकोस हं बाळा!" आईसुद्धा दुप्पट उपरोधाने म्हणाली.

काही केल्या आई आणि तिची सुनंदा पाठ सोडणार नव्हती त्यामुळे शांततेने थालीपीठ पूर्ण खून संपवल्यानंतर मनातला चढणारा संताप दाबून टाकत राजेश शक्य तितक्या हळू ताटावरून उठला. हो किंवा नाही न म्हणता मौन राहून तो कपडे घालू लागला.

कधी कधी कुणी हो म्हणायचे असले तरी मौन बाळगतात आणि कुणी नाही म्हणायचे असले तर मौन पत्करतात. कुणाकुणाला हो किंवा नाही यापैकी काहीच म्हणायचे नसते तेव्हा मौन राहतात. पण समोरचा त्या मौनाचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ घेतो. राजेशच्या आईनेही त्याच्या मौनाचा होकारार्थी अर्थच गृहीत धरला, भले त्याने आताच स्पष्ट संवादातून स्पष्ट नकार पोहोचवला का असेना!

एकदाचा पाठीवर सॅक घेऊन तो राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मध्ये बसला. बसमध्ये तुरळक गर्दी होती....

त्याने खिडकीजवळची जागा पकडली. कंडक्टर कडून तिकीट काढले आणि खिडकीतून बाहेर बघू लागला. गाडी सुरु झाली. खिडकीतून गार वारा येत होता.

आईच्या सकाळच्या लग्नासंदर्भातील चर्चेचे त्याच्या मनात विचार आले येऊ लागले.

"मी माझ्या लिहिलेल्या कथांमध्ये माझ्या मनाप्रमाणे सभोवतालाचे जग आणि पात्रे तयार करतो आणि ती सगळी पात्रे माझ्या हुकुमानुसार जगतात आणि मरतातसुद्धा! पण, खऱ्या जगातील एक पात्र म्हणजे मी मात्र पूर्ण माझ्या अधीन नाही. मला लग्नासारखा निर्णय आईच्या मर्जीनुसार आणि हुकुमानुसार घ्यावा लागतोय! पण ती सुद्धा कुणाच्या तरी खेळातले एक पात्र आहे? जगाला नियंत्रित करणाऱ्या कुणीतरी शक्तीच्या हातातले ती आणि मी सुद्धा पात्रच आहोत. पण त्याला इलाज नाही. लहानपणी दिल्या गेलेल्या काही वचनांमुळे आणि दिलेल्या शब्दांमुळे, कुणाच्या उपकाराच्या ओझ्यामुळे आणि कर्जामुळे आपण कधीकधी परावलंबी होतो."

खिडकीतून चांगला वारा येत होता. झोप येण्यासारखा हा वारा होता पण मनातील विचार त्याला झोपू देत नव्हते....

राजेशचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले, "पण मला एक समजत नाही की एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो तर खरं, पण त्यामागे त्याची भविष्यातली दूरदृष्टी असू शकते, पण आपल्याला हे आधी त्याची मदत स्वीकारतांना कळत नाही. कसे कळेल? कुणाचे मन थोडेच वाचता येते? काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कुणी आजकाल मदत करतच नाही का? मदतीच्या उपकारापायी परतफेडीची कुठेतरी अपेक्षा असतेच असते! असायला हवी की नको? ते ठरवणारा मी तरी कोण? आणि त्यातल्या त्यात मी आणि माझे कुटुंब मदत ‘घेणारे’ आहोत त्यामुळे ‘देणाऱ्याने’ अपेक्षा ठेवाव्यात की नको आणि काय ठेवाव्यात हे मी कसे ठरवू शकेन?"

सहजपणे राजेशची नजर बाजूला गेली तेव्हा त्याला दिसले की बाजूच्या सीटवर एकजण "जीवनाचे शिल्पवृक्ष" हे रा. म. मालवणकर यांचे पुस्तक वाचत होता.

त्यानेही ते वाचले होते. पुस्तक बघितल्याने आणी त्यातील काही प्रसंग त्याला वाचल्याचे आठवल्याने त्याचे लग्नाच्या विषयाकडून ध्यान हटले आणि मन भूतकाळात गेले. रात्री आठवलेल्या प्रसंगांच्या पुढचे त्याला आठवू लागले.
 
वलय - प्रकरण १८

विनितने युद्धपातळीवर त्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा फडशा पाडला. इकडे तिकडे वर्तमानपत्रात तपासले. नवीन प्रकाशित झालेल्या कादंबऱ्याचा आढावा घेतला. तोपर्यंत राजेश कथा लिहिण्यात गुंतला. रात्रंदिवस मेहनत करून त्याने त्याची कथा पुन्हा लिहून काढली.

स्वत:च्याच कथेचे जसेच्या तसे प्रसंग, वाक्य आणि शब्द जरी त्याला आठवले नसले तरी शेवटी कथा त्याने लिहून काढली. विनीतला जमेल तेवढे त्याने संशोधन केले. इतर मित्रानाही त्याने मदतीला घेतले. कुठेच त्याच्या कथेसारखी कथा छापून आलेली नव्हती.

मग आता त्याने पुन्हा नव्याने लिहिलेली ही कथा छापायला द्यायची का?

याचे एखादे पुस्तकच छापायचे का?

कुणी प्रकाशक तयार होईल का?

की स्वत:च प्रकाशित करायची ती कथा?

पुस्तक स्वत: प्रकाशित करण्याइतके भांडवल नव्हते राजेशजवळ!

पुन्हा काही चौर्यकर्म घडले तर?

आणि आता परिक्षा जवळ आल्या आहेत, तेव्हा कथेचे काय करायचे ते नंतर पाहू!

असे म्हणून ती कथा त्याने नंतर कोणालाच आणि कुठेच पाठवली नाही!!

परिक्षा संपल्यानंतर कुणा प्रकाशकाला भेटून बघूया असा त्याने विचार केला.

मग परीक्षा आली.

कथा असलेली लाल रंगाची फाईल त्याने कपाटात ठेवून दिली....

कालांतराने तो हळूहळू त्या विचारांतून बाहेर पडला. अभ्यासाला लागला.

परीक्षा झाली!!

अनेक महिने उलटले...

अधून मधून राजेश वर्तमानपत्रात लिखाण करत होता. लेख लिहित होता. वाचकांचे प्रतसाद येत होते.

त्याचे बहुदा सगळे लेखन संवादात्मक असायचे. एखाद्या विषयावर भाष्य करतांना सरळ लेख न लिहिता तो दोन तीन जण त्या विषयावर चर्चा करा आहेत असे संवाद लिहायचा. एकजण त्या विषयाच्या बाजूने तर दुसरा विरोधात वगैरे असे त्याचे लिखाण लोकाना आवडून जायचे. आता लिखाण पाठवताना योग्य ती खबरदारी तो घेत होता. झेरॉक्स काढून ठेवत होता!!!

या कालावधीत एक गोष्ट चांगली झाली होती की त्याची कथा कोणत्याही दिवाळी अंकात छापून आली नाही आणि ती इतर कुठेसुद्धा पुस्तकरूपाने किंवा इतर कसल्याही प्रकारे छापून आल्याचे त्याला समजले नव्हते.

अधून मधून त्याच्या आईचा सुनंदाबद्दलचा रेटा सुरूच होता.

त्याला कसेतरी हो नाही म्हणत तो तोंड देतच होता.

आई सुनंदाच्या नावाचे अनेक फुल टॉस बॉल टाकायची आणि दर वेळेस तो सुनंदाचा चेंडू सिक्स मारून सीमापार करायचा आणि आई आणखी दुसरा चेंडू लगेच तयार ठेवायची.

दरम्यान वेळ मिळेल तसे राजेशचे वाचन आणि लिखाण सुरूच होते...

जुन्या काळातले राजे आणि राजांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पुस्तकांचा तो अभ्यास करायचा. चाणक्यबद्दल अनेक पुस्तके त्याने वाचून काढली. त्या कपाटातील त्याने पुन्हा लिहून काढलेल्या कादंबरीबद्दल का कोण जाणे त्याच्या मनात एक उदासीनता निर्माण झाली. कदाचित त्याला त्याद्वारे स्वत:च्या असहायतेची आणि विश्वासघात झाल्याची सतत आठवण होत असावी. त्याने ती कथा पुन्हा बाहेर काढली नाही.

***

एका वर्षांनंतर -

फायनल ईयरला नव्वदच्या वर मार्क पडून तो पास झाला.

तोपर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आले होते.

कॉलेज संपले होते. सुट्ट्या लागल्या!!

विनीत आणि त्याचे दोन मित्र राजेशकडे आले. तालुक्याच्या गावाला एका मित्राची मोठी गाडी घेऊन जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी त्यांचे जायचे ठरले. दोन तीन दिवस मुक्काम करून मजा करायची, फिरायचे असे त्यांनी ठरवले. सगळयांच्या परीक्षा संपल्या होत्या त्यामुळे आनंदाचे भरते ओसंडून वाहात होते. ते अगदी सक्काळीच म्हणजे पाच वाजता निघाले. सगळी तयारी आणि समान बरोबर घेतला होता.

चार मित्र आणि फिरायला एक गाडी - अजून काय पाहिजे? अगदी स्वर्गीय सुख! नाही का?

दुपारी बाराला ते अलकापूर या तालुक्याच्या गावी पोहोचले.

तेथून चार तासांचा रस्ता होता – "सावरीमाळ" या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा!

त्यांनी ब्रेक घेतला आणि एका खाणावळीत ते जेवणासाठी गेले.

विनीत, राजेश, बंडू आणि सोमा असे ते चौघं चार वेगवेगळे पदार्थ मागवून त्यावर ताव मारत होते - झुणका भाकर त्या हॉटेलची खासियत होती. त्यासोबत मिरचीचा कोल्हापूरी झटका, वांग्याचं भरीत, पनीर मटर आणि तवा पुलाव!

बंडू म्हणाला, "अरे यार विनीत, एक आयडीया आहे. ‘मंडोला सिनेमा’ मध्ये ‘किस्मत का खेल’ पिक्चर लागलाय! जाउया का? त्यात दोन सुपरस्टार एकत्र आलेत! - रोहन कुमार आणि अमित श्रीवास्तव. अमितजींनी यात वडिलांची भूमिका केली आहे! आणि रोहन कुमार मुलगा आहे."

सगळ्यांना आयडीया पसंत पडली. अजून त्यावेळेस दूरदर्शन हे एकमेव लोकप्रिय टीव्ही चॅनेल होते. अजून एक प्रायव्हेट चॅनेल होते पण दिवसातून चार तासच त्याचे प्रक्षेपण होते. व्हीसीआरचे सुद्धा प्रस्थ बरेच होते आणि इंटरनेटची अजून सुरुवात होती. पण तरीही मनोरंजनासाठी थिएटर मध्ये जाऊनच लोक सिनेमा बघत.
 
सोमा म्हणाला, "त्यात विनीतच्या आवडीची मस्त मस्त हिरीईन पण आहे ना यार! सुनीती पराडकर. काय झकास नाचते ती! मी पण फिदा आहे यार तिच्यावर!"

राजेश म्हणाला, "अरे असे फालतू सिनेमे काय बघतोस? किस्मत का खेल? ह्या! काय असणार आहे त्यात? हाणामारी, नाचगाणे अजून काय?"

विनीत म्हणाला, " हा रे! मला पण वाटतंय जाऊ आणि बघू हा पिक्चर! मी ऐकलंय लय वेगळी स्टोरी आहे. परदेशात पण शूटिंग केली आहे. आणि खूप गर्दी आहे पिक्चरला! पिक्चर पाह्यलं की मग जाऊ सावरीमाळला!"

राजेश म्हणाला, "ठीक आहे! अमितजी आहेत म्हणून एकदा बघायला हरकत नाही. मसाला चित्रपट आहे पण वेगळा आहे तर मग चला! आटपा मग लवकर! ढकला पोटात अन्न पटापट अन सुटा!"

चौघेजण तिकीट काढून थिएटरमध्ये बसले...

लाईट बंद झाले. पिक्चर सुरु झाला....

पिक्चरची कथा थोडक्यात अशी होती-

"एका शहरातला १५ वर्षांचा मुलगा (रोहन कुमार) एका कार्यक्रमांचं तिकीट मोफत जिंकल्यामुळे कंपनीमार्फत त्याच्या वडिलांसह (अमित श्रीवास्तव) परदेशात जातो. तो कार्यक्रम बघून आणि फिरून झाल्यानंतर मुलगा वडिलांचे लक्ष नसतांना त्याच्या धुंदीत एका ट्रेन स्टेशन वरच राहून जातो.

वडील सहज फेरफटका मारायला पुढे जाऊन परत येतात तर तो मुलगा तिथे नसतो.

तो मुलगा एका आंतरराष्ट्रीय स्मगलर्स च्या टोळीच्या तावडीत योगायोगाने सापडतो. त्यानंतर त्याचा एक चित्तथरारक प्रवास सुरु होतो - अचानक एका अशा जगाशी त्याची ओळख होते ज्या जगाचा त्याने आपल्या आयुष्यात कधी विचार सुद्धा केला नसता.

मग आणखी एका योगायोगाच्या घटनेत त्याचेकडून टोळीतल्या एकाचा खून होतो आणि तो तेथून निसटतो. मग गुंड त्याचे मागे लागतात..

इकडे त्याचे वडील घाबरून जातात. पोलिसांत तक्रार करतात. योगायोगाने पोलीस अधिकारी भारतीय असतो, अनेक दिवस जाऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने ते शेवटी स्वत:च जीव धोक्यात घालून मुलाला शोधायचे ठरवतात.

त्यासाठी लागणारी विसा पासपोर्टची सगळी मदत तो पिलीस अधिकारी करतो. मुलगा सापडत नाही!

भारतात परत आल्यानंतर दोन वर्षांनी एका विचित्र प्रसंगात त्यांची आपल्या मुलाशी भारतात भेट होते पण तो पार बदललेला असतो…."

बंडू आणि सोमा चित्रपट बघण्यात गुंतले असताना मध्येच विनीत आणि राजेश उठून निघून गेले होते....

त्याना प्रथम वाटलं की गाणे बिणे आवडले नसेल म्हणून बाहेर गेले असतील पण बराच वेळ ते बाहेर होते मग पुन्हा मध्ये आले.

चित्रपट सुटल्यावर -

"अरे काय चाललं होतं तुमचं दोघांचं आत बाहेर आत बाहेर? सुनीती पराडकर चा डान्स आवडला नाही का ह्या खेपेला??"

"आरे! त्या फटाकडी सुनीतीची ऐसी की तैसी रे! अरे इथे चोरी झालीय मोठी चोरी!"

"चोरी, कसली चोरी?"

"आपल्या राजेशच्या कादंबरीची चोरी झालीय. या पिक्चरची स्टोरी राजेशची आहे! एक वर्षांपूर्वी लिहिलेली. दिवाळी अंकात पाठवली होती पण दिवाळी अंकवाले गायब झाले आणि आता अचानक ह्या पिक्चरची कथा सेम टू सेम तीच! फक्त देश आणि परदेश एवढा फरक आहे बास!"

"अरे? असे कसे शक्य आहे?"

"शक्य झाले आहे. राजेश घरी जाऊन त्याची कथा दाखवेल आपल्याला! चला!"

राजेश आश्चर्य, संताप आणि निराशा अशा तिन्ही भावनांनी भारला गेला होता आणि नीट बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

"आपण आपली ट्रिप कॅन्सल करूया. घरी जाऊया!", विनितने सल्ला दिला.

पण राजेशने झाले ते गेले असे समजून आणि ट्रिप एन्जॉय करूया असे सांगून त्यावर जास्त चर्चा टाळली.

ते अचानक परत घरी आले असते तर सगळीकडे गवगवा झाला असता. राजेशला ह्या गोष्टीची जास्त वाच्यता नको होती. त्याला आता स्वतःची लेखनाची पत कळली होती. त्याचे लेखन चित्रपट बनवण्यासाठी सहज योग्य होते आणि विशेष म्हणजे त्याच्या पहिल्याच कथेवर पिक्चर हिट होत होता.

चित्रपटाच्या सुरुवातीला नावे येत असताना पटकथा, संवाद, कथा लेखक कोण कोण आहे हे दिले नव्हते.

त्याऐवजी स्टोरी, स्क्रीनप्ले, डायलॉग अँड डिरेक्शन बाय – "के. के. सुमन" असे लिहिले होते.

के. के. सुमन हा सुमार माणूस इतक्या सगळ्या आघाड्या सांभाळण्याएवढा हुशार नक्कीच नव्हता.

पण मग करायचे काय?

ती कथा राजेशची आहे हे सिद्ध कसे होणार होते?

जे घडले ते सगळे अकल्पित होते. अनाकलनीय होते.

के. के. सुमन सारख्या प्रथितयश डायरेक्टवर आरोप केले असते तर लोकांनी राजेशला वेड्यात काढले असते.

मुळात ती कथा त्यांचेपर्यंत पोहोचलीच कशी?

विचार करून करून त्याचे डोके भणाणून गेले होते...

पण आता माघार नाही. जोपर्यंत के. के. सुमनचा छडा लागत नाही, त्याचा बदला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत राजेशच्या मनाला शांती लाभणार नव्हती.

ह्या घटनेने त्याला ती कथा कपाटातून बाहेर काढायला भाग पाडली...

त्या कथेच्या फाईलचा रंग लालसर होता....
 
फाईलकडे बघतांना राजेश म्हणाला, "खारकातेला माफ केले, आता के के सुमनला माफी नाही! नक्कीच नाही! आणि फक्त केके ला पकडून मी थांबणार नाही तर अशा अनेक कथा चोऱ्या उघडकीस आणणार!"

त्यानंतर राजेश एका ध्येयाने पछाडल्यासारखा फिल्म जर्नालिझमचा डिप्लोमा कोर्स केला ज्याद्वारे त्याला फिल्म क्षेत्राशी जोडलेले राहाता येईल.

आईचेही त्याने काहीएक ऐकले नाही!

नंतर मग स्क्रिप्ट लेखनाचा डिप्लोमा केला.

जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला आता त्याची चोरालेली कथा आठवू लागली आणि मनात एकाच ध्यास होता – चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात लेखनाचे करियर!!

आता मागे वळून बघायचे नाही! प्रथम जिथे ब्रेक मिळेल तेथे! टीव्ही किंवा चित्रपट कुठेही! पण जायचे म्हणजे जायचे! मला कुणीही रोखू शकणार नाही! हळूहळू त्याला मार्ग सापडू लागले. दिशा मिळू लागली.

एके दिवशी त्याला विनितकडून एक आनंदाची बातमी कळली. विनितच्या एका दूरच्या काकांच्या ओळखीने त्याला टीव्ही वरच्या एका सिरियलच्या काही एपिसोड्सचे स्क्रिप्ट लिहिण्याचा चान्स मिळाला. त्या संधीचे त्याने सोने केले आणि त्या काकांच्या हाताखाली त्यांना स्क्रिप्ट लिहायला मदत केली. त्यांचेकडून खूप काही त्याला शिकायला मिळाले...

सोबतच तो वर्तमानपत्रांत चित्रपटविषयक लिहू लागला.

चित्रपटविषयक मासिकांकडून त्याला मराठी टीव्ही जगतातील कलाकारांचे इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळू लागली. त्याद्वारे थोडी प्रसिद्धी मिळाल्यानंतर मग काही प्रकाशन संस्थांनी त्याच्या काही कथा छापल्या.

सुरुवातीला त्याच्या आईने त्याच्या या करियरला विरोध करायचा प्रयत्न केला खरा पण त्याच्या भयंकर ध्यासाकडे आणि त्याने एकदाच तिच्याकडे रोखून बघितलेल्या नजरेकडे बघून तिने त्याला नंतर विरोध केला नाही.

दरम्यान त्याने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत काही कथा आणि लघू कादंबऱ्या लिहिल्या. त्या चांगल्या खपल्या.

काळ पुढे सरकत गेला. इंटरनेटवर लोक वाचन करू लागले. न्यूजपेपर ऑनलाइन झाले. ब्लॉग्ज आले...

राजेशने स्वतःचा ब्लॉग लाँच केला. त्याची वाचकसंख्या वाढली. मग तो बोरीवलीला येऊन राहू लागला कारण तो आता बऱ्यापैकी स्क्रिप्ट लेखन क्षेत्रात स्थिरावला होता. त्याला हवे तसे करियर मिळाले आणि बऱ्यापैकी प्रसिद्धी सुद्धा मिळाली...

पण त्याच्या लिखाणाची चोरी करणाऱ्यांचा सूड घायची भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पण अजून तरी त्याला टीव्हीवरील एखाद्या चर्चेत किंवा एखाद्या कार्यक्रमात किंवा हिंदी चित्रपटांची संबंधित कुठेही रत्नाकर रोमदाडे नावाचा माणूस वाचनात किंवा बघण्यात येत नव्हता!

आणि तो केके सुमन?

त्याचा आणि त्या दिवाळी अंक कार्यालयातील रत्नाकर रोमदाडे चा काही संबंध असेल का?

असलाच पाहिजे!

त्याबद्दल राजेश विचार करू लागला:

"आता मी मुंबईत आहेच! तर मग विनीतच्या काकांच्या मदतीने के के सुमनचा माग काढावा का? पण त्याने काय होईल? त्याला शोधले तरी मी सरळ त्याचेवर माझ्या कथा चोरीचा आरोप केला तर कोण विश्वास ठेवेल माझ्यावर?

आणि त्यानेच माझ्यावर उलटा चोरीचा आरोप केला तर? कारण चित्रपट पाहून मग मी त्याप्रमाणे थोडा बदल करून कथा लिहिली असा आरोप त्याने केला तर? के के प्रसिद्ध आहे आणि मी? दिवाळी अंक कार्यालय आणि के के सुमन यांच्यात नेमके काय आणि कसे कनेक्शन आहे?

आणि ते मी सिद्ध कसे करणार? माझ्याकड ठोस पुरावा आहे का?"

"माझी कादंबरी आणि चित्रपटाची कथा यात बराच फरक आहे, आणि शेवट पण थोडा बदललेला आहे! मी तर अजून फक्त या इंडस्ट्रीत सुरुवात करतोय. ते पण लेखक म्हणून! कलाकार म्हणून नाही! आणि लेखकांची स्थिती आणि महत्व काय आहे आज बॉलीवूड मध्ये? शून्य! माझ्यावर कोण विश्वास ठेवेल?"

"मी तर अजून कुठे मराठीत सुरुवात करतोय! ती पण कलाकार नाही तर लेखक म्हणून!

असे हजारो मराठी ऑनलाईन आणि ऑफलाईन लेखक कार्यरत आहेत. लिहित आहेत!

अनेक लेखक असे दिग्दर्शकांवर कथाचोरीचे आरोप करतात. त्यापैकी काही खरे आणि काही खोटे असू शकतात!

त्यापैकीच मी एक खोटा म्हणून गणलो गेलो तर?

शेवटी ही सगळी बॉलीवूडमधील मंडळी प्रतिष्ठित आणि प्रस्थापित आहेत.

आणि करीयरच्या सुरुवातीलाच मी नाहक कोणत्या वादात अडकून बदनाम झालो तर? त्या

मुळे बदला घेण्याची ही वेळ मला योग्य वाटत नाही!

आणि पूर्वी माझ्या दोन कथांची चोरी झाली असली तरी मला इतर ठिकाणी चांगली संधी मिळतेय आणि माझी लेखक म्हणून हळूहळू ओळख निर्माण होते आहेच!

तेव्हा मला घाई करायला नको. याचा अर्थ असा नाही की मी स्वस्थ बसून राहीन. नाही!

मी फक्त योग्य संधीची मी वाट बघेन आणि संधी मिळेलच. नाही मिळाली तर मी निर्माण करेल. पण आता ती वेळ नाही!" असे म्हणून त्याने एकदा त्या लाल फाईलकडे पाहिले.

दरम्यान आईने सुनंदासाठी त्याचेकडे फिल्डिंग लावणे सुरू केले होते...

गोडंबे काकांकडून दबाव वाढत होता. त्याच्या लेखनाच्या ध्यासापायी त्याचे लग्नाबाबतीतले विचार मागे पडले. अशातच "चार थापडा सासूच्या" च्या निमित्ताने सुप्रियाशी ओळख झाली. तिच्याबरोबर फिरणे हिरणे सुरु झाले. काहीवेळेस राजेशला वाटून जायचे ही सुप्रिया हीच आपल्यासाठी आयुष्याची योग्य जोडीदार आहे पण तो स्वतःला सावरायचा कारण त्याच्या जीवनाचे ध्येय वेगळे होते आणि विशेष म्हणजे आईचा सुनंदा सुनंदा असा सततचा जयघोष त्याला व्यथित आणि चिंतीत करत होता.

दरम्यान के. के. सुमन चे फारसे चित्रपट आले नाहीत. नंतर तो प्रोड्युसर बनला….!!!

(क्रमश:)
 
वलय - प्रकरण १९

बस ड्राइवरने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने राजेशची तंद्री भंग पावली. बसमध्ये बाजूच्या सीटवरचा रा. म. मालवणकर यांचे "जीवनाचे शिल्पवृक्ष" हे पुस्तक वाचणारा आधीच्या स्टँडवर केव्हाच उतरून गेला होता. धर्मापूरला जाऊन तो जे करणार होता त्याद्वारे त्याच्या प्रतिशोधाच्या शोधार्थ एक पाऊल तो टाकणार होता.

धर्मापूरच्या "धर्म वार्ता" या वृत्तपत्र कार्यालयात तो पोहोचला. तेथील संपादक त्याचे मित्रच झाले होते. धर्मापूरच्या समस्यांवर संवादात्मक पद्धतीने लिखाणातून भाष्य करून त्याने जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर कालांतराने त्याने चित्रपट परीक्षण लिहायला सुरुवात केली होती.

के. के. सुमनचे चित्रपट आले की त्याबद्दल तो मानधन न घेता आवर्जून आणि हटकून परीक्षण लिहायचा आणि त्याच्या चित्रपटाला फक्त अर्धा किंवा एकच स्टार रेटिंग द्यायचा. त्याच्या ब्लॉगवर सुद्धा त्याने के के सुमनच्या चित्रपटांची लिहून लिहून वाट लावली होती.

त्या वृत्तपत्राच्या संपादकाना भेटून त्याने खाली दिलेली विशेष जाहिरात छापायला दिली आणि त्यांचा निरोप घेऊन तो निघाला. संपादकांनी ती जाहिरात तो म्हणेल तितके दिवस आणि तेही विनामूल्य छापायचे ठरवले. त्यामागची राजेशची काय भावना आणि उद्देश्य आहे हे पूर्णपणे नाही तरी थोडीफार कल्पना त्याना आली होती. राजेशला बेस्ट लक देऊन त्यांनी गप्पा मारल्या आणि त्याला निरोप दिला. ते संपादक कलेची कदर करणारे होते.

ती जाहिरात अशी होती: "संसार संभाळून पार्ट टाईम मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छिणारे हौशी छंदिष्ट, सृजनशील, आणि कलाप्रेमींनी (स्त्री पुरुष) यांनी खालील पत्त्यावर भेटावे. एका अभिनव मोहिमेसाठी काम करण्याची सुवर्णसंधी! मोबदल्यात जास्त पैसे मिळणार नाहीत (आधीच सांगून ठेवतो) पण कलेच्या अभिव्यक्तीचे मानसिक समाधान जरूर मिळेल आणि आपण एका महत्वाच्या मोहिमेत आजीवन सहभागी झालो आहोत याचा गर्व आणि अभिमान वाटल्याशिवाय रहाणार नाही. तुमच्यात कोणतीही कला असो - लेखनकला, चित्रकला, संवादकला, टीका करण्याचे कसब, वाईट गोष्टी चांगल्या कामांसाठी वापरण्याची कला या प्रकारे काहीही असो, तुमचे येथे स्वागत आहे! पुढे नंतर मनायोग्य व्यासपीठ मिळू शकते त्यानंतर मात्र तुम्हाला अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता नाकारता नाही! मला प्रथम कॉल करा आणि मग भेटायची वेळ ठरवू! तुमचा बायोडटा माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. मोहिमेसाठी तुमच्या सृजनशील कल्पनांच्या प्रतीक्षेत! तुम्ही माझी मोहीम यशस्वी करा, मी तुमची स्वप्ने पूर्ण करीन! प्रॉमिस!"

त्यानंतर चार पाच दिवस असेच गेले. गोडंबे काका आणि सुनंदा यांचे येणेसुद्धा लांबले. तसा त्याच्या आईला फोन आला होता. तेवढा सुटकेचा निश्वास राजेशने टाकला. जाहिरात देऊन आठ दिवस झाले होते पण अजून एकही फोन आला नव्हता. दोन कॉल्स आले खरे पण राजेशने उचलले नाहीत. ते जितेंद्र करमरकरचे कॉल्स होते. पण जितेंद्रने सहज कॉल केला असेल म्हणून राजेशने दुर्लक्ष केले. जितेंद्रनेही पुन्हा त्याला कॉल केला नाही. राजेशला कल्पना नव्हती की सुप्रियाने ती सिरीयल सोडली. कळले असते तरी तो तिला थांबवू शकला असता का? त्याचा कॉल तिने घेतला असता का?

बरोबर दहा दिवसानंतर तो फोन आला, "तुमची जाहिरात वाचली मी. तुम्हाला भेटायचे आहे. कुठे भेटायचे?"

ह्या एका बहुप्रतीक्षित फोन कॉल नंतर मग एकसारखे फोन कॉल्स सुरु झाले. साधारण दहा जणांचा कॉल आल्यानंतर त्याने सगळ्यांच्या सोयीनुसार एक दिवस आणि वेळ ठरवली. भेटायचे ठिकाण राजेशने निवडले होते ते म्हणजे - शाळेतली टीचर्स रूम, जेथे त्याने लिहिलेले लहानपणी त्याचे नाटक त्याच्या शिक्षकांकडे सुपूर्त केले होते. त्याला मिळालेल्या पहिल्या विश्वासघाताची खूण होती ते ठिकाण म्हणजे! शाळेतल्या ओळखीमुळे त्याला ती रूम शाळा सुटल्यानंतर पर्सनल वापरासाठी मिळाली कारण आज सकाळची शाळा होती. मात्र तेथे आता टीचर्स रूम नसून स्पोर्ट्स साहित्य ठेवण्याची ती खोली बनली होती आणि तिला बाहेरून वेगळा प्रवेश होता. त्याचे नाटक चोरून स्वतःच्या नावावर खपवणारे ते शिक्षक मात्र आता त्या शाळेत नव्हते. त्यांची बदली झाल्याचे त्याने नंतर ऐकले होते. मात्र कोणत्या गावाला हे त्याला कळले नाही.

संध्याकाळी चार वाजेपासून तर सात वाजेपर्यंत त्यांच्यातील चर्चा चालली. राजेशचे समजावून सांगण्याचे कसब जबरदस्त होते. कथेत तो जशी संवादातून योग्य शब्दयोजना करीत असे तसेच प्रत्यक्ष जीवनात संवाद कौशल्यात सुद्धा तो योग्य शब्दयोजना करे आणि समोरच्यावर प्रभाव टाके. त्याला अपेक्षित असलेले असे ते सगळे जण होते. त्यापैकी चारजण (दोन पुरुष दोन महिला) विवाहित तर इतर सहाजण (सगळे पुरुष) अविवाहित होते. त्यांना राजेशने व्यवस्थित मोहीम समजावून सांगितली. काहींना सुरुवातीला शंका आली पण नंतर त्यांना विश्वास बसला.
 
राजेशने मोहिमेचे सगळेच पत्ते सुरुवातीला त्यांच्यासमोर उघड केले नाहीत. त्या टीम मधला एक लीडर त्याने नेमला - सारंग सोमय्या.

रात्रीचे डिनर राजेशतर्फे हॉटेलमध्ये केल्यावर ते सगळे आपापल्या गावी निघाले. घरी गेल्यावर घरच्यांना तोंड कसे द्यायचे तो त्यांचा प्रश्न होता. मोहिमेतले किती आणि काय कोणाकोणाला सांगायचे किंवा नाही याबद्दल राजेशने नियम आखून दिले होते. ते सगळ्यांना पाळायचे होते. सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी राजेशने घेतले. काहींचा बायोडाटा आधीच राजेशला ईमेलने मिळाला होता, ज्यांचा मिळाला नाही त्यांचा त्याने आता मागून घेतला किंवा नंतर इमेलवर पाठवायला सांगितला. प्रत्येकाचे मनोरंजन क्षेत्रातील पॅशन, इच्छा आणि स्वप्न काय काय आहेत ते त्याने जाणून घेतले. सगळे लिहून घेतले. आता ते सगळेजण वेळोवेळी राजेशच्या आदेशाची वाट बघणार होते. मुद्रेवर एक विजयी भाव ठेऊन तो घरी परतला. कामानिमित्त बाहेर गेलो होतो एवढेच त्याने आईला सांगितले होते. कारण सांगितले असते तरी तिला त्यातले जास्त काही कळलेच नसते.

त्यानंतर दोन दिवस गेले आणि गोडंबे काकांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा राजेशच्या आईला फोन आला. घडलेली घटना अकस्मात आणि दुर्दैवी होती. कुठलाही घातपात नव्हता. जे घडले ते सगळे अचानक योगायोगाने घडले याबद्दल सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती. राजेश आणि त्याची आई तातडीने ‘धोरणा’ या गावाला गेले. सुनंदाला भाऊ नव्हता. सुनंदा पुरती कोलमडली होती. शोकाकुल वातावरणात आठ दिवस गेले. सगळे अंतिम संस्कार पार पडल्यानंतर गोडंबे काकूंनी राजेशच्या आईला वचनाची आठवण करून दिली. राजेशच्या आईने सुनंदासाठी फिल्डिंग रचलेली होती पण ही एक घटना राजेशला अचानक क्लीन बोल्ड करून गेली. महिनाभरातच साखरपुडा आणि लग्न करायचे ठरले. तशी गोडंबे काकांचीच इच्छा होती म्हणे! सुनंदाच्या वडिलांचा बंगला आणि इतर बरीच संपत्ती तिच्या आणि राजेशच्या नावावर झाली होती. राजेशच्या आईचे सुनंदाचा तगादा मागे लावण्याचे हे सुद्धा एक सबळ कारण होते.

लहानपणापासून ओळखत असलेल्या परंतु एकमेकांचा "त्या" अर्थाने पूर्ण परिचय नसलेल्या अशा दोन जीवांचे लग्न झाले. राजेशचा मुक्काम दोन महिने लांबला. पहिली रात्र काय आणि दुसरी तिसरी काय त्या दोघांनी अजून अनुभवलीच नव्हती कारण सुनंदा सतत वडिलांच्या जाण्याच्या दु:खात बुडालेली आणि दडपणाखाली होती. लग्नानंतरचे बहुतेक दिवस ती माहेरीच होती. आता शहरात गेल्यावरच जो काय त्यांचा संसार होता तो सुरु होणार होता! काही नाती जपली जातात तर काही जपावी लागतात, तसेच काही नाती जोडावी लागतात तर काही जोडली जातात. आता जे जोडलं गेलेलं नातं टिकेल की टिकवावं लागेल हे काळच ठरवणार होता!!
 
Back
Top