• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

वलय (कादंबरी)

  • Thread starter Thread starter StoryPublisher
  • Start date Start date
वलय - प्रकरण २७

मग तिने एके दिवशी सूरजला तिचा रोहनसोबतचा संबंध सांगितला, मग रोहनच्या ऍक्सिडेंटबद्दल सांगितले. सूरज शांतपणे ऐकून घेत होता.

रागिणी पुढे म्हणाली, "रोहनच्या मृत्यूनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले आणि राहुलच्या नादी लागले. अर्थात त्यांचेशी माझे शारीरिक संबंध नव्हते आणि तसे ते रोहनसोबतही नव्हते. राहुल आधीपासून माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होता आणि मी त्याला नाकारले होते पण रोहनच्या मृत्यूनंतर तो थोडा सुखावला आणि मी आता त्याला हो म्हणेन अशी एक आशा त्याच्या मनात तयार झाली. मी राहुलला भेटायला लागले हे माझ्या घरी माहिती नव्हते. राहुलने मला मानसिक आधार देण्याचे नाटक करून मला हळूहळू सिगारेट, दारूची सवय लावली. मग एकदा मला माझ्या नकळत एका सिगारेट मध्ये ड्रग्ज भरून दिले!"

ड्रग्जचे नाव काढताच सूरजच्या चेहेऱ्यावर एक प्रकारची वेगळीच चिंतायुक्त अस्वस्थता पसरली. ती लपवून तो म्हणाला, "ओह नो रागिणी! खूपच वाईट झालं! आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवून का ठेवलंस? माझ्यावर विश्वास नव्हता का?"

रागिणी म्हणाली, "तसे नाही रे सूरज! मला भीती होती की मी तुला गमावून बसेल! एकदा रोहनला गमावले होते आणि तुला गमवायचे नव्हते!"

सूरज म्हणाला, "आय कॅन अंडरस्टॅन्ड रागिणी, माय लव्ह! एनिवे मग पुढे काय झालं ते सांग ना?"

रागिणी: "मी ड्रग्जच्या नशेत असतांना राहुलने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण मी अगदी वेळेवर शुद्धीवर येऊन तेथून कसेतरी पळाले. घरी काही कळू दिले नाही. राहुलला सांगून टाकले की आपल्यात जे झाले ते झाले पण आता यापुढे मला भेटू नकोस आणि आता मी लग्न करणार आहे. मग मी घरच्यांना लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. आणि मग माझ्या त्या नवऱ्याबद्दल मी तुला सांगितले आहेच. घरच्यांनी माझे लग्न एक बिझिनेस डील मिळावी म्हणून लावून दिले होते. म्हणजे ते एक डील होतं. दोन बिझिनेसमॅन फॅमिली मधले डील! नवरा मारकुटा निघाला. सॅडिस्ट निघाला!! छोट्या कारणांवरून मारायचा! रात्री सेक्स करतांना मला बांधून ठेवायचा! त्याने मला ऍक्टिंगमध्ये करियर करायची बंदी घातली होती. मग मी एके दिवशी बेमालूमपणे घरून पळून आले मुंबईत! दिल्लीतील एका मैत्रिणीच्या मदतीने!"

"ओह गॉड! मग पुढे?"

"घरच्यांनी मला सांगून टाकले की आता आपला संबंध संपला. मग नंतर राहुलला कसे माहित पडले ते माहित नाही पण माझ्या सिरियल्स पाहून त्याला कळले असावे की मी मुंबईत आहे आणि त्याने कुठूनतरी माझा फोन नंबर मिळवला असावा आणि आता मला तो ब्लॅक मेल करतोय की तो माझ्या नवऱ्याला माझा ठावठिकाणा सांगणार! मला भीती वाटतेय! माझा नवरा खूप खुनशी आहे. तो त्याचे गुंड पाठवेल! घटस्फोटाचा किंवा फसवणुकीचा दावा करून पैसे उकळेल किंवा माझ्यावर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करेल! मला आता पुन्हा दिल्लीला परत जायचे नाही. प्लिज! हेल्प मी! माझे घरचेही माझ्या नवऱ्याला साथ देतील, वेळ पडली तर!" असे म्हणून ती रडायला लागली.

"हे बघ रागिणी! मला तू हे सगळं सांगितलंस ते बरं केलंस! मी ब्राझीलहून तीन दिवसांत परत येईन...आणि हे बघ, रडू नकोस!", असं म्हणून तो विचारात गढला.

मनावरचा भार हलका होऊन सूरजने तिला समजून घेतल्याबद्दल रागिणीला हायसे वाटले.

बराच वेळ विचार करून सूरज पुढे म्हणाला, "तू असं कर! तू मला राहुलची काही माहिती, फोटो दाखव! मी ब्राझीलहून परत आल्यावर फोन करून त्याला मुंबईला भेटायला बोलाव! आपण काहीतरी आमिष दाखवू त्याला! तू त्याला भेटायला एकटी जा आणि मी लपून तुझ्या मागे असेनच! मग बघूया काय करायचे! डोन्ट वरी!"

मग तिने त्याला तिच्या मोबाईलवरचा राहुलचा फोटो दाखवला. फोटो बघताच त्याच्या चेहेऱ्यावर अस्वस्थता पसरली. तीला दिसू न देता त्याने तो स्वतःच्या मोबाईल मध्ये सेंड केला!

मग ब्राझीलला निघतांना तो तिला म्हणाला, "संशय येऊ नये म्हणून तू त्याला तो मागेल तेवढे पैसे पाठव. तोपर्यंत मी येतोच! आणि हो! त्याला माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस! नाहीतर तो सावध होईल!"

सूरजला घेऊन विमान हवेतून ब्राझीलकडे निघून गेले. दोन कामवाल्या बाई गेल्यानंतर ती फ्लॅटमध्ये एकटीच होती. आता ती वाट बघत होती सूरज परत येण्याची! काल राहुलचा फोन आला होता आणि त्याने आज संध्याकाळच्या आत 50000 रुपये मागितले होते ते तिने त्याच्या अकाउंटवर पाठवले. आतापूरता प्रॉब्लेम मिटला. सूरज आल्यावर आता पुढचे काय ते ठरवायचे होते.

मुंबईला पळून आल्यानंतरच्या घटना तिला आठवू लागल्या:

मुंबईला बोरिवलीला तिची दिल्लीतली एक मैत्रीण राहात होती. ती एकटीच होती. गौरी सहानी. तिच्या रूमवर सहा महिने रागिणी राहिली कारण नंतर गौरीला कॅनडात कायमचा जॉब मिळाला. म्हणजे तिला आता फक्त सहा महिने होते!

मग रागिणीने तात्पुरता सेल्स वूमन म्हणून जॉब पकडला आणि तिच्या मैत्रिणीने गौरीने काही पैशांची मदत केली. मग जमतील तसे अनेक पार्ट टाइम जॉब पकडून तिने मॅडम अकॅडमी जॉईन केली. तेथे सुप्रिया, सोनीशी ओळख आणि मैत्री झाली. पार्ट टाइम जॉब सुरूच होता. टीव्ही किंवा सिनेमा कुठेतरी छोटासा का होईना रोल मिळणे अत्यावश्यक झाले होते अशातच मॅडम अकॅडमित डी. पी. सिंग यांचे सिरीयलसाठी ऑडिशन झाले. त्यात रागिणीची निवड झाली आणि अशा प्रकारे तिची करियरची सुरुवात झाली. मग गौरीची पैशांची परतफेड करतेवेळी गौरीने ते पैसे नाकारले आणि कॅनडाला जातांना फक्त ती एवढीच म्हणाली, "तुझी करियरची लाईन लागली ना! मग बास! पैसे मला परत नकोत. फक्त माझी आठवण ठेव म्हणजे झाले!"
 
वलय - प्रकरण २८

दरम्यान सोनी बनकरचा लव्हर साकेत न सांगता तिला सोडून निघून गेला. नेमका कुठे गेला त्याचा थांगपत्ता सोनीला लागलाच नाही. मग सोनीने स्वतःला बेबक्यू (BEBQ) च्या शुटिंगमध्ये व्यस्त ठेवलं. काही भागाचं शुटिंग झालं होतं आणि काही भागाचं बाकी होतं. पण प्रोग्रॅम टेलिकास्ट व्हायला सुरु झाला होता. सुभाष भट बारकाईने BEBQ शो वेळ मिळेल तेव्हा बघत होता कारण त्याला त्याच्या हॉरर चित्रपटासाठी नवीन चेहरा हवा होता आणि अशा रियालिटी शोजमध्ये नवे चेहेरे आणि नवनवीन टॅलेंट चिक्कार मिळतात हे तो जाणून होता. त्यातल्या त्यात त्या कार्यक्रमातली सोनी बनकर त्याचे जास्ती लक्ष वेधून घेत होती. सिंग यांचेकडून रागिणीसाठी नकार आल्याने सुभाष भटला दुसरे कुणीतरी शोधणे भाग होतेच. एकदा का हा शो संपला की सोनीला विचारून बघावे असा विचार त्याच्या मनात आला.

एका प्रायव्हेट रिसॉर्टवर दहा जणांना बोलावून त्या रियालिटी शोची शुटिंग सुरु झालेली होती. त्यात पन्नास टक्के काय करायचे ते आधीच स्क्रिप्ट लिहून ठरवलेले होते तर पन्नास टक्के आपल्या मनाने वागण्याची परवानगी होती. मात्र प्रेक्षकांना सांगण्यात आले होते की हा जगातील पहिलाच असा शो आहे की ज्यात सगळे कलाकार किंवा भाग घेणारे पार्टीसिपॅन्ट संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे जगणार आणि खेळ खेळणार! म्हणजे काहीही प्लान केलेले नाही!

चोवीस तासांपैकी जवळजवळ अठरा तास सतत कॅमेरे त्यांच्या मागे राहणार होते. काही हलते कॅमेरे काही स्थिर तर काही गुप्त ठिकाणी लपवलेले कॅमेरे असणार होते. मोबाईल आणि इतर उपकरणे सगळ्यांजवळून काढून घेण्यात आली आणि फक्त एक लँडलाईन फोन गरजेपुरता वापरता येणार होता.

रिसॉर्टवर दिवसभर कंटेस्टन्ट मनाप्रमाणे इकडे तिकडे फिरू शकत होते. दरम्यान त्यांना विविध ठिकाणी लपलेले चिठ्ठ्यांच्या स्वरूपातील दुवे (क्लू) शोधायचे होते. त्या क्लू मध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे वागायचे होते. तसेच काही क्लू मध्ये खेळाडूला कठीण टास्क देऊन ते न जमल्यास त्याला बाद करण्यात येत होते. सगळ्यांना शेवटी कोणती वस्तू शोधायची आहे हे सुद्धा माहिती नव्हते. गेमच्या शेवटच्या लेव्हलला पोहोचेपर्यंत ते माहित असणार नव्हते. मग शोध संपल्यावर ज्यानेही ते शोधले तो पहिला येणार! आणि गेमच्या नियमानुसार शेवटी जे तीन जण टिकले त्यापैकी ज्या दोघांना शोध लागला नाही तो किंवा ती दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर येणार!

तसेच गेम मधले नियम एकदा तोडणाऱ्याला पेनल्टी म्हणून त्या गेमचा "बिग आय" म्हणून बघणारा संयोजक काहीतरी करायला लावणार होता. दुसऱ्यांदा नियम तोडल्यास मात्र गेम मधून बाहेर!

सोनी बनकरने एकदा गेमचा नियम मोडला. मग बिग आयने तिला एक पेनल्टी दिली - ती जोपर्यंत गेम मध्ये टिकून आहे तोपर्यंत तिने रोज रात्री दोन बॉलिवूड आयटम सॉंग्जवर डान्स करून दाखवायचा. त्यानंतर त्या गेमपेक्षा त्या गेममधले सोनीने डान्सच लोकप्रिय व्हायला लागले. पुन्हा तिच्या जुन्या सेल्फीबद्दल चर्चा व्हायला लागली. सुभाष भट हे सगळे बारकाईने पाहात होते. त्यांनी BEBQ च्या कास्टिंग डायरेक्टर के. सचदेवाला कॉल केला आणि त्याला भेटायची इच्छा बोलून दाखवली. प्रथम सचदेवाला आश्चर्य वाटले की नक्की सुभाषजीना आपल्याला का भेटायचे आहे?

पण त्यांच्या भेटीत ते क्लियर झाले, ते असे:

"मला सोनी माझ्या पुढच्या हॉरर फिल्ममध्ये हवी आहे! माझ्या डोक्यात अशी स्क्रिप्ट घोळते आहे की ज्यात म्युझिक आणि डान्स संबंधित एका ग्रुप सोबत काही सुपरनॅचरल घटना घडतात! म्हणजे सोनीचे डान्स टॅलेंटही सिनेमात वापरता येईल आणि तिला हिरोईन म्हणून पण लाँच करता येईल! लोकांना फ्रेश चेहेरा हवाय! तीच एक हिरोईन रिताशा सतत माझ्या बहुतेक हॉरर चित्रपटांत काम करतेय आणि आताशा तिचे नवे चित्रपट फ्लॉप होत आहेत!"

"बरं! हरकत नाही! सोनीच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास आमच्या शोचे सगळे एपिसोड टेलिकास्ट होऊन संपले की ती आमच्या अग्रीमेन्ट पासून मुक्त असेल! मग ती इतर कुठेही काम करू शकते! आय एम अबसोल्युटली फाईन विद धिस!"

"ते ठीक आहे! पण मला तुमच्याकडून काय हवंय ते ऐका! मला हवंय की या गेम शोची विनर तीच असेल! सोनी!"

"हे बघा! आमचा हा रियालिटी शो आहे त्यामुळे यात काय घडणार आणि काय नाही हे मी नाही सांगू शकत! आणि तिला ठरवून जिंकवणे म्हणजे इतरांवर अन्याय नाही का होणार?"

"मिस्टर मिस्टर! ऐका माझं जरा! तुमच्या या सगळ्या रियालिटी शोबद्दलची आतली रियालिटी मला चांगली कळते! तेव्हा मला तुम्ही शिकवू नका! तुम्ही या शोचे कास्टिंग डायरेक्टर आणि स्क्रिप्ट मॅनेजरपण आहात. तेव्हा तुम्ही हे मॅनेज करू शकता!"

"मिस्टर सुभाष! मी मॅनेज करू शकतो की नाही हा मुद्दा वेगळा! पण मला सांगा, मी तुमचे का ऐकू? माझा फायदा काय?"

"सांगतो! मूळ मुद्यावर येतो मी आता! मला माझी पुढची नवी हिरोईन ही गेम शो मध्ये जिंकून फेमस झालेली अशी हवी आहे आणि ती सोनीच हवी! त्याबदल्यात मी तुमचा फायदा करून देईन! तुम्हाला मी माझ्या चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक म्हणून घेईन! तुम्हाला आयती प्रसिद्धी मिळेल. चित्रपटाच्या उत्पन्नातला 20 टक्के हिस्सा देईन आणि आता सायनिंग अमाऊन्ट म्हणून ताबडतोब 2 लाख रुपये देतो. मग तुमच्या शोच्या प्रोड्युसर वगैरे मंडळींना मॅनेज करून सोनीला कसे जिंकवायचे कसे ते तुमचे काम! बोला! आहे मंजूर?!"

"आता तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करत आहात तर मी पण तुमचं काम केलंच पाहिजे, नाही का? नाहीतरी कुणाला न कुणाला तरी जिंकायचं आहेच! माझ्या माईंडमध्ये ती इंडियन-ओरिजिन फॉरेनर कंटेस्टन्ट - "जेसिका कर्टिस" जिंकायला हवी होती पण एनिवे मला जिथे फायदा आहे तिथे मी जाईन! ठीक आहे, सोनीला विनर बनवू या!"

"अरे तुझ्या त्या जेसिका कर्टिसला सेकंड नंबरवर आण! मी तिलापण चित्रपटात छोटासा रोल देतो! तिला सांग की तू तिला बॉलिवूड मध्ये ब्रेक मिळवून देणार आहे! खुश होईल ती! "

शेवटी डील ठरली. सुभाष भटना हे दाखवून द्यायचे होते की डी. पी. सिंग च्या रागिणीवाचून त्यांचे काही अडत नाही. रागिणीने स्वतः नकार दिला असे सुभाष भटना सिंग यांनी सांगितले होते. त्यामुळे ते दुखावले गेले होते. मग त्यांनी अर्थातच रागिणीला स्वतःहून कॉल करण्याचा प्रयत्न केला नव्हता...
 
स्टोरी वाचल्या बद्दल आभारी आहे
 
वलय - प्रकरण २९

इकडे रागिणी सूरजच्या ब्राझीलहून परत येण्याची वाट बघत होती. संध्याकाळ झाली होती. स्वतःसाठी स्वयंपाक बनवून ती जेवली. मग सूरजला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलत नव्हता. मग झोपतांना सहज बातम्या बघाव्या म्हणून तिने टीव्ही लावला.

'फ्रेश न्यूज- आप तक, आपके घर तक!" हे चॅनेल सुरु होते. "फिल्मी खुलासा" या कार्यक्रमात निवेदक ओरडून ओरडून सांगत होते:

"फेमस हॉरर सिरीयल की फेमस ऐक्ट्रेस रागिणी के बारे में एक बडा खुलासा! एक ऐसा सच जो आजतक किसीको नही था पता! देखीये थोडीही देर में!"

बेडवर झोपलेली रागिणी अचानक उठून बसली. तिला धक्काच बसला.

"हे चाललंय काय या चॅनेलचं! काय सांगणार आहेत ते माझ्याबद्दल? मला तर डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये! आतापर्यंत मी फिल्मी पत्रकारांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती सांगणे शिताफीने टाळले होते. मात्र या चॅनेलला अचानक कुणी माझ्याबद्दल सांगितलं आणि काय सांगितलं? नक्कीच राहुल असणार! त्याला पैसे देऊन सुद्धा त्याने जे करायचे तेच केले वाटते!"

पुढे निवेदक सांगू लागला:

"दरअसल ये रागिणी भाग गयी थी अपने घर से! बिना अपने हजबंड को बताये! क्या फिल्म इंडस्ट्री में आनेके लिए कोई इस हद तक जा सकता है? हमारे जर्नालिस्टने ये भी खुलासा किया है की शादी से पहले रागिणी के दो लडकों के साथ रिश्ते थे और इतना ही नही ..."

पुढे ऐकवले जात नव्हते. रागिणीच्या मनात संताप, आश्चर्य आणि पराकोटीचा अनपेक्षित धक्का या तीन भावना एकत्र झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे तिने रिमोट टिव्हीकडे जोराने भिरकावले. टीव्ही खळकन फुटून बंद पडला. तिने पुन्हा सूरजला कॉल केला असता त्याचा नंबर स्विच ऑफ होता.

ओह नो! आता काय करू मी? रागिणी अस्वस्थपणे येरझारा घालू लागली. मला या शहरात दुसरं कोण आहे? जवळचं? सूरजशिवाय? आता तिला प्रश्न पडला की ही बातमी पाहून सूरजच्या आधी त्याच्या वडिलांनी, डी. पी. सिंग यांनी तिला बोलावले तर? त्यांना तिने तिच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच सांगितले नव्हते आणि त्यांनीही काही विचारले नव्हते कारण त्यांची वागणूक प्रोफेशनल होती. ते कामाशी काम या वृत्तीचे होते. पण आता मात्र गोष्ट वेगळी होती कारण ती आता त्यांच्या मुलाची गर्लफ्रेंड होती. त्याचेसोबत रहात होती. पण त्यांना कॉल करण्याऐवजी प्रथम सूरज आल्यानंतर त्याच्या सोबत बोलूया असा विचार तिने केला....
 
वलय - प्रकरण ३०

रागीनीची ही बातमी इटलीत सुप्रिया दुपारी टीव्हीवर बघत होती. तिला आश्चर्य वाटले आणि जुन्या होस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या. मेडिया आता सेलिब्रिटींच्या खासगी जीवनात जरा जास्तच शिरायला लागलीय असे तिला वाटले. सेलिब्रिटीजना एक हवेहवेसे सोशल "वलय" प्राप्त तर होते पण ते "वलय" आपल्यासोबत अनेक दुःखदायक आणि नकोशा गोष्टी घेऊन येते हे नक्की! असा विचार सुप्रियाच्या मनात आला.

ती एव्हाना चांगलीच इटालियन बोलू शकत होती. तिने जवळच्या शहरातील एका एफएम रेडिओ स्टेशनवर दिवसातील चार तास रेडिओ जॉकी म्हणून जॉब पत्करला होता. आसपासच्या शहरातील एशियन लोकांसाठी चार तास एशियन गाण्यांचा प्रोग्रॅम त्या रेडियोवर आठवड्यातून तीन दिवस लागायचा. त्यासाठी त्यांना थोडे इंग्लिश, इटालियन आणि हिंदी भाषा येत असणारी एशियन वूमन हवी होती. लोकल न्यूजपेपर मध्ये तशी ऍड आली होती. सुबोधने ती ऍड सुप्रियला दाखवली आणि तिने एप्लाय केले. इंटरव्ह्यू झाला आणि तिला निवडण्यात आले. इंटरव्ह्यू साठी जास्त स्त्रिया आल्या नव्हत्या आणि ज्याही दोन पाच आल्या होत्या त्यात सुप्रियाच सगळ्यात उजवी ठरली. मध्यंतरी तिचे आईवडील आणि सुबोधची आई येऊन त्यांचेकडे चार आठवडे राहून गेले होते. एकंदरीत दोघांचं बरं चाललंय हे पाहून समाधानाने ते इंडियात परत गेले होते...

एकदा रात्री सुबोध लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत होता. घरातली कामं आटोपली होती. सुप्रियाने सहज म्हणून एक न्यूज चॅनेल लावले असता तिला एक फिल्मस्वर आधारित प्रोग्रॅम दिसला. त्याचा दुसरा भाग सुरु होता. राजेश त्या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार आणि अँकर होता. समोर ऑडिएन्स बसली होती आणि स्टेजवर अनेक प्रोड्युसर आणि डायरेकटर मंडळी बसली होती. ऑडिएन्स मध्ये बरीचशी मंडळी ही राजेशने बनवलेल्या टीम मधली होती. अर्थात हे फक्त त्यांना आणि राजेशला माहिती होते. प्रथम टीव्ही बंद करायला तिचा हात वळला पण स्वत:च्या मनाविरुद्ध उत्सुकतेने ती सरसावून बसली आणि उशी मांडीवर घेऊन प्रोग्रॅम बघू लागली.

राजेशने माईक हातात धरून म्हटले, "आपल्या पहिल्या भागात आपण भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास पहिला. दादासाहेब फाळके यांचे अविस्मरणीय कार्य यानिमिताने आपण बघितले. भारतीय चित्रपट कसा बदलत गेला याचा इतिहास आपण बघितला. पहिला भाग आवडल्याबद्दल अनेकांचे ईमेल, ट्विट्स आणि फ्रेंडबुक वर प्रतिक्रिया आल्यात. आपण सोशल मीडिया आणि फोनद्वारे या कार्यक्रमात सिनेरसिकांच्या थेट प्रतिक्रिया आणि प्रश्न या कार्यक्रमात लाईव्ह समाविष्ट केल्या त्यामुळे हा कार्यक्रम लोकांना आपलासा वाटला. आजच्या भागासह यापुढचेही भाग प्रेक्षकांना जागतिक मनोरंजन क्षेत्राबद्दल असेच मनोरंजनपूर्ण ज्ञान आणि ज्ञानपूर्ण मनोरंजन पुरवत राहतील अशी मी खात्री देतो. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला!"

स्टुडिओत आलेले प्रेक्षक, व्यासपीठावरचे प्रोड्युसर, डिरेक्टर्स वगैरे सगळे सरसावून बसले.

राजेश म्हणाला, "तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे- "सिनेमा आणि लेखक!" आपणास माहिती आहेच की कार्यक्रमाची सुरुवात आपण एका प्रश्नाने करतो. तर आजचा प्रश्न आहे- "सिनेमाला सशक्त कथा, पटकथा आणि संवाद असावेत असे आजकाल अनेक निर्माते दिग्दर्शकांना का वाटत नाही?" किंवा दुसऱ्या अर्थाने विचारायचे झाल्यास "निर्माते दिग्दर्शकांना स्वतःच लेखन करावेसे का वाटते?"

थोडा वेगळाच प्रश्न होता. अनेक निर्माते, दिगदर्शकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये अस्वस्थ चुळबूळ सुरु झाली.

रामरत्नम नावाचे निर्माते म्हणाले, "मिस्टर! तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. निर्माते आणि दिगदर्शक हेच खऱ्या अर्थाने चित्रपटाला अंतिम रूप देतात. त्या दोघांच्या अनुभवी नजरेशिवाय कितीही सशक्त कथा लेखकाने लिहिली तरीही ती पडद्यावर साकारता येत नाही. दिग्दर्शकाच्या व्हिजनची सर लेखकाच्या व्हिजनला येऊच शकत नाही आणि दिग्दर्शकाच्या व्हिजनला पैशांच्या वेसणात बांधून शेवटी पडद्यावर येते ते चित्रपटाचे फायनल रूप!"

प्रेक्षकांतील काहीजणांनी टाळ्या वाजवल्या. एका खुर्चीवर बसलेला कथाचोर के. के. सुमनपण मनोमन सुखावला. टाळ्या शांत झाल्यावर हळूच राजेश म्हणाला, "पण मला सांगा की आडातच नाही तर पोहोऱ्यात कोठून येणार हो? म्हणजे मला म्हणायचे आहे की लेखकाने कथाच लिहिली नाही तर त्याला पैशांच्या वेसणात बांधणारे आणि पडद्यावर साकारण्याचे व्हिजन येणार कोठून? मुळात एखादी मूर्ती बनवून झाल्यावरच तिला मूर्तिकार किंवा इतर कुणीतरी फायनल टच किंवा रंग देऊ शकतो! आधी मूर्तीला फायनल टच आणि रंग देऊन घ्यायचा आणि मग मूर्ती बनवायला सुरुवात करायची असं कोण करतं का, सांगा बरं मला प्रेक्षकांनो?"

हे बोलून संपताच दुप्पट टाळ्या वाजू लागल्या. टाळ्या संपल्यावर रामरत्नम् काही बोलू इच्छित होते पण त्यांना नेमके शब्दच सापडेनासे झालेत आणि जवळपास ते निरुत्तर झाले.
 
ही संधी साधून राजेश पुढे म्हणाला, "आणि आता आजकाल तर हद्द झालीये. बरेच निर्माते, दिग्दर्शक तर लेखकांच्या कथा तोंडी ऐकून घेतात किंवा त्याचे कथा वाचन किंवा स्क्रिप्ट ऐकून घेतात, लेखकांना कथा न आवडल्याचे सांगून हाकलून लावतात आणि कालांतराने तीच कथा स्वतःच्या नावाने खपवतात!"

के. के. सुमन आणि काहींच्या चेहेऱ्यावर घाम आला आणि प्रेक्षकांमध्ये चलबिचल सुरु झाली.

"व्ही. शामसुंदर" नावाचे दिग्दर्शक उभे राहिले, "राजेश, काही ठिकाणी असे होत असेलही पण सगळेच जण असे करत नाहीत. मी असा दिग्दर्शक आहे की जो लेखकाला त्याचे पूर्ण मानधन निर्मात्यांकडून द्यायला लावतो आणि त्याच्या कथेशी कुठे तडजोड करत नाही!"

राजेश म्हणाला, "मान्य आहे! मान्य आहे. पण असे चित्र फार दुर्मिळ आहे. आजही लेखकांना हवा तेव्हढा मान, मानधन आणि प्रसिद्धी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दिली जात नाही. अवार्ड्स फंक्शन मध्ये सुद्धा चित्रपटाच्या लेखनासंबंधी फारसे अवार्डस् नाहीये. लेखकाला त्याचा सन्मान मिळालाच पाहिजे. आणि प्रत्येक निर्मात्याने एका सशक्त कथेचा आग्रह धरलाच पाहिजे! लक्षात ठेवा लेखक हा पुरातन काळापासून आहे आणि कथा लिहून तो शतकानुशतके वाचकांचे मनोरंजन करत आहे. सिनेमा नंतर आला. लेखक फार पूर्वीपासून अस्तित्वात होते! प्रसिद्ध इंग्रजी लेखक केतन सहानी यांच्या पहिल्या कादंबरीवर आधारित चित्रपट चार चतुर खूप चालला पण केतनला त्याचे श्रेय दिले गेले नाही पण त्याची वाचकसंख्या खूप असल्याने नंतर सोशल मेडीयातून निर्मात्यावर दबाव येऊन त्यांना केतनची माफी मागणे भाग पडले, नंतर त्याच्या आणखी एका कथेवर चित्रपट बनला तेव्हा त्याचे योग्य ते क्रेडीट केतनला मिळाले, पण सगळ्याच आणि नवोदित लेखकांसोबत मात्र असे होत नाही!"

पुन्हा टाळ्या....

पण एक प्रोड्युसर "सी. आर. छब्बीसिया" म्हणाला, "पण राजेश! मी अनेक चित्रपट बनवलेत की ज्यात मी कुणाच लेखकाची मदत घेतली नाही. माझ्याजवळ फॉर्मुले आहेत! त्यात थोडा तिखट मीठ मसाला टाकला की झाला चित्रपट तयार! कशाला हवेत लेखक अन बिखक! रोमँटिक चित्रपटांचे अनेक फॉर्मुले, थ्रिलरचे, सस्पेन्सचे, इमोशनल, कॉमेडी असे प्रत्येक प्रकारच्या सिनेमाचे विविध फॉर्मुले असतात!"

या प्रोड्यूसरला दे दणादण बदडून काढण्याचा प्लॅन राजेशच्या मनात आला पण त्याने स्वतःला कंट्रोल केले कारण त्याच्या टीमचा एक प्यादा त्याला ठरल्याप्रमाणे मदत करणार आहेच हे त्याला माहित होते...

त्याऐवजी राजेश त्याला एवढेच म्हणाला, "येथे बसलेल्या आणि देशभरातील करोडो सिनेरसिकांना तुमचा एखादा फॉर्म्युला सांगाल का?!"

"हे बघा! सामान्य माणूस तिकीट काढून पैसे खर्च करून दोन अडीच तास चित्रपट पाहण्यासाठी येतो ते दोन घटका मनोरंजन करायला! सॉरी मी दोन अडीच तास म्हणालो कारण आजकाल चित्रपट पूर्वीसारखे तीन साडेतीन तासांचे राहिले नाहीयेत! आणि आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तर एका तिकिटाला दोनशे ते पाचशे रुपये पडतात. एवढे पैसे खर्च करून फक्त दोन तासांचा सिनेमा असतो, त्यातही जर समोर पडद्यावर डोक्याला जड असे काहीतरी बघायला मिळाले तर प्रेक्षक शिव्या देईल! चित्रपट प्रेक्षकाला दोन घटका करमणूक देण्यासाठी असतो आणि मसाला फॉर्म्युला त्यासाठी पुरेसा आहे. त्यासाठी लेखकाची गरज नाही. मला तरी नाहीच नाही!"
 
राजेश म्हणाला, "अहो तुम्ही फॉर्म्युला सांगणार होतात ना! सांगा ना एखादा फॉर्म्युला आम्हाला!"

छब्बीसिया सांगू लागला, "समजा रोमँटिक मुव्ही घेऊ! एक हिरो घ्यायचा एक हिरोईन घ्यायची! मग त्यांची भेट एखाद्या परदेशातल्या एका सुंदर नयनरम्य ठिकाणी घडवायची. चार पाच नाचगाणी. रुसवे फुगवे. तिथल्या एखाद्या पब, डिस्को किंवा क्लबमध्ये एकादे सेक्सी आयटम सॉंग टाकायचे. वर आम्ही सेन्सॉरला असे म्हणायला मोकळे की हे अंगप्रदर्शन किंवा सेक्सी नंगा नाच जास्त वाटत असला तरी ते परदेशात घडतंय, आपल्या भारतात थोडंच घडतंय! आणि मग हिरोईनचे वडील तिच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून देतात. मग त्या नियोजित वराच्या ओढून ताणून वाईट सवयी दाखवायच्या आणि मग हिरो ते उघडकीस आणतो आणि मग थोडी मारामारी आणि मग हॅपी एंडिंग! माझा पिक्चर "दुल्हन हमारी हिंदुस्तानी" बघितला ना तुम्ही??"

काही जणांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान राजेशने त्याच्या टीम मधल्या गावाकडील एका मेम्बरला एसेमेस केला आणि प्रोग्रॅम मध्ये कॉल करायला सांगितले. तो मेम्बर काय ते बरोबर समजला.

छब्बीसिया पुढे म्हणाला, "हा होता रोमँटिक चित्रपटाचा एक फॉर्म्युला. तसेच ऍक्शन चित्रपटाचाही माझा एक फॉर्म्युला आहे. मी जवळपास सत्तर ऐशी मोडक्या तोडक्या गाड्या गैरेज मधून विकत घेतो आणि चित्रपटभर त्या गाड्या बॉम्बने उडवत राहातो! गाड्यांचे पाठलाग, ऍक्सिडेंट करत राहातो, गाड्या तोडतो फोडतो. प्रेक्षकांना आवडतं! मी लहानपणी माझ्या स्वतःच्या आणि मित्रांच्या खेळण्यातल्या कार तोडून टाकायचो, दिवाळीत गाड्या सुतळी बॉम्बला बांधून त्यांना फोडून ब्लास्ट करून टाकायचो तेव्हाच माझे एक बॉलिवूडमधले काका बोलले होते की हा मोठा झाल्यावर नक्की एक मोठ्ठा ऍक्शन डायरेक्टर किंवा प्रोड्युसर होणार! खि खि खि!"

पब्लिकपण हसायला लागली. राजेश त्याला म्हणाला, "वा! तुमचे फॉर्मुले आणि तुमचा सेन्स ऑफ ह्युमर छानच आहे की! तुम्ही आता एखादा कॉमेडी मुव्हीपण बनवायला हवा! मग त्याचाही फोर्मुला बनवायला हवा! मी तुमच्या या मताशी सहमत आहे की प्रेक्षकाला दोन घटका करमणूक हवी असते पण मी या मुद्द्याशी सहमत नाही की लेखकाची गरजच नसते. मुळात तुमचे हे जे फॉर्मुले आहेत ते कोठून आलेत? ते तुमचे स्वतःचे नाहीत. एखाद्या लेखकाची एखादी कादंबरी हिट होते त्यावर पिक्चर बनतो आणि मग त्याची कॉपी करून तसे अनेक पिक्चर बनतात आणि मग त्याचा फॉर्म्युला होतो. म्हणजे त्याचे श्रेय लेखकालाच जाते शेवटी! अर्थात असेही असेल की एखादा दिग्दर्शक मुळातच एक प्रतिभावान लेखक किंवा संवाद लेखक असू शकतो. असा योग म्हणजे दुग्धशर्करा योग्य किंवा सोने पे सुहागा म्हणावा लागेल! पण विजय शेवटी लेखकाचाच!"

तेवढ्यात फोन वाजला.

"आपल्याला भारतातील एका प्रेक्षकाकडून फोन आलाय. आपण तो फोन घेऊया, हॅलो?"

"हॅलो, मी एक सामान्य सिनेमा रसिक बोलतोय. माझे नाव जय भोसले! मी केव्हापासून तुमची चर्चा बघतोय, ऐकतोय. मला काहीतरी सांगायचं आहे. मी जे सांगणार ते माझं आणि माझ्या अनेक मित्राचं मत आहे!"

"सांगा जय आपले मत! आम्ही सगळे ऐकायला उत्सुक आहोत!"

"तर मी काय म्हणत होतो की छब्बीसिया साहेबांची गाड्यांची तोडफोड आम्हाला आवडत नाही. आपल्या देशात लय गरिबी आहे. नुसत्या मनोरंजनासाठी गाड्या तोडफोड कशापायी करायच्या? त्यापेक्षा गरिबाला एकवेळ भाकर दिली तर तो दुवा देईल. आणि आमाला लेखकाशिवाय पिक्चर सहन होत नाही. पिक्चरला लेखक पायजेलच पायजेल! आणि एखादाच फॉर्म्युला एकदाच फक्त हिट होतो पण नंतर फ्लॉप होतात. त्या के. के. सुमनवर आम्हाला लय डाऊट येतो राव! इतके सगळे पिक्चर तो स्वतःच लिहितो आणि डायरेक्ट पण करतो? शक्य वाटत नाही राव. सुमन एवढाss हुशार आहे हे त्याच्या एकंदरीत अवतारावरून वाटत नाय!" आणि फोन कट झाला. प्रेक्षकांत एकच हशा पिकला आणि सुमन अस्वस्थ झाला. राजेश मनातून आनंदला....

सगळी चर्चा सॉलिड इंटरेस्टिंग होत चालली होती पण डोळ्यांवर आता झोपेचा अंमल येत चालला होता त्यामुळे सुप्रियाने टीव्ही बंद करून टाकला मात्र सुबोधकडे बेडरूमकडे जातांना तिच्या मनात थोड्या वेळाकरता राजेशबद्दल विचार येऊन गेले, "राजेशच्या मनात काहीतरी नक्की वेगळे आहे. काहीतरी आहे ज्यासाठी तो धडपडतोय! राजेशचे इतर प्रोग्राम सुद्धा बघितले पाहिजेत. तो नक्की काहीतरी वेगळे करेल असं एकंदरीत वाटतंय! अगदी राजेशच्या पुन्हा प्रेमात पडावेसे वाटते आहे! छे! सुप्रिया! काय हे!" असे म्हणून तिने सुबोधला मागून येऊन मिठी मारली...
 
स्टोरी वाचल्या बद्दल आभारी आहे
 
वलय - प्रकरण ३१

काही दिवस मुंबईबाहेर असल्याने डी. पी. सिंग हे रागिणीबद्दलच्या टीव्हीवरील गौप्यस्फोटाबाबत मौन बाळगून होते. मौन बाळगण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते सूरज ब्राझीलहून परतण्याची वाट बघत होते. तो कालच आला होता. मात्र मुंबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सूरजशी फोनवर बोलले तेव्हा मी सगळे बघतो, तुम्ही चिंता करू नका असे आश्वासन सूरजने त्यांना दिले होते.

कालांतराने एका हिंदी टिव्ही शोच्या सक्सेस पार्टीला जुहू येथील फाईव्ह स्टार हॉटेल "गोल्डन सिटीझन" मध्ये रविवारी संध्याकाळी रागिणी, सूरज, डी. पी., सुभाष भट, पत्रकार म्हणून राजेश, तसेच सोनी बनकर, तिच्या शो मधील इतर कलाकार यांच्यासह सिने क्षेत्रातील अनेकांना आमंत्रण होते. एव्हाना सोनी बनकर रियालिटी शो जिंकली होती. जवळपास महत्वाची अशी सगळी टीव्ही फ्रॅटर्निटी आणि काही प्रमाणात बॉलिवूड मधील मंडळी सुद्धा येणार होती. ती सक्सेस पार्टी आयोजित केली होती सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या एका ऐतिहासिक टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी!! कारण त्यांच्या "चक्रवीर राजा विक्रमसेन!" या शोचे नुकतेच दोनशे भाग पूर्ण झाले होते.

प्रथम टीव्हीवरील त्या न्यूजने अस्वस्थ झालेली रागिणी पार्टीला यायला तयार नव्हती पण सूरजने आग्रह केला. विशेष म्हणजे तो रागिणीच्या भूतकाळाचा गौप्यस्फोट करणारा टीव्ही जर्नालिस्ट "सुधीर श्रीवास्तव" पण तेथे येणार होता. त्या टीव्हीवरील कार्यक्रमाबद्दल जास्त टेन्शन घेऊ नको असे सूरजने रागिणी सांगितले तसेच सूरजने त्या पत्रकारावर लीगल ऍक्शन घ्यायचे ठरवले होते. पण जर का त्याने माफी मागितली तर प्रकरण मिटवून टाकू असे रागिणीला सांगितले. असे अनेक धक्के सेलिब्रिटीजना पचवावे लागतात असे तो म्हणाला. ती शेवटी पार्टीला तयार झाली होती.

पण कितीही केले तरी त्यादिवशीनंतर आजतागायत ती एका अनामिक दडपणाखाली होती. आतापर्यंत तिने शिताफीने पत्रकारांपासून लपवलेले सत्य नेमके सूरज ज्यादिवशी ब्राझीलला गेला त्यानंतरच कसे काय पत्रकारांना समजले? राहुलने तर नाही ना हे सगळे केले? पण सूरजला राहुलबद्दल सांगितल्यानंतर राहुलचा फोन येणे बंद का झाले? सूरजने त्याला धमकावले असावे! त्यामुळेच राहुलने टीव्ही चॅनेलला माझे पूर्वायुष्य सांगितले असेल!!

पार्टीच्या दिवशी संध्याकाळी कारमध्ये मुंबईतील रस्त्यांवर सूरजची कार धावत होती. सूरजसोबत रागिणी बसली होती-

"एनिवे रागिणी, राहुलचा फोन तुला पुन्हा आला होता का?"

"नाही!"

"पुन्हा फोन आलाच तर आपण काही ठोस ऍक्शन घेऊ! तसे मी त्याचा फोटो माझ्या काही विश्वासू सहकाऱ्यांना दाखवून काही माहिती मिळतेय का हे गुप्त रीतीने तपास करायला सांगितलंय. पोलिसांत गरज पडली तरच जाऊया! कारण पोलिसांचा उगाच ससेमिरा मागे लागतो, यु नो!"

यानंतर रागिणी काही न बोलता शांत विचार करत राहिली. म्हणजे अजून तरी सूरज राहुलशी डायरेक्ट बोलला नाहिए तर! सूरज ब्राझीलहून आल्यानंतर थोडा बदलला आहे असे तिला वाटल्यावाचून राहवले नाही. पण कामाच्या व्यापामुळे तसे असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले. बराच वेळ कुणी कुणाशी बोलत नव्हतं…

"गोल्डन सिटीझन" च्या टेरेसवर म्हणजे बाराव्या मजल्यावर खास मोठे पार्टी लाऊंज होते. ते आजच्या पार्टीसाठी बुक केले होते. जसा अंधार पडायला लागला तसे टीव्ही आणि बॉलिवूड मधील चमकते वलयांकित तारे एकेक करून पार्टीत यायला सुरुवात झाली.

आजकाल टीव्ही पण बॉलिवूड इतकाच ग्लॅमरस झाला असल्याने एकेकाळी छोट्या पडद्याला नाकारणारे अनेक बॉलिवूड मधील लोक टीव्ही पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावत. डिनर जॅकेट, डेंनीम जॅकेट, जीन्स पॅन्ट, शेरवानी, स्लीवलेस टीशर्ट , ग्रे, ग्रीन, ब्लु ब्लेझर्स अशा अनेक प्रकारच्या पोशाखात टीव्ही तसेच बॉलिवूड मधली पुरुष कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी, गीतकार, संगीतकार, गायक मंडळी अवतरत होती. ऐतिहासिक आणि पौराणिक सिरीयलचे कलाकार मात्र थोडे वेगळ्या वेशात आले होते कारण शूटिंग साठी जुन्या काळातील व्यक्तिरेखांप्रमाणे त्यांना तसे राहाणे भाग होते. कुणी टक्कल केलेले तर कुणी केस वाढवलेले असे सगळेजण आले होते.

तर स्त्रियांपैकी काहीजणी सलवार, स्लीव्हलेस टॉप, जीन्स, लो कट् ब्लाऊज आणि मुद्दाम कमरेखाली नेसलेल्या साड्या, तर काहीजणी अतिशय शॉर्ट स्कर्ट आणि खूप मोठा क्लिव्हेज दाखवणारे शॉर्ट टॉप, पार्टी गाऊन्स, वन पीस टॉप, वन पीस गाऊन अश्या प्रकारचे कपडे घालून आणि हातात पर्स आणि महागडे मोबाईल मिरवत येत होत्या. अनेक ग्लॅमरस स्त्रिया एकेक करून पार्टीत येत होत्या. त्यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या सेंट्सचा सुवास त्या पार्टीला एक वेगळीच अनुभूती देत होता. काही स्पॉन्सर बिझिनेसमॅन मंडळींनीही हजेरी लावली होती. सोनी बनकर अंगाला घट्ट आणि फिट बसणारा, तिचे स्त्रीत्व दर्शवणारे अंग उठून दिसेल असा स्लीव्हलेस टॉप आणि अतिशय छोटी पण हिप्सचा गोलाकार ठळकपणे दर्शवणारी जिन्सची पॅन्ट घालून आली होती. त्यामुळे तिच्या गोऱ्या उघड्या पुष्ट पायांकडे आणि मांड्याकडे सगळ्या पार्टीतील पुरुषांची नजर होती. काही स्त्रिया तिला लाभलेले असे सौंदर्य पाहून मनातल्या मनात जळून नाक मुरडत होत्या. सोनी बनकर या पार्टीत तिच्या रियालिटी शोमधील कोस्टार "भूषण ग्रोवर" याच्यासोबत पोहोचली होती.

सोनीच्या चेहेऱ्यावरचा नेहमीचा अल्लडपणा आणि उच्छृंखलपणा ओसंडून वाहात होता आणि तो तिच्या कपड्यांशी मॅच होत होता. भूषण ग्रोवरचे दणकट बाहू पकडून पार्टीत येतांना तिला खूप गर्व आणि आनंद वाटत होता.

सुभाष भट त्यांची साडी घातलेली पत्नी रजनी घोसाळकर सोबत नुकतेच पोहोचत होते. सुभाष भटना आज सोनी बनकरला त्यांच्या आगामी हॉरर, थ्रिलर म्युझिकल चित्रपटात घेण्याबद्दलची औपचारिक घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. तशी BEBQ च्या प्रोड्यूसरने थोडी पूर्वकल्पना सोनीला दिली होतीच!

पार्टीत स्टार्टर्स आणि सॉफ्ट ड्रिंक सर्व्ह केले जात होते. रागिणी आणि सूरज "ऑन द वे" होते तर राजेश घरून निघण्याच्या बेतात होता. तो बहुदा अश्या पार्ट्यांना हाफ स्लीव्ह ग्रे टी शर्ट आणि जीन्स घालायचा पण यावेळेस त्याने ग्रीन ब्लेझर निवडले जे त्याने नुकतेच ऑनलाइन मागवले होते खास अशा पार्ट्यांसाठी ज्यात तो फिल्मी पत्रकार म्हणून जात असे.
 
वलय - प्रकरण ३२

शक्यतो सुनंदा त्याच्यासोबत अशा पार्ट्यांना येत नसे. फक्त एक दोनदा ती आली होती पण तिला ग्रामीण जीवनाची सवय अंगवळणी पडली असल्याने अशा पार्ट्यांना तिला अवघडल्यासारखे वाटे. मध्यन्तरी राजेशची आई त्यांचेकडे राहून गेल्यानंतर तिची एक दूरची काकू दोन महिन्यापासून त्यांचेकडे राजेशच्या इच्छेविरुद्ध येऊन राहात होती कारण सुनंदाला शहरात करमत नव्हते. काकू राहायला आल्यापासून सुनंदा राजेशवर संशय घ्यायला लागली कारण ती काकू सुनंदाला नेहेमी राजेश नसताना असे काहीतरी सांगायची ज्यामुळे तिला राजेशवर संशय निर्माण होईल!

"या फिल्मी क्षेत्रात काय खरं नसतं बरं! बायका लै लफडेबाज असत्यात! आपला मतलब साध्य करायला त्या कायबी करायला तयार व्ह्त्यात! माझ्या एका दूरच्या चुलत भावाकडून म्या ऐकलंया तसं! तो शुटिंगच्या ठिकाणी स्पॉट-बाय आसतो. त्यो सांगतो की त्यानं लै येळा एका कारमंदी एका फेमस नटीला एका लगीन झालेल्या डायरेक्टर सोबत लव्ह करताना पायलंय, त्या हिरोईनचा नवरा एक जानमाना यापारी हाय, बिझीनेशमॅन! त्याला हे लफडं माहिती नाय! नायतर..." विविध प्रकारे अशिक्षित हातवारे करून बांगड्यांचा खळ खळ आवाज करत ती अशा ऐकीव सुरस आणि चमत्कारिक कथा सुनंदाला सांगायची.

"खरंच कावो काकू असं असतं?" गावभोळी सुनंदा तिच्या बोलण्यात यायची.

"असतं मंजे? बिलकुल असतं! मला तो चुलत भाऊ अजुन काय काय सांगत आसतो! न सांगितलेलं बरं! आन या बायका राजेशसारक्या सध्यासुध्या माणसाला लवकर जाळ्यात ओढत्यात! असं झालं तर तुझा संसार संपलाच की सुनंदे! तू त्याच्यावर लक्ष ठिव! त्याच्या बोलण्या वागण्यात काय बदल होतो का, त्याच्या शर्ट, पॅन्टवर कसला बाईचा लिपस्टिक, लांब केस बारीक तपासत जा, शरीराचा बदललेला वास ओळखत जा म्हणते मी! काय? तुला आता हे सांगायला नको! बाई माणसाला माहित पायजेत या गोष्टी! श्रेयापदा आणि जयदेवी या नट्यांचे पिक्चर पहाते ना तू नेहमी टीव्हीवर? त्यातून शिकत जा ना जरा!"

"व्हय! व्हय व्हय नक्की!", सुनंदा आणखीनच गोंधळून जायची आणि मान डोलवायाची.

"शक्य झालं ना तर त्याला म्हणा ही पत्रकार, टीव्ही सिनेमा वाली नोकरी सोडून दे आणि दुसरीकडे हाफिसात नोकरी कर! 9 ते 5", काकू मोलाचा सल्ला द्यायच्या. त्यांना राजेश सुनंदाच्या संसाराबद्दल काय आकस होता माहीत नाही पण जणू काही त्यांचा चाललेला सुखाचा संसार तिला सहन होत नसावा.

"नाही पण काक्कु! ते तर त्यांचे स्वप्न आहे! ते हे क्षेत्र ही नोकरी कधीही सोडणार नाही! ते मला तसं बोलले होते मागे!", सुनंदा म्हणायची.

मग ती "काक्कु" वेगवेगळे उपाय सांगे आणि मग सुनंदा राजेशच्या मागे तगादा लावायला लागली की दुसरीकडे नोकरी शोधा आणि त्याचेवर संशय घ्यायची. राजेश सुरवातीला वाद टाळण्यासाठी काही बोलायचा नाही पण नंतर वाद व्हायला लागले तेही अगदी मोठ्याने. राजेशला काकूंवर संशय होताच पण त्याचेकडे काही पुरावा नव्हता आणि बोलायला सोयही नव्हती.

सासू सुनेच्या सिरीयलसाठी तो अनेक कथा लिहायचा ज्यात संसारात लावालावी करणारी अनेक स्त्री पात्रे असायची पण तशा प्रकारचं एक जिवंत पात्र त्याच्या घरात आज ठाण मांडून बसलं होतं आणि तो काहीही करू शकत नव्हता! त्याचे जीवन म्हणजे त्याने लिहिलेली कादंबरी थोडेच आहे ज्याला तो हवे तसे वळण देईल?

सध्या तो त्याच्या प्रोफेशनल लाईफ आणि त्याच्या महत्वाकांक्षेकडे जास्त लक्ष देत होता. समिरणने त्याच्या म्हणण्यानुसार हिंदी चित्रपटाचे काम् सुरु केले होते. राजेशने त्या चित्रपटाच्या लेखनाचे काम संपवले होते. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरु होते. विशिष्ट दिवशी समिरण त्याला सेटवर बोलवून त्याचे इनपुट्स घ्यायचा. इकडे त्याचे फिल्मी लेखन तसेच टीव्हीवरील त्याचे फिल्मी कार्यक्रम लोकप्रियता मिळवत होते. के के सुमन कडे त्याची आणि त्याच्या टीमची वक्रदृष्टी होतीच!

आजच्या पार्टीत के के सुमन पण येणार होता कारण आता तो म्हणे यापुढे टीव्ही सिरियल्स पण प्रोड्यूस आणि डायरेक्ट करणार होता असे राजेशला त्याच्या टीममधील अशा खबऱ्यांनी सांगितले होते ज्यांना त्याने सेटवर आणि इतर ठिकाणी छोटी मोठी कामे मिळवून दिली होती आणि ज्यात ते खूप खूश होते कारण त्यांना विविध स्टार्सच्या आसपास वावरायला मिळायचे!

सारंग सोमैया हापण आता एका मराठी साप्ताहिकासाठी टीव्ही स्टार्सच्या मुलाखती घेणारा एक पत्रकार बनला होता. त्यानिमित्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात त्याचा वावर वाढला होता. या सगळ्या गोष्टी यशस्वीपणे मॅनेज करतांना घरी निर्माण झालेल्या या "साँस बहू टाईप" प्रॉब्लेमचे मात्र त्याचेकडे सोल्युशन नव्हते.
 
Back
Top