• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

वलय (कादंबरी)

  • Thread starter Thread starter StoryPublisher
  • Start date Start date
वलय - प्रकरण ४४

फ्रांको आणि व्हिटोरीओ दोघांनी एकमेकांना संपर्क साधल्यावर त्यांना कळले की अपघातात सुबोधचा मृत्यू झाला आहे. व्हिटोरीओने सुप्रियाच्या आई वडिलांना आणि सुबोधच्या आईला कॉल करून ही वाईट बातमी सांगितली. प्रसंग खूपच दु:खद होता. सुबोधची आई शुद्ध हरपून बसली. सुप्रियाच्या घरी सुद्धा वाईट हाल होते. दोघांचे नातेवाईक इटलीत यायला निघाले. ते येईपर्यंत सुप्रियाला धीर देण्याचे काम व्हिटोरीओ आणि त्याची पत्नी क्रिस्टीना यांनी केले. मृतदेहाचे तुकडे एकत्र करून तो घरी आणला गेला होता. दहशतवाद्यांना लवकरच पकडून शिक्षा करण्याचा निर्धार स्थानिक पोलिसांनी केला. मृतदेहाचे इटलीतच विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्याचे ठरवले गेले. सुप्रिया सतत स्फुंदून रडत होती. तिचे हाल बघवले जात नव्हते.

शेवटी तिचे मन वळवण्यासाठी व्हिटोरीओ इंग्रजीतून तिला म्हणाला, "हे बघ, ऐक! एक बातमी सांगतो तुला. तुला एका भव्य हॉलीवूडपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून काम मिळण्याची शक्यता आहे, गरज आहे फक्त तू एक ऑडीशन देण्याची!"

तिच्या चेहऱ्यावर खिन्नता आणि विषाद दर्शवणारी शून्य नजर होती. तिच्याकडून काहीएक प्रतिक्रिया आली नाही. तिने फक्त थोडेसे वळून व्हिटोरीओकडे पाहिले.

व्हिटोरीओने क्रिस्टिनाकडे पाहिले. ती म्हणाली,

"हे बघ सुप्रिया, जीवनात असे प्रसंग सांगून येत नाहीत. पण आपण अश्या प्रसंगाना सामोरे जायला शिकले पाहिजे!"

आता सुप्रियाच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसून आला.

"मी त्या दहशतवाद्यांना सोडणार नाही. मला त्या सगळ्यांना गोळ्या घालायच्या आहेत. तरच सुबोधला ती श्रद्धांजली ठरेल!"

क्रिस्टिना म्हणाली, "तुझा राग योग्य आहे, पण दहशतवाद्यांना शिक्षा करण्याचे काम तुझे नाही पोलिसांचे आहे!"

व्हिटोरीओ पुढे म्हणाला, "सुबोधची सुध्दा इच्छा तुला मनोरंजन क्षेत्रात खूप यश मिळावं हीच होती. तेव्हा तू या दुःखातून सावरून लवकरच या क्षेत्रात अधिकाधिक यश मिळवले तर ती खरी श्रद्धांजली ठरेल सुबोधला!"

क्रिस्टिनाने विनंती केली, "एकच कर की यापुढे सगळे निर्णय विचारपूर्वक घे. लगेच इटली सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नकोस. इथे एकटे वाटून घेऊ नकोस. आम्ही दोघे आहोत. आम्हाला तुझे फॅमिली मेंबर समज!"

दुसऱ्या दिवशी सगळे सोपस्कार आटोपल्या नंतर दहा दिवसांसाठी सुप्रिया भारतात गेली.

***

दरम्यान राजेशच्या आईने राजेशला कॉल केला.

"राजेश, फोन कट करू नको. मी काय सांगते ते ऐक. तूला बाळ होणार आहे. आणि सूनंदाच्या त्या काकूला मी लवकरच वठणीवर आणणार आहे. तिनेच तुझ्या बायकोच्या मनात विष पसरविण्याचे काम केले आहे. तिला सुनंदाची संपत्ती आपल्याला मिळाल्याचं सहन झालं नव्हतं म्हणून ती असे तुमच्या संसारात विष कालवण्याचे काम करत होती!"

पुढचं जास्त न ऐकता आपल्याला बाळ होणार या कल्पनेने राजेश सुखावला होता.

"आई, फार छान बातमी सांगितली, कधी आहे तारीख?"

"काही महिन्यातच!!"

"मग निघतो यायला पण सुनंदा, तिच्या मनातले गैरसमज?"

"मी जेव्हा तिच्याशी बोलले होते राजेश तेव्हा तिला पण तिची चूक वाटू लागली पण काकूच्या धाकाने ती तुला संपर्क करण्यास धजत नव्हती. शेवटी लहानपणाासूनच त्या नालायक काकुचा पगडा तिच्या मनावर होता..तू ये. ती नाही कसला गैरसमज करणार! आणि गावाला निघून येण्याआधी जे काही घडले ते तिने मला सांगितले आता त्याचं मात्र काय ते तू बघ बाबा, आधी ये तर घरी!"

राजेश स्वागतपुरीला जायला निघाला. त्याला वारंवार पडणाऱ्या त्याच त्याच स्वप्नांत लिफ्टमध्ये तो नाजूक हात कुणाचा होता ते आता त्याला कळून चुकले होते, तो होता बाळाचा!!

***

माया माथूर जॉगिंगला गेली. सकाळच्या सहा वाजेच्या फ्रेश हवेत जॉगिंग केले तर बॉडी अर्थातच फिट राहणार होती. गेले तीन महीने तिने आराम करायचे ठरवले होते. अजून तिच्याकडे एकाही नवीन चित्रपटाची ऑफर नव्हती.

"माया म‌‍ॅडम!" कुणीतरी आवाज दिला होता.

"एक्स क्यूज मी, तुमच्या मागे बघा!"

"आय डोन्ट नो यू, कोण तुम्ही!"

"मी सूरज सिंग. म्हटलं तुमच्याशी बोलायला ही सकाळची वेळच योग्य होईल, एरवी जरी सध्या चित्रपट आणि शूटिंग नसली तरी तुम्ही डान्स क्लासेस घेतात त्यामुळे बिझी असता."

"पण तुम्ही आहात कोण मिस्टर, सॉरी मी तुम्हाला ओळखले नाही. जन्टलमन तर दिसता पण तुम्हाला साधा शिष्टाचार माहीत नाही की अनोळखी महिलेशी बोलता तर बोलता, आणि विचारून सुद्धा ओळख सांगत नाहीत!"

थोडासा अंधार होता पण हळूहळू उन्हाची तिरीप चेहऱ्यावर पडल्यावर अचानक मायाला काहीतरी आठवले, "एक मिनिट, एक मिनिट, मी ओळखलं तुम्हाला! टीव्ही अॅक्टर रागिणी राठोडचे पती! आय फील सॉरी फॉर युवर गर्लफ्रेंड! आय थिंक यू आर एन ओनर ऑफ ए फुड चेन! डी. पी. सिंगचे पुत्र ना तुम्ही?"

सूरजने चेहरा गंभीर केला.

"चला बाजूला बाकड्यावर बसूया!" सूरज म्हणाला.

बाकड्यावर:
 
"माझ्या जीवनातल्या त्या घटना मला विसरायच्या आहेत. पत्रकाराने टीव्हीवर रागिणीच्या पूर्वायुष्यातल्या घटना उघड केल्याने तिने फार मनाला लावून घेतले होते, मी तिला सपोर्ट केला पण तिने .... !" असे म्हणून तो थोडा गंभीर झाला आणि पुढे बोलू लागला, "काही कारणास्तव मी आता डी. पी. सिंग सोबत राहत नाही. पण सोडा त्या सगळ्या गोष्टी आणि मी तुमच्याकडे कशाकरता आलोय ते सांगतो! मी चित्रपट निर्मिती सुरू केलीय हे तुम्हाला माहीत असेलच, तेव्हा माझ्या चित्रपटात तुम्ही काम करावं अशी माझी इच्छा आहे, पण चित्रपटात लीड अॅक्टर मात्र नवीन आहे, आणि आपल्या देशातला नाही पण इंडियन ओरिजिन आहे."

थोडा विचार करून माया म्हणाली, "मला वाटते थोडी घाई होतेय. मला इतर सगळे डिटेल पण हवेत, लीड अॅक्टर कोण आहे काय आहे हे सगळं बघावं लागेल नाही का! तुम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या ऑफिस मध्ये सगळे डिटेल्स घेऊन या, मग बघुया!"

सूरज बागेतून परत गाडीत बसत असतांना थोडा चिंताग्रस्त दिसत होता. हिने ऐकलं नाही तर? मग तिला राजी करायला दुसरा पर्याय वापरायची वेळ तर नाही ना येणार? बघूया!" असे म्हणून तो गाडी वेगाने पळवू लागला.

नंतर एके दिवशी सूरजने मायाच्या ऑफिसमध्ये तिला त्याच्या विनोदी पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटाची कथा ऐकवली जी स्वत: त्याच्या "भाईने" सांगितली होती. मायाला काही ती कल्पना पसंत पडली नाही! तसेच अशा अप्रकार्च्या नवख्या हिरोबद्दल ती काम करायला तयार नव्हती. तिने नकार कळवला.

सूरज अस्वस्थ झाला. तिकडे दुबईहून भाईचा अभिनयशून्य "चचेरा भाई" माया माथुर सोबतच चित्रपटात येण्यासाठी अडून बसला होता आणि भाई त्याचेसाठी काहीही करायला तयार होता कारण चचेरा भाईने त्या भाईच्या ड्रग्ज बिझिनेस मध्ये भाईला खूप मदत केली होती. आणि इकडे सूरजने जर भाईचे ऐकले नाही तर त्याच्या धंद्याला आणि पर्यायाने एकूणच त्याला मिळणाऱ्या अमाप संपत्तीला आणि त्याद्वारे मिळणाऱ्या विविध सुंदर स्त्रियांना मुकावे लागणार होते. माय माथूर...? काय करू तुला राजी करण्यासाठी?

***

सोनी बनकर आणि भूषण ग्रोवर यांचा साखरपुडा पार पडला. अनेक वर्तमानपत्रे आणि बॉलीवूड न्यूज चॅनल्सनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली. राजेशने विणा वाटवे आणि सारंग सोमय्याला त्या इव्हेंटचे कव्हरेज करायला सांगितले होते.

भूषण ग्रोवरला बॉलीवूड अभिनेत्री रिताशासोबत टीव्ही सिरीयलची ऑफर आल्याने तो खूश होताच पण सोनी सुध्दा दुप्पट खुश होती. एकंदरीत दोघांचे टिव्ही इंडस्ट्रीत बरे चालले होते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले होते म्हणून त्यांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला होता आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार होते. रिताशाही त्या साखरपुड्याला आवर्जून हजर होती. "डर की दहशत" ही सिरियल सुरू झाली होती आणि त्यात रिताशा भूषण यांची प्रमुख भूमिका होती. सिरियल पुन्हा चालायला लागली. लोकांमध्ये लोकप्रिय व्हायला लागली आणि सोनीची पण सुभाष भटच्या चित्रपटाची शूटिंग जवळपास संपली होती.

रिताशा आता त्या दोघांचे लग्न होण्याची वाट बघत होती. साखरपुड्याला रिताशाने त्या दोघांना भेट दिलेला एक आकर्षक आणि महाग ताजमहाल रात्री त्यांनी पॅकेज मधून उघडला तर टेबलवर ठेवताच त्याचे आपोआप दोन तुकडे झाले. दोघानाही आश्चर्य वाटले आणि थोडी चिंताही वाटली कारण हा एक प्रकारचा अपशकुन होता का? पण कदाचित अनेक हातांनी हाताळला गेल्याने तो तुटला असावा असे समजून त्यांनी तो फेकून देण्याचे ठरवले. मुद्दाम टीचलेला ताजमहाल रिताशने पॅक करून दिला होता आणि तो उघडताच दोघांचा चेहरा कसा झाला असेल हे आठवून ती गालातल्या गालात घरी रात्री हसत होती.

लवकरच त्या दोघांचे लग्न झाले. सिरियल अजूनही चॅनलच्या टॉप लिस्टवर होती. हनीमूनसाठी स्विसला जातांनाचे, गेल्यानंतरचे, सकाळी झोपेतून उठल्यावरचे, खातांना, पितांना, नाचताना, गातांना, बर्फ खेळताना, ट्रेनमध्ये एकमेकांचा किस घेतांना असे सगळे फोटो म्हणजे सेल्फी त्या दोघांनी फोटोग्राम, फ्रेंडबुक, चॅटर या सोशल साईट्स वर शेअर केले. फक्त रात्रीचे प्रायव्हेट क्षण सोडून!! रिताशा हे सगळे फॉलो करत होती. तिला त्यांची आयती खबर मिळत होती. सोनी ऐवजी फोटोत मी असेन, हा माझा पक्का निर्धार आहे असे म्हणून तिने रागाने एक फ्लावर पॉट जमीनीवर आदळला.

दोघेही हनिमूनहून परत आल्यावर काही दिवसानंतर:

रितशाने डी. पी. सिंग यांना एक सल्ला दिला की आता सिरियलची शूटिंग आपण युरोपात केल्यास प्रेक्षकवर्ग अजून वाढेल. युरोप मध्ये रहात असलेले भारतीय आणि त्यांचे स्थानिक मित्र यांना तिथे आलेले भूतांचे अनुभव आपण युरोप टूरच्या सिझन मध्ये दाखवू. तेथील स्थानिक कलाकारांना सुध्दा सामील करून घेऊ. त्यांना कल्पना पसंत पडली. मग लवकरच युरोपात जाऊन लेखकांची टीम काम करायला लागली. हा हेतू होताच पण सिरियल भारताबाहेर घेऊन जाण्याचा मूळ हेतू रिताशाचा हा होता की त्याच दरम्यान सोनी बनकरला एका डान्स रियालिटी शो मध्ये तीन पैकी एक जज्ज म्हणून संधी मिळाली, म्हणजे ती युरोपात भूषण सोबत येऊ शकणार नव्हती!
 
स्टोरी वाचल्या बद्दल आभारी आहे
 
वलय - प्रकरण ४५

टीव्हीवर राजेशचा एक प्रोग्राम टेलिकास्ट होत होता. त्याची शूटिंग आधीच झालेली होती आणि आता तो फक्त टेलिकास्ट होत होता आणि पब्लिक डिमांड मुळे हा शो आज बहुतेक सगळ्या प्रमुख प्रायव्हेट आणि दूरदर्शन चॅनल्स वर प्रसारित करण्यात येत होता. अमितजी सुद्धा आवडीने हा कार्यक्रम बघत होते.

"आजचा आपला विषय आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि टिव्ही क्षेत्रापुढील विविध आव्हाने. आज कधी नव्हे एवढी चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा होते आहे पण त्याचबरोबर विविध मार्गांनी चित्रपटांची सेन्सॉरशिप पण वाढली आहे!"

स्टेजवर साऊथ, मराठी, हिंदी तसेच इतर अनेक चित्रपट सृष्टीतील आघाडीचे तसेच नवखे प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्स आणि काही सुपरस्टार हिरो हिरोईन बसलेले होते, आणि नेहमीप्रमाणेच ऑडीयंस मध्ये सामान्य सिनेप्रेमी माणसे, तसेच बॉलीवूड मधील पडद्यामागे काम करणारे कलाकार तसेच त्यांचे नातेवाईक व इतर मंडळी बसले होते.

एक निर्माता म्हणाला, "हे एक आव्हान आहेच. सिगारेट पिताना दाखवलं तर सिगारेट हानिकारक अशी सूचना दाखवा, दारुसाठी तेच! प्राणी असल्यास त्याच्या जीविताला हानी पोहोचवली नाही हे दाखवा, शिव्या चालत नाहीत, पण खून मारामारी, हे सगळं चालतं. प्राण्यांना हानी पोचवली तर चालत नाही पण येथे स्टंटमेन स्टंट सिन करताना बरेचदा मृत्यूमुखी पडतात त्याचे काही सोयरसुतक नाही!"

दुसरा एक निर्माता म्हणतो, "जितकी बंधनं जास्त होत गेली तेवढे जास्त स्वातंत्र्य चित्रपटात घेण्यात येऊ लागले. कुठल्यातरी आडमार्गाने चित्रपट सेन्सॉर कडून मंजूर करून घेणं किंवा ए चित्रपटाला यू ए सर्टिफिकेट लाच देऊन मिळवणं हे सुरु झालं. तसं पाहिलं तर ए आणि यू ए चित्रपटां मध्ये आता सीमारेषा नाहीशी झाली आहे किंवा पुसट झाली आहे. टीव्हीवर सुध्दा आता सेन्सॉर सर्टिफिकट बंधनकारक करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. अशाने आधीच हॉलिवूडशी स्पर्धा करण्यासाठी म्हणून खर्चिक झालेली भारतीय चित्रपटनिर्मिती अशा सेन्सॉरशिप मुळे धोक्यात आली आहे. सेन्सॉर बोर्ड कमी आहे की काय म्हणून आता विविध संघटना सुध्दा जाळपोळ करतात, धमकी देतात. बायोपिक काढला तर त्यांचे वंशज धमक्या देतात, पण एका अर्थाने बायोपिक काढताना निर्मात्यांनी भान ठेवलेच पाहिजे कारण तथाकथित व्यक्ती ज्याच्यावर बयोपिक निघतोय त्यांच्या बद्दल खरेच दाखवले गेले पाहिजे आणि शक्यतो वादग्रस्त भाग टाळला पाहिजे."

राजेश म्हणाला, "आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सेन्सॉर बोर्ड अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीजण सेन्सॉर बोर्डाची मुस्कटदाबी करत आहेत तेच कळेनासं झालंय. मुळात हे दोघे एकाच बाजूला आहेत की विरुद्ध बाजूला तेच समजत नाही!"

एक मराठी निर्माता म्हणाला, "तुझे म्हणजे अंशत: बरोबर आहे आणि त्यात भरीस भर म्हणून पायरसी वाढली आहे. आजकाल लोक चित्रपटाची पायरेटेड कॉपी मोबाईलवर, लॅपटॉपवर बघणे पसंत करतात, थिएटरमध्ये कुणी येत नाही!"

एक कसलेला अभिनय सम्राट तरुण अभिनेता म्हणाला, "पण मल्टिप्लेक्स थिएटरचे दर किती वाढले आहेत हो! त्यामुळे सामान्य माणूस जातच नाही चित्रपट बघायला, आणि आजकाल मनोरंजनासाठी घरी स्वस्तात कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत, पूर्वी असे नव्हते म्हणून थियटर मध्ये पिक्चर गोल्डन जुबिली साजरे करायचे. आजकालच्या पिढीला हे माहितीसुद्धा नाही!"

दुसरी एक अभिनेत्री म्हणाली, "पायरसी रोखू शकत नाही म्हणून मल्टिप्लेक्सला पहिल्या एक दोन आठवड्यात कमावून घ्यायला लागते म्हणून तिकिटांचे दर वाढवले आहेत असे म्हणायचे की मल्टिप्लेक्सचे दर जास्त असल्याने पायरसी वाढली आहे असे म्हणायचे? अंडे आधी की कोंबडे असा हा सवाल आहे!"

आणखी एक अभिनेता म्हणाला, "काहीही असले तरीही पायरसीचे समर्थन करता येणार नाही. उलट आजकाल दोन तीन आठवडे चित्रपट चालल्यानंतर दोन चार महिन्यांच्या आत टीव्हीवर येतोच ना! तरीही पायरसी चालूच आहे. ती रोखण्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी पण मुळात सर्वप्रथम कॉपी कधी आणि कुठे होते ते आपण शोधू शकत नाही मग शिक्षा नेमकी कुणाला करणार?"

राजेश म्हणाला, "हो, तो मोठा गहन प्रश्न आहे. बनावट सीडी विक्रेत्यांना अटक करून फारसे काही होणार नाही!"

राजेश पुढे सांगू लागला, "आजकाल चित्रपटसृष्टीच नाही तर लेखनक्षेत्रात सुध्दा पायरसी वाढली आहे, बनावट पुस्तके सर्रास रस्त्यांवर विकत मिळतात आणि त्यात भरीस भर म्हणून काही डायरेक्टर लोकं लेखकांच्या कथेची सर्रास चोरी करतात, पण असो तो विषय वेगळा आहे आणि या आधी चर्चिला गेला आहे!"
 
एक निर्माता म्हणाला, "मग कधीतरी बॉलीवूड मंदीतून सावरायला सेक्सचा आधार घेते असे आढळून येते. सेक्सवर आधारित कथा हा चित्रपट चालण्याचा हुकुमी एक्का मनाला जातो! यात इन्व्हेस्टमेंट कमी असते आणि रिटर्न्स बऱ्यापैकी मिळतात, निदान नुकसान होण्याची शक्यता कमी असते नाही का?"

प्रेक्षकांतला एकजण म्हणाला, "पण एकूणच समाजमनावर याचा परिणाम काय होतो याचा कुणीही निर्माता, लेखक, निर्देशक विचार करतांना दिसत नाही!

राजेश, "ते ही काही अंशी खरे आहे, पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे ही लक्षात घ्या. तर आपण एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीसमोरील आव्हाने याबद्दल चर्चा करत होतो. चुकीची सेन्सॉरशिप किंवा वैयक्तिक आकसापोटी किंवा राजकीय हेतूने प्रेरित अशी लादली गेलेली सेन्सॉरशिप, पायरसी आणि अजून कोणती आव्हाने आहेत, सांगा बरे?"

दुसरा एक प्रेक्षक म्हणाला, "आजकाल टीव्हीवर एक ट्रेंड दिसतो. एखादी सिरीयल वर्षानुवर्षे चालते आणि मग अचानक काहीतरी कारण देऊन निर्माते ती अचानक बंद करतात. ही तर प्रेक्षकांची शुद्ध फसवणूक आहे. याची दाद कुठे मागता येईल का? वर्षानुवर्षे सिरीयल रोज रोज बघून अचानक मधूनच ती बंद केल्यास प्रेक्षकांनी आतापर्यंत सिरीयल बघायला दिलेल्या वेळ हा वाया गेल्यासारखा नाही का?"

राजेश म्हणाला, "हा मुद्दा बरोबर आहे. कुणी सिरीयल विरोधात तक्रार केली असेल आणि कोर्टाने तसा सिरीयल बंद करायचा आदेश दिला असेल तर तो भाग वेगळा पण निर्मात्यांच्या लहरीखातर सिरीयल बंद करणे हा मात्र अन्याय आहे. याबाबत कन्झुमर कोर्टात दाद मागता यायलाच हवी!"

प्रेक्षकांतला आणखी एकजण म्हणाला: "राजेश मला असे वाटते की कास्टींग काऊच हा आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मोठ्ठा कलंक मोठ्ठा डाग आहे, आजही ते चालते हे सत्य नाकारून चालणार नाही! आणि आपल्या मॅडम अॅकॅडमी आणि त्यासारख्या संस्थांमध्ये पण आजकाल भ्रष्टाचार वाढलाय असे ऐकिवात आहे, अभिनय शिकविणाऱ्या अशा प्रकारच्या अनेक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतोय असे नाही का वाटत?"

राजेश म्हणाला, "प्रत्येक क्षेत्रात बऱ्यावाईट गोष्टी असतातच, त्यामुळे आपण मिळून वाईट गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करू म्हणजे लोकांचे या क्षेत्राबद्दल गैरसमज दूर होतील. मी याबद्दल सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांची मदत घेणार आहे. त्यांनीही या चर्चेत सहभागी होण्याबद्दल मी विनंती केली होती पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. कास्टींग काऊच बद्दल माझेकडे बॉलीवूड मधील काही तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींविरोधात पुरावे सुध्दा आहेत, स्टिंग ऑपरेशनमध्ये ते अडकले आणि पुरावे हाती आले, योग्य वेळ आली की ते जगासमोर मी आणणार!"

हा कार्यक्रम टीव्हीवर बघत असताना राजेश त्याच्या छोट्याशा बाळाशी खेळत होता आणि पिकेचा संताप होत होता. त्याने राजेशला कॉल केला, "राजेश, विणा वाटवेने मला सांगितल्या प्रमाणे तुम्ही लोकं माझ्या वडिलांचे काळे कारनामे पब्लिक समोर आणणार नव्हता फक्त माझ्यासाठी, माझ्या विनंतीवरून! माझ्या कथा चोरून तुम्ही आमचा बदला घेतला, फिट्टम फाट झाले आता मला वाटते तुम्ही थांबावे, वडिलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे!"

राजेशने त्याला खोटा दिलासा दिला, "काळजी करू नको पिके, ते मी प्रोग्राम मध्ये सहज म्हणालो पण मी तसे करणार नाही! माझ्यावर विश्वास ठेव!"

राजेश मनात म्हणाला, "बेटा पिके, कथाचोरीचा गुन्हा तर तुझ्या बापाने केला आहेच पण, चित्रपटांत काम देण्याच्या आमिषाने फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केलेल्या मुलींबद्दल काय? केकेला एक्स्पोज केल्याशिवाय तक्रार दाखल करायला त्या पुढे येणार नाहीत. जरी त्या गोष्टीला अनेक वर्षे लोटली तरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यांनी स्वखुशीने केकेला शोषण करू दिले त्यांच्या बद्दल काय बोलणार? पण ज्यांच्या मनाविरुध्द शोषण केले होते त्यांचे काय?"
 
स्टोरी वाचल्या बद्दल आपला आभारी आहे
 
वलय - प्रकरण ४६

माया माथुरचे पती सुशांत माथुर हे एक नावाजलेले डॉक्टर होते आणि त्यांनी स्वत: उभारलेल्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये ते नेहमी बिझी रहात. त्यांनी आजवर अनेक गरीब रुग्णांना मोफत किंवा अगदी कमी खर्चात ऑपरेशन आणि औषधसेवा दिली होती. डॉक्टरी पेशाचा कधीही त्यांनी दुरुपयोग केला नव्हता आणि माया माथुर एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने दोघांच्या आयुष्यात खूप पैसा, प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळाला होता. सौंदर्य, अभिनय आणि नृत्य या तीन गोष्टींच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीची अनेक वर्षे गाजवली होती. सध्या तिच्याकडे चित्रपट नव्हते पण ती डान्स क्लासेस घेत होती.

त्या दिवशी सहावीत शिकत असलेली माया माथूरची जुळी मुले घरी आली. दप्तर बेडवर फेकून ती दोघे ओरडत म्हणाली, "मम्मा, उद्या सुट्टी आहे. टुडे वी फिनिश्ड अवर क्राफ्ट प्रोजेक्ट. वी विल नॉट डू होमवर्क टुडे. वी आर गोइंग तो प्ले इन द गर्दन डाऊन!" असे म्हणून दोघांनी फ्रीजमधून ब्रेड आणि जाम काढले आणि मम्माला म्हणाले, "आम्हाला ब्रेड जाम आणि दूध दे मम्मा, मग आम्ही खेळायला जातो, पटकन दे! भूक लागली आहे!", असे म्हणून दोघेही टीव्ही लाऊन सोफ्यावर बसले.

दोघांची खाण्यापिण्याची आवड जवळपास सारखीच होती. एकाचे नाव अरुण आणि दुसरा वरूण.

"अरे बाबांनो, खायची घाई, खातांना टीव्ही पण पाहिजे, लगेच खेळायला जायची सुद्धा घाई? अरे दप्तरातून सकाळचा टिफिन आणि पाण्याची बाटली तर काढाल की नाही, की ते पण मीच काढू?" असे म्हणून ती प्रथम त्यांच्या दप्तराकडे गेली तेवढ्यात दोघे पुन्हा ओरडले, "आई प्रथम दूध जाम ब्रेड मग आमचा टिफिन नंतर काढ दप्तरातून!"

शेवटी तिने दप्तराचा नाद सोडला आणि ब्रेड जाम आणि दूध बोर्नव्हीटा करायला घेतले.

"चला, जा बेसिन मध्ये हात धुवून घ्या बरं आधी! चला उठा!" असे म्हणून तिने जबरदस्तीने त्यांना सोफ्यावरून उठवले आणि हात धुवायला पिटाळले.

अर्धा तास डोरेमोन आणि शिनचान बघता बघता दूध ब्रेड जाम खाऊन झाल्यावर मग ते दोघे खाली पळाले. लिफ्टमध्ये लिफ्ट अटेंडंट असल्याने तसे ते दोघे सातव्या मजल्यावरून खाली बागीच्याकडे जाऊ शकत होते. थोड्याच वेळात खिडकीसमोरच्या बगिच्या ते दोघे त्यांच्या मित्रांसोबत लपाछपी पळापळी खेळायला सुद्धा लागले होते. त्या दोघांना मुक्तपणे खेळताना पाहून मायाला इतर कशापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांचे टिफिन दप्तरातून काढतांना अचानक एक चिठ्ठी खाली पडली. ती मायाने उचलली! दप्तरात ही कोणती चिठ्ठी असे म्हणून ती चिठ्ठी उलगडतांना विचार करू लागली, "शाळेने एखादी सूचना पालकांसाठी लिहून दिली असावी!"

चिठ्ठी प्रिंटेड होती आणि लाल अक्षरात होती, ज्यामुळे माया जरा घाबरलीच.

"घाबरलात ना? मुलांच्या दप्तरात ही चिठ्ठी अचानक कशी आली ते बघून? तुमची दोन्ही मुले ज्या नावाजलेल्या शाळेत जातात त्यात इतकी सुपर सिक्योरिटी असूनही ही चिठ्ठी आम्ही मुलांच्या दप्तरात टाकू शकलो तेही त्यांच्या नकळत तर आम्ही त्यांना किडनॅप पण सफाईदारपणे करू शकतो! अ अ अ! पूर्ण वाचा आणि पोलिसांना किंवा तुमच्या डॉक्टर पतीला यातले काही एक सांगण्याचा विचार चुकुनसुद्धा मनात आणू नका! आता दुसऱ्या दप्तरातली चिठ्ठी वाचा!"

फुल एसीमध्ये चेहऱ्यावर घाम जमा होऊन माया थरथरायला लागली आणि तिने खिडकीतून खाली पहिले. मुले दृष्टीस पडली नाहीत. ती खूपच घाबरली आणि तिने आणखीन डोकावून पाहिले तेव्हा तिला अरुण घसरगुंडीहून सरकतांना आणि वरूण उंचच उंच झोके घेतांना दिसला. मेन गेट जवळ सिक्योरिटी गार्डस होते, मग तिला हायसे वाटले.

नोबिता घरातून गायब झाल्याने चिंता करत असलेली त्याची आई डोरेमोनला विनंती करते की कोणतेतरी गॅजेट काढ ज्याद्वारे तो नोबिताला शोधू शकेल, असे दृश्य टीव्हीवर सुरु असलेले पाहून तिने पटकन टीव्ही बंद केला आणि दुसरे दप्तर घेऊन त्यात तिने चिठ्ठी शोधली. त्यात लिहिले होते:

"सूरज तुमच्याकडे विनंती करण्याकरिता आला होता, तुम्ही त्याला नाही बोलला. तो तर फक्त आमचा मोहरा आहे. त्याला तुम्ही नाकारलेत, पण आमच्यापासून तुम्ही वाचू शकणार नाहीत. तुमच्या मुलांची सुरक्षितता हवी असेल तर सूरजच्या चित्रपटाला फटक्यात हो म्हणा! आमच्या भाईचा भाई त्यात काम करणार आणि माया माथुर त्याला नाही म्हणणार? भाईला सहन होईल का ते? सांगा बरं? तुमचे खूप भले आहे मॅडम असे करण्यात! काय मग फोन करून सांगता ना आताच सूरजला? दोन्ही चिठ्ठ्या मस्तपैकी जाळून टाका आता. खूप भलं होईल तुमचं असं केल्यावर!!"

घामाने डबडबलेल्या चेह्र्यासह ती मटकन खुर्चीवर बसली. पाणी पिता पिता ती विचार करू लागली, त्या चिठ्ठ्या जाळून टाकायच्या का? की कुठेतरी लपवून ठेऊ? सुश ला सांगू की नको? तो म्हणेल सोडून दे ही मनोरंजन नगरी! बास आणि बासरी दोन्हीही राहणार नाहीत. पण सोडून दिली समजा ही चित्रपटसृष्टी तरी माझ्यामागचे वलय कायम राहणार! आणि आता सोडण्याचा विचार केला तरी काय होणार? हा चित्रपट करावाच लागणार असं दिसतंय आणि समजा मी चित्रपट केला तरी काय हरकत आहे? प्रथम हो तर म्हणूया, शुटींग सुरु करुया मग बघू काय करायचे ते?

खिडकीतून हाका मारून तिने दोघाना वर बोलाऊन घेतले आणि त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु केला जसे –

"बेटा, तुला शाळा सुटल्यावर कुणी अंकल भेटले होते का?"

"बसमध्ये चढतांना कुणी भेटलं होतं का?"

"रस्त्यात कुणी..?"

सगळ्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आले.

"का विचारते आहेस मम्मी आम्हाला असे?"

"काही नाही आपलं सहज रे! अनोळखी लोकांना भेटत जाऊ नका रे! चांगले नसतात बरे!" असे सांगून तिने विषय बदलून टाकला.

म्हणजे ज्यांनी दोघांच्या दप्तरात नकळत चिठ्ठ्या ठेवल्या ते सराईत गुन्हेगार असावेत. अशांच्या विरोधात जाण्यापेक्षा सध्या त्यांची मागणी पूर्ण करणे हाच उपाय आहे. चित्रपटात काम करा अशीच अपेक्षा ते करत आहेत दुसरे तर काही ते मागत नाहीएत, बघुया! आता हो म्हणूया मग पाहू! पण तिच्या मनात सूरजला भेटल्यापासूनच शंकेची पाल चुकचुकतच होती. कारण फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच जणांना रागिणीची आत्महत्या मान्य नव्हती, त्याना तो खूनच वाटायचा. शंकेला वाव होता. मायाला सुद्धा रागिणीच्या आत्महत्येमागे काहीतरी गौडबंगाल आहे असे वाटत होतेच. पण कुणाजवळ पुरावा नव्हता आणि कोर्ट पुरावा मागतं. जसा एखाद्या माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन हवा असतो तसा जज्जला न्याय देण्यासाठी पुरावा हवा असतो. काय करणार? जज्ज हा सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय देऊ शकतो!

सूरजला मायाकडून फोनवर गुड न्यूज मिळाली की ती त्याच्या कॉमेडी चित्रपटात काम करणार!

सूरज खुश होऊन मनात म्हणाला, "चला बरे झाले! पुन्हा व्हेरोनिकाला भेटायला जायला आता मी मोकळा आणि टेन्शन फ्री!"

कातील खान आणि माया माथूरचा तो विनोदी चित्रपट – "गँगस्टर की दुल्हन!" सुपरहिट झाला. त्यात ओलिव्हियाला त्याने महत्वाची भूमिका देऊ केली होती. त्या चित्रपटानंतर कातील खान भारतात राहायला येऊन त्याने मुंबईतच बांद्रयाला तळ ठोकला, भाईच्या कृपेने कमी किमतीत समुद्रकिनारी फ्लॅट मिळवला. माया माथुरच्या चित्रपटानिमित्त लाभलेल्या सहवासातच तो सध्या खुश होता. दरम्यान सूरजचे ड्रग्ज कनेक्शन वाढत गेले आणि त्याचे विनोदी चित्रपट सुद्धा सुपरहिट होत गेले. त्याचे ओलोव्हीया आणि व्हेरोनिका सोबत प्रेमसंबंध अव्याहतपणे चालत राहिले. आणि प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला तो "माझे प्रिय प्रेम रागिणी, तुला हा चित्रपट समर्पित" असे वाक्य टाकायचा!
 
वलय - प्रकरण ४७

रिताशा युरोपच्या टूरवर सगळ्या टीम सोबत खूश होती. सोनी भारतात डान्स शोच्या जज्जच्या भूमिकेत खूश होती आणि त्यात ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन पण करत होती. इकडे भूषण ग्रोवर लग्न, हनिमून आणि करीयर मार्गी लागल्या बद्दल खूश होता पण रिताशाच्या मनात काय चालले आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. आता तर अशी स्थिती होती की जवळपास युरोप टूरची अघोषित सिरियल डायरेक्टर तीच झाली होती. डिपी सिंग सुध्दा खूश होते कारण त्यांच्या मागचे काम कमी झाले होते आणि त्यांचे करीयर पुन्हा मार्गी लागले होते.

आयर्लंड सरकारची परवानगी घेऊन त्यांच्या टीमचा मुक्काम सध्या मॉलवरिन या भूत बाधित कॅसलच्या जवळ असलेल्या हॉटेल मध्ये होता. आसपासचे लोकं सांगायचे की या किल्ल्यात एका पहारेकरीला त्याच्या राजाच्या पत्नीसोबत संबंध ठेवल्याच्या खोट्या आरोपाखाली मृत्यूदंड दिला गेला होता पण फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि प्राण जाई जाई पर्यंत तो म्हणे ओरडत होता की तो निर्दोष आहे. त्याची आरोळी त्यावेळेस फाशी देताना ज्या लोकांनी ऐकली होती त्यापैकी काही जण वेडे झाले, काहीजण पाच दिवसात मेले तर काहीजण म्हणे बेपत्ता झाले. आजही म्हणे तेथे तसा त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो की मी निर्दोष आहे.

संध्याकाळी पाच नंतर तेथे जायला बंदी असते. त्यांची टीम सगळी शूटिंग दिवसा करायची आणि नंतर स्पेशल इफेक्ट द्वारे दिवसाचे सिन रात्रीचे वाटतील असे त्यात बदल करायचे.

त्या दिवशी शूटिंग अर्ध्या दिवसात संपली होती. सहज म्हणून जवळपास फिरण्यासाठी रिताशाने भूषणला विनंती केली. तो तयार झाला. थोड्याच वेळात पाऊस येईल अशा प्रकारे मोबाईलवर हवामानाचा अंदाज पाहिल्यावर तिने मुद्दाम त्याला फिरायला चालण्याची विनंती केली. नंतर ती म्हणाली, "चल भूषण, जरा सिटी फिरून येऊ! परवा आपल्याला येथून निघायचे आहे, आज वेळ मिळाला आहे तर जवळपास जाण्यापेक्षा सिटी मध्ये मिड टाऊन मॉलमध्ये फिरून येऊ!"

भूषण हो म्हणाला कारण त्यालाही हॉटेलच्या रूमवर बसून बोअर होणार होते आणि मिड टाऊन मॉल मधून सोनीसाठी काहीतरी विकत घेता येईल असा विचार करून तो तिच्यासोबत निघाला. भूषणने सोनीला कॉल लावला पण ती शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने फोनवर उपलब्ध नव्हती.

काही अंतर मॉलमध्ये चालल्यानंतर अचानक एक मोठा आवाज आला आणि पळापळ सुरु झाली. त्यामुळे ती संधी साधून दचकल्यासारखे करून रिताशाने भूषणच्या थोडे जवळ सरकत त्याचा तळहात धरला आणि तिची पाचही बोटे त्याच्या हाताच्या बोटात लॉक केली. भूषण थोडा अवघडला पण सोबतच्या एका लेडीची भीतीने अशी होणारी प्रतिक्रिया साहजिक आहे असे समजून त्याने तिला विरोध केला नाही. तसे पाहता सिरियल मध्ये शूटिंगच्या वेळेस तिच्या शरीराचा स्पर्श त्याला कित्येक वेळा झाला पण ते सगळे लोकांसमोर आणि मुद्दाम केले असल्याने त्याची अनुभूती वेगळी आणि आताच्या स्पर्शाची अनुभूती कित्येक पटीने वेगळी होती.

नंतर घोषणा झाली आणि कळाले की ती पळापळी म्हणजे मॉल मधले "मॉक ड्रील" होते म्हणजे एखादा दहशतवादी हल्ला झाला तर काय करायचे याची ती रंगीत तालीम होती.

पण तोपर्यंत त्या गोंधळात मार्ग काढतांना घाबरून रिताशा बराच वेळ भूषणच्या अंगाला अंग घासून चालत होती. आज कोणत्याही परिस्थितीत डाव साधायचा कारण युरोपला येऊन बरेच दिवस झाले होते पण हवी तशी संधी मिळत नव्हती, जी आज नक्की मिळेल असे तिला आज सकाळपासून खूप मनापासून वाटत होते. त्या दृष्टिकोनातून पाहिले पाऊल योग्य संधी साधून तिने टाकले होते.

रिताशाने त्याच्या हातात तिचा हात जेव्हा दिला तेव्हा भूषणला तिच्या हाताची लांबसडक बोटे प्रकर्षाने दिसली. जाणवली! ती बोटे त्याला खूपच आवडली. हातात हात घालून तो अनेकदा सोनीसोबत फिरला होता पण रिताशाच्या बोटांच्या स्पर्शाने त्याला जी अनुभूती मिळाली ती आयुष्यात प्रथमच त्याने अनुभवली होती, अगदी सोनीच्या हातांच्या स्पर्शात सुद्धा ती जादू नव्हती!

नंतर ते दोघे अनेक दुकानं फिरले. सोनीकरता भूषण जी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा त्याबद्दल तो रिताशाचे मत विचारायचा कारण एक महिला दुसऱ्या महिलेला काय आवडेल हे ठामपणे सांगू शकते ज्याद्वारे सोनीला त्याने घेतलेले गिफ्ट आवडण्याचे चान्सेस वाढणार होते. पण रिताशा भूषणने निवडलेल्या प्रत्येक आयटेम मध्ये काहीतरी खोट काढून त्याला गोंधळून टाकायला लागली. शेवटी भूषण तिच्या बोलण्यात येऊन कोणतीच वस्तू नीट निवडू शकला नाही.

नाही म्हटले तरी त्या रात्री भूषणच्या मनात तिच्या हाताच्या घट्ट स्पर्शाबद्दल एक वेगळेच आकर्षण घर करून राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी –

सकाळी पाच वाजताच रिताशाने भूषणच्या रुमच्या दरवाज्यावर टक टक केले. रात्रीचा वन पीस गाऊन तसाच अंगावर ठेऊन ती आली होती.

"अरे बापरे, रिताशा एवढ्या सकाळी?"
 
"सकाळी अकरा वाजता शूटिंग चालू होते आहे. वेळ कमी आहे. म्हणून लवकर उठले आज. म्हटलं रिव्हर साईडला फिरून येऊ. तुझ्या पेक्षा कुणी डीसेंट आणि सिंपल माणूस कंपनी द्यायला मला आपल्या पूर्ण टीम मध्ये दिसत नाही म्हणून तुला विचारले. असा आश्चर्यजनक चेहरा काय केलास? तू म्हणशील तर जाते मी परत...!"

सकाळी सकाळी अचानक उठवल्याने त्याचा चेहरा आश्चर्य दर्शवत होता आणि त्याने काही बोलण्याच्या आतच तिने बडबड चालू केली.

"रिटा, तसे नाही, ये बैस. अचानक पणे तू सकाळी सकाळी आलीस म्हणून बाकी काही नाही", त्याची नजर तिच्या गाऊन मधून दिसणाऱ्या शरीरावरून हट म्हणता हटत नव्हती," बैस! मी पटकन ब्रश करून येतो!"

ती त्याच्या बेडवर बसली आणि तो ब्रश करायला वॉशरूम मधील बेसिनकडे गेला तेव्हा ती त्याच्या बेडवर आडवी झाली. एखाद्या परपुरुषाच्या रुममध्ये आपण सकाळी सकाळी आलो आहोत याची तमा न बाळगता एक आळस देऊन ती बेडवर पहुडली.

दहा मिनिटांनी वॉशरूम मधून ब्रश करून बाहेर आल्यावर बेडवर नजर टाकताच त्याचा अनपेक्षित दृश्याने आ वासला गेला. नजर बेडवर खिळली.

रिताशा बेडवर पूर्ण नग्नावस्थेत होती आणि रूमचा दरवाजा, पडदे, खिडक्या सगळे लावलेले होते. तिच्या नजरेतून आणि शरीरातून एक मादक आव्हान झळकत होते. त्याच्या हातातून रुमाल आणि ब्रश खाली पडला...

मग त्या दिवसानंतर एक दिवसाआड रिताशा त्याला उद्युक्त करायची आणि मग दिवसा किंवा संध्याकाळी किंवा रात्री वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगच्या ब्रेक मध्ये आडोसा शोधत कुठेही ते बिनधास्तपणे प्रेम करायला लागले अर्थात त्यांच्या टीमपासून हे लपवण्याची खबरदारी घेण्यात ते चुकत नव्हते.

खरेतर भूषण हा रिताशा सोबत प्रथम शारीरिक पातळीवर गुंतला होता आणि नंतर रिताशा त्याची आवड निवड छोट्या छोट्या प्रसंगाद्वारे सांभाळायला लागली तेव्हा मात्र तो हळूहळू तिच्यात स्वतःच्या नकळत भावनिक पातळीवर सुध्दा गुंतत गेला.

युरोपमधून परत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा बदललेला भूषण सोनीला जाणवला. सोनीसोबत प्रेम करतांना त्याला रिताशा आठवायला लागली कारण सोनी भूषण ज्या खेळात अजून नवशिके होते त्यात रिताशा खूप अनुभवी होती आणि तिचा तो वेगवेगळा अनुभव त्याने अनुभवल्यानंतर त्याला साधा मिळमिळीत अनुभव नकोसा वाटायला लागला. सोनीला अजूनही कळत नव्हते नेमके काय झाले ते! आणि भारतात आल्यानंतर फोनवर आणि शूटिंगच्या दरम्यान फ्री वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा भूषण वेड्यासारखा तिच्यात गुंतत चालला होता. सोनीला काही काळानंतर थोडा थोडा संशय आला पण तिला एखादा ठोस पुरावा मिळेल असे काही अजून मिळत नव्हते.
 
वलय - प्रकरण ४८

सुनंदा राजेश सोबत राहायला मुंबईत आपल्या बाळासह आली. राकेशने बाळाचे नाव "अक्षर" ठेवले.

दरम्यान अभिजित श्रीवास्तवसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन अमितजींनी राजेशला जो एक गुप्त प्लान सांगितला होता त्याची वेळ येऊन ठेपली होती.

अमित श्रीवास्तव यांचा "मालामाल हो जाओ" या कार्यक्रमाचा नुकताच दहावा सिझन सुरू झालेला होता आणि त्याच्या शुक्रवारच्या खास एपिसोड मध्ये अमितजिंनी सिनेक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राजेशला निवडले होते. सिने क्षेत्रातील लेखकांसाठी त्याला काहीतरी कामगिरी करायची आहे हा विचार अमितजींना आवडला. आणि नेहमीप्रमाणे डायरेक्ट दहा हजाराच्या प्रश्नापासून सुरुवात केली गेली.

विशेष म्हणजे अमितजींच्या खास विनंतीवरून हा शो लाईव्ह ठेवण्यात आला होता आणि शोचे सर्वेसर्वा "कमलेन्द्र बोस" यांनी अमिताभच्या विनंतीला मान दिला होता.

गेम शो सुरु होण्याआधी -

"राजेश जी, आम्हाला सांगा, तुम्ही येथून एक करोड जिंकलात तर त्या पैशांचे काय करणार आहात?"

"या सिनेसृष्टीत मी अनेक वर्षांपासून फ्री लान्स फिल्म जर्नालिस्ट आणि एक लेखक आणि समीक्षक म्हणून कार्यरत आहे. येथून मी जी काही रक्कम जिंकेन त्यातील काही रक्कम मी या क्षेत्रातील लेखक आणि पत्रकार यांचेसाठी एक संस्था उघडून त्यांना आर्थिक मदत तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वापरेन!"

"धन्यवाद राजेश जी बहोत उमदा विचार ही आपके! तो चलीये खेलते है - मालामाल हो जाओ!"

खेळ सुरु होतो -

"तो राजेश जी, अगला प्रश्न दस हजार रुपये के लिये ये रहा आपके कंप्युटर स्क्रीन के ऊपर!"

इनमेसे कौन "कौन है वह" फिल्म मे भूत नही बना है?

1. राकेश कुमार

2. पवन ममतानी

3. फारुख पटेल

4. अनिता राठी

"सर D अनिता राठी"

"बिलकुल सही जवाब आपका! अगला प्रश्न बिस हजार रुपये के लिये ये रहा!

आपको एक गाना सुनाई देगा आपको बताना है ये किस अभिनेत्री पर चित्रित किया गया है?

"राजाजी का बजा दूंगी मै बाजा, तो फिर नाच नाच, नाच नाच, नाच रे मन मोहना!"

1. शिवानी संध्या

2. मनमित कौर

3. साबरिना सोनाटा

4. मधुमालीनी मेहता

सर "मनमित कौर" पर ठप्पा लगा दो.

मुबारक हो! आप बिस हजार जित गये.

चालीस हजार रुपये के लिये अगला प्रश्न ये रहा!

1983 का वर्ल्ड कप भारत ने जीता तब कप्तान कौन थे?

1. सुनील गावस्कर

2. कपिल देव

3. रवी शास्त्री

4. राणा दुग्गुबाती

सर "कपिल देव" पर ठप्पा लगा दो.

बिलकुल सही जबाब आपका!

अस्सी हजार लिये प्रश्न ये रहा

कौनसे फिल्म मे फिल्म के हिरो राजेंद्र शास्त्री मोबाईल के टॉवर पर चढ जाते है?

1. आग के गोले

2. भोले दोस्त

3. जाली दुश्मन

4. कालिया का बदला

सर "आग के गोले" पर सिक्का मार दो.

अस्सी हजार जित गये आप.

एक लाख साठ हजार के लिये प्रश्न ये रहा.

इनमेसे कौनसी फिल्म पाच साल थिएटर मे चली?

1. भले आदमी दुल्हन चुरा लेंगे

2. ‎हमारी दुल्हनियाँ की मेहंदी

3. मेहंदी वाले हाथो में कंगना खनक खनक जाए

4. चुडियो का चाँद

सर ऑप्शन मेहंदी वाले हाथो पर ठप्पा लगा दो .

आ बिलकुल सही जवाब!

एक लाख साठ हजार जित गये आप.

पुढे आणखी प्रश्न विचारले गेले. तोपर्यंत फक्त एकच चौथी लाईफलाईन उरली होती.

कॉल युवर बडी!

आणि शेवटी एक करोडचा प्रश्न आला.

"किस्मत का खेल" इस फिल्म की कथा किसने लिखी?

1. के. के. सुमन

2. पि. के. सुमन

3. ‎आनंद कुमार

4. ‎संतोष ठाकूर

राजेश मुद्दाम विचारात पडला. त्याला उत्तर माहित नाही असे तो चेहऱ्यावर दाखवू लागला.

"राजेश जी, आप लेखक है और आपको इसका उत्तर मालूम होना चाहिये!"

तरीही राजेश विचारात गढलेला दिसत होता.

"कोई बात नही. अगर उत्तर मालूम नही हो तो अभी भी आपके पास एक लाईफलाईन बची है! कॉल युवर बडी!"

"ठीक है सर! मै लाईफलाईन युज करना चाहूँगा!"

"किसे कॉल लगायेंगे आप?"

"सर मेरा दोस्त! माझे चांगले मित्र आहेत जे आता फिल्म इंडस्ट्री मध्येच कार्यरत आहेत - सारंग सोमैय्या! त्यांना मी कॉल करू इच्छितो!"

"कंप्युटर भैय्या, सारंग जी को फोन लगाया जाय!"

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

"सारंग सहाब नमस्ते, मैं अमित श्रीवास्तव बोल रहा हूं, मालामाल गेम शो से!"

"सर, नमस्कार कैसे है आप?"

"मैं बढिया हुं, आप बताईए क्या हालचाल है आपके?"

"बस सर! आपके राज मे सब कुछ ठीक चल रहां हैं!"

"अरे अरे ऐसां मत काहिये. मेरे सामने बैठे है राजेश. वे पचास लाख जित गये है और उन्हे जरुरत हैं आपकी मदद की एक करोड के सवाल के जवाब के लिये. वें अब प्रश्न पढेंगे!"

काउन्ट डाऊन सुरू झाले.

राजेश सारंगशी बोलू लागला, "सारंग, किस्मत का खेल या हिंदी चित्रपटाची कथा कुणी लिहिली, मी ऑप्शन वाचतो..!"

राजेशला मध्येच तोडत सारंग म्हणाला, "राजेश अरे, ऑप्शन वाचायची काय गरज आहे? या चित्रपटाची कथा तूच तर लिहिली आहेस राजेश!"
 
Back
Top