• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

वलय (कादंबरी)

  • Thread starter Thread starter StoryPublisher
  • Start date Start date
वलय - प्रकरण ३६

केकेचा मुलगा पिके सुमन (पवन किशोर सुमन) हा पक्का पार्टीबहाद्दर आणि प्लेबॉय होता. तो चित्रपटांसाठी खूप चांगले नसले तरी बरे लिखाण करायचा आणि विशेष म्हणजे ते लिखाण कधीही चोरलेले नसायचे. पण केके आणि रत्नाकर मात्र ऑनलाइन आणि इकडे तिकडे छापल्या जाणाऱ्या असंख्य कादंबऱ्या आणि कथांतून कथेचा गाभा बिनधास्त चोरायचे आणि त्यात मीठ मसाला टाकून त्याचा चित्रपट बनवायचे आणि स्वतःच्या नावाखाली ते खपवायचे आणि त्याचे क्रेडिट स्वतः उकळायचे. पिकेला हे अर्थातच माहित नव्हते.

राजेश रत्नाकरला ज्या रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी बोलावणार होता त्याच्या काही दिवसापूर्वी…

पिके एका पार्टीत धूम नाचला. आता वडील सध्या भारतात नसल्याने आणि त्याची आई ही वडिलांपासून वेगळी राहत असल्याने त्याला रान मोकळे झाले होते. त्या रात्री पार्टीत तो बेफाम नाचला. रात्रीचे बारा वाजले आणि एक आकर्षक पोशाख घातलेली महिला त्याचेकडे आली.

"हॅलो, मी रविना! हाऊ आर यू मिस्टर पवनकुमार सुमन?", पिकेच्या डान्स स्टेप्ससारख्याच डान्स स्टेप्स करत तिने पिकेला शेकहॅन्ड साठी हात पुढे केला.

पिकेची डान्स पार्टनर साक्षी तिच्याकडे बघू लागली. ती आणि पिके या रविनाला प्रथमच बघत होते. या आधी रविना कधीही त्यांना कुठे दृष्टीला पडली नव्हती.

"आय एम फाईन! पण सॉरी मी आपणाला ओळखले नाही. म्हणजे तू रविना आहेस ते तू सांगितलंस पण मी तुला ओळखत नाही!" पिके म्हणाला.

"मी लेखकांची चाहती आहे. विशेषतः तुमच्या कथा मला फार आवडतात!", रविना त्याच्या आणखी जवळ येत म्हणाली.

पार्टी, सुंदर मुली आणि लेखन हे तीन विक पॉईंट असलेल्या पिकेला पार्टीत एक सुंदर मुलगी त्याच्या लेखनाचे कौतुक करतेय म्हटल्यावर तो पघळला, नरमला.

"अ हो! थँक्स! थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स!" नाचतांना तिच्याकडे सरकत रविनाला पिके म्हणाला.

"वुड यु माईंड मी डान्सिंग विथ यु?" रविना त्याचे अधिक जवळ जात म्हणाली.

पिकेला रविनाचा आग्रह मोडवेना म्हणून मग नाईलाजाने त्याने साक्षीला जायला सांगितले. थोड्या नाईलाजानेच साक्षी त्याच्यापासून दूर झाली आणि अंधुक प्रकाशात उघडझाप करणाऱ्या डिस्को लाईट्सच्या प्रकाशात बेधुंदपणे डान्स करणाऱ्या काही जोडप्यांतून मार्ग काढत ती एका सोफ्यावर जाऊन बसली.

काही वेळाने जेव्हा अगदी मंद प्रकाशात संथमधुर संगीत सुरु झाले तेव्हा नाचतांना हळूहळू रविना आणि पिके हे दोघे एकमेकांच्या कानामध्ये कुजबूजत संभाषण करत होते.

रविना- "तुमच्या सर्व कथा मला आवडतात. मनात जे आहे ते स्पष्ट आणि रोखठोकपणे तुम्ही तुमच्या कथेत मांडता, हे मला खूप आवडते!"

पिके- "हो! जीवनाच्या विविध पैलूंवर मला लिहायला आवडते! जीवनातील कोणत्याही विषयावरचा कोणताही प्रसंग लिहायचा असल्यास मी कोणतीही आडकाठी न ठेवता त्याबद्दल लिहितो आणि चित्रपटातही ते तसेच असावे असा माझा आग्रह असतो!"

रविना- "विशेषतः प्रेमाबद्दल आणि सेक्सबद्दल तुम्ही जे स्पष्ट आणि रोखठोक लिहिता ते मला आवडते! काही लेखक फक्त सेक्स हा भाग मुद्दाम वगळून लिहितात!"

पिकेला अशी धाडसी मत व्यक्त करणारी मुलगी प्रथमच भेटली आणि आवडली!

पिके- "हो! अनेक कादंबरीकार अनेक कादंबऱ्या लिहितात, एखाद्याची पूर्ण जीवनकथा लिहून काढतात पण त्या माणसाच्या सेक्स लाईफचा त्या कादंबरीत साधा उल्लेखही नसतो! मला सांग रविना, माणसाच्या जीवनातील प्रत्येक पैलू हा महत्वाचा असतो आणि असा प्रत्येक पैलू संपूर्ण जीवनावर कमी अधिक परिणाम करणारा असतो. मग फक्त सेक्स हाच एक महत्वाचा पैलू टाळून एखादी कादंबरी लिहिली तर त्या कादंबरीतल्या विविध पात्रांना आणि त्यांच्या जीवनप्रवासाला आपण संपूर्ण न्याय देऊ शकू का? अर्थातच नाही!"

"अगदी बरोबर बोललात! मला हेच म्हणायचे होते!" असे म्हणत रविना आणखीन त्याचेजवळ सरकली.

साक्षीला हे पाहवत नव्हते. ती सोफ्यावरून उठली आणि दुसरीकडे गेली. तसा साक्षीला पिकेचा सुंदर मुलींबाबतचा विक पॉईंट माहिती होता. त्यामुळे हे तिला अगदीच अनपेक्षित नव्हते पण पिके भेटून तिला फक्त काही महिनेच झाले होते, त्यामुळे थोडी जेलसी तिच्या मनाला स्पर्शून गेली इतकेच!

रविनाने पिकेला आपली अशी ओळख सांगितली की, ती या मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीत कलाकार बनण्यासाठी आली आहे. टीव्ही किंवा फिल्म्स यात तिला करियर करायचे आहे आणि ती मैत्रिणीच्या एका बंगलोमध्ये सध्या काही दिवस एकटी राहते आहे. मैत्रीण आणि तिचा नवरा परदेशातून परत आले की मग ती दुसरी रूम शोधेल.

* * *

त्या पार्टीनंतर रोज त्यांचे एकमेकांना फोन करणे सुरू झाले. मग चार पाच दिवसातच त्यांच्या प्रेमाचा असा काही अंकुर उगवला की त्याचे आठवड्याभरातच झाड होईल की काय असे एकंदरीत वाटत होते. सोबत बागेत फिरणे झाले, सिनेमा बघून झाले, हॉटेलिंग झाले, मॉल्स मध्ये फिरणे व्हायला लागले, एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना कळू लागल्या. तिने त्याच्या कथा वाचणे सुरु केले.
 
काही दिवसांनी एकमेकांना आलिंगन देणे तसेच परस्पर संमतीने किस घेणे वाढू लागले. बरेचदा किस घेताना पिके अनावर व्हायचा पण राविनाने त्याला हसवून अडवायची मग शेवटी एके दिवशी ती त्याला लाडिक हसत म्हणाली,

"पिके साहेब, तुम्ही प्रेमात बरेच फास्ट दिसता! कथेत लिहिता त्याप्रमाणे खऱ्या जीवनातही बिनधास्त दिसता! आज रात्री नक्की आपण प्रेमाच्या अत्युच्च आविष्कारात भ्रमण करूया! या लवकर संध्याकाळी सात वाजेपर्यंत! मी तयार राहते! माझ्या बंगलोमध्ये! मी वाट पाहाते! येताना लॅपटॉप पण घेऊन ये तुझा! तुझ्या कथा वाचायच्या आहेत, मोकळ्या वेळात! तुझ्या नव्या कथेतले सगळे प्रेम प्रसंग वाचायचे आहेत मला, म्हणजे आपण कदाचित त्या प्रसंगांसारखे प्रेम खरोखर अनुभवू शकू"

"व्हेरी नाईस आयडिया!" पिके म्हणाला.

त्या रात्री साडेसात वाजता-

त्याने अंगावरचे बहुतेक कपडे काढले होते. मग तिचे कपडे काढायची त्याला घाई झाली. त्याने तिला हात लावताच ती म्हणाली, "राजा, घाई करू नकोस! माझ्याकरता "रेड क्राऊन" चा पेग आण! आपण दोघे पिऊ! आजची रात्र मेमोरेबल झाली पाहिजे! कारण रेड क्राऊनशिवाय मजाच ती काय? पाच मिनिटांच्या अंतरावर शॉप आहे! जा, घेऊन ये ना प्लिज!"

पिके एका पायावर तयार झाला. त्याने पुन्हा कपडे घातले आणि म्हणाला, " बरंय मॅडम! आणतो! मी जनरली रेड क्राऊन घेत नाही. थोडी स्ट्रॉंग आहे पण हरकत नाही, तू म्हणतेस तर घेईन मी! पण त्यांनतर मात्र एकही जास्तीचा बहाणा चालणार नाही बरं का! एवढं तडपवू नका माझ्यासारख्या गरीब माणसाला! पाच मिनिटांच्या अंतरावर शॉप आहे, घेऊनच येतो स्वतः जाऊन!"

असे म्हणून तो जायला निघाला तेवढ्यात तिने त्याला थांबवले आणि म्हणाली, "तू येतोस तोपर्यंत मला तुझी नवी चित्रपटाची कथा दे ना वाचायला! तू मला वाचायला द्यायचे कबूल केले होतेस ना! प्लिज! बाकी सगळ्या कथा मी वाचल्या आहेत! विशेषतः त्यातील प्रेम प्रसंग मला वाचायचेत आणि तुझ्यासोबत ते जिवंत करायचेत!"

त्याने तिला त्याचे लॅपटॉप ऑन करून दिले आणि पासवर्ड टाकून दिला आणि वेगवेगळ्या फोल्डर्स मधून त्याच्या नव्या कथेच्या फाईल्स तिला वाचायला दिल्या आणि बाहेर निघून गेला. सेक्ससाठी अधीर झाल्याने त्याचे डोके चालणे जवळपास बंद झाले होते.

मग घाईघाईने लॅपटॉप मांडीवर घेत तिने दरवाजा बंद केला, तिच्या मोबाईलची मेमरी चिप बाहेर काढली, लॅपटॉपला कनेक्ट केली. पिकेच्या नवीन लिखाणाच्या सगळ्या फोल्डर्स आणि फाईल्स तिने कॉपी केल्या आणि मेमरी कार्ड पटकन मोबाईलमध्ये टाकले आणि मोबाईल परत जसाच्या तसा लावला. तिची पर्स आणि इतर साहित्य घेऊन ती पिके यायच्या आत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून परागंदा झाली.

तिने पिकेला फोन करून सांगितले की तिच्या एका मैत्रिणीच्या आईला अचानक छातीत त्रास सुरू झालाय आणि मैत्रीण एकटी असल्याने तिच्या आणि आईच्या मदतीला ती रिक्षेने तातडीने जात आहे आणि ती त्याला नंतर भेटेल... सॉरी!

रेड क्राऊनच्या बाटल्या बेडवर ठेऊन तो संतापाने चरफडत होता, पण इलाज नव्हता. आपले लॅपटॉप सोबत घेऊन त्याच्या कारने तो साक्षीकडे जायला निघाला. दरम्याने त्याने रविनाला फोन केला पण स्विच ऑफ येत होता.

"मी नसतं का सोडलं हिला कारने, पण मला न सांगता ही अशी कशी निघून गेली?" असा विचार करतांना त्याच्या मनात रविनाची प्रतिमा येत होती. ती रात्र त्याने शेवटी साक्षीकडे घालवली.

दरम्यान राजेश एका बारमध्ये रत्नाकर सोबत ड्रिंक्स घेत होता. राजेशकडून अनेक नवीन कथा ऐकून त्यावर आधारित आयते अनेक चित्रपट बनवता येतील अशी इच्छा बाळगून रत्नाकर राजेश सोबत वेळ घालवत होता. एक विशिष्ट पेय रत्नाकारच्या नकळत त्याच्या पेयात मिसळल्यानंतर रत्नाकर भडाभडा राजेशला त्याच्या आणि केकेच्या एकंदर फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल स्वत:च्या नकळत सगळे खरे खरे सांगू लागला. राजेश हा अशा काही लेखकांपैकी एक असेल ज्याची कथा आपण कधीतरी चोरली आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना रत्नाकरला नव्हती.

"केके आणि मी उनाडक्या करणारे बेरोजगार युवक होतो. त्याची आणि माझी चांगली मैत्री होती. केकेची आई आणि गावातील लोक आमच्या उपदव्यापांनी त्रासले होते. केकेचा (किशोर) चा भाऊ कुमार याच्यासारखे अभ्यासात हुशार होण्यासाठी आमच्यावर दबाव यायचा. कुमार चांगल्या मार्कांनी पास व्हायचा तर किशोर आणि मी कॉपी करून काठावर पास व्हायचो. स्वतः मेहेनत न करता लोकांच्या मेहनतीची नक्कल करणे आणि त्यावर यश मिळवणे हा आमचा लहानपणापासूनचा आवडीचा खेळ!!

आम्हाला अभ्यासवगैरेंचा जाम कंटाळा यायचा पण चित्रपट बघणे आम्हाला खूप आवडायचे. मी आणि किशोर तासनतास विचार करत बसायचो की ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे चमधमक आहे. येथे एकदा प्रवेश मिळवला की पुढे पैसाच पैसा आणि सुंदर सुंदर बायका.
 
अभिनय कशाशी खातात किंवा चित्रपटासारखी कलाकृती बनवण्यासाठी काय मेहनत करावी लागते, सकस लिखाण करावे लागते हे आम्हाला माहिती नव्हते आणि कुणी सांगून ते आम्हाला पटलेही नसते.

त्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर मधले सकाळी दहा वाजता लागणारे खास ऍडल्ट बी ग्रेड चित्रपट खूप पैसा कमवायचे. त्यामानाने त्या चित्रपटांना बजेट कमी असायचे. त्यात सुंदर सुंदर मुलीही काम करायच्या. आपण जर का अशा चित्रपटात काम केले तर आपल्याला पैसेही मिळतील आणि सुंदर सुंदर स्त्रियांचा सहवासही लाभेल या विचाराने आम्ही पछाडलो आणि मग आम्ही दोघे शेवटी गावातून पळून गेलो आणि मुंबईत आलो. रस्त्यांवर राहिलो. पडेल ती कामे केली. आमचे चित्रपटाचे वेड पाहून जेथे आम्ही काम करत होतो तेथील एकाने आम्हाला एका बी ग्रेड सिनेमा बनवणाऱ्या डायरेक्टर प्रोड्युसरचा पत्ता दिला. त्याचे नाव होते- केवलजीत! मग त्याने आमची टेस्ट घेऊन त्याच्या बी ग्रेड सिनेमात काम दिले. पैसे थोडेफार मिळत होते आणि सुंदर मुलींबरोबर काम करायला मिळायचे. तशा सिनेमात सिरीयसली अभिनय वगैरे फारसा करावा लागायचा नाही. मग आम्ही परस्पर एक धंदा सुरु केला!"

"कसला धंदा रत्नाकर? सांग ना!", राजेश म्हणाला.

"तुला माहिती आहे राजेश की भारतात फिल्म इंडस्ट्रीचे किती आकर्षण आहे ते! पूर्वीही आणि आजही भारतातील अनेक खेडे आणि शहरांतून अनेक मुली मुलं नशीब आजमावण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत येतात. काही खरोखरीच अभिनयगुणसंपन्न असतात आणि त्यांना कालांतराने संघर्षानंतर यश जरूर मिळते. काहींमध्ये अभिनयगुण नसतात ते निराश होऊन परत जातात. पण काही जण विशेषतः त्यातील काही मुली ज्या घरून पळून वगैरे तर आलेल्या असतात पण त्यांच्यात अभिनयगुण नसतो पण सुंदर असतात आणि जीवनात खूप पैसे मिळवणे हेच यांचे ध्येय असते. रिच लाइफस्टाइल त्यांना जगायची असते. जीवनाची अनेक सुखे त्यांना भोगायची असतात. मग त्या स्वतःच्या शरीराचा उपभोग इतरांना घ्यायला देऊन येनकेन प्रकारे चित्रपटात विशेषतः बी ग्रेड चित्रपटात कामं मिळवतात.

मग आम्ही अशा प्रकारच्या मुलींना जाळ्यात ओढायचे सुरु केले. त्यांची शरीरं उपभोगली आणि त्यांना केवलजीतकडे पाठवायचो. काही मुली राजीखुषीने तर काहींना आम्ही बळजबरी करून आमच्याशी शरीरसंबंध ठेवायला भाग पडायचो आणि मग केवलजीतकडे पाठवायचो. त्यावेळी मुली आतासारख्या सजग नव्हत्या. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला घाबरायच्या. केवलजीत पण त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा. पण आम्हीही त्यांना उपभोगायचो हे केवलजीतला कळले आणि ते त्याला आवडले नाही. आम्हाला दोघांना त्याने कायमचे कामावरून काढले.

मग नंतर आम्ही स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढली कारण आमच्याकडे तोपर्यंत बराच पैसे आला होता आणि नेहमीप्रमाणे केवलकडे काम करून करून आम्ही जे काही फिल्म मेकिंग बद्दल शिकलो तेच आमच्या साठी आम्ही कामी आलं. कॉपी करायची आमची सवय कामी आली. इतरांच्या सृजनशीलतेवर जगण्याची आमची लहानपणापासूनची सवय होती तीच अंगावळणी पडली.

पण नंतर नंतर बी ग्रेडचे चित्रपट आणि मेनस्ट्रीम सिनेमा असा भेद जवळजवळ नष्ट झाला. मग आम्ही मेनस्ट्रीम सिनेमामध्ये नशीब आजमावून बघायचे ठरवले. तेव्हा आम्हाला चित्रपट बनवतांना अडचण आली ती सशक्त कथेची. आम्ही दोघे त्याबाबतीत मठ्ठ!!

काही दिवसानंतर एकदा मी रेल्वेत प्रवास करत होतो. बाजूच्या सीटवर कॉलेजचा एक मुलगा "डिटेक्टिव्ह कथा" नावाचा दिवाळी अंक वाचतांना दिसला. आपल्या आईला एका सस्पेन्स कथेबद्दल तो सांगत होता आणि म्हणत होता की अनेक हॉलिवूड आणि हिंदी, मराठी चित्रपटांना शोभतील अशा कितीतरी कथा दिवाळी अंकात छापून येत असतात, पण ते क्षेत्र कधीही या कथांची दखल घेत नाही असे दिसते.

झाले! माझ्या माझ्या मेंदूत 'कॉपी करण्याची सृजनशीलता' दाटून आली. मग दादरला मी तात्पुरते दिवाळी अंक कार्यालय उभारले आणि पेपरात जाहिरात देऊन महाराष्ट्रभरातून नवीन दिवाळी अंकासाठी कथा मागवल्या. हजारोंनी कथा आल्या आणि मग त्या कथा घेऊन आम्ही कार्यालयाला टाळा ठोकला. त्यातील एका कथेवर आम्ही “किस्मत का खेल” हा सिनेमा बनवला त्यात खुद्द अमितजींनी म्हणजे सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांनी काम केले आहे! मग काळ बदलला तसा इंटरनेटवर अनेक मराठी लेखक हजारो फ्री कथा लिहून टाकू लागले मग आम्हाला फुकटात खजिनाच सापडला! चोरून न्यायला!"

आताच त्याच्या कानाखाली चार पाच दणादण माराव्यात आणि त्याला रस्त्यावर फरफटत नेऊन दोनचार तगडे गुंड भाड्याने घेऊन त्याला धो धो बदडून काढावा असं राजेशला प्रकर्षानं जाणवलं पण त्याने स्वतःला सावरलं. शेवटी इतक्या उशिरा का होईना पण छडा लागला होता.
 
राजेश आणि रत्नाकर बसले होते त्या टेबलखाली एक माईक लावलेला होता आणि शेजारी असलेल्या एका टेबलवर वेष बदललेला सारंग सोमैया त्याच्या चष्म्याला लावलेल्या मायक्रोकॅमेरामधून ह्या सगळ्याची व्यवस्थित व्हीडिओ रेकॉर्डिंग करत होता. या सगळ्यांच्या बदल्यात राजेशने रत्नाकरला एक कथा फुकटात लिहून रत्नाकारच्या चित्रपटासाठी द्यायचे कबूल केले होते.

काही दिवसांनी –

वीणा वाटवे (जिला सारंगने गावाकडून मुंबईत टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवून देण्यासाठी आणले होते), राजेश आणि सारंग हे तिघे राजेशच्या फ्लॅटवर बसले होते.

सारंग म्हणाला, "तर मग रविनाजी उर्फ वीणाजी, ती पिकेकडून चोरलेली कथा मिष्टी मेहरानला दिली ना?"

वीणा, "होय! आपण ठरवल्याप्रमाणे मिष्टी लवकरच त्यावर एक तासांची शॉर्ट फिल्म बनवते आहे. लवकरच ती बनून पूर्ण होऊन "व्हीडिओ ट्यूब" वर अपलोड सुद्धा होईल. मग पिके, केके आणि रत्नाकर तिघांना जबर धक्का बसेल!"

राजेश, "ग्रेट! आता पिकेच्या इतरही काही कथांवर शॉर्ट फिल्म बनवा आणि जगभर जाहिरात करून त्यात लेखक म्हणून एक कुणाचेतरी काल्पनिक नाव टाका! त्या फिल्म्स रिलीज होताच बरोबर पिके आणि केके यांची मेहनत वाया जाईल आणि त्यांना कळेल कथाचोरीचे दुःख!"

सारंग, "आणि वीणा! त्या शॉर्ट फिल्म रिलीज होईपर्यंत तू अधूनमधून पिकेला भेटत राहा. हळूहळू त्यांचेपासून दूर निघून जा! असे की त्याला तुझ्यावर संशय येता कामा नये!"

वीणा, "होय! मी रविना बनताना खूप मेहनत घेतली, वेशभूषा बदलली, मेकप केला. इतकं की रविना म्हणून मी त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर जरी वीणा म्हणून पुन्हा त्याचे समोर गेले तरीही तो मला ओळखण्याची शक्यता कमी आहे!"

राजेश, "वा सारंग! माझा शिष्य शोभतोस! खऱ्या जीवनात जर ही मुलगी एखाद्या काल्पनिक पात्राची भूमिका बेमालूमपणे वठवते तर सिरियल्स आणि चित्रपटांत तर धमालच करेल! वीणा, तुला मी आताच माझ्या टेलिव्हिजन शोसाठी को-अँकर म्हणून घेतो!"

वीणा, "थँक्यू राजेश सर!"

मग पुढचे काही प्लॅन आखले गेले.

मध्यंतरी राजेशला आईकडून काही कॉल आले खरे पण त्याने काहीतरी जुजबी बोलून आईला थोपवून धरले. सुनंदाचा मुक्काम सध्या तिच्या फेवरीट काकूंकडे होता. खरे तर त्या काकूला सुनंदाकडून राजेश आणि त्याच्या आईला मिळालेली संपत्ती डोळ्यात खुपत होती. तसेच तिचा मुलगा आणि राजेश याची तुलना ती लहानपणापासूनच करायची आणि राजेशला मिळालेले प्रसिद्धीवलय तिच्या डोळ्यात खुपायला लागले. म्हणूनच ती राजेश-सुनंदाचा घटस्फोट करवण्याच्या मागे होती हे कालांतराने राजेशच्या आईला कळून चुकले होते आणि आता सुनंदाला हे कसे समजवायचे आणि त्या काकूच्या प्रभावातून बाहेर कसे काढायचे आणि मग राजेशला हे सगळे कसे समजावून सांगायचे या विवंचनेत राजेशची आई होती पण राजेश सध्या काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता! दरम्यान त्या काकूंच्या शेजारपाजारच्याकडून राजेशच्या आईला आणखी एक बातमी कळली...!!

* * *

मिष्टी मेहरानने पिकेकडून चोरलेल्या कथेवर एक तासाची सशक्त शॉर्ट फिल्म बनवली आणि व्हीडिओ ट्यूबवर रिलीज केली फक्त मुद्दाम शेवट थोडा बदलला. ती फिल्म पहिल्याच दिवशी चार लाख लोकांनी पहिली कारण त्या फिल्मला माऊथ पब्लिसिटी मिळाली.

दरम्यान वीणा रविना बनून पिकेला अधूनमधून भेटत राहिली. केके आणि रत्नाकरच्या चोरीचा भुर्दंड पिकेला भरावा लागला होता. खरं तर पिके काही कथाचोर नव्हता. काही पर्सनल गोष्टी सोडल्या तर प्रोफेशनली पिके खूप चांगला माणूस होता. विणाचे पिकेवर कालांतराने खरंच प्रेम बसले. तो तिला आवडू लागला.

नंतर केके परदेशातून परत आला. तोपर्यंत शॉर्ट फिल्मबद्दल पिके, केके आणि रत्नाकर या तिघांना कळले आणि त्यांना दुःखद आश्चर्याचा झटका बसला.

मिष्टी मेहरानकडे तिघांनी जाब विचारला आणि जवळची कथाही तिला दाखवली आणि चोरी मान्य कर नाहीतर कोर्टात केस दाखल करु अशी धमकी दिली.

पण मिष्टीने त्याला सांगितले, "एकच कल्पना दोन किंवा जास्त जणांना सुचू शकते मिस्टर केके! आणि लक्षात घ्या की तुमच्या आणि माझ्या कथेचा शेवट सारखा नाही. समजलं? त्यामुळे तुमचा दावा खोटा आहे. तुम्हाला कोर्टात जायचं तर खुशाल जा! मी निर्दोष सुटेन!"

हळूहळू विश्वासात घेऊन विणाने पिकेला त्याच्या कथांची चोरी तिने रवीना बनून कशी केली ते सांगितले आणि त्याच्या वडिलांच्या आणि रत्नाकारच्या भूतकाळातील चौर्यकृत्यांबद्दल सांगितले. त्यालाही आश्चर्य वाटले आणि त्याचा वडिलांबद्दल संताप झाला.

विणाने पिकेकडून वचन घेतले की जोपर्यंत राजेश केकेला योग्य धडा शिकवत नाही तोपर्यंत त्याने केकेला यातले काहीएक सांगू नये. कारण केकेला कोर्टात जाण्यापासून रोखणे, त्याची कथा चोरून जशास तसे बदला घेणे आणि केकेच्या आगामी चित्रपटाची कथा आधीच फोडून त्याचे जबर आर्थिक नुकसान करणे एवढाच फक्त राजेशचा उद्देश या सगळ्यामागे नव्हता तर केके आणि त्याच्यासारख्या इतर लोकांचा खरा चेहरा टीव्ही, बॉलिवूड इंडस्ट्रीसमोर आणणे हा उद्देश होता म्हणजे पुन्हा कुणी असे करायला धजावणार नाही.

नंतर पिके कडून चोरलेल्या आणखी दोन कथांवर मिष्टीकडून शॉर्ट फिल्म बनवून नेटवर फ्री अपलोड करण्यात राजेश यशस्वी झाला आणि समिरणला मराठीऐवजी हिंदी चित्रपट बनवायला सांगून बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून राजेशचा शिरकाव आधीच झाला होता. तो आता योग्य वेळ आणि योग्य व्यासपीठ मिळण्याची वाट बघत होता.
 
वलय - प्रकरण ३७

राजेश एकटाच लिफ्टमध्ये चढला.

सुनंदाला त्याच्यासोबत आली नाही.

तो लिफ्टमध्ये एकटाच!

नंबर्सऐवजी आकाराने मोठे होत जाणारे स्टार!

लिफ्टच्या दरवाज्याचे बटण.. दार उघडले गेले. दरवाज्यासमोर रागिणी!

घाबरल्याने पुन्हा दरवाजा बंद!

मोठा स्टार असलेले बटन!

लिफ्टचा अनाकलनीय वेग आणि हेलकावे!

अचानक जोराचा धक्का, लिफ्ट थांबली!

दार उघडले गेले..

अंधूक प्रकाशात एक दाढी असलेली वृद्ध व्यक्ती!

चेहरा क्लियर दिसत होता!

येस! हे तर सुपरस्टार अमित श्रीवास्तव!

त्यांनी लिफ्टमधून राजेशला बाहेर येण्यासाठी मदतीचा हात पुढे केला!

मग खांद्यावर एक नाजूक हात?

कुणाचा हात आहे? बघूया तर खरं?

तेवढ्यात राजेश स्वप्नातून जागा झाला.

सकाळचे पाच वाजले होते!सुपरस्टार अमित श्रीवास्तव! त्यांचा आजपर्यंत एकदाही इंटरव्ह्यू घेण्याचा प्रसंग राजेशला आला नव्हता. ते खूप बिझी स्टार होते. नुसते स्टार नाही तर ते सुपरस्टार होते. स्वप्नात त्यांनी मला मदतीचा हात दिला? का? माझ्या सध्याच्या संघर्षात त्यांची मला मदत होईल असा त्याचा अर्थ घ्यायचा का? तो पाठीवरचा हात कुणाचा? सुनंदाचा? नसावा कारण ती तर लिफ्टमध्ये आली नव्हती!

विचार करत करत राजेश उठला. ब्रश करून त्याने चहा घेतला आणि गॅलरीत जाऊन तो विचार करू लागला. सुनंदाविना रिकामे घर भकास वाटत होते.

सुरुवातीला अनिच्छेने लग्न केले असले तरी राजेश सुनंदाचा संसार नंतर रुळावर आला असे वाटत असतानाच काकूंच्या कालवलेल्या विषाने तोही संसार अधांतरी लटकत होता. सकाळी झोपेतून उठल्यानंतरच्या सुनंदाच्या हालचाली, चाहूल सगळे त्याला आठवायला लागले. कदाचित सुप्रियाचे हृदय मी तोडले म्हणून तर मला अशा प्रसंगातून जावे लागत नाही ना? पण मी सुप्रियाशी ब्रेकप घेतला ते त्यावेळेस योग्य होतं असं मला वाटतं!

कदाचित आज माझा बदला आणि संघर्ष अंतिम टप्यावर पोहोचतोय ते बघायला ती असती तर?

ती सोबत असतांना सुद्धा मी इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का?

ती बरोबर म्हणत होती का?

पण त्यावेळेस समजा सुप्रियाशी लग्न केलं असतं

आणि आईचा सुनंदाशी लग्न करण्याचा तगादा त्याच वेळेस रोखला असता तर?

पण तो सुनंदावर अन्याय नसता का झाला?

वचन मोडले नसते का गेले?

पण सुप्रियावर तरी अन्याय कसा झाला असू शकतो?

ती तर लग्न करून इटलीत सेटल झाली आहे!

मग मी आता काय करू?

अन्याय तर माझ्यावर झाल्यासारखा वाटतोय, नियतीचा!!

* * *

सकाळी दहा वाजता समिरणचा फोन आला.

"अरे! लेखक साहेब आहेत कुठे? कशी काय चालली आहे सुट्टी? एन्जॉय करतोय का बायकोसोबत?"

"अ हो हो! म्हणजे ... हो हो!"

"चला बरंय! अरे मी तुला यासाठी कॉल केला आहे की एक गुड न्यूज आहे आपल्या चित्रपटासाठी!"

"काय आहे ती न्यूज समिरण?"

"अरे! मी अमितजींना आपल्या एका आगामी मराठी चित्रपटांत पाहुणा कलाकार घेतो आहे कारण त्यांना माझे पूर्वीचे चित्रपट आवडलेत आणि त्यांनी स्वतःच एका पार्टीत मला विचारले की समिरण मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे! ऐकलं का? स्वतः अमितजी!"

राजेशचा प्रथम कानांवर विश्वासच बसेना. आपल्याला पडलेले स्वप्न??

"अरे! काय विचारात पडलास राजेश? मी खरं तेच सांगतोय! पुढे तर ऐक! मी त्यांना म्हटलं की सर मी माझे हे भाग्य समजतो की तुमच्यासारखा सुपरस्टार माझ्या चित्रपटात काम करायला उत्सुक आहे आणि त्यांच्या पंधरा मिनिटांच्या रोलसाठी तुला लिखाण करायचे आहे तेही त्यांचेशी चर्चा करून!"

"काय सांगतोस समिरण?" खरंच, ग्रेट न्यूज दिलीस!"

समिरण पुढे म्हणाला,

"आणि माहितीये का? ते आपल्या मराठी चित्रपटाला फायनान्स पण करणार आहेत. तसेच ते एक हिंदी चित्रपट काढत असून मला दिगदर्शक म्हणून घेणार आहेत आणि तुला लेखक म्हणून घायचं मी आधीच त्यांचेकडून कबूल केलंय! आणि त्या चित्रपटासाठी त्यांच्या मुलाला – अभिजितला लीड रोलमध्ये घायचे आहे! अभिजितसाठी सशक्त व्यक्तिरेखा लिहिणे हे आता तुझे कौशल्य आहे रे बरं का राजेश! त्यांच्या मुलाला एका हिट चित्रपटाची आवश्यकता आहे! तर मग बोल केव्हा भेटतोस मला राजेश?"

पुढच्या दहा मिनिटांत राजेश वेगाने समिरणकडे निघालासुद्धा आणि कार चालवत असतांना त्याचा मनात एक प्लॅन तयार होत होता.
 
स्टोरी वाचल्या बद्दल आपला आभारी आहे
 
वलय - प्रकरण ३८

सकाळचे अकरा वाजले होते.

चार पाच वेळा बेल वाजवूनसुद्धा दरवाजा उघडत नाही म्हणून रायमा बोस यांनी शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्या आणि शेजारच्यांपैकी दोन महिला घाईघाईत सरळ बेडरूम मध्ये पोहोचल्या तर त्यांना बेडवर अस्ताव्यस्त पहुडलेली रिताशा दिसली.

तिचा श्वास चालू होता आणि जवळच्याच टेबलवर दोन टॅब्लेट्स पडल्या होत्या त्या उचलून बघत त्यांनी रिताशाला गदागदा हलवत आणि स्वर रडकुंडीला येत म्हटले, "बेबी, शोना उठ! तुझी मम्मी आलीय. तू झोपेच्या गोळ्या घेतल्या? मला अशक्य वाटतंय!

उत्साहाने सळसळणारी सतत पॉझिटिव्ह राहणारी माझी बेबी रिताशा! आज काय हालत झाली तुझी? आणि मला एका शब्दानंही कॉल करून तू सांगितलं नाहीस? बेबी उठ!"

असे म्हणून रडत रडत रिताशाचा हात हातात घेऊन बाजूच्या खुर्चीवर रायमा बोस बसल्या. तिच्या सोबतच्या एक महिलेने एका ग्लासमध्ये फ्रिजमधले थंड पाणी घेतले आणि रिताशाच्या चेहऱ्यावर ओतले. ती आता हालचाल करू लागली पण तिचे डोळे खोल गेले होते आणि चेहऱ्यावर अतिशय निर्विकार आणि शून्याकडे बघत असल्याचे भाव होते. रायमाने तिला कमरेत धरून उठवले आणि उशीला टेकून बसवले.

रायमा इतर दोन महिलांना म्हणाली, "कृपया, मी तुम्हाला विनंती करते की हे सगळं कुणाला सांगू नका आणि तुमच्यासोबत असलेल्या इतरांनाही सांगा की कुणाला सांगू नका म्हणून! मीडियाला हिच्या अशा अवस्थेबद्दल कळलं तर ते प्रश्न विचारून विचारून हिचं जगणं नकोसे करून ठेवतील!"

त्यापैकी एक महिला म्हणाली, "काळजी करू नका ताई. आम्ही कुणाला सांगणार नाही. आजपर्यंत आमच्याशी रिताशाचे शजारी म्हणून वागणे खूप चांगले राहिले आहे. तुम्ही हिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा!"

रायमा म्हणाल्या, "धन्यवाद तुमच्या या सगळ्या मदतीबद्दल! मी आता हिला कोलकात्याला घेऊन जाते मगच तिथल्या हॉस्पिटलला दाखल करते! काहीही केलं तरी इथे मीडिया पाठ सोडणार नाहीत!"

रायमा बोस यांनी त्या रात्री सगळीकडे गुप्तता पाळून एयर अम्ब्युलन्स मागवली आणि त्या रिताशासह कोलकात्याला पोहोचल्या. तोपर्यंत आई सोबत असल्याने रिताशाला हायसे वाटले आणि प्रवासात ती जराशी रिलॅक्स वाटत होती पण अधून मधून स्फुंदून स्फुंदून रडतही होती तेव्हा तिची आई तिच्या पाठीवरुन हात फिरवत होती मग तिला तेवढ्यापुरते बरे वाटे पण अर्ध्या तासानंतर तिला पुन्हा रडू कोसळे!

मुंबईत अशी बातमी पसरवली गेली की अभिनेत्री रिताशा काही काळाकरता सुट्टीवर गेल्याची शक्यता आहे.

तेथील डॉक्टरांनी आठ दिवसानंतर हॉस्पिटलमधून तिला परत जाऊ दिले. झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाल्याने झालेले परिणाम भरून काढण्यासाठी त्यांनी मेडिसिन दिले आणि घरी जाऊ दिले पण त्यांनी तिचे मन इकडेतिकडे रमवायला सांगितले. रिताशाचे वडील लहानपणीच वारले होते. मग तिची आईच तिचे वडीलसुद्धा झाली होती. आईनेच तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याच्या तिच्या निर्णयाचे समर्थन केले होते. पण रिताशाला सहजासहजी बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली नव्हती...

रिताशाला एका रात्री अंथरुणात पडल्या पडल्या जुने संघर्षाचे दिवस आठवू लागले...

कोलकात्यातील नाट्यगृहात एकच टाळ्यांचा आवाज ऐकू आला कारण छोटी रिटा (म्हणजेच रिताशा) हिने वयाच्या बाराव्या वर्षीच "अभिसुंदरी" या नाटकातील "मौमिता" या पत्राचे संवाद अशा काही सहजसुंदर अभिनयाने सजवून म्हटले जाते की टाळ्यांचा गाजर काही केल्या थांबेचना.

जरी ती सावळी होती तरी नाकी डोळी आणि अंगाने नीटस होती. नाटकाचे दिगदर्शक बिजॉन घोष यांनी तर त्यानंतर तिला यानंतरच्या त्यांच्या सगळ्या नाटकांत तिला भूमिका देण्याबाबत घोषणासुद्धा करून टाकली. वडील लहानपणीच वारल्यानंतर आईच रिटासाठी सगळे काही होती. रिटाची लहानपणापासूनची अभिनयवृत्ती ओळखून तिने त्याला विरोध करण्याऐवजी सपोर्ट केला.

विविध बंगाली नाटकांत आणि टीव्ही शो मध्ये रिताला भाग घेण्यासाठी प्रोत्साहन तर तिने दिलेच त्याबरोबरच तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हेही तिने कटाक्षाने पाळले. तिच्या नात्यातील एका काकांचा घराण्यातील मुलींनी नाटकात, टिव्हीत काम करायला विरोध होता. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता प्रसंगी समाजाचे टक्के टोपणे सहन करत तिने आपल्या लाडक्या रिटाला तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रोत्साहन दिले. त्या काकांनी समाजात तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली पण त्यावेळेसही रिटाची आई अटळ राहिली.
 
बिजॉन घोषच्या पुढील प्रत्येक नाटकांत रिटाचा रोल असायचा. त्या रोलला ती जीव तोडून आपल्या उपजत अभिनयाने न्याय द्यायची. तिच्या अनेक नाटकांत तिच्यासोबत काम केलेला पुरुष सहकलाकार सौमित्र सरकार याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. पण तो ते कधीही शब्दांनी व्यक्त करू शकला नाही आणि डोळ्यांची भाषा समजण्यात रिताशा कमी पडली. पण रिताशाच्या आईला हे समजलं होतं. ती एके दिवशी सौमित्राशी बोलली आणि रिताशाच्या मनात काय आहे हवं ती जाणून गजेईन असे तिने त्याला सांगितले, त्यासाठी तिने त्यांचेकडे काही काळ मागितला.

दरम्यान एके दिवशी मूळचे बंगाली आणि आता एक प्रसिद्ध बॉलिवूड दिगदर्शक रबिंद्र सरकार एका बंगाली पुस्तकावर आधारित बॉलिवूड चित्रपट बनवण्यासाठी काही बंगाली कलाकार निवडीसाठी बिजॉनला भेटले. त्यांची काही नाटके त्यांनी पहिली. त्यांनी रिताशाला आपल्या आगामी हिंदी चित्रपटासाठी कास्ट करायचे ठरवले आणि बिजॉन यांची परवानगी मागितली. बिजॉन यांनी प्रथम रिताशाचा कल तपासला. फक्त राज्यापुरता अभिनय मर्यादित न ठेवता पूर्ण देशाला आपले अभिनयगुण कळले पाहिजेत असे तिलाही वाटले आणि मग बिजॉय यांनी सुद्धा तिला थांबवले नाही. अर्थातच रिताशाच्या आईनेसुद्धा तिला परवानगी दिली. मुलीच्या सुखातच आपले सुख आहे असे तिने ठरवले होते. तिचे ग्रॅज्युएशन सुद्धा तोपर्यंत पूर्ण झाले होते. मग अशी अनुकूलता झाल्यावर रिताशाने चित्रपटांत जीव तोडून काम केले. तिची आईसुद्धा मुंबईत येऊन तिच्यासोबत राहिली.

रिताशाचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट "दास बावरा" सुपर डुपर हिट ठरला. अर्थात त्यात रिताशासोबत बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री "तरण्या अरोरा" सुद्धा होती. पण तरण्यासोबतच रिताशाचा अभिनयसुद्धा वाखाणला गेला.

समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून तिचे वारेमाप कौतुक झाले. मग तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने मग आपल्या आईलाच आपले मॅनेजर बनवले. दिगदर्शक, प्रोड्युसर यांना रिताशाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईनासा झाला.

रिताशाला न सांगताच परस्पर तिची आई तिला ऑफर झालेल्या काही भूमिका नाकारून टाके. कथेची गरज असली तरी काही किसिंग, बेड सिन चित्रपटांत असतील तर ते कापावे अथवा रिताशा चित्रपटांत काम करणार नाही असे तिची आई ठणकावून सांगायला लागली. कधीकधी ती शूटिंगच्या सेटवरही हजेरी लावायची. प्रथम रिताशाला हे योग्य वाटले पण नंतर तिला ऑफर येईनशा झाल्या तेव्हा बदलत्या जगानुसार आपणही बदलावे असे तिला वाटू लागले, ती आईशी वाद घालू लागली. सौमित्रबद्दल आईने सांगताच ती चिडली आणि त्याच्याशी लग्न करणार नाही असे तिने निक्षून सांगितले कारण बॉलिवूडचा एक मॅचो मॅन आणि ऍक्शन हिरो जॉनी डिसुझा तिच्या जीवनात आला होता. त्याचे अजून दोन तीनच चित्रपट आले होते आणि ते खूप जास्त सुपरहिट नव्हते पण फ्लॉपसुद्धा झाले नव्हते.

शेवटी रिताशापुढे आईने हार मानली आणि पोरीच्या सुखातच आपले सुख असे मानून तिला हवी ती मोकळीक दिली. पण तोपर्यंत तिच्या हातून अनेक चांगल्या भूमिका निघून गेल्या. एक दीड वर्षे ती रिकामी बसली.

मग एके दिवशी सुभाष भट यांनी तिला हॉरर चित्रपटाची ऑफर दिली ज्यात अनेक बेड ऐन, किसिंग सिन आणि खूप अंगप्रदर्शन करावे लागणार होते. रिताशाने कोणतीही अट न घालता होकार दिला. काही दिवस परदेशात शुटिंग होती. चित्रपटाचे नाव होते "जमीन का राज''. चित्रपट खूप सुपरहिट झाला.

काही समीक्षकांनी रिताशावर अंगप्रदर्शनाचा मार्ग स्वीकारल्याबद्दल टीकेची झोड उठवली आणि टीव्ही चॅनेल्सनी रिताशाचे चित्रपटातील हिरोबरोबर, पिंटो मोरिया बरोबर परदेशातील शुटिंगसाठीच्या वास्तव्यादरम्यान अफेअर असल्याच्या काल्पनिक बातम्या पसरवल्या. त्या इतक्या खऱ्या वाटल्या की रिताशा ने स्वतः त्याचे खंडन करूनही लोकांना आणि इंडस्ट्रीतील लोकांना ते अफेअर खरेच वाटले. याचा परिणाम म्हणून जॉनीने तिच्याशी ब्रेकप केला.

खरं तर नवखा हिरो पिंटो यानेच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी या अफवा पसरवल्या होत्या पण हे त्याने बेमालूमपणे केले आणि ते अजूनही कुणालाच कळले नाही. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली पण आईच्या मदतीने सावरली.

दरम्यान तिला एकाच साच्याच्या हॉरर चित्रपटातल्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या पण त्या स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. अर्थात ते चित्रपट हिट होत होते आणि ती समाधानी होती. जणू काही हॉरर चित्रपटांत तिची एकटीची एकाधिकारशाही झाली पण प्रत्येक चित्रपटांत तिचे अंगप्रदर्शन हटकून असायचे पण कालांतराने वय वाढत गेल्यावर तिच्या अभिनयात आणि अंगप्रदर्शनात तोचतोचपणा आला. तिचा हॉटनेस कमी झाला. दरम्यान तिची आई पुन्हा आपल्या घरी निघून गेली होती.
 
रिताशाला महागड्या लाईफस्टाईलची तोपर्यंत सवय झाली होती. जवळचे पैसे चैनीसाठी मुंबईत अपुरे पडू लागले. दर उन्हाळ्यात युरोप फिरून येण्याची सवय होती त्यासाठी आता पैसे कमी पडू लागले.

तशातच तिला कळले की एका सुमार दर्जाच्या टीव्ही स्टारला म्हणजे सोनी बनकरला सुभाष भटनी त्यांच्या आगामी चित्रपटांत घेतले. आता हक्काचे सुभाष भट सुद्धा दुरावले होते आणि हॉरर चित्रपटांची लाट थंडावली. कित्येक दिवस तिने आईला फोन केला नाही. ती डिप्रेशन मध्ये गेली. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली. एकदा कहर झाला. तिने एका रात्री नैराश्यापोटी झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्या पण योगायोगाने त्या दिवशी तिची आई तिच्याकडे आली आणि तिने तिला कोलकात्याला परत आणले...

हे सगळे आठवल्यावर तीला घाम आला. ती थरथर कापू लागली. तिला तहान लागली. फ्रिज मधून काचेच्या ग्लास मध्ये पाणी ओतत असतांना तिच्या डोक्यात विचारांचा गलका असह्य झाला आणि तिला डीप्रेशनचा सौम्य झटका आला. तिने ग्लास समोरच्या भिंतीवर भिरकावून दिला!!

ती मोठमोठ्याने म्हणत होती, "एक सुमार दर्जाची अभिनयशून्य नाचरी नालायक बाई, सटवी! सोनी बनकर! माझी जागा घेते? आणि तेही सुभाष भटच्या पिक्चर्स मध्ये?"

रायमा बोस, तिची आई जागी झाली आणि तिने लाईट लावला आणि तिच्याकडे धावत गेली तोपर्यंत रिताशाने तीन शोभेचे काचेचे फ्लॉवर पॉट जमिनीवर फेकून त्यांचा चुरा चुरा करून टाकला होता आणि आता तिच्या हातात भिंतीवरचे महागडे क्लॉक होते. ते क्लॉक तिने टीव्हीच्या दिशेने भिरकावले पण रायमा आडवी आली आणि ते क्लॉक जमिनीवर पडून फुटले. टीव्ही वाचला!

रायमाने तिला बळजबरीने खांद्याला पकडून ओढत नेले आणि पलंगावर बसवले.

"रिलॅक्स, बेबी! असे तोडफोड करून काहीच होणार नाही. शांत हो!"

"त्या सटवीला, सोनी बनकरला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."

"तिने तुझे काय बिघडवले आहे रिटा? तिला दोष देऊ नकोस!"

"तिने माझा हक्काचे काम हिरावले माझ्यापासून! माझे ''वलय'', माझे ग्लॅमर हिसकवले आहे तिने माझ्यापासून!"

"बेबी! हे तर चालायचंच या इंडस्ट्रीमध्ये! तिने ते काही मुद्दाम केलेले नाही हे तुला माहितेय! तिच्याकडे संधी आली आणि तिने ती स्वीकारली!"

"पण तिने माझी जागा घेतली त्याचे काय? नाही! मी तिला असं करू देणार नाही! ती मस्त पिक्चर करेन, यश चाखेन आणि मी इथे गाशा गुंडाळून स्वस्थपणे बसणार? मुळीच नाही!"

"अगं, मग तू करणार आहेस तरी काय?"

"मी परत मुंबईला जाणार!"

"अगं, तुझी हालत ठीक नाही. तिथे जाऊन काय करणार?"

"माझी हलत ठीक आहे! सगळं ठीक आहे. यापूर्वीही मी डिप्रेशनमधून सावरले होते! आतासुद्धा मी सावरले आहे नैराश्यातून! मी परत जाणार! काम शोधणार!"

"हे बघ बेबी! इथे कोलकात्याला पुन्हा तू थिएटर मध्ये काम करायला लाग!"

"नाही, मी बरी आहे! मी उद्याच पुन्हा मुंबईला जाणार!"

आईने लाख समजावले पण तिने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या वागणुकीत बदल जाणवत होता. ती जाणीवपूर्वक स्वतःला कंट्रोल करत होती आणि ही एक चांगली गोष्ट होती. तिने फ्लाइटचे तिकीट बुक केले आणि सामान बांधून ती तयारी करू लागली. तिच्या मनात नेमके काय चाललंय हे आज तिच्या आईला मुळीच समजत नव्हते शेवटी नाईलाजाने तिने परवानगी दिली.

मुंबईच्या विमानात बसल्यानंतर रिताशाच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आणि गूढ हसू उमटले. तिच्या मनात नेमके काय चाललंय हे फक्त तीच सांगू शकणार होती, पण कसलातरी गाढ निश्चय तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हे विमानातील तिच्या बाजूच्या सहप्रवाशाला जाणवलं हे नक्की
 
वलय - प्रकरण ३९

ऑस्ट्रेलियातील बोन्डी किंवा युकेतील बाऊनमाऊथ बिचवर जसे स्त्रियांना टॉपलेस व्हायला व्हायला परवानगी आहे तसे ब्राझील देशातल्या रिओ दि जनैरोच्या कोपाकबाना बीचवर परवानगी नाही. त्यादिवशी संध्याकाळी सूर्य मावळतीला असतांना कोपाकबाना बीचवर आलेल्या बहुतेक ब्राझीलियन किंवा इतर देशांतील पर्यटक स्त्रियांनी घातलेली बिकिनी ही आकाराने एवढी छोटी आणि तोकडी होती की त्या जवळपास न्यूडच वाटत होत्या. काही जणी पोहोण्यासाठी बिकिनी तर काहीजणी फक्त ऊन खाण्यासाठी नेहमीच्या वापरातील रंगीबेरंगी ब्रा आणि पँटी किंवा फक्त पँटी घालून तेथे आलेल्या होत्या. बहुतेक पुरुष मंडळी ब्रीफ घालून फिरत होते. अनेक स्त्रिया बिनधास्तपणे नियम झुगारून टॉपलेस होऊन फिरत होत्या आणि हे नियम बनवणाऱ्याना सुद्धा माहिती होतेच. या बीचवरील स्त्रियांपैकी अर्ध्या स्त्रिया या बहुतेक करून मॉडेल होत्या आणि असतातच. रिओला दक्षिण अमेरिकेचे पॅरिस म्हणतात ते उगाच नाही. त्या बीचवर नेहमीच या मॉडेल्स येत असतात. कधी कधी येथे सौदर्य स्पर्धा सुद्धा भरते. हॉलीवूड चित्रपटांत दिसणाऱ्या बिकिनीतील सुंदर आणि भरीव शरीरयष्टीच्या अभिनेत्रींपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर अशा हजारो स्त्रिया अगदी तिथे सहजच दृष्टीस पडत होत्या. स्थानिक पुरुषांच्या दृष्टीला असे उघड उघड मादक सौंदर्य बघणे अंगवळणी पडलेले असते पण भारतात राहणाऱ्या मंडळींना मात्र ते डोळे भरभरून बघतच बसावे असे वाटते.

असेच दोन भारतीय चेहरे काळा कोट, हातात ब्रिफकेस आणि चेहऱ्यावर गॉगल लावून झपाझप चालत किनाऱ्याकडे निघाले होते. बिचवरच्या टॉपलेस मॉडेल्सकडे बघून त्यांचे मन भरत नव्हते. किनाऱ्याजवळ आरामात पहुडलेल्या एका पिळदार शरीरयष्टीच्या माणसाकडे ते आले. तो माणूसही भारतीयच होता. ते दोन जण आल्याचे बघून तो अलर्ट झाला आणि जागेवरून उठून उभा राहिला, त्याने त्या दोघांशी हस्तांदोलन केले.

"हॅलो मिस्टर बाजवा अँड मिस्टर काजवा! केव्हा येणार आहे ती व्हेरोनिका सिसिली?"

"सर साहेब, ती येतच असेल. पंधरा मिनिटात पोचेल ती आपल्याकडे!"

मग ते तिघे जवळच्या चार पैकी तीन खुर्च्यांवर बसले. एक खुर्ची रिकामी होती. ती बहुदा त्या व्हेरोनिकासाठी असावी. तिघेही बराच वेळ बोलत होते आणि त्या बीचवर आलेल्या स्त्री पुरुषांकडे बघत होते.

पाच मिनिटातच व्हेरोनिका समोरच्या गर्दीतून वाट काढत येतांना दिसली. तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली होती. ती त्या तिघांच्या जवळ आली आणि तिघांनीही तिला उभे राहून शेक हँड केले. त्या तिघांमध्ये बराच वेळ काहीतरी बोलणे झाले आणि मग चौघे जवळच्या आराम खुर्च्यांवर बसले. ते बीचवरच्या स्त्री पुरुषांची लगबग बघत बसले.

व्हेरोनिका मग फोनवर कुणाशीतरी बोलली. ते दोघेजण नंतर निघून गेले. आता तिथे व्हेरोनिका आणि तो "सर साहेब" हे दोघेजण होते. ते दोघे बराच वेळ बोलत होते आणि गर्दीत कुणी त्यांचेकडे बघतय का असा मागोवा घेत होते.

मग, व्हेरोनिकाने सरसाहेबकडे हसून पाहिले, स्वत:ची ब्रा काढून टाकली आणि बाजूच्या एका टेबलावर ठेवली. आता ती संपूर्ण टॉपलेस झाली होती. मग इकडेतिकडे पाहिल्यावर ती सरसाहेबला बाय करून टॉपलेस अवस्थेत त्या बीचवरील गर्दीत निघून गेली. जातांना तिच्या नजरा सावधपणे इकडेतिकडे भिरभिरत होत्या. मग ती गर्दीत दिसेनासी झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अटलांटिको पेस्ताना या हॉटेल मध्ये सरसाहेब अंघोळ करून सोफ्यावर कुणाची तरी वाट बघत होता. बाजूला विमानप्रवासासाठी एक बॅग तयार दिसत होती. थोड्याच वेळात बेल वाजली आणि एक अतिशय सुंदर स्त्री आत आली. तिच्याकडे बघून ती युरोपिअन असावी असे वाटत होते. तिचे केस लालसर सोनेरी होते. चेहरा अतिशय बोलका आणि सुंदर होता. तिने हसून सरसाहेबकडे पाहिले. तिच्या हातात एक हँडबॅग होती. ते दोघे इंग्रजीत बोलू लागले.

"शाल वी गो?"

"एस, माय लव्ह! बट व्हेअर इज माय गिफ्ट?"

"गिफ्ट?", तो हसायला लागला, "हे काय! देतो थांब!"

त्याने बाजूला ठेवलेली काळ्या रंगाची ब्रा तिला दिली.

"वाव! मस्त आहे! पण माझ्या आधी तूच माझे गिफ्ट म्हणजे ती नवी कोरी ब्रा उघडून बघितलीस? एवढी घाई?", असे म्हणून तिने त्याचेकडे लाडाने बघितले.

तो डोळे मिचकावत म्हणाला, "मला उत्सुकता होती तू यात कशी दिसशील ते, म्हणून मी तू येण्याआधी थोडी कल्पनाशक्ती लढवत होतो!"

तिने मग तिचा टॉप त्याच्यासमोर काढला. ती आता टॉपलेस होती. त्याने तिला मिठी मारली आणि कुरवाळायला सुरुवात केली.

ती त्याची मिठी सोडवत म्हणाली, "नाही डियर! आता नाही. आता आपल्याला प्रवास करायचा आहे ना! हे आता नंतर! इंडियात गेल्यावर! आता मला तुझी गिफ्ट घालू दे ना!"

मग तो नाईलाजाने बाजूला झाला कारण त्याना लवकरच एयरपोर्टकडे निघणे जरुरी होते. तिने ती काळी ब्रा घातली आणि टॉप चढवला. ते दोघे हॉटेलचे चेकआउटचे सोपस्कार आटोपून निघाले.

थोड्याच वेळात सिक्युरिटी चेक झाल्यानंतर मग त्यांचे "एयर फ्रांस" चे विमान आकाशात उडाले.

भारतात आल्यावर विमानतळावरचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणाला, "वेलकम टू इंडिया! मिस्टर सूरज सिंग और मिस ऑलिव्हिया ब्रूनर!"
 
Back
Top